निकालपत्र
निकाल दिनांक – ०९/०३/२०२१
(द्वारा मा.अध्यक्ष : श्री.विजय चंद्रलाल प्रेमचंदानी)
__________________________________________________________
१. तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ अंतर्गत सदर तक्रार दाखल केलेली आहे.
२. तक्रारदाराने तक्रारीत असे कथन केलेले आहे की, तक्रारदार क्रमांक १ व २ हे शेतकरी असुन शेतीचा व्यवसाय करतात. तक्रारदार क्रमांक १ हे तक्रारदार २ चा मुलगा आहे. दिनांक २३-०६-२०१६ सामनेवाले क्रमांक २ श्रमीक कृषी सेवा केंद्र यांच्या दुकानातुन सामनेवाले क्र.१ महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ यांच्या कंपनीने तयार केलेले भुईमुग पिकाचे टॅग २४ या जातीचे २० कि.ग्र. बियाणे विकत घेतले होते. त्याबाबत श्रमीक कृषी सेवा केंद्र यांचे मालक यांनी तक्रारदार यांचेकडुन घेतलेल्या भुईमूग पिकाच्या बियाण्यासाठी रक्कम रूपये २,३३०/- मोबदला घेतलेला होता.
३. दिनांक २६-०६-२०१६ रोजी अनुकुल वातावरण असल्यामुळे तसेच जमीनीत पुरेसा ओलावा असल्याचे खात्री करून भुईमुग पिकाची पेरणी केली. परंतु सदरील भुईमुग पिकाचे बियाणे पेरलेल्या शेतामध्ये दहा दिवस उलटूनही पिकाची उगवण झाली नाही म्हणुन तक्रारदाराने बियाणे का उगवले नाही, याबाबत दिनांक ०५-०७-२०१६ रोजी शेतात जाऊन नमुना दाखल काही बियाणे उकरून पाहीले असता त्यावेळी सदरील भुईमुग बियाणे जागेवर कुजून गेल्याचे दिसून आले. भुईमुग पिकाची उगवण झाली नसल्याने तक्रारदार यांनी दिनांक ०८-०७-२०१६ रोजी तालुका कृषी अधिकारी पंचायत समिती, तालुका कृषी अधिकारी कृषी विभाग संगमनेर यांच्याकडे लेखी तक्रारी दाखल केल्या. दिनांक १३-०७-२०१६ रोजी तालुका बियाणे तक्रार निवारण समिती तसेच श्रमीक कृषी सेवा केंद्र प्रतिनिधी यांनी तक्रारदाराचा गट नंबर ६२४/१ मध्ये येऊन तक्रारी मधील व सर्व बाबीची पडताळणी करून जागेवर शेतातील नमुण्यादाखल बियाण्यांची पाहणी केली व पाहणी केली असता बियाणे कुजलेले आढळुन आले आहे. त्यामुळे बियाणांचा पंचासमक्ष पंचनामा केला. सामनेवाले यांनी तक्रारदाराला सदोष बियाणे विकलेबाबत अभिप्राय अहवालामध्ये नोंदविण्यात आलेला आहे. त्यानुसार सामनेवाले क्रमांक २ यांच्याकडे दिनांक ०८-०७-२०१६ रोजी प्रत्यक्ष तोंडी तक्रार केली, परंतु सामनेवाले यांनी त्याबद्दल कोणतेही उत्तर किंवा दाद दिली नाही. म्हणुन तक्रारदाराने वकिलामार्फत दिनांक २४-१०-२०१६ रोजी सामनेवाले क्रमांक १ व २ यांना नोटीस पाठविली. सामनेवालेने दिनांक ३०-११-२०१६ रोजी तक्रारदाराला नोटीसीचे खोटे उत्तर पाठविले. तक्रारदाराला जमीनिची नांगरणी, मजुरी व भुईमुग पिकाची बियाण्यांचा खर्च व इत्यादीचा खर्च मिळावा तसेच मानसिक व शारीरिक त्रास झाला असल्याने तक्रारदाराने सदर तक्रार आयोगासकक्ष दाखल केलेली आहे.
२. तक्रारदाराची तक्रार स्विकृत करून सामनेवाले यांना नोटीस काढण्यात आली. नोटीस प्राप्त झाल्यानंतर सामनेवाले प्रकरणात हजर झाले व निशाणी १७ वर सामनेवाले क्रमांक १ यांनी कैफीयत दाखल केली. त्यात सामनेवालेने तक्रारदाराने तक्रारीत लावलेले आरोप अमान्य आहे, असे नमुद केलेले आहे व असे नमुद करण्यात आलेले आहे की, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादीत कंपनी बियाणे उत्पादीत केल्यानंतर व शासकीय प्रयोग शाळेत चाचणी केल्यानंतर व त्यांचेकडुन उगवण शक्तीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर बिज प्रामाणिकरण यंत्रणा यांचेकडुन बियाणे विक्रीचा मुक्तता अहवाल प्रमाणपत्र दिले जाते व त्यानंतर सदर बियाणेची विक्री केली जाते. तक्रारीत बीज प्रमाणीकरण यंत्रणा आंध्र प्रदेश यांना आवश्यक पार्टी केलेले नसल्याने सदर तक्रार खारीज होणेस पात्र आहे. पुढे असे नमुद केलेले आहे की, सदर अहवाल तालुका तक्रार निवारण समितीने महाराष्ट्र सरकारच्या परिपत्रकाप्रमाणे तयार केलेला नाही व अहवालामध्ये नोंदविलेला अभिप्राय पाहता प्रमाणित बियाणे पुरवठा केला आहे, समान प्लॉटची पाहणी करून प्रतठरवता येईल. परंतु तालुका तक्रार निवारण समितीने समांतर प्लॉटची पाहणी केलेली नाही. भुईमुग बियाणे हे जमीनीत जास्त खोलवर गेल्यास किंवा त्यास पाण्याचे प्रमाण जास्त झाल्यास बियाणे कुजू शकते, भुईमुग बियाणास हवामान, तापमाण, दिलेली खते, पाण्याचा प्रमाणात त्याचा लागवडीचा हंगाम, त्याची पेरणीची किंवा लागवडीची पध्दत यावर बियाणे उगवन अवलंबून असते व त्याचा परिणाम बियाणाचे उगवण शक्तीवर किंवा कुजनेवर होतो त्यास, बियाणे जबाबदार नाहीत. सामनेवालेने तक्रारदारास दिलेले बियाणे मुळीच निकृष्ठ नव्हते व नाही. सदर तक्रार खोट्या स्वरूपाची असल्याने खारीज करण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.
३. सामनेवाले क्रमांक २ यांनी निशाणी ३० वर कैफीयत दाखल केली. त्यात सामनेवाले क्रमांक २ यांनी असे नमुद केलेले आहे की, तक्रारदाराने सामनेवाले क्रमांक २ यांचेविरूध्द लावलेले आरोप खोटे असुन त्यांना नामंजुर आहे. सामनेवाले क्रमांक २ यांनी सामनेवाले क्रमांक १ यांनी उत्पादित केलेले भुईमुग पॅक स्वरूपाचे बियाणे तक्रारदाराला विक्री केलेले आहे. त्यामध्ये कुठलाही बदल केलेला नाही व बीज प्रमाणीकरण यंत्रणा, आंध्र प्रदेश यांना आवश्यक पार्टी म्हणुन तक्रारीमध्ये सामील केले नसल्याने सदर तक्रार खारीज होणेस पात्र आहे. तालुका बियाणे तक्रार निवारण समिती यांनी तक्रारीत दाखल केलेला अहवाल महाराष्ट्र सरकारच्या परिपत्रकाप्रमाणे तयार केलेला नाही व सदर अहवालामध्ये सामनेवालेने नोंदविलेला अभिप्राय पाहता प्रामाणित बियाणे पुरवठा केलेला आहे व समान प्लॉटची पाहणी करून प्रत ठरवता येईल असे म्हटलेले आहे. परंतु तालुका तक्रार निवारण तालुका तक्रार निवारण समितीने समांतर प्लॉटची पाहणी केलेली नाही व भुईमुग बियाणे हे जमीनीत जस्त खोलवर गेल्यास किंवा त्यास पाण्याचे प्रमाण जास्त झाल्यास बियाणे कुजू शकते, भुईमुग बियाणास हवामान, तापमाण, दिलेली खते, पाण्याचा प्रमाणात त्याचा लागवडीचा हंगाम, त्याची पेरणीची किंवा लागवडीची पध्दत यावर बियाणे उगवणे अवलंबून असते व त्याचा परिणाम बियाणाचे उगवण शक्तीवर किंवा कुजनेवर होतो, त्यास बियाणे जबाबदार नाहीत. तक्रारदाराला दिलेल्या बियाण्यामध्ये कुठलाही दोष नव्हता. सदर तक्रार खोटी दाखल केलेली असुन ती खारीज करण्यात यावी, अशी विनंती केली आहे.
४. तक्रारदाराची दाखल तक्रार, दस्तऐवज, सामनेवाले क्रमांक १ व २ यांनी दाखल केलेला जबाब. तक्रारदाराने दाखल केलेले पुराव्याचे शपथपत्र, लेखी युक्तिवाद व तोंडी युक्तिवाद याचे अवलोकन केले असता आयोगासमक्ष खालील मुद्दे विचारात घेण्यात येत आहे.
अ.नं. | मुद्दे | निष्कर्ष |
(१) | तक्रारदार हे समानेवालेचे ग्राहक आहे आहेत काय ? | होय |
(२) | बीज प्रमाणीकरण यंत्रणा, आंध्र प्रदेश यांना आवश्यक पार्टी म्हणुन तक्रारीत सामील करणे आवश्यक होते काय ? | नाही |
(३) | सामनेवाले क्रमांक १ व २ यांनी तक्रारदाराप्रती अनुचीत व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे काय ? | होय |
(४) | आदेश काय | अंतिम आदेशा प्रमाणे |
विवेचन
५. मुद्दा क्र. (१) : तक्रारदार क्रमांक १ व २ हे व्यवसायाने शेतकरी असुन सामनेवाले क्रमांक १ यांचे कंपनीचे व सामनेवाले क्रमांक २ या विक्रेत्याकडुन भुईमुग पिकाचे बियाणे विकत घेतले होते व त्याकरीता तक्रारदाराने सामनेवालेकडे रक्कम रूपये २,३३०/- मोबदला दिला होता, ही बाब तक्रारदाराने निशाणी ६/१ वर दाखल टॅक्स इनव्हॉईस यावरून सिध्द होते. तक्रारदार क्रमांक १ व २ हे सामनेवालेचे ग्राहक आहेत, असे सिध्द होते. सबब मुद्दा क्रमांक १ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
६. मुद्दा क्र. (२) : सामनेवालेने तक्रारदाराला विकलेले बियाणे हे बीज प्रमाणीकरण यंत्रणा, आंध्र प्रदेश यांनी प्रमाणपत्र दिलेले होते, या संदर्भात सामनेवाले क्रमांक १ व २ यांनी निशाणी २० वर दस्त दाखल केलेले आहे. परंतु सदर बियाण्याची उगवण महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादीत कंपनी बियाणे यांनी केली असल्याने बीज प्रमाणीकरण यंत्रणा, आंध्र प्रदेश यांच्याकडुन प्रमाणपत्र मागण्याची आवश्यकता का पडली, याविषयी कोणताही खुलासा सामनेवाले क्रमांक १ व २ कडे जबाबात नोंदविण्यात आलेला नाही. तसेच सदर प्रमाणपत्रदिनांक ३०-०५-२०१६ रोजी देण्यात आलेले असुन सदर बियाणे दिनांक २३-०६-२०१६ रोजी तक्रारदाराला विकण्यात आलेले होते. सदर प्रामणपत्रात असे नमुद करण्यात आलेले आहे की, वादातील बियाणे तसेच प्रमाणपत्रची वैधता ९ महिनेपर्यंत आहे. परंतु सदर बियाणे हे योग्य वातावरणात ठेवले असेल तर दिनांक ३०-०५-२०१६ ते २३-०६-२०१६ पर्यंत सदर बियाणे योग्य वातावरणात ठेवण्यात आलेले होते किंवा नाही, ही बाब सिध्द करण्याची जबाबदारी सामनेवाले क्रंमाक १ व २ यांची होती. तसेच सामनेवाले क्रमांक १ व २ यांनी या संदर्भात जबाबात कोणताही खुलासा सादर केलेला नाही. बीज प्रमाणीकरण यंत्रणा, आंध्र प्रदेश यांना पक्षकार म्हणुन सामील करणे आवश्यक नव्हते, असे आयोगाचे मत ठरले आहे. सबब मुद्दा क्रमांक २ चे उत्तर नकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
७. मुद्दा क्र. (३) : तक्रारदार यांनी सामनेवाले क्रमांक १ व २ यांचेकडुन खरेदी केलेले भुईमुगाचे बियाण्याची लागवण तक्रारदाराचे शेतात केली, ही बाब तक्रारदाराने निशाणी ६/१, ६/२ तसेच ६/५ वर दाखल दस्तऐवजावरून सिध्द होत आहे. तक्रारदाराने निशाणी ६/५ वर पाहणी अहवालाची मुळ प्रत दाखल केली आहे. त्यात तालुका तक्रार निवारण समिती यांनी दिनांक १३-०७-२०१६ रोजी प्रत्यक्ष तक्रारदाराचे शेतावर जाऊन शेतात पाहणी करून अहवाल तयार केला आहे, असे दिसुन येते. त्यात तज्ञांनी नोंदविलेला अभिप्राय असा आहे की, शेतक-याच्या शेतावर प्रत्यक्ष पाहणी करिता असे लक्षात येते की, भुईमुग बियाणे सदोष असुन उगवणक्षमता अतिशयम कमी आहे. बियाणे उकरून पाहिले असता कुजलेले आढळले.
यावरून असे सिध्द होते की, सामनवाले क्रमांक १ व २ यांनी तक्रारदाराला विकलेले बियाणे हे निकृष्ठ दर्जाचे होते व त्यामुळे तक्रारदाप्रती सामनेवाले क्रमांक १ व २ यांनी अनुचीत व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे, असे सिध्द होते. सबब मुद्दा क्रमांक ३ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
८. मुद्दा क्र. (४) : तक्रारदाराने सदर तक्रारीत बियाणांचा खर्च किंवा पेरणी नांगरणी इत्यादीसाठी करण्यात आलेलया खर्चासंदर्भात पुरावा सादर केलेला नाही, ही बाब ग्राह्य धरून व मुद्दा क्रमांक १ ते ३ चे विवेचनावरून अंतीम आदेश पारीत करण्यात येत आहे.
अंतीम आदेश
१. तक्रारदार यांची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येत आहे. २. सामनेवाले क्रमांक १ व २ यांनी वैयक्तिकरित्या किंवा संयुक्तिकरित्या तक्रारदाराला बियाण्याची रक्कम रूपये २,३३०/- (अक्षरी दोन हजार तीनशे तीस मात्र) द.सा.द.शे. ८ टक्के व्याजासह रक्कम अदाहोईपर्यंत द्यावे. ३. सामनेवाले क्रमांक १ व २ यांनी वैयक्तिकरित्या किंवा संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना शारीरीक मानसिक त्रासापोटी प्रत्येकी रूपये २०,०००/- (अक्षरी रूपये वीस हजार) व तक्रारीचा खर्च रूपये १०,०००/- (अक्षरी रूपये दहा हजार) द्यावे. ४. वर नमुद आदेशाची पुर्तता सामनेवालेने आदेशाची प्रत मिळाल्यापासुन ३० दिवसांचे आत करावी. ५. आदेशाची प्रत उभयपक्षांना विनामुल्य देण्यात यावी. ६. सदर प्रकरणाची ‘क’ व ‘ब’ फाईल तक्रारदार यांना परत करण्यात यावी. |