(मंचाचा निर्णय: श्री. विजयसिंह राणे - अध्यक्ष यांचे आदेशांन्वये)
-// आ दे श //-
(पारित दिनांक : 24/10/2011)
1. प्रस्तुत तक्रार तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द मंचात दिनांक 06.08.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :-
2. यातील एन.आर.आय. तक्रारकर्ती आपल्या वडीलांकडे नागपूर येथे आली होती. गैरअर्जदार क्र.2 ही प्रवासी विमान कंपनी असुन गैरअर्जदार क्र.1 हे त्यांचे प्रतिनिधी आहेत. तक्रारकर्तीने दि.29.07.2008 रोजी ऑकलॅन्ड येथे जाण्याकरीता गैरअर्जदार क्र.2 या विमान कंपनीचे 3 प्रवासी तिकीट खरेदी केले. ठरलेल्या तारखेला तिने प्रवास सुरु केला दि.07.09.2008 रोजी दिल्ली येथून ऑकलॅन्डकरीता आपल्या दोन मुले व सामानासहीत बसल्यानंतर ते विमान बँकॉक येथील सुवमघम विमानतळावर पोहचले. त्याच दिवशी ऑकलॅन्डसाठीचा प्रवास 19.55 वाजता सुरु होणार होता, त्यांना 10 तास तेथे थांबावे लागले तेथे कोणतीही थांबण्याची व खाण्याची व्यवस्था नव्हती त्यामुळे तिला मुलांसोबत त्रास सहन करावा लागला. तक्रारकर्तीने आपले विमान टिकीट ऑकलॅन्डला जाण्याचे दृष्टीने चेक करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिचे जवळ सिडनीकरीता ट्रांझीट व्हीसा आहे काय अशी चौकशी करण्यांत आली. आणि तसे असेल तरच ऑकलॅन्डकरीता प्रवास करता येईल. सिडनी येथे 1 तास विमान थांबते तेव्हा तक्रारकर्तीने तेथे ट्रांझीट व्हीसा कसा मिळविता येईल याची चौकशी केली, त्या दिवशी सुटी असल्याने ट्रांझीट व्हीसा मिळणे शक्य नव्हते. बाहेरुन व्हीसा मिळविण्याकरीता 5 दिवस वेळ लागेल असे कळले. शेवटी तक्रारकर्तीला आपल्या भावाचे मदतीने बँकॉक सुवमघम ते ऑकलॅन्ड प्रवास करण्याकरीता दुसरे टिकीट मागवावे लागले, त्याकरीता रु.2,11,203/- एवढी रक्कम भावाला द्यावी मागली. हा सगळा गोंधळ गैरअर्जदारांच्या अपु-या माहