(मंचाचा निर्णय: श्रीमती जयश्री येंडे - सदस्या यांचे आदेशांन्वये)
-// आ दे श //-
(पारित दिनांक : 30/12/2011)
1. प्रस्तुत तक्रार तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारां विरुध्द मंचात दि.29.06.2011 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत
तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :-
2. प्रस्तुत प्रकरणातील तक्रारकर्त्याचे म्हणण्यानुसार त्याने गैरअर्जदारांचे प्रतिनिधीकडून अक्वॉ गार्ड रिव्हायवा वाटर प्युरिफाईड मशीन एकूण रक्कम रु.9,990/- एवढया मोबदल्यात विकुन दि.03.02.2009 रोजी विकत घेतली होती. सदर मशीनवर एक वर्षाची वारंटी होती. सदर मशीनचा वापर सुरु केल्यावर चार-पाच दिवसातच सदरची मशीन बंद पडली. गैरअर्जदारांनी सदरचा दोष तात्पुरता दुर करुन दिल्यानंतर पुन्ही दिड महिन्यानंतर सदरची मशीन बंद पडली. शेवटी दि.17.08.2010 रोजीच्या पत्रान्वये तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांना सदर दोष त्याच्या तांत्रीक प्रतिनिधीमार्फत दुर होत नसल्यामुळे सदर मशीन बदलवुन देण्याची विनंती केली. परंतु आजपावेतो गैरअर्जदारांनी वारंवार मागणी करुनही सदरचा दोष कायमचा दुर करुन दिला नाही, अथवा सदरची मशीन बदलवुन दिली नाही, ही गैरअर्जदारांची कृति सेवेतील कमतरता आहे.
3. मंचामार्फत गैरअर्जदारांना नोटीस बजावण्यांत आली असता ते मंचात हजर झाले असुन त्यांनी आपला लेखी जबाब खालिल प्रमाणे दिलेला आहे...
गैरअर्जदारांच्या कथनानुसार सदरची तक्रार चालविण्याचा या मंचाला अधिकार नाही. गैरअर्जदार यांनी सदरची मशीन त्याचे प्रतिनिधीमार्फत विकत घेतल्याचे तक्रारकर्त्याचे म्हणणे मान्य केलेले आहे. परंतु तक्रारकर्त्याचे इतर आरोप अमान्य केलेले आहेत गैरअर्जदारांच्या मते मशीनची किंमत ही रु.8,880/- एवढी असुन रु.1,110/- ही रक्कम तक्रारकर्त्याने शासनाकडे करापोटी भरलेली आहे. तक्रारकर्त्याने सदर मशीन वारंवार बंद पडत असल्याची तक्रार खोटी आहे. त्या संबंधात तक्रारकर्त्याने कुठलाही पुरावा सादर केलेला नाही. उलट तक्रारकतर्याचे तक्रारीवरुन गैरअर्जदारांनी मशीन दुरुस्त करुन दिल्यामुळे तक्रारीचे कुठलेही कारण उरलेले नसुन त्यांचे सेतेत कमतरता नसल्याचे नमुद केलेले असुन सदर तक्रार खारिज करण्याची मंचास विनंती केलेली आहे.
4. सदर तक्रार मंचासमक्ष मौखिक युक्तीवादाकरीता दि.12.12.2011 रोजी आली असता तक्रारकर्त्यातर्फे वकील हजर त्यांचा युक्तिवाद ऐकण्यांत आला, गैरअर्जदार गैरहजर. तक्रारीसोबत दाखल केलेल्या दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील प्रमाणे निष्कर्षाप्रत पोहचले.
-// नि ष्क र्ष //-
5. तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांचे प्रतिनिधीकडून अक्वॉ गार्ड रिव्हायवा वाटर प्युरिफाईड मशीन एकूण रक्कम रु.9,990/- एवढया मोबदल्यात दि.03.02.2009 रोजी विकत घेतली होती. त्यामुळे तक्रारकर्ता हा गैरअर्जदारांचा ‘ग्राहक’, ठरत असल्यामुळे सदरची तक्रार चालविण्याचा या मंचाला अधिकार आहे. तसेच सदर रकमेपैकी रु.1,110/- तक्रारकर्त्याने वॅटकरापोटी दिलेले होते, हे दस्तावेज क्र.1 वरुन स्पष्ट होत असुन सदर मशीनवर एक वर्षाची वारंटी होती हे दोन्ही पक्षांनी मान्य केलेले आहे.
6. तक्रारकर्त्याचे शपथपत्र व दस्तावेज क्र.2,3 व 4 पाहता या मंचाचे असे निदर्शनास येते की, सदरच्या मशीनमधे वारंटी कालावधीत दोष उत्पन्न झाल्यामुळे ती योग्य रितीने काम करीत नव्हती. तक्रारकर्त्याच्या मते गैरअर्जदारांनी सदरचा दोष दुर करण्याचा प्रयत्न करुनही सदरचा दोष दुर झाला नाही. तसेच तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांना दि.17.08.2010 रोजी पाठविलेल्या पत्रात देखील सदर बाब नमुद केलेली दिसुन येते. गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याचे सदरचे म्हणणे खोडून काढण्यासाठी कुठलाही सुस्पष्ट पुरावा सादर केला नाही. उलट आपल्या जबाबात तक्रारकर्त्याचे तक्रारीवरुन सदर मशीन दुरुस्त करुन दिल्याचे शपथेवरील जबाबात म्हटले आहे. म्हणजेच तक्रारकर्त्याचे सदर मशीनमधे दोष निर्माण झाला होता, ही बाब स्पष्ट होते. सदर मशीनवरचा वारंटी कालावधी जरी संपला असला तरी मशीनमधे दोष हा वारंटी कालावधीत निर्माण झाला होता, असे दिसुन येते. त्यामुळे ती विनामुल्य दुर करण्याची जबाबदारी ही गैरअर्जदारांची आहे, ती त्यांनी पार पाडली नाही म्हणून तक्रारकर्त्यास या मंचात दाद मागावी लागली. तसेच मशीनमधे उत्पादकीय दोष असल्यामुळे ती मशीन बदलवुन देण्यांत यावी ही तक्रारकर्त्याची मागणी पुराव्या अभावी या मंचाला मान्य करता येणार नाही.
वरील सर्व वस्तुस्थिती पाहता हे मंच खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-// अं ति म आ दे श //-
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते.
2. गैरअर्जदारांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्त्यास अक्वॉ गार्ड रिव्हायवा वाटर प्युरिफाईड मशीन दुरुस्त करुन द्यावी. तसेच सदर मशीनमधील दोष दुर होत नसल्यास संबंधीत पार्ट बदलवुन द्यावा यासाठी कुठलेही मुल्य आकारु नये.
3. गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.2,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.1,000/- अदा करावे.
4. वरील आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदारांनी आदेशाची साक्षांकीत प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी.