श्रीमती रोहीणी कुंडले, अध्यक्षा यांचे आदेशांन्वये.
-आदेश-
(पारित दिनांक : 12.10.2012)
1. तक्रारकर्तीने सदर तक्रार ग्रा.सं.का.चे कलम 12 अन्वये दाखल केलेली आहे. तक्रारकर्ती मृतक विमित संदीप मोहन वारई यांचा दि.05.09.2010 रोजी तलावात पाय घसरुन मृत्यु झाला. त्याच्या नावे विमा पॉलिसी रु.1,00,000/- आहे. विम्याची रक्कम मिळण्यासाठी मंचात तक्रार दाखल आहे.
2. तक्रार व युक्तीवाद थोडक्यात अशी आहे की, तक्रारकर्तीच्या मुलाच्या नावे (संदीप मोहन वारई) त्याच्या मालकीचे मौजा-डोंगरगाव, ता.देवरी, जि.गोंदिया येथे शेतजमिन आहे. तक्रारकर्तीच्या मुलाचा मृत्यु दि.05.08.2010 रोजी चिचगड, जि. गोंदिया येथील तलावात पाय घसरुन पडल्याने झाला. मृतक विमित संदीपच्या नावे मौजा चिचगड, ता.देवरी, जि.गोंदिया येथे (1.83) शेतजमिन आहे. त्यामुळे शेतकरी अपघात विमा योजनेचा तो लाभार्थी आहे. मृत्यु दावा मिळावा, म्हणून तक्रारकर्तीने संपूर्ण कागदपत्रांसहित दि.22.08.2011 रोजी डी.एस.ए.ओ.गोंदिया यांच्याकडे दावा दाखल केला. त्यांनी तो वि.प.क्र.2 कबाल इंशुरंस कंपनी, नागपूर यांच्याकडे पाठविला. दि.10.09.2011 रोजी वि.प.क्र. 1 विमा कंपनीने तक्रारकर्तीचा विमा दावा 90 दिवसाच्या मुदतीत दाखल न केल्यामुळे फेटाळला व तसे कमिश्नर एग्रीकल्चर पुणे यांना कळविले. तक्रारकर्तीला मुदतीच्या कारणाने दावा रद्दबादल केल्याचा निर्णय मान्य नाही, म्हणून मंचात तक्रार दाखल आहे. तक्रारीसोबत एकूण 14 दस्तऐवज जोडलेले आहेत.
3. तक्रारीची नोटीस प्राप्त झाल्यानंतर, वि.प.क्र. 1 यांनी उत्तर दाखल केले. त्यांचे उत्तर व युक्तीवाद थोडक्यात खालीलप्रमाणे-
उपरोक्त विमा पॉलिसी 15.08.2009 ते 14.08.2010 पर्यंत होती. पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार विमित व्यक्तीच्या मृत्युच्या तारखेपासून 90 दिवसाचे आत दावा सादर करायला पाहिजे. तक्रारकर्तीने विमा दावा दि.22.08.2011 रोजी मृत्युनंतर एक वर्षानंतर सादर केला. त्यावेळी 90 दिवसाची मुदत संपून गेली होती. मुदतबाह्य म्हणून दि.10.09.2011 च्या पत्रांन्वये हा दावा रद्दबादल ठरविला. तक्रारकर्तीचा विमा दावा अट क्र. IV व उपक्रमांक 3 या नियमांच्या अधीन राहून फेटाळल्याने ही सेवेतील त्रुटी ठरत नाही. वि.प.क्र. 1 ने विम्या संबंधीचा त्रिपक्षीय करार सोबत जोडला आहे. तक्रारीत तथ्य नसल्याने तक्रार खारिज करण्याची विनंती ते करतात.
4. वि.प.क्र. 2 चे अर्ध्या पानाचे उत्तर रेकार्डवर आहे. त्याच्या म्हणण्यानुसार तक्रारकर्तीचा व वि.प.क्र.2 चा प्रत्यक्ष संबंध नाही. वि.प.क्र.2 ची नियुक्ती शासनाने ‘सल्लागार’ म्हणून केली आहे. त्याची भूमिका मध्यस्थाची आहे. प्राप्त झालेले विमा दावे वि.प.क्र.1 विमा कंपनीकडे पाठविणे एवढीच मर्यादित भूमिका त्यांची आहे. हे काम विना मोबदला ते करतात.
‘मयत- संदीप मोहन वारई गाव – चिचगड तालुका – देवरी जिल्हा – गोंदिया सदरील अपघात दिनांक – 5.08.2010 रोजी झाला सदरील प्रस्ताव आमच्या कार्यालयास दिनांक – 24.08.2011 रोजी प्राप्त झाला सदरील अपघात हा विमा पॉलिसी 15.08.2009 ते 14.07.2010 या कालावधीतील असून शासन आणि विमा कंपनी मध्ये झालेल्या कराराप्रमाणे पॉलिसीच्या शेवटच्या दिवसा पासून म्हणजेच 90 दिवसात दिनांक – 14.11.2010 पर्यंत विमा कंपनीकडे पाठविणे गरजेचे होत परंतु सदरील प्रस्ताव आ आमच्या कार्यालयास 90 दिवसानंतर म्हणजेच दि.24.08.2011 रोजी प्राप्त झाला सदरील प्रसताव हा विमा कंपनीकडे आहे त्या स्थितीत दिनांक 26.08.2011 रोजी पाठविन्यात आला सदरील दावा हा युनायटैड इंडिया इन्शुरन्स कंपनी नागपुर यांनी आपल्या दिनांक 10.09.2011 च्या पत्राद्वारे नामंजुर केल्याचे अर्जदारास कळविले आहे.’
5. तक्रारकर्त्याच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकला. रेकॉर्डवरील संपूर्ण कागदपत्रे तपासली.
-निरीक्षणे व निष्कर्ष-
6. तक्रारकर्ती, वि.प.क्र. 1 व 2 विमा पॉलिसी आणि विमित व्यक्तीचा दि.05.08.2010 रोजीचा अपघात मान्य करतात. संपूर्ण कागदपत्रे तपासली असता ग्राहक विमित व्यक्तीचा अपघात मौजा चिचगड, ता. देवरी, जि. गोंदिया येथील तलावात बुडून मरण पावल्याचे निष्पन्न होते. म्हणजेच तक्रारीस कारण गोंदिया जिल्हा मंचाच्या कार्यकक्षेत घडल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे नागपूर जिल्हा मंचाच्या अधिकार क्षेत्रात हे प्रकरण येत नाही असा मंचाचा निष्कर्ष आहे.
7. मृतक विमित व्यक्तीच्या नावे असलेली शेतीसुध्दा मौजा चिचगड, ता.देवरी, जि. गोंदिया येथे आहे. विमा दावा प्रथम देवरी येथील तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे दाखल केला आहे. दि.30.05.2011 असे पत्र दाखल आहे. म्हणून नागपूर येथील जिल्हा मंचाच्या कार्यक्षेत्रात हे प्रकरण येत नाही. तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे की, वि.प.क्र. 1 व 2 हे नागपूर येथे व्यवसाय करतात, म्हणून दावा नागपूर येथे चालू शकतो. मंचाला तक्रारकर्त्याच्या या म्हणण्यात तथ्य वाटत नाही, कारण तक्रारकर्तीने प्रथम ता.देवरी येथील कृषी अधिका-याकडे दावा सादर केला. त्रिपक्षीय करारानुसार कृषी अधिकारी देवरी हे शासनाचे प्रतिनीधी आहेत. तक्रारकर्तीने त्यांच्याकडे सादर केलेला दावा त्यांनी प्रथम वि.प.क्र.2 नागपूरकडे व वि.प.क्र. 2 यांनी तो वि.प.क्र.1 विमा कंपनीकडे नागपूर पाठविला. प्रत्यक्षपणे तक्रारकर्ती व वि.प.क्र. 1 व 2 यांच्यात व्यवहार झालेला नाही. तो कृषी अधिकारी देवरी यांच्या माध्यमातून झालेला आहे. म्हणून या तक्रारीसाठी जि. गोंदिया हे कार्यक्षेत्र ठरते असे मंचाचे मत आहे
8. तक्रारीच्या अन्य तपशिलात न जाता नागपूर मंचाच्या कार्यक्षेत्रात तक्रार येत नसल्याने ती तक्रार तक्रारकर्तीला परत करण्यात येते. सबब आदेश -
-आदेश-
1) नागपूर जिल्हा मंचाच्या कार्यकक्षेत तक्रार येत नाही, म्हणून तक्रारकर्तीला ती परत करण्यात येते.
2) खर्चाबद्दल आदेश नाहीत.