(मंचाचा निर्णय: श्री. विजयसिंह राणे - अध्यक्ष यांचे आदेशांन्वये)
-// आ दे श //-
(पारित दिनांक :16/01/2012)
1. प्रस्तुत तक्रार तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द मंचात दि.28.09.2011 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :-
2. तक्रारकर्तीचे म्हणण्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने शेतकरी व त्यांच्या कुटूंबीयांच्या भविष्यासाठी ज्यांच्या नावे शेती आहे त्यांचेकरीता रु.1,00,000/- विमा प्रदान केला होता. तक्रारकर्तीचा पती हा शेतकरी होता व तो आणि त्याचा मित्र दि.02.02.2010 रोजी दुचाकी वाहनावरुन हिंगणघाट ते आपल्या गावाकडे जात असतांना टिप्पर क्र.सी.जी.18/एच-472 च्या वाहन चालकाने वाहन निष्काळजीपणाने चालविल्यामुळे तक्रारकर्तीचे पतीचे दुचाकी वाहनास अपघात झाला. अपघातात तक्रारकर्तीचे पतीचे डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याला कस्तुरबा हॉस्पीटल, सेवाग्राम येथे भरती करण्यांत आले, मात्र तो दि.16.02.2010 रोजी मरण पावला. सदर घटनेबाबत हिंगणघाट पोलिस स्टेशन येथे टिप्परचे चालका विरुध्द एफ.आय.आर. नोंदविलेला आहे.
3. महाराष्ट्र शासनाने शेतकरी विमा योजना सुरु केली आहे त्यामधे तक्रारकर्त्याने मागणी केली तेव्हा गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीची मागणी नाकारली. म्हणून सदर तक्रार मंचात दाखल करुन रु.1,00,000/- ची द.सा.द.शे.15% व्याजासह मागणी केलेली असुन मानसिक, शारीरिक त्रासापोटी रु.20,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.5,000/- मागणी केलेली आहे.
4. तक्रारकर्तीने तक्रारीसोबत निशानी क्र.3 वर दस्तावेजांची यादी जोडलेली असुन त्यात अनुक्रमांक 1 ते 14 दस्तावेजांच्या छायांकित प्रती जोडलेल्या आहेत.
4. गैरअर्जदारांना नोटीस देण्यांत आले असता ते मंचात हजर झाले असुन त्यांनी आपला लेखी जबाब खालिल प्रमाणे दाखल केलेला आहे.
गैरअर्जदार क्र.1 यांनी अपघाताची बाब मान्य केली, मात्र अशा प्रकरणी मोटार अपघात न्यायधिकरणाकडे जावे लागते असा उजर घेतला आहे. तसेच मृतकाने हेलमेटचा वापर केला नव्हता व त्यांचेजवळ ड्रायव्हींग लायसेंन्स नव्हते. त्यामुळे तक्रारकर्तीचा सदर दावा नाकारला असुन यात त्यांची कोणतीही चुक नसुन तक्रार खारिज करण्याची मंचास विनंती केलेली आहे.
5. गैरअर्जदार क्र.2 यांनी आपल्या जबाबात त्यांचा या प्रकरणाशी कोणताही संबंध येत नसल्याबाबतचा उजर घेतलेला आहे.
6. प्रस्तुत तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि.09.01.2012 रोजी आली असता दोन्ही पक्ष हजर, मंचाने त्यांचा युक्तिवाद ऐकला. तसेच तक्रारीसोबत दाखल दस्तावेजांचे व युक्तिवादाचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले.
-// नि ष्क र्ष //-
7. यातील तक्रारकर्त्याने आपली भिस्त मा. राज्य आयोगाचे 2008(2) ALL MR (JOURNAL) 13, ICICI Lombard General Insurance Co. Ltdl. –v/s- Smt Sindhubhai Khanderrao Khairnar”, आणि 2009 AC 165 (BOM) (AB), “New India Assurance Co. Ltd. –v/s- Mangla w/oDevedas Phophale and others”. यावर ठेवली आहे. गैरअर्जदारांनी दाखल केलेल्या 2011(3) CPR-148 (NC) या ठिकाणी प्रकाशीत निकालातील वस्तुस्थिती या प्रकरणाशी मिळती जुळती नाही, त्यामुळे ते निकालपत्र विचारात घेण्याचे प्रयोजन नाही. यातील अपघाताची वस्तुस्थिती गैरअर्जदारांनी मान्य केलेली आहे व मृतक शेतकरी असल्याबाबतही दस्तावेजांवरुन सिध्द झालेले आहे. तसेच मृतक टिप्परच्या अपघातामधे गंभीर जखमी होऊन मरण पावला ही बाब लक्षात घेता मृतकाच्या चालक परवान्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असे मंचाचे मत आहे. आणि मृतकाजवळ चालक परवाना नव्हता ही बाब सिध्द करण्याची जबाबदारी विमा कंपनीची आहे. त्यामुळे गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीचा विमा दावा नाकारुन आपल्या सेवेत त्रुटी ठेवलेली आहे, करीता आम्ही खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-// अं ति म आ दे श //-
1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते.
2. गैरअर्जदारांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला शेतकरी अपघात विमा दाव्यापोटी रु.1,00,000/- दावा नाकारल्याचे दिनांकापासुन द.सा.द.शे.9% व्याजासह परत करावी.
3. गैरअर्जदारांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्तीस झालेल्या मानसिक, शारीरिक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.2,000/- अदा करावे.
4. वरील आदेशाचे पालन गैरअर्जदारांनी आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी. अन्यथा पुढील कालावधीकरीता आदेश क्र.2 मधील रकमेवर द.सा.द.शे.9% ऐवजी 12% व्याज देय राहील.