निकाल
दिनांक- 01.08.2014
(द्वारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्यक्ष)
तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाला यांनी नुकसान भरपाई न देऊन सेवेत त्रुटी ठेवली आहे म्हणून नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली आहे.
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात येणेप्रमाणे, तक्रारदार हे महिन्द्रा स्कॉर्पीओ वाहन नं.एम.एच.23/वाय-8586 चे मालक आहे. सदरील वाहन तक्रारदार यांनी सबलोक कार्स, अहमदनगर यांचेकडून खरेदी केलेली आहे. तक्रारदार यांचे वाहनाचा विमा सामनेवाला कंपनी यांचेकडून घेतलेला आहे. विमा पॉलीसी क्र.231201/31/12/पी/302882777 असा आहे. विमा कालावधी दि.04.03.2013 ते 03.03.2014 पर्यंत आहे. सामनेवाला यांनी तक्रारदार यांचे वाहनाची नुकसान भरपाई देण्याची जोखीम स्विकारलेली आहे, तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहे. तक्रारदार यांनी सदरील वाहन स्वतःच्या वापरासाठी विकत घेतले आहे. तक्रारदार हे सदरील वाहनाचा उपयोग स्वतः करता व कुटूंबाकरता करतात. तक्रारदार यांनी अकबर पठाण सलीम पठाण या व्यक्तीस ड्रायव्हर म्हणून नेमलेले आहे.
तक्रारदार यांचे कथन की, दि.05.07.2013 रोजी तक्रारदार यांचे ड्रायव्हर यांनी तक्रारदाराची परवानगी न घेता खाजगी कामानिमित्त ड्रायव्हर व त्याचा मित्र असे दोघे गाडी घेऊन गेले, सदरील वाहन जामखेडहून परत येत असताना बीड जामखेड रोडवर पिंपळगावच्या पुढे पुलाजवळ रात्री एक वाजण्याचे सुमारास अपघात झाला. रस्त्यावर असलेल्या वळणावर चार, पाच हरीण गाडीला आडवे आले, त्यांना वाचविण्यासाठी ड्रायव्हर यांनी ब्रेक दाबला व गाडीचे स्टेअरींग वळाल्यामुळे गाडी रोडच्या खाली गेली. तक्रारदार यांचे गाडीचे बरेच नुकसान झाले. तक्रारदार यांचे ड्रायव्हर अकबर हेही जखमी झाले. तक्रारदार यांनी सदर अपघाताची खबर पोलीस स्टेशनला दि.07.07.2013 रोजी दिली. सामनेवाला यांनी अपघाताची लेखी नोंद दि.09.07.2013 रोजी घेतली. सामनेवाला यांनी गाडीचे नुकसानीची पाहणी करण्यासाठी सर्व्हेअर श्री.ए.के.कदम व अरुण जी.नाईक यांची नियुक्ती केली. दि.06.07.2013 रोजी ए.के.कदम यांनी तक्रारदार यांचे अपघातग्रस्त वाहनाची पाहणी केली व दि.09.07.2013 रोजी सामनेवाला विमा कंपनीकडे अहवाल पाठविला. तक्रारदार यांचे वाहनास झालेल्या नुकसानीबाबत सविस्तर तपशिल विमा कंपनीला कळविला. तक्रारदार यांनी सामनेवाला यांना सांगितल्यावर वाहन क्रेनच्या सहाय्याने बीड येथील श्रीराम अॅटोमोबाईल्स येथे आणले. सामनेवाला यांचे सर्व्हेअर व लॉस असेसर श्री.अरुण जी.नाईक यांनी दि.27.07.2013 रोजी श्रीराम अॅटोमोबाईल्स बीड येथे येऊन अपघातग्रस्त वाहनाची पाहणी केली. तक्रारदार यांना सदरील वाहन दुरुस्तीसाठी औरंगाबाद येथील शोरुममध्ये नेण्यास सांगितले, तक्रारदार यांनी वाहन क्रेन सर्व्हिसेसच्या माध्यमातून दि.31.08.2013 रोजी औरंगाबाद येथे नेले. सदरील वाहन औरंगाबाद येथे दुरुस्ती करता घेऊन जात आहे ही बाब सामनेवाला यांना कळविण्यात आली. तक्रारदार यांनी अपघातग्रस्त वाहनाच्या दुरुस्तीचा अंदाजे खर्च रक्कम रु.7,32,513/- होण्याची शक्यता दर्शविली. सामनेवाला यांनी औरंगाबाद येथील महिन्द्रा कंपनीच्या अधिकृत शोरुममधून गाडीची दुरुस्ती करुन घेण्यास सांगितले. तक्रारदार यांनी रत्नप्रभा मोटर्स, चिकलठाणा औरंगाबाद येथून गाडीची दुरुस्ती करुन घेतली, सदर दुरुस्ती खर्चापोटी दि.31.08.2013 रोजी रत्नप्रभा मोटर्स यांचेकडे रु.1,00,000/- जमा केले, उर्वरित रक्कम रु.5,85,914/- हे दि.28.12.2013 रोजी जमा केले, तक्रारदार यांनी एकूण खर्च रक्कम रु.6,85,914/- दुरुस्ती कामी खर्च केले. सामनेवाला यांचे सर्व्हेअर श्री.अरुण जी.नाईक यांनी रत्नप्रभा मोटर्स औरंगाबाद येथे वारंवार भेट देऊन गाडीच्या दुरुस्तीची पाहणी केली. तक्रारदार यांचे वाहन किल्नर साईडचे पूर्णपणे नुकसान झाले होते. गाडीचा टॅब चेपला, बोनट, बाडी, टायर फुटला, हेडलाईट, इंडिकेटर, पायरी डॉस बोर्ड, बॅटरी फाउंडेशन, डिझेल फिल्टर बॉडी, टायर वरील पत्रा पूर्ण बेंड झाला, सदरील गाडीचे 80टक्के नुकसान झाले होते. तक्रारदार यांनी सदरील वाहन बीड वरुन औरंगाबादला नेण्यासाठी रक्कम रु.7,000/- खर्च केले. तक्रारदार यांनी पाटोदा येथून बीडला वाहन आणण्यासाठी रु.5,000/-खर्च केले. तक्रारदार यांनी एकूण खर्च रक्कम रु.7,02,914/- खर्च केले. सामनेवाला यांचे सर्व्हेअर यांनी रक्कम रु.4,20,000/- चे नुकसान झाले आहे असा रिपोर्ट दिला. सामनेवाला यांनी, तक्रारदार यांनी केलेल्या खर्चाची रक्कम दिली नाही. दि.24.02.2014 रोजी सामनेवाला यांनी तक्रारदार यांचा क्लेम नामंजूर केला आहे असे कळविले. सामनेवाला यांनी गाडीच्या ड्रायव्हरचा पोलीसासमोर झालेला जबाब याचा आधार घेऊन क्लेम नाकारला. ड्रायव्हर यांचा जबाब पोलीसांनी चुकीचा लिहून घेतला होता, तो जबाब दुरुस्त करुन पोलीस निरीक्षक यांना पाठविण्यात आला. सदरील वाहन भाडयाने प्रवाशी वाहतूक करण्यासाठी दिले नव्हते, सामनेवाला यांनी चुकीच्या पध्दतीने क्लेम नाकारुन नुकसान भरपाई देण्याची टाळाटाळ केली व सेवेत त्रुटी ठेवलेली आहे. तक्रारदार यांनी अपघातग्रस्त वाहनाच्या दुरुस्तीकामी केलेला खर्च रक्कम रु.7,02,914/- विमा कंपनीकडून देववावे व त्यावर व्याज देण्यात यावे. तक्रारदार यांना झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी व तक्रारीच्या खर्चापोटी नुकसान भरपाई देण्यात यावी अशी विनंती केली आहे.
सामनेवाला हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी निशाणी 9 अन्वये लेखी कैफियत दाखल केली. सामनेवाला यांनी तक्रारदार हे अपघातग्रस्त वाहनाचे मालक आहे, तक्रारदार यांचे वाहनाचा सामनेवाला यांच्याकडे विमा उतरविलेला आहे ही बाब मान्य केलेली आहे. सामनेवाला यांनी अपघातग्रस्त वाहनाची पाहणी करण्यासाठी सर्व्हेअरची नियुक्ती केली, सर्व्हेअरने गाडीची पाहणी केली व अहवाल दिला, ही बाब मान्य केली आहे. सामनेवाला यांनी वाहन दुरुस्तीकामी रक्कम रु.6,85,914/- इतका खर्च आला ही बाब नाकारली आहे. तसेच सदरील वाहन पाटोदा येथून बीड येथे व बीड येथून औरंगाबाद येथे नेण्यासाठी तक्रारदाराला खर्च करावा लागला, ही बाब नाकारली आहे.
