श्रीमती अल्का पटेल, सदस्या यांचे आदेशांन्वये.
-आदेश-
(पारित दिनांक : 09.10.2012)
1. तक्रारकर्तीने प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अंतर्गत सदर तक्रार दाखल केलेली असून, तक्रारकर्तीची तक्रार थोडक्यात अशी आहे की, तिची सासु श्रीमती मुक्ता सीतकुरा कोहपरे यांच्या मालकीची मौजा मुडझा, ता. ब्रम्हपूरी, जि.चंद्रपूर येथे शेतजमीन आहे व तक्रारकर्तीची सासु शेतीतील उत्पन्नावर कुटूंबाचे पालनपोषण करीत होती. गैरअर्जदार क्र. 1 कडे शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेंतर्गत रु.1,00,000/- चा विमा तक्रारकर्तीच्या सासुचा काढण्यात आला होता.
2. तक्रारकर्तीची सासु दि.03.03.2010 रोजी मुडझा येथे शेतीवर जात असतांना वाघाने हल्ला केल्याने ती मृत्युमुखी पडली. तक्रारकर्तीने सासुचा अपघाती मृत्यु झाल्याने 19.11.2010 रोजी वि.प.कडे रीतसर अर्ज केला व त्यांचे मागणीनुसार वेळोवेळी दस्तऐवजांची पूर्तता केली. परंतू विमा दाव्याबाबत तक्रारकर्तीला वि.प.ने कळविले नाही, म्हणून कायदेशीर नोटीस पाठविला असता त्यासही प्रतिसाद दिला नाही, म्हणून तक्रारकर्तीने सदर तक्रारीद्वारे नुकसान भरपाईची रक्कम 18% व्याजासह रु.1,00,000/-, मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु.30,000/- व प्रकरणाचा खर्च रु.10,000/- अशी मागणी केलेली आहे. आपल्या तक्रारीचे पुष्ट्यर्थ एकूण 12 दस्तऐवज दाखल केलेले आहेत.
3. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांना पाठविण्यात आली असता, नोटीस प्राप्त झाल्यावर गैरअर्जदार क्र. 1 यांनी तक्रारीस लेखी उत्तर दाखल केले. गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी तक्रारीस लेखी उत्तर दाखल केले नाही, म्हणून त्यांचे उत्तराशिवाय कारवाई चालविण्याचा आदेश मंचाने पारित केला.
4. गैरअर्जदार क्र. 1 यांनी लेखी उत्तरामध्ये नमूद केले आहे की, सदर तक्रार चालविण्याचा क्षेत्राधिकार मंचाला प्राप्त नाही. तसेच तक्रारकर्तीच्या सासुचा मृत्यु वाघाने हल्ला केल्याने झालेला आहे, त्यामुळे तिला वनविभागाकडून नुकसान भरपाई प्राप्त होते, परंतू ही बाब तक्रारकर्तीने तक्रारीत नमूद केलेली नाही. सदर विमा पॉलिसीतील अटी व शर्ती सर्व संबंधितांवर लागू आहेत. पॉलिसीचे कलम 9 प्रमाणे, मुदतीच्या आत दावा दाखल केलेला नसल्याने तो मुदतबाह्य आहे. म्हणून फेटाळण्यात आला आहे. करीता सदर तक्रार खारीज करणे न्यायोचित होईल अशी विनंती गैरअर्जदार क्र. 1 ने केलेली आहे.
5. सदर प्रकरण युक्तीवादाकरीता आल्यावर तक्रारकर्ती व गैरअर्जदार क्र. 1 यांनी लेखी युक्तीवाद दाखल केला व मंचाने त्यांचा तोंडी युक्तीवादही ऐकला. गैरअर्जदार क्र. 1 ने लेखी युक्तीवादात निवाडाही नमूद केला आहे. मंचाने सदर प्रकरणी दाखल दस्तऐवज व शपथपत्रांचे अवलोकन केले असता मंचाचे निरीक्षणे व निष्कर्ष खालीलप्रमाणे.
-निरीक्षणे व निष्कर्ष-
6. तक्रारकर्तीची सासु शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेंतर्गत गैरअर्जदार क्र. 1 कडे विमित होती, ही बाब गैरअर्जदार क्र. 1 ने मान्य केलेली आहे. त्यामुळे ती गैरअर्जदार क्र. 1 यांची ग्राहक आहे व तक्रारकर्ती ही मृतक विमित व्यक्तीची सुन असल्यामुळे ती लाभार्थी ठरते. गैरअर्जदाराचेही यावर दुमत नाही. तक्रारकर्तीच्या सासुचा मृत्यु हिंस्त्र पशुच्या हल्याने झाला ही बाब तक्रारकर्तीने दाखल केलेल्या दस्तऐवजावरुन स्पष्ट होते.
7. तक्रारकर्तीने तक्रारीत नमूद केले आहे की, तिला गैरअर्जदाराने विमा दावा दाखल केल्यानंतर, तो खारीज केला की मान्य केला याबाबत अद्यापही तिला कळविले नाही. गैरअर्जदाराचे मते विमा दावा हा मुदतबाह्य असल्याने खारीज केलेला आहे. मंचाने तक्रारीत उभय पक्षांद्वारे दाखल करण्यात आलेल्या दस्तऐवजांचे अवलोकन केले असता त्यामध्ये विमा दावा खारीज करण्यात आला अशा आशयाचे कुठलेही पत्र आढळून आलेले नाही. केवळ गैरअर्जदाराचे कथन अशा आशयाचे आहे. मात्र त्यापुष्ट्यर्थ गैरअर्जदार क्र. 1 यांनी दावा नाकारल्याचे पत्र मंचासमोर दाखल केलेले नाही. त्यामुळे कागदोपत्री पूराव्याअभावी गैरअर्जदार क्र. 1 चे सदर कथन मान्य होण्यायोग्य नाही असे मंचाचे मत आहे.
8. तसेच गैरअर्जदार क्र. 1 विमा कंपनीने तक्रारकर्तीचा दावा गुणवत्तेवर नाकारलेला आहे असेही कथन केलेले नाही. पुढे लेखी उत्तरामध्ये हिंस्त्र श्वापदाने हल्ला केल्याने मृत्यु झाल्यास वनविभागाकडून भरपाई मिळते असे गैरअर्जदार क्र. 1 चे कथन मंचाला समर्थनीय वाटत नाही. त्यामुळे तक्रारकर्ती सदर प्रकरणी दाद मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. गैरअर्जदार क्र. 1 ने तक्रारकर्तीला शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेंतर्गत रु.1,00,000/- विमा दाव्याची रक्कम विमा दावा दाखल दि.19.11.2010 पासून तर प्रत्यक्ष संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 12% व्याजासह द्यावी.
9. गैरअर्जदार क्र. 1 यांनी तक्रारकर्तीला विमा दावा निकाली काढला किंवा नाही याबाबत कधीही कळविले नाही, त्यामुळे तिला मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागला व पर्यायाने मंचासमोर तक्रार दाखल करावी लागली, त्यामुळे ती मानसिक व शारिरीक त्रासाच्या भरपाईदाखल रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चादाखल रु.2,000/- मिळण्यास पात्र ठरते. तक्रारकर्तीची तक्रारीतील मागणी ही गैरअर्जदार क्र. 3 विरुध्द नसल्याने, तसेच गैरअर्जदार क्र. 2 यांचा संबंध विमा दावा निकाली काढण्याकरीता येत नसल्याने, त्यांच्याविरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते. उपरोक्त निष्कर्षावरुन मंच सदर प्रकरणी खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-आदेश-
1) तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) गैरअर्जदार क्र. 1 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेंतर्गत रु.1,00,000/- विमा दाव्याची रक्कम विमा दावा दाखल दि.19.11.2010 पासून तर प्रत्यक्ष संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 12% व्याजासह द्यावी.
3) गैरअर्जदार क्र. 1 यांनी तक्रारकर्तीला मानसिक व शारिरीक त्रासाच्या भरपाईदाखल रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चादाखल रु.2,000/- द्यावे.
4) गैरअर्जदार क्र. 2 व 3 विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
5) सदर आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदार क्र. 1 यांनी आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे.