(मंचाचा निर्णय: श्रीमती जयश्री येंडे - सदस्या यांचे आदेशांन्वये)
-// आ दे श //-
(पारित दिनांक : 25/01/2012)
1. प्रस्तुत तक्रार तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द मंचात दि.01.07.2011 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :-
2. प्रस्तुत प्रकरणात तक्रारकर्तीचे म्हणण्यानुसार ती स्कूटी पेप, विना गेअरची एमएच-31/बीव्ही-9957 या दोन चाकी वाहनाची मालक असुन तिने सदर गाडीचा विमा गैरअर्जदार कंपनीकडे काढलेला होता व त्याचा कालावधी दि.26.02.2010 ते 25.11.2011 पर्यंत होता. तक्रारकर्तीची मुलगी कु. यशश्री मानिकराव साहारे, दि.26.11.2010 रोजी रात्री 8.30 वाजता जवाहरनगर, मानेवाडा रोड येथून जात असतांना एक व्यक्ति रस्त्यामधे वळण घेण्याकरता वळला असता सदर गाडीचा अपघात झाला. अपघातात गाडीचे नुकसान झाले म्हणून तक्रारकर्तीने वाहन मे. इंद्रायनी टी.व्ही.एस. येथे दुरुस्तीकरता दि.04.12.2010 रोजी दिले व संबंधीत अपघाताची सुचना गैरअर्जदारांना दिली. तक्रारकर्तीने दिलेल्या सुचनेवरुन गैरअर्जदारांनी क्लेम फॉर्म तसेच अंदाजीत खर्चाचे बिल व इतर आवश्यक कागदपत्रे, तसेच मुलीचे ड्रायव्हींग लायसेन्सची प्रत गैरअर्जदारांकडे सादर केली. त्यानंतर गैरअर्जदारांनी केलेल्या सुचनेनुसार सदर गाडीच्या नुकसानीचे प्रत्यक्ष खर्चाचे बिल जे तक्रारकर्तीचे पतीने रु.4,776/- मे. इंद्रायनी टी.व्ही.एस. येथे अदा केले होते ते देखिल गैरअर्जदारांकडे सादर केले.
3. तक्रारकर्तीने नमुद केले आहे की, गैरअर्जदारांनी दि.09.05.2011 रोजीच्या पत्राव्दारे अपघाताचे वेळी ड्रायव्हींग लायसन्स इफेक्टीव्ह नाही या कारणास्तव तक्रारकर्तीचा विमा दावा नाकारला. वास्तविक आर.टी.ओ. ने तकारकर्तीच्या मुलीला विदाऊट गेअरचे लायसन्स (परवाना) दि. 06.09.2003 ला नियमीत केले व त्याची मुदत दि.05.09.2023 पर्यंत आहे. सदरची गाडी ही विदाऊट गेअरची असुन सुध्दा गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीचा विमा दावा नाकारला ही त्यांचे सेवेतील कमतरता असल्यामुळे तक्रारकर्तीने सदर तक्रार मंचात दाखल केलेली आहे.
4. तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रारीसोबत निशानी क्र. 3 वर दस्तावेजांची यादी जोडलेली असुन त्यात दस्तावेज क्र.1 ते 12 च्या छायांकीत प्रती पान क्र.8 ते 17 वर दाखल केलेल्या आहेत.
5. गैरअर्जदारांना प्रस्तुत प्रकरणात नोटीस बजावला असता ते मंचात उपस्थित असुन त्यांनी आपला जबाब खालिल प्रमाणे दाखल केलेला आहे...
गैरअर्जदाराने आपल्या कथनात तक्रारकर्तीचे सदर वाहन त्यांचेकडे दि.26.02.2010 ते 25.02.2011 पर्यंत पॅकेज पॉलिसी अंतर्गत काढलेला होता, तसेच सदर गाडीस दि.26.11.2010 रोजी अपघात झाला हे मान्य केले असुन तक्रारीतील इतर बाबी अमान्य केलेल्या आहेत.
6. गैरअर्जदारांचे कथनानुसार सदर अपघात दि.26.11.2010 रोजी झालेला असतांना तक्रारकर्तीने सदर अपघाताचा दि.03.12.2010 रोजी देणे हे विमा कंपनीच्या कलमांचे विरुध्द आहे. गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीचे पतीने संबंधीत वाहनाचा दुरुस्तीचा खर्च रु.5,107/- दिला होता हे म्हणणे मान्य केले असुन ते वस्तुस्थितीला अनुसरुन नाही असेही म्हटलेले आहे.
7. सदर तक्रारकर्तीच्या मुलीला सदर गाडी चालविण्याचे ड्रायव्हींग लायसन्स इफेक्टीव्ह नसल्यामुळे पॉलिसीच्या अटी व शर्तींना अनुसरुन सदरचा विमा दावा नाकारण्यांत आल्याचे नमुद केले आहे. तक्रारकर्तीच्या मुलीजवळ विदाऊट गेअर चे लायसेन्स होते व त्याचा कालावधी दि.05.09.2023 पर्यंत वैध आहे. परंतु सदरचे विदाऊट गेअरची आहे या म्हणण्याचे पृष्ठयर्थ तक्रारकर्तीने कुठलाही पुरावा सादर केलेला नाही. वास्तविक स्कूटी या गाडीमधे गेअर आणि गेअर केस असेम्बली या दोन्ही बाबी असतात या बाबतचा पुरावा गैरअर्जदारांनी दाखल केलेला आहे. गेअरची गाडी ही विना गेअरचा परवाना असतांना चालविणे हे पॉलिसीच्या अटी व शर्तींचे उल्लंघन आहे.
8. तक्रारकर्तीने आपल्या प्रार्थनेमधे वाहनाचे दुरुस्ती खर्चापोटी रु.4,876/- ची 18% व्याजासह मागणी केलेली आहे, परंतु सव्हेअरच्या रिपोर्टप्रमाणे फक्त रु.1,500/- चा खर्च मान्य केलेला आहे.
9. वरील सर्व बाबी लक्षात घेता गैरअर्जदारांनी सदरची विमा पॉलिसी अटी व शर्तींच्या अधीन राहून नाकारलेली असुन यात त्यांनी कुठलीही सेवेत त्रुटी दिलेली नसल्यामुळे सदरची तक्रार खारिज करावी अशी मंचास विनंती केलेली आहे.
10. सदर तक्रार मंचासमक्ष मॉखिक युक्तीवादाकरीता दि.25.01.2012 रोजी आली असता दोन्ही पक्ष हजर मंचाने त्यांचा युक्तिवाद ऐकला व तक्रारीसोबत दाखल केलेल्या दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील प्रमाणे निष्कर्षाप्रत पोहचले.
-// नि ष्क र्ष //-
11. प्रस्तुत तक्रारीतील वस्तुस्थिती तसेच दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता निर्वीवादपणे तक्रारकर्तीच्या मालकीची स्कूटी पेप, विना गेअरची एमएच-31/बीव्ही-9957 या दोन चाकी वाहनाचा गैरअर्जदारांकडे अपघाती विमा काढलेला होता व त्याचा कालावधी दि.26.02.2010 ते 15.02.2011 पर्यंत होता. तसेच सदर पॉलिसीच्या वैध कालावधीमधे दि.26.11.2010 रोजी तक्रारकर्तीची मुलगी सदर वाहन चालवित असतांना अपघात झाला होता. त्याच प्रमाणे सदरचे वाहन मे. इंद्रायणी टी.व्ही.एस. येथे दुरुस्ती करता दिले होते. तक्रारकर्तीने गैरअर्जदारांकडे आवश्यक कागदपत्रे सादर केली होती व गैरअर्जदारांनी सदरचा विमा दावा दि.09.05.2011 रोजीचे पत्रान्वये अपघाताचे वेळी तक्रारकर्तीचे मुलीजवळ ड्रायव्हींग लायसन्स इफेक्टीव्ह नव्हते या कारणास्तव नाकारले. वास्तविक पाहता तक्रारकर्तीने दाखल केलेले टेक्नीकल स्पेसीफीकेशनमधे कुठेही सदरचे वाहन हे गेअरचे असल्याबाबत नमुद नाही. तसेच सदर अपघात हा विरुध्द दिशेने येणा-या व्यक्तिच्या चुकीमुळे झालेला असुन सदरचा विमा दावा गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीचे मुलीजवळ गेअरचे लायसेन्स नसल्याचे कारणास्तव नाकारला ही गैरअर्जदारांची कृति निश्चितच सेवेतील कमतरता आहे. तसेच गैरअर्जदारांचे सर्व्हेअर अहवालानुसार दुरुस्ती खर्चापोटी रु.1,500/- चा दावा मान्य केलेला आहे. परंतु तक्रारीसोबत दाखल दस्तावेजांचे अवलोकन केले असता तक्रारकर्तीने सदर वाहनाच्या खर्चापोटी रु.4,538/- एवढी रक्कम मे. इंद्रायणी टी.व्ही.एस. यांना अदा केल्याचे दिसुन येते. त्यामुळे ती रक्कम देण्यांस गैरअर्जदार बाध्य आहे, असे मंचाचे मत आहे.
12. वरील सर्व परिस्थिती पाहता गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीचा विमा दावा अयोग्य कारणास्तव नाकारल्यामुळे सेवेत कमतरता दिलेली आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येते.
वरील सर्व बाबींचा विचार करता आम्ही खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहोत.
-// अं ति म आ दे श //-
1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते.
2. गैरअर्जदारांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्तीस विमा दाव्याची रक्कम रु.4,538/- विमा दावा नाकारल्याचे दि.09.05.2011 पासुन द.सा.द.शे. 9% दराने रक्कम अदा होईपर्यंत व्याजासह परत करावी.
3. गैरअर्जदारांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्तीस झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासाकरीता रु.2,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.2,000/- अदा करावे.
4. वरील आदेशाचे पालन गैरअर्जदारांनी आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आत करावे.