सामनेवाला यांचे कथन की, तक्रारदार यांनी वाहन स्वतःच्या वापराकरता विकत घेतले होते व त्या वाहनाची विमा पॉलीसी काढली होती. तक्रारदार यांनी सदरील वाहन प्रवाशी वाहतूक करण्यासाठी भाडयाने दिले होते. प्रवाशी वाहतूक करणेकामी ड्रायव्हरकडे योग्य ते लायसन्स नव्हते. तक्रारदार यांनी प्रायव्हेट कार पॉलीसी घेतलेली होती, सदरील पॉलीसी नुसार गाडी भाडयाने प्रवाशी वाहतूक करता येणार नाही असे बंधन होते. तक्रारदार यांनी पॉलीसीच्या शर्ती व अटींचा भंग केल्यामुळे कंपनी नुकसान भरपाई देण्यास जबाबदार नाही. सामनेवाला यांनी तक्रारदार यांचा क्लेम योग्य व वाजवी कारणासाठी नाकारलेला आहे. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवलेली नाही. सबब तक्रारदार यांची तक्रार रदद करण्यात यावी.
तक्रारदार यांनी निशाणी 4 सोबत सामनेवाला यांनी तक्रारदार यांचा क्लेम नाकारल्याबाबत पत्र, दोषारोप पत्र, साक्षीदाराचे पोलीसांनी घेतलेले जबाब याच्या झेरॉक्स प्रती, गुन्हयाची प्रथम खबर, वाहनाचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, ड्रायव्हरचे शपथपत्र, वाहन दुरुस्तीच्या झालेल्या खर्चाच्या पावत्या, सर्व्हे रिपोर्ट हजर केलेले आहे. तक्रारदार यांनी निशाणी 13 सोबत तक्रारदार यांचे सॉ मील लायसन्स दाखल केले आहे. तक्रारदार यांनी स्वतःचे शपथपत्र निशाणी 10 अन्वये दाखल केले आहे. सामनेवाला यांनी शिवाजी विश्वनाथ उलमुले यांचे शपथपत्र दाखल केले आहे. सामनेवाला यांनी निशाणी 14 सोबत इन्व्हेस्टीगेशन रिपोर्ट दाखल केला आहे. तसेच पोलीस पेपर हजर केलेले आहे. तक्रारदार यांचे वकील रहेमतुल्लाह आणि सामनेवाला यांचे वकील श्री.जाधव यांचा युक्तीवाद ऐकला. न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1) सामनेवाला यांनी तक्रारदार यांचा विमा रकमेचा
क्लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवली आहे, ही बाब
तक्रारदार यांनी शाबीत केली आहे काय ? नाही.
2) तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्यास
पात्र आहे काय? नाही.
3) आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुददा क्र.1 व 2 ः- तक्रारदार यांचे वकील श्री.रहेमतुल्लाह यांनी या मंचासमोर असा युक्तीवाद केला की, ड्रायव्हर हा तक्रारदार यांची गाडी घेऊन बीड येथे परत येत असताना जामखेड रोडवर पिंपळगावच्या जवळ रस्त्यावरुन काही हरणे जात होती, त्यांना वाचविण्यासाठी ड्रायव्हरने ब्रेक दाबला असता गाडी रस्त्याच्या खाली गेली व त्यामध्ये वाहनाचे मोठे नुकसान झाले. सदरील वाहनाचे झालेले नुकसान तपासणे कामी सामनेवाला यांनी सर्व्हेअरची नियुक्ती केली होती, सामनेवाला यांनी सांगितल्यावरुन तक्रारदार यांनी वाहन दुरुस्त करुन घेतले. तक्रारदार यांना वाहन दुरुस्तीकामी रु.6,85,914/- खर्च आला. सामनेवाला यांचे सर्व्हेअर यांनी रिपोर्टमध्ये दुरुस्ती खर्च रक्कम रु.4,20,000/- आला, असा रिपोर्ट सामनेवालाकडे दिला. तक्रारदार यांनी सर्व कागदपत्राची पूर्तता सामनेवाला यांच्याकडे केली, सामनेवाला यांनी कोणत्याही संयुक्तिक कारणाशिवाय तक्रारदार यांचा क्लेम नाकारला. सदरील वाहन तक्रारदार यांनी प्रवाशी वाहतूक करण्यासाठी भाडयाने दिले नव्हते. तक्रारदार यांचे ड्रायव्हर यांनी सदरील वाहन तक्रारदाराच्या परवानगी शिवाय नेले होते, पोलीसांनी तक्रारदार यांचे ड्रायव्हरचा जबाब चुकीच्या पध्दतीने नोंदविला आहे. सदरील वाहनामध्ये कोणतेही प्रवाशी आढळून आले नाही व त्यांचा जबाब ही पोलीसांनी घेतलेला नाही. तक्रारदार यांचे ड्रायव्हरचा जबाब पोलीसांनी चुकीचा घेतला याबाबत ड्रायव्हर यांना दुरुस्ती जबाब पोलीस स्टेशनला दिला आहे. तक्रारदार यांनी पॉलीसीच्या कोणत्याही शर्ती व अटीचा भंग केलेला नाही. त्यामुळे विमा पॉलीसी अंतर्गत वाहन दुरुस्तीसाठी करावा लागलेला खर्च तक्रारदार मिळण्यास पात्र आहे. सबब तक्रारदार यांची तक्रार मंजूर करण्यात यावी.
