श्री. सतीश देशमुख, सदस्य यांचे कथनांन्वये.
- आदेश -
(पारित दिनांक – 30/03/2013)
1. तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अंतर्गत दाखल सदर तक्रारीचा थोडक्यात आशय असा आहे की, तक्रारकर्त्यांनी वि.प.यांचे मौजा चिखली, ख.क्र.27/1, प्लॉट क्र. 44 वरील स्वराजपार्क या योजनेतील बंगला एकूण क्षेत्रफळ 1343.240 चौ.फु.चे, किंमत रु.9,40,000/- मध्ये विकत घेण्याकरीता दि.16.01.2006 रोजी वि.प.सोबत करारनामा केला व वेळोवेळी करारनाम्यानुसार रु.4,40,000/- वि.प.ला अदा केले.
उभय पक्षातील करारानुसार नियोजित कालावधीत वि.प. बांधकाम पूर्ण करुन देणार होते. तथापि, सदर बंगल्याचे बांधकाम हे नियोजित कालावधीत व ठरलेल्या किंमतीमध्ये पूर्ण करु शकत नसल्याचे वि.प.यांनी दि.16.01.2011 रोजी अन्य बंगले धारकांच्या घेतलेल्या सभेत सांगितले.
तसेच तक्रारकर्त्याद्वारे प्राप्त झालेली रक्कम रु.4,40,000/- ही 12% व्याजासह परत करण्याची तयारी दर्शविली व त्यानुसार वि.प.ने तक्रारकर्त्याला खालीलप्रमाणे धनादेश दिले.
अ.क्र. | धनादेश क्रमांक | दिनांक | रक्कम रु. |
1. | 220437 | 31.01.2012 | रु.1,00,000/- |
2. | 220435 | 06.02.2012 | रु.1,00,000/- |
3. | 220436 | 06.02.2012 | रु.1,40,000/- |
यापैकी धनादेश क्र. 220437 हा रु.1,00,000/- हा बँकेत वटविल्या गेला व अन्य दोन धनादेश वेळेस वटविण्याकरीता बँकेत सादर केले असता, “Effects not cleared; present again” व “Funds insufficient” या शे-यासहीत परत आले. (धनादेश वटविण्याकरीता नमूद केलेल्या तारख व परत आलेले धनादेशाचे पत्र नि.क्र.23 ते 26 वर आहे.)
करिता तक्रारकर्त्यांनी वि.प.ला प्रत्यक्ष भेटून व फोनद्वारे माहिती दिली, परंतू वि.प.ने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्यांनी वि.प.ला वकिलामार्फत दि.07.04.2012 रोजी नोटीस बजावली. परंतू वि.प.ने तक्रारकर्त्यांच्या नोटीसला उत्तर दिले नाही किंवा रक्कमही परत केली नाही. करिता तक्रारकर्त्यांनी खालील प्रार्थनेसह सदर तक्रार या मंचासमोर प्रतिज्ञापत्रावर दाखल केलेली आहे.
प्रार्थना -
1) रु.4,40,000/- पैकी दि.31.01.2.12 चे धनादेशाद्वारे प्राप्त झालेले रु.1,00,000/- वजा करुन उर्वरित रक्कम रु.2,40,000/- ही 12% व्याज दराने मिळावी.
2) झालेला मानसिक, शारिरीक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रु.50,000/- मिळावे.
3) तक्रारीच्या खर्चापोटी रु.7,500/- मिळावे.
2. तक्रारीचे अनूषंगाने मंचाने वि.प.ला नोटीस पाठविली असता, नोटीस प्राप्त होऊनही वि.प.ने आपले लेखी जवाब दाखल केला नाही व मंचासमोर उपस्थित झाले नाही. करिता मंचाने त्यांचेविरुध्द एकतर्फी प्रकरण पुढे चालविण्याचा आदेश पारित केला.
3. तक्रारकर्त्यांनी मंचासमोर केलेला तोंडी/लेखी युक्तीवाद व कागदपत्रांची पाहणी केली असता असे निदर्शनास येते की,
-निष्कर्ष-
4. तक्रारकर्ता व वि.प. यांचेमध्ये दि.16.01.2006 रोजी तक्रारीत नमूद ख.क्र.44 वर बांधकामासहित संपूर्ण रक्कम रु.9,60,000/- याप्रमाणे बंगला बांधून देण्याचा करार झालेला आहे.
5. वि.प.यांनी तक्रारकर्त्यांना बंगल्याचे अनूषंगाने ठरल्याप्रमाणे मागणी केलेल्या रकमेची तक्रारर्त्यांनी पूर्तता केलेली आहे.
6. तथापि, सदर बंगल्याचे बांधकाम हे ठरलेल्या रकमेत पूर्ण करणे शक्य नसल्याचे वि.प.ने स्वतः मान्य करुन, तक्रारकर्त्यांकडून घेतलेली रक्कम रु.4,40,000/- 12% व्याजासह परत करण्याचे स्वतः मान्य केले असून त्यानुसारच तक्रारकर्त्यांनी सदर तक्रारीत नमूद नि.क्र.23 ते 26 वर धनादेशाची प्रत दाखल केली आहे. सदर धनादेश हे न वटता बँकेतून परत आलेले आहे.
7. वि.प.ने तक्रारीची नोटीस प्राप्त होऊनही तक्रार दस्तऐवजासह नाकारलेली नाही किंवा मंचासमोर उपस्थित होऊन तक्रारीवर आपले म्हणणे दाखल केले नाही, यावरुन तक्रारीतील प्रतिज्ञापत्रावर असलेले तक्रारकर्त्याचे अभिकथन सत्य समजण्यास मंचाला हरकत वाटत नाही. वि.प.ची एकूण परिस्थितीमध्ये वर्तणूक बघता त्यांने तक्रारकर्त्यास देऊ केलेल्या सेवेत न्युनता ठेवलेली आहे ही बाब यावरुन स्पष्ट होते. करिता मंच खालील आदेश पारित करीत आहे.
-आदेश-
1) तक्रारकर्त्यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) वि.प.ला आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याकडून घेतलेल्या रकमेपैकी देय उर्वरित रक्कम रु.3,40,000/- ही द.सा.द.शे.12 व्याजासह दि.19.12.2006 पासून तर प्रत्यक्ष रक्कम अदा होईपर्यंत परत करावी.
3) वि.प.ने तक्रारकर्त्याला मानसिक, शारिरीक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रु.10,000/- व तक्रारीच्या खर्चाबाबत रु.5,000/- द्यावे.
4) सदर आदेशाची अंमलबजावणी वि.प.ने आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाचे आत करावी.