श्रीमती स्मिता चांदेकर, मा. सदस्या यांचे आदेशांन्वये.
1. तक्रारकर्तीने वि.प.ने तिच्या मृतक पतीचा विमा दावा न दिल्याने सदर तक्रार ग्रा.सं.का.2019 चे कलम 35 अन्वये तक्रार दाखल केलेली आहे.
2. तक्रारकर्तीची तक्रार अशी आहे की, तिचे मृतक पती शेषराव कोठीराम सायरे यांचे मालकीची मौजा खर्दुका, ता.सावनेर येथे भुमापन क्र. 36 ही शेतजमीन असून ते शेतीचा व्यवसाय करीत होते. तक्रारकर्तीच्या पतीचा दि.17.02.2020 रोजी अपघातात मृत्यु झाला. तक्रारकर्तीच्या पतीचा शेतकरी अपघात विमा काढला असल्याने तिने पतीच्या मृत्युपश्चात वि.प.क्र. 3 कडे संपूर्ण कागदपत्रांसह विमा दावा अर्ज सादर केला. परंतू तक्रारकर्तीला विमा दाव्याबाबतची कोणतीही माहिती वि.प.कडून मिळाली नाही. म्हणून तक्रारकर्तीने वि.प.ला दि.03.06.2021 रोजी वकीलामार्फत नोटीस पाठविली. परंतू सदर नोटीसाला वि.प.कडून कुठलेही उत्तर मिळाले नसल्याने तिने सदर तक्रार दाखल करुन विमा दाव्याची रक्कम रु.2,00,000/-, मानसिक व शारिरीक नुकसान भरपाई आणि तक्रारीच्या खर्चाची मागणी केलेली आहे.
3. सदर तक्रारीची नोटीस वि.प.क्र. 1 ते 3 ला पाठविली असता वि.प.क्र. 1 ते 3 यांनी लेखी उत्तर दाखल केले.
4. वि.प.क्र. 1 ने लेखी उत्तरामध्ये तक्रारकर्तीचे पती हे शेतकरी असून त्यांचा अपघातात मृत्यु झाल्याची बाब मान्य करीत उर्वरित संपूर्ण तक्रार नाकारली आहे. आपल्या विशेष कथनात वि.प.क्र. 1 ने असे नमूद केले आहे की, तक्रारकर्तीचे पती हे मालवाहक वाहन महिंद्र बोलेरो पीकअप क्र. एम एच 40 बी जी 3392 या मालवाहक वाहनाच्या डाल्यात बसून प्रवास करीत असतांना वाहन पलटी झाल्याने गंभीर दुखापत होऊन मरण पावले. अपघातसमयी तक्रारकर्तीचे पती मालवाहक वाहनामध्ये प्रवास करीत असल्यामुळे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत विमा रक्कम मिळण्यास अपात्र आहे. मृतक विमा धारक याने कायद्याचे उल्लंघन आणि गैरव्यवहार केला असल्यामुळे त्यांना झालेली दुखापत ही स्वतःहून ओढवून घेतलेली असल्यामुळे विमा पॉलिसीच्या अटींचा भंग केलेला आहे. त्यामुळे तक्रारकर्ती विमा दावा मिळण्यास अपात्र आहे. सदर बाब वि.प.क्र. 1 यांनी तक्रारकर्तीला दि.06.10.2021 रोजी विमा दावा रद्द केल्याचे पत्र पाठवून कळविलेली आहे. वि.प.क्र. 1 ने त्यांचे लेखी उत्तरात तक्रारकर्तीने वि.प.क्र. 1 कडे महाराष्ट्र शासनाचे परिपत्राकाप्रमाणे 45 दिवसाचे आत नोंदविले नसल्यामुळे ती विमा दावा मिळण्यास अपात्र आहे असा आक्षेप देखील नमूद केला आहे. तक्रारकर्तीने तिच्या तक्रारीत चुकीचे कथन करुन आयोगाची दिशाभूल केल्याने सदर तक्रार खारीज करण्याची मागणी वि.प.क्र.1 ने केलेली आहे.
