( आदेश पारित द्वारा : श्री. विजयसिंह ना. राणे, अध्यक्ष )
आ दे श
( पारित दिनांक : 31 मार्च 2012 )
यातील तक्रारदार श्रीमती प्रतिभा सुरेश काळे यांची थोडक्यात तक्रार गैरअर्जदार विमा कंपनी विरुध्द अशी आहे की, त्यांचे पती शेतकरी होते व त्यांचा महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रात वास्तव्य करणा-या शेतक-यांचा शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत 1 लक्ष रुपयाचा विमा काढलेला होता. त्यांचा दिनांक 19/6/2012 रोजी अपघाती मृत्यु झाला असल्यामुळे त्या सदर योजनेअंतर्गत विमा लाभ गैरअर्जदाराकडुन मिळण्यास पात्र असल्याने व त्यासंबंधी गैरअर्जदाराकडे मागणी केली असतांना गैरअर्जदाराने अयोग्य कारणास्तव विमा दावा निकाली काढला म्हणुन त्यांनी ही तक्रार दाखल करुन तीद्वारे रुपये 1 लक्ष नुकसानी व 15 टक्के व्याज रक्कम मिळेपर्यत द्यावे. मानसिक व आथिक त्रासापोटी रुपये 20,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 5000/- मिळावे अशी मागणी केली.
सदर प्रकरणात गैरअर्जदार यांना नोंदणीकृत डाकेद्वारे नोटीस पाठविण्यात आली. नोटीस प्राप्त होऊन गैरअर्जदार हजर झाले व त्यांनी आपला लेखी जवाब दाखल केला.
गैरअर्जदाराने आपले उत्तरात तक्रारदाराची सर्व विपरित विधाने नाकारली. त्यांचे म्हणणे असे आहे की, त्यांनी विमा दावा नामंजूर केला कारण मृतक यांचे जवळ दुचाकी मोटर वाहन चालविण्याचा परवाना असणे गरजेचे असतांना तक्रारकर्तीने तो दिला नाही. शासन व गैरअर्जदार यांचेतील कराराप्रमाणे ही बाब आवश्यक होती त्यामुळे त्यांनी दावा नाकारला यात त्यांनी सेवेत कुठलीही त्रुटी ठेवलेली नाही म्हणुन तक्रारकर्तीची तक्रार खारीज करावी असा उजर घेतला आहे.
तक्रारकर्तीने आपली तक्रार शपथपत्रावर दाखल केली असुन दस्तऐवज यादी नुसार 13 कागदपत्रे दाखल केली. गैरअर्जदाराने आपला जवाब शपथपत्रावर दाखल केला व सोबत शासन निर्णय व न्याय निवाडा दाखल केला.
#####- का र ण मि मां सा -#####
यातील मृतकाचा अपघाती मृत्यु व तो शेतकरी होता इत्यादी बाबतीत वाद नाही. गैरअर्जदाराचा एक बचाव असा आहे की, मृतक यांचेजवळ वाहन चालविण्याचा परवाना असणे गरजेचे होते तो तक्रारदाराने सादर केला नाही म्हणुन त्यांनी विमा दावा नाकारला.
यामधील दाखल दस्जऐवजावरुन व तक्रारदाराचे म्हणण्याप्रमाणे मृतकाचा अपघात हा त्यांचे एकटयाचे वाहनामुळे झालेला नसुन ट्रक क्रमांक एम एच जी-4190 च्या चालकाने आपले वाहन निष्काळजीपणे चालवून दुचाकीला ठोस दिल्यामुळे तीवरील मृतकाचा मृत्यु झालेला आहे आणि ट्रक चालकाने भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालविल्यामुळे अपघात झाला असा प्रथम निष्कर्ष सुध्दा तपासणी अधिका-यांनी काढलेला आहे व त्याप्रमाणेच प्रथम माहिती अहवाल नोदविलेला आहे. ही बाब पाहता मृतक यांचेजवळ त्यांचा वाहन चालविण्याचा परवाना होता किंवा नाही ही बाब कमी महत्वाची ठरते व या बाबतीत निरर्थक ठरते. तक्रारकर्तीच्या म्हणण्याप्रमाणे मृतकाजवळ वाहन चालविण्याचा परवाना होता मात्र अपघाताचे वेळी त्यांची कागदपत्रे इत्यादी चोरीला गेली व त्यात तो परवाना गहाळ झाला अशा परिस्थितीत शेतकरी कुटूंबातील एक सामान्य स्त्री हिला अशाप्रकारे दस्तऐवज सादर करण्यास सांगणे आवश्यक वाटत नाही. वास्तविक गैरअर्जदाराने अशा प्रकरणात असा बचाव घेतांना ही त्यांची प्राथमिक जबाबदारी ठरते की, परिवहन अधिका-याकडुन मृतकाजवळ वाहन चालविण्याचा परवाना होता किंवा नाही, ते पाहणे- नसल्यास तसा दस्तऐवज प्राप्त करणे व तो दाखल करणे तसे गैरअर्जदाराने केले नाही व निष्काळजीपणे तक्रारकर्तीचा विमा दावा नाकारला ही गैरअर्जदाराचे सेवेतील त्रुटी आहे असे आमचे मत आहे. गैरअर्जदार यांनी आपले लेखी युक्तिवादा पृष्ठर्य्थ मा.जिल्हा ग्राहक मंच, चंद्रपुर यांनी पारित केलेल्या निकाल (सत्यप्रत) दाखल केला आहे जो विचारात घेण्याचे कारण नाही. म्हणुन आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहोत.
-// अं ति म आ दे श //-
1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. गैरअर्जदाराने तक्रारकर्तीला रुपये 1,00,000/-(रुपये एक लक्ष) नुकसान भरपाई रक्कम व तीवर दावा निकाली तारीख 31/12/2010 पासुन द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह मिळुन येणारी रक्कम द्यावी.
3. गैरअर्जदाराने तक्रारकर्तीस मानसिक त्रासापोटी रुपये 5,000/- द्यावे.
वरील आदेशाचे पालन गैरअर्जदार यांनी आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासुन 30 दिवसांचे आत करावे न पेक्षा 9 टक्क्याऐवजी 12 टक्के व्याज देय ठरतील.