सामनेवाला यांचे वकील श्री.जाधव यांनी या मंचाचे लक्ष तक्रारदार यांनी दाखल केलेल्या पोलीस पेपरवर वेधले व असा युक्तीवाद केला की, तक्रारदाराचे ड्रायव्हर यांचे विरुध्द दोषारोप पत्र दाखल झाले आहे. तक्रारदार यांचे ड्रायव्हर स्वतः अपघातास कारणीभूत झालेले आहे, तक्रारदार व त्यांचे ड्रायव्हर सदरील वाहन भाडे घेऊन प्रवाशी वाहतूक करत होते, सदरील वाहन हे तक्रारदार यांचे वैयक्तिक वापरासाठी घेतलेले आहे. सदरील वाहनाचा विमा प्रायव्हेट कार पॉलीसी अंतर्गत काढलेला आहे. सदरील वाहन मोटार वाहन कायदा कलम 66 पोट कलम 3 नुसार विमा पॉलीसीचा भंग केलेला आहे. सबब सामनेवाला हे तक्रारदार यांना नुकसान भरपाई देणे लागत नाही. सामनेवाला यांनी तक्रारदार यांचा क्लेम योग्य व वाजवी कारणासाठी नाकारलेला आहे.
तक्रारदार यांचे वकील व सामनेवाला यांचे वकील यांनी वर नमुद केलेला युक्तीवाद लक्षात घेतला. तसेच पुराव्याचे शपथपत्र व सोबत दाखल केलेले दस्तऐवज याचे अवलोकन केले. तक्रारदार यांनी वाहन खाजगी वापरासाठी घेतलेले होते. सदरील वाहनाचा प्रायव्हेट कार पॉलीसी स्वरुपाचा विमा काढलेला होता. सदरील वाहनाचा दि.06.07.2013 रोजी रात्रीच्या वेळेस जामखेड बीड रोडवर अपघात झाला, त्या अपघातामध्ये तक्रारदार यांचे वाहनाचे नुकसान झाले. तक्रारदार यांनी सदरील वाहन औरंगाबाद येथून दुरुस्त करुन घेतले व त्याकामी तक्रारदार यांनी तक्रारीसोबत दाखल केलेल्या बिलानुसार खर्च केला आहे, या बाबी विषयी वाद नाही. सामनेवाला यांनी तक्रारदार यांचे वाहनाचे काय नुकसान झाले हे पाहण्यासाठी सर्व्हेअर नेमले होते, सर्व्हेअर यांनी सदरील वाहन दुरुस्ती कामी रक्कम रु.4,20,000/- एवढा खर्च आला असा रिपोर्ट सामनेवाला यांच्याकडे दिला.
सामनेवाला यांचा बचाव की, तक्रारदार यांनी पॉलीसीमध्ये नमुद केलेल्या शर्ती व अटीचा भंग केला आहे. सदरील वाहन वैयक्तिक वापरासाठी असतानाही भाडे घेऊन प्रवाशी वाहतूक करण्यासाठी वापरले व ते तसा वापर करत असताना अपघात झाला त्यामुळे पॉलीसीच्या शर्ती व अटीचा भंग झाला. सदरील बाबीचा विचार केला असता सदरील वाहन हे तक्रारदार यांचे खाजगी वापरासाठी घेतले होते व प्रायव्हेट कार पॉलीसी सामनेवाला यांचेकडून घेतली होती, पॉलीसीच्या शर्ती व अटीनुसार सदरील वाहन भाडे घेऊन प्रवाशी वाहतूक करण्यासाठी वापरता येणार नाही अशी अट आहे. सदरील वाहनास प्रवाशी वाहतूक करण्याची परवानगी नाही. तसेच ड्रायव्हर यांना प्रवाशी वाहतूक करण्यासाठी योग्य ते लायसन्स असणे गरजेचे आहे. प्रवाशी वाहतूक करत असताना गाडीचा अपघात झाला त्यास इन्शुरन्स कंपनी जबाबदार राहणार नाही अशी अट आहे.
तक्रारदार यांचे वाहनाचा अपघात झाल्यानंतर सदरील अपघात हा पोलीस स्टेशनमध्ये नोंदविण्यात आला. तक्रारदार यांचे ड्रायव्हर अकबर पठाण सलीम पठाण यांचा जबाब सरकारी दवाखाना बीड येथे पोलीस चौकी अंमलदार यांनी नोंदविला, त्या जबाबात ड्रायव्हर याने तक्रारदार यांचे वाहन दुपारी चार वाजेच्या सुमारास बीड येथून भाडे घेऊन गेलो होतो, जामखेड येथील कार्यक्रम संपल्यानंतर भाडेकरु यांना घेऊन परत बीडला येत असताना गाडीला चार, पाच हरणे आडवी आली, त्यांना वाचविण्यासाठी ब्रेक लावला असता गाडीचा अपघात झाला असे नमुद केले आहे. विलास साहेबराव माळी पोलीस हेड कॉन्स्टेबल पाटोदा यांनी अपघाताची चौकशी केली, सदरील चौकशी दरम्यान शेख पाशा शेख पापामियॉ तक्रारदार शेख अल्लाउददीन यांचा जबाब घेण्यात आला. या दोघांनी त्यांच्या जबाबात तक्रारदार यांचे वाहन भाडयाने दिले जाते, अपघात झाला त्यावेळेस तक्रारदार यांचे ड्रायव्हर जामखेड येथे भाडे घेऊन गेले होते, भाडेकरुना घेऊन ते परत येत असताना अपघात झाला ही बाब नमुद केलेली आहे. तक्रारदार यांचे ड्रायव्हर यांनी प्रवाशी घेऊन सदरील वाहन नेले नसते तर त्यांनी तसा जबाब देण्याचे कोणतेही कारण नव्हते. सदरील अपघात घडल्यानंतर चौकशी पूर्ण झाल्यानंतर तक्रारदार यांचे असे लक्षात आल्याचे दिसते की, सदरील वाहन भाडे प्रवाशी वाहतूक केली हे जर स्पष्ट झाले तर, त्यांना वाहन दुरुस्तीचा खर्च मिळणार नाही. हे लक्षात आल्यानंतर तक्रारदार यांनी त्यांचे ड्रायव्हरचा जबाब पोलीस स्टेशनला पाठविल्याचे निदर्शनास येते. जर तक्रारदार यांचे वाहन प्रवाशी वाहतूक करण्यासाठी वापरलेच नव्हते, तर तक्रारदार त्यांचा ड्रायव्हर यांचे जबाब घेतले त्यावेळेस त्यांनी स्पष्टपणे तसे सांगितले असते. तक्रारदार हे सदरील केसमध्ये त्यांचे वाहन भाडे घेऊन प्रवाशी वाहतूक करत नव्हते ही बाब नुकसान भरपाई मिळण्यासाठी विचारपूर्वक म्हटल्याचे निदर्शनास येते.
या मंचाने तक्रारदार यांचा क्लेम व सोबत दाखल केलेला सर्व पुरावा लक्षात घेतला. तसेच सामनेवाला यांनी ज्या कारणासाठी क्लेम नाकारला, त्या बाबीचे विश्लेषण केले असता, सामनेवाला यांनी तक्रारदार यांचा क्लेम योग्य व वाजवी कारणासाठी नाकारला आहे हेच स्पष्ट होते. तक्रारदार यांनी पॉलीसीत नमुद केलेल्या शर्ती व अटीचा भंग केला आहे. सबब विमा पॉलीसी अंतर्गत सामनेवाला हे तक्रारदार यांना नुकसान भरपाई देणे लागत नाही. सामनेवाला यांनी
द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवलेली नाही. सबब तक्रारदार यांची तक्रार रदद होणेस पात्र
आहे. म्हणून मुददा क्र.1 व 2 चे उत्तर नकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1) तक्रारदार यांची तक्रार रदद करण्यात येत आहे.
2) खर्चाबददल आदेश नाही.
3) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्री.रविंद्र राठोडकर, श्री.विनायक लोंढे,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड