निकालपत्र
निकाल दिनांक – १९/११/२०१९
(द्वारा अध्यक्ष : श्री.विजय चंद्रलाल प्रेमचंदानी)
___________________________________________________________
१. तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ प्रमाणे सदर तक्रार दाखल केलेली आहे.
२. तक्रारदाराने तक्रारीत असे कथन कले आहे की, तक्रारदाराने शेतात शेततळे तयार करण्याचे ठरविले व सामनेवाले क्र.२ यांच्याशी संपर्क साधला. सामनेवाले क्र.१ ही शेततळ्यासाठी आवश्यक असणा-या प्लॅस्टिकच्या कागदाची उत्पादन करणारी कंपनी असुन सामनेवाले क्र.२ हे सामनेवाले क्र.१ यांचेकडुन प्लॅस्टीक पुरविण्याचे काम करतात. तक्रारदाराने सामनेवाले क्र.२ यांच्या सांगण्यावरून शेततळ्याकरीता जागा तयार केली व त्याकरीता जवळपास १० ते १५ लाख रूपये खर्च कला. दिनांक २१-०१-२०१५ रोजी तक्रारदाराने सामनेवाले क्र.१ यांचे कंपनीचे H.D.F.C. Fabric coated with LDPE Size 17x50 MTR 420GSM 500 mm. (Micron) चे काळ्या रंगाचे Duly ISI Mark 15345112008 चा 950.00 चौ.मी. प्लॅस्टीक कापड रूपये ६२,४००/- ला खरेदी केला व मजुरीचे व टॅक्स पोटीचे रूपये १७,१००/- चे इनव्हॉईस पत्र दिले. सदर प्लॅस्टीक कागदाची विक्री करतेवेळेस पाच वर्षांची वॉरंटी दिली होती. तक्रारदाराने शेतामध्ये शेततळे तयार केले व जवळपास ५,००,०००/- रूपये खर्च केला व शेततळ्यामध्ये पाणी भरले व या पाण्याचा वापर करू लागला. शेततळे तयार झाल्यानंतर दिनांक ०५-०३-२०१६ रोजी तक्रारदारास लक्षात आले की, शेततळ्यामधील पाणी आपोआप एका रात्रीमधुन चार ते पाच फुट कमी होत आहे. पाणी न वापरता, कमी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने सामनेवाले क्र.२ यांच्याकडे संपर्क साधला असता सामनेवाले क्रमांक २ तज्ञ माणसाच्या लक्षात आले व त्यावेळी त्यांनी सदरील प्लॅस्टीक कागद बदलावे लागेल, असे सांगितले. त्यानंतर सामनेवाले क्र.२ यांनी सामनेवाले क्र.१ कडे दिनांक ११-०३-२०१६ रोजी ई-मेल करून तक्रारदार यांचे शेततळ्याचे झालेले नुकसानीबाबत कळविले. परंतु सामनेवाले क्र.१ यांनी त्यास कसलेही उत्तर दिले नाही अथवा सामनेवाले क्र.१ तर्फे कोणीही तज्ञ व्यक्ती शेततळ्याची पाहणी करण्यास आले नाही. त्यानंतर सामनेवाले क्र.२ यांनी दिनांक १३-०४-२०१६, २८-०४-२०१६ व १३-०६-२०१६ रोजी सदर तक्रारीबाबत ई-मेलद्वारे कळविले. परंतु सामनेवाले क्र.१ यांनी सदर ई-मेलला व तक्रारीस कोणतेही उत्तर दिले नाही व नुकसान भरपाई दिली नाही. शेततळ्यामध्ये पाणी टिकून न राहिल्यामुळे जवळपास रूपये ३,००,०००/- चे शेतीमधील पिकाचे नुकसान तक्रारदारास झाले आहे व त्यास सामनेवाले क्र.१ व २ हेच सर्वस्वी जबाबदार आहेत. म्हणुन सदर तक्रार दाखल करणेस कारण घडले आहे.