5. वि.प.क्र. 2 ने लेखी उत्तरात असे नमूद केले आहे की, ते विमा कंपनी आणि अर्जदार यांच्यातील मध्यस्थ म्हणून काम करतात व त्यानुसार वि.प.क्र. 3 कडून प्राप्त झालेले विमा दावे पडताळणी करुन वि.प.क्र. 1 कडे मंजूरीकरीता पाठवितात. विमा दावा मंजूर अथवा नामंजूर करणे वि.प.क्र. 1 यांच्या अखत्यारीत असते व त्यामध्ये वि.प.क्र. 2 चा सहभाग नसतो. वि.प.क्र. 2 ने तक्रारकर्तीच्या पतीचा 17.02.2020 रोजी अपघाती मृत्यु झाल्याची बाब मान्य केली असून तिने वि.प.क्र. 3 कडे 31.07.2020 रोजी अर्ज सादर केला व सदर अर्ज जिल्हा कृषी अधिकारी यांचेमार्फत वि.प.क्र. 2 ला दि.24.08.2020 रोजी प्राप्त झाल्याचे नमूद केले आहे. वि.प.क्र. 2 यांनी सदर अर्ज व त्यासोबत जोडलेल्या कागदपत्रांची पडताळणी करुन विमा दावा दि.04.09.2020 रोजी वि.प.क्र. 1 यांचेकडे पाठविला. वि.प.क्र. 1 ने सदर विमा दावा विमाधारक हा मालवाहक वाहनातून प्रवास करीत असल्यामुळे कायद्याचे उल्लंघन केल्याने दि.06.10.2020 रोजीच्या पत्राद्वारे तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर केला. वि.प.क्र. 2 ने त्यांची जबाबदारी व्यवस्थित पार पाडल्यामुळे सेवेत कुठलाही कसुर केला नाही, म्हणून त्यांचेविरुध्दची तक्रार खारिज करण्याची मागणी केली.
6. वि.प.क्र. 3 ने लेखी उत्तर दाखल करुन तक्रारकर्तीच्या पतीचा विमा दावा हा Death due to negligence या सबबीखाली रद्द करण्यात आला असे नमूद केले आहे. परंतू मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत जिल्हा संनियंत्रण समितीच्या सभेच्या इतिवृत्तामध्ये सदर प्रकरण हे विमा दाव्यास पात्र असून विमा दावा मंजूर करुन अपघातग्रस्ताचे वारसदारास विमा योजनेचा लाभ देण्याचे आदेश मा. जिल्हाधिकारी यांनी विमा कंपनीस दिल्याचे नमूद केले आहे.
7. तक्रारकर्तीने आणि वि.प.क्र. 1 ने लेखी युक्तीवाद दाखल केला. सदर प्रकरण तोंडी युक्तीवादाकरीता आल्यावर तक्रारकर्ती आणि वि.प.क्र. 1 चा तोंडी युक्तीवाद ऐकला. तसेच दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले असता आयोगाचे विचारार्थ उपस्थित मुद्दे आणि त्यावरील निष्कर्ष खालीलप्रमाणे.
अ.क्र. मुद्दे उत्तर
1. तक्रारकर्ती विरुध्द पक्षाची ग्राहक आहे काय ? होय.
2. तक्रारकर्तीची तक्रार विहित कालमर्यादेत आहे काय ? होय.
3. वि.प.च्या सेवेत त्रुटी व अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब आहे काय? होय.
4. तक्रारकर्ती काय आदेश मिळण्यास पात्र आहे ? अंतिम आदेशाप्रमाणे.
8. मुद्दा क्र. 1 व 2 – तक्रारकर्तीने तक्रारीसोबत दाखल केलेल्या 7/12 वरुन मृतक शेषराव कोठीराम सायरे हे शेतकरी होते आणि महाराष्ट्र शासनाचे वतीने राज्यातील शेतक-यांचा विमा गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना या योजनेंतर्गत वि.प.क्र. 1 व 2 कडून काढण्यात आला असल्याने व वि.प.क्र. 3 ला त्याकरीता सहकार्य व आवश्यक ती मदत करण्याची सेवा देण्यास नियुक्त केल्याने तक्रारकर्ती ही मृतक पतीची विमा लाभार्थी म्हणून वि.प.क्र. 1 ते 3 ची ग्राहक ठरते. तसेच तक्रारकर्तीने सदर तक्रार दाखल करेपर्यंत तिला विमा दाव्याची रक्कम प्राप्त झाली नसल्याने वादाचे कारण सुरु असल्याने सदर तक्रार ही विहित कालमर्यादेत असल्याचे आयोगाचे मत आहे आणि म्हणून मुद्दा क्र 1 व 2 वरील निष्कर्ष होकारार्थी नोंदविण्यात येतात.
9. मुद्दा क्र. 3 व 4 – तक्रारकर्तीचे मृतक पती शेतकरी होते आणि त्यांचा दि.17.02.2020 रोजी अपघाती मृत्यु झाला व त्याबाबतचा विमा दावा वि.प.क्र. 1 ते 3 कडे सादर करण्यात आला ही बाब निर्विवाद आहे. तक्रारकर्तीने विमा दावा 28.07.2020 रोजी दाखल केल्याचे वि.प.क्र. 3 चे लेखी उत्तरात नमूद आहे. वि.प.क्र. 1 विमा कंपनीने त्यांचे लेखी उत्तरात तक्रारकर्तीने विमा दावा उशिरा दाखल केल्याचा आक्षेप घेतला आहे. अभिलेखावर दाखल दस्तऐवजावरुन असे दिसून येते की, तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु हा 17.02.2020 रोजी झाला व त्या पश्चात तिने दि.28.07.2020 रोजी वि.प.क्र. 3 कडे विमा दावा कागदपत्रांसह सादर केला. तक्रारकर्तीच्या वकीलांनी त्यांचे लेखी युक्तीवादात दावा दाखल करण्याकरीता उशिराचे कारण नमूद करतांना तक्रारकर्तीचा विमा दावा उशिराने दाखल केला म्हणून नामंजूर करण्यात आल्याचे विमा कंपनीने त्यांच्या खारीज पत्रात कुठेही नमूद केले नाही असे निवेदन देत तक्रारकर्तीला तिच्या पतीच्या मृत्यु पश्चात विमा दावा दाखल करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवा-जुळव करण्यास अनेक अडचणी आल्या व तसेच सदरचा काळ हा कोरोना महामारीचा असल्याने दावा दाखल करण्यास उशिर झाल्याचे कारण हे संयुक्तीक वाटते. परंतू वि.प.ने तक्रारकर्तीचा विमा दावा विलंबाच्या कारणास्तव नामंजूर न केल्यामुळे सदर कारण आता उपस्थित करणे हे अयोग्य आहे.
10. तक्रारकर्तीने सदर तक्रार ही विमा कंपनीने तिच्या विमा दाव्याबाबतची कुठलीही माहिती न दिल्याने आयोगासमक्ष दाखल केलेली आहे. वि.प.ने त्यांच्या लेखी उत्तरात तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु हा मालवाहक वाहनाचे डाल्यात बसून प्रवास करीत असतांना झाला असल्यामुळे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत विमा रक्कम मिळण्यास अपात्र आहे. या कारणावरुन दि.06.10.2021 रोजी विमा दावा रद्द केल्याचे तक्रारकर्तीला पत्र पाठवून कळविल्याचे नमूद केले आहे. सदरचे पत्र त्यांनी अभिलेखावर दाखल केले आहे. प्रस्तुत प्रकरणात अभिलेखाचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, वि.प.क्र. 3 यांनी त्यांचे लेखी उत्तरात वि.प.क्र. 1 ने तक्रारकर्तीचा विमा दावा वर नमूद कारणाने रद्द करण्यात आल्याचे नमूद केले आहे. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली गठीत जिल्हा संनियंत्रण समितीच्या इतिवृत्तामध्ये सदर प्रकरण विमा दाव्यास पात्र असून विमा दावा मंजूर करुन अपघातग्रस्ताचे वारसदारास विमा योजनेचा लाभ देण्याचे आदेश विमा कंपनीस दिले आहे. वि.प.क्र. 3 ने सदर दि.24.02.2021 च्या सभेचे इतिवृत्त लेखी उत्तरासोबत दाखल केले आहे. सदर इतिवृत्ताचे अवलोकन केले असता समितीच्या सभेत वि.प.क्र. 1 व 2 प्रतिनीधीतर्फे उपस्थित असल्याचे दिसून येते. सदर सभेत तक्रारकर्तीचे प्रकरणात विमा कंपनीने दि.06.10.2020 रोजी त्रिपक्षीय करार अपवाद – 3 (12)- या निकषाखाली विमा दावा नाकारला असला तरी सदर प्रकरण हे वाहन अपघाताच्या व्याख्येत बसत असल्याने विमा दाव्यास पात्र आहे असे मत समितीने नोंदविले आहे. त्यानुसार जिल्हाधिका-यांनी वि.प.क्र. 1 यांना तक्रारकर्तीस विमा दाव्याची रक्कम देण्याचे आदेश दिलेले आहे. जिल्हा संनियं.ण समितीचा निर्णय हा विमा कंपनीवर बंधनकारक असल्याचे शासन निर्णयात स्पष्टपणे नमुद केलेले आहे. मा. जिल्हाधिकारी यांचे आदेशाची माहिती वि.प.क्र. 1 यांना असतांना सुध्दा सदर आदेशाबाबतचा कुठलाही उल्लेख वि.प.क्र. 1 ने लेखी उत्तरात केलेला नाही. इथे विशेष नमूद करण्यात येते की, दि.24.02.2021 च्या सभेमधील आदेशाची माहिती असतांनादेखील वि.प.क्र. 1 व 2 ने तक्रारकर्तीच्या तक्रारीस विरोध केलेला आहे व जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन केले नाही. वि.प.क्र. 1 व 2 ची ही कृती आक्षेपार्ह्य असून त्यांच्या सेवेतील त्रुटी आहे. वास्तविक पाहता, वि.प.क्र. 1 ने सदर आदेशाची पूर्तता करावयास हवी होती. तसेच त्यानंतर वि.प. क्र. 2 यांनी तक्रारकर्तीला तिचा विमा दावा मिळवून देण्याकरीता सहाय्य करणे अपेक्षित होते. परंतू वि.प.क्र. 1 व 2 यांनी सदर जबाबदारी पार न पाडता तक्रारकर्तीला आयोगासमक्ष तक्रार दाखल करण्यास भाग पाडल्याचे स्पष्ट होते. वि.प.क्र. 1 ने जिल्हा संनियंत्रण समितीच्या सभेतील निर्णयानुसार आदेशाचे पालन न करुन सेवेत त्रुटी केली आहे, म्हणून तक्रारकर्ती सदर प्रकरणी लाभार्थी म्हणून दाद मिळण्यास पात्र आहे. मुद्दा क्र. 3 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
11. वि.प.क्र. 1 ने नामंजूर केलेला विमा दावा जिल्हाधिका-यांचे अध्यक्षतेखालील समितीने मंजूर केल्यावरही तक्रारकर्तीला विमा रक्कम न मिळाल्यामुळे तक्रारकर्तीला सदर तक्रार आयोगासमोर दाखल करावी लागली, यामुळे निश्चितच तिला शारिरीक, मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे तक्रारकर्ती विमा रक्कम रु.2,00,000/- व्याजासह आणि नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे असे आयोगाचे मत आहे.
सबब, आयोग खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
- आ दे श –
1) तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत असून वि.प.क्र. 1 ला आदेश देण्यात येतो की, त्यांनी विमा दाव्याची रक्कम रु.2,00,000/- ही द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दरासह विमा दावा सादर केल्याचा दि.28.07.2020 पासून प्रत्यक्ष रकमेच्या अदाएगीपर्यंत द्यावी.
2) वि.प.क्र. 1 ने तक्रारकर्तीला शारिरीक, मानसिक आणि आर्थिक त्रासाची भरपाई म्हणून रु.25,000/- आणि तक्रारीच्या खर्चाबाबत रु.15,000/- द्यावे.
3) सदर आदेशाचे पालन वि.प.क्र. 1 ने आदेशाची प्रमाणित प्राप्त झाल्यापासून 45 दिवसाचे आत करावे. अन्यथा वरील देय रकमेवर द.सा.द.शे. 12 टक्के व्याज देय राहील.
4) आदेशाची प्रमाणित प्रत उभय पक्षांना विनामूल्य पुरविण्यात यावी.