तक्रारदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, तक्रारदार यांना सामनेवाले यांच्याकडुन तक्रारदार यांचे शेततळ्याचे व पिकांचे झालेले नुकसान रक्कम रूपये ३,००,०००/- सामनेवाले यांच्याकडुन तक्रारदार यांना देण्याबाबत आदेश व्हावा, तक्रारदार यांना सामनेवालेकडुन शारीरीक, मानसिक त्रास याबाबत रक्कम रूपये २५,०००/- मिळावे. तसेच वरील रकमेवर सामनेवाले यांच्याकडुन क्लेम सादर केलेपासुन रक्कम वसुल होईपावेतो द.सा.द.शे. १८ टक्के प्रमाणे व्याज देण्यात यावे.
३. तक्रारदाराची तक्रार स्विकृत करून सामनेवालेंना नोटीस काढण्यत आली. सदर नोटीस प्राप्त झाल्यानंतर सामनेवाले क्र.१ प्रकरणात हजर झाले व सामनेवाले क्र.१ यांनी त्यांचे म्हणणे निशाणी १२ वर असे दिले की, सचिन नामदेव गोटे हे सामनेवाले क्र.१ या कंपनीचे अधिकृत डिलर आहेत. सामनेवाले क्र.१ कंपनीकडुन प्लॅस्टीक पेपर घेऊन ते शेतकरी यांना विक्री करण्यास तसेच सदरचा कागद शेतकरी यांच्या सुचनेनुसार त्यांच्या शेत तळ्यामध्ये बसवुन देण्याचा व्यवसाय करतात. सदरचा कागद बसवतांना शेत तळ्यात जर बारीक दगड असल्यास पेपरास छिद्र पडु शकतात. म्हणुन याबाबतची काळजी घेणे ही जबाबदारी ही संबंधीत शेतकरी याची असते व कंपनीच्यावतीने तसेच डिलर याच्यावतीने शेतकरी यांना तश्याच प्रकारची सुचना देण्यात येतात. इतक्यात नव्हे तर सदर सुचना तक्रारदाराला देण्यात आली होती. सदर कागद घाईगडबडीत टाकल्याने व शेतामध्ये बारीक दगड असल्याने सदरचा कागद दगडामुळे खराब होऊ शकतो त्यात उत्पादक कंपनीची आणि डिलरची कोणतीही जबाबदारी नाही. तक्रारदाराचे प्लॅस्टीक कपडा बारीक काळे छिद्र पडल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. ही बारीक छिद्र बारीक दगडांमध्ये झाले असले तरी त्यात कोणताही उत्पादीत दोष नाही. सामनेवाले क्र.१ यांनी या कंपनीचे उत्पादीत केलेला कागद हा आय.एस.ओ. प्रमाणीत असुन उच्च दर्जाचा आहे. संपुर्ण महाराष्ट्रामध्ये त्यातल्या त्यात नगर जिल्ह्यामध्ये गेल्या चार-पाच वर्ष सतत दुष्काळी परिस्थिती होती. दुष्काळी परिस्थितीमुळे तक्रारदार यांनी कागद टाकलेल्या शेत तलावात पाणी न भरल्याने उन्हाळ्यामुळे तसेच शेततलाव कोरडा असल्याने जंगली प्राणी, पशुपक्षी यांचा वापर होऊन त्यामुळे तक्रारदार याचे शेत तलावातील कागदाचे नुकसान होऊ शकते. सदरची बाब ही नैसर्गिक असल्याने त्यास सामनेवाला यांना मुळीच जबाबदार धरता येणार नाही. सदरचा कागद बसवतांना कागद बसविण्याचा खर्च हा संपुर्णपणे डिलरला दिलेला असतो. त्यामुळे तो सामनेवाला यांच्याकडुन वसुल करण्याचा कोणताही अधिकार तक्रारदार यांना नाही. शेतात अनेक दिवस पाणीसाठा नसल्याने नैसर्गिक कारणाने सदर कागद खराब झाला असल्याचे सामनेवाले यांच्याविरूध्द खोटी तक्रार दाखल करण्यात आली आहे. संबंधीत शेतकरी यांनी सदर शेत तलावासाठी लागणारे कागदाची शासनाकडुन मिळणारी संपुर्ण सवलत मिळल्यानंतर सदरची खोटी बनावट तक्रार सामनेवाले यांच्याविरूध्द दाखल करण्यात आली आहे. सामनेवाले क्र.१ यांनी महाराष्ट्राबाहेर राज्यात शेततलावासाठी सदर कागद विकले असुन अशाप्रकारची कोणतीही तक्रार आली नसुन सदर तक्रार खोटी असुन खर्चासह खारीज करण्यात यावी, अशी विनंती सामनेवाले क्र.१ यांनी केली आहे.
४. सदर प्रकरणात सामनेवाले क्र.२ हजर झाले व त्यांचे म्हणणे निशाणी १८ वर असे दिले की, तक्रारदाराने तक्रारीत सामनेवाले क्र.२ चे विरूध्द लावलेले आरोप खोटे असुन त्यांना नाकबुल आहे. सामनेवाले क्र.२ ने पुढे असे कथन केलेले आहे की, तक्रारदाराने दाखल केलेल्या बिलांप्रमाणे संपुर्ण रक्कम ही तक्रारदार याने युनियन क्वालिटी प्लॅस्टिक लिमिटेड व सामनेवाले क्र.१ यांना अदा केलेली आहे. सामनेवाले क्र.१ यांनी तक्रारदाराच्या शेततळ्यास प्लॅस्टीक कागदाचा पुरवठा केलेला आहे. त्यामुळे सदर तक्रारदाराच्या कोणत्याही मागणीस अथवा तक्रारीस सामनेवाले क्र.२ हे जबाबदार नाहीत. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी, अशी विनंती सामनेवाले क्र.२ यांनी केली आहे.
५. तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार, शपथपत्र, दस्तऐवज सामनेवाले क्र.१ व २ यांचे शपथपत्र त्यांनी दाखल केलेली कागदपत्र पाहता मंचासमोर खालीलप्रमाणे मुद्दे विचारात घेण्यात येत आहे.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
१. | तक्रारदार हे सामनेवालेंचे ग्राहक आहेत काय ? | होय |
२. | सामनेवाले क्र.१ व २ यांनी तक्रारदार यांना सेवेत त्रुटी दिलेली आहे काय ? | नाही |
३. | आदेश काय ? | अंतीम आदेशाप्रमाणे |
मुद्दा क्र.१ -
६. तक्रारदाराने सामनेवालेकडुन त्याच्या शेततळ्यात प्लॅस्टीक खरेदी व कागद बसविण्याकरीता सामनेवाले क्र.१ ला रक्कम दिली, ही बाब तक्रारदाराने निशाणी क्र.३ दस्त क्र.३ व ४ देयकांवरून सिध्द होत आहे. म्हणुन तक्रारदार हे सामनेवालेचे ग्राहक आहे, असे सिध्द होते. सबब मुद्दा क्र.१ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्र.२ -
७. तक्रारदाराने तक्रारीत सामनेवालेने पुरवलेला प्लॅस्टीक कागदा उत्पादीत दोषामुळे शेततळ्यातील पाणी आपोआप कमी झाली. त्यामुळे तक्रारदाराचे शेतातील नुकसान झाले. सदर नुकसान भरपाई सामनेवालेने दिली नसल्याने सदर तक्रार दाखल केलेली आहे. परंतु तक्रारदाराने सदरील प्रकरणात प्लॅस्टीक कागद खराब आहे, याबाबत कोणताही तज्ञ विशेषज्ञाचा अहवाल दाखल केलेला नाही. त्त्यामुळे सामनेवाले यांनी तकारदाराला पुरविलेला प्लॅस्टीक कागद हा निम्न दर्जाचा होता, ही बाब तक्रारदार सिध्द करू शकले नाही. सबब सामनेवाले यांनी तक्रारदाराला न्युनतम सेवा दिली, असे सिध्द होत नाही. म्हणुन मुद्दा क्र.२ चे उत्तर नकारार्थी देण्यात येत आहे.
मुद्दा क्र.३
८ मुद्दा क्रमांक १ व २ वरील विवेचनावरून खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
आदेश
१. तक्रारकर्ताची तक्रार खारीज करण्यात येत आहे. २. उभय पक्षकार यांनी तक्रारीचा खर्च स्वतः सहन करावा. ३. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना नि:शुल्क देण्यात यावी. ४. तक्रारकर्ता यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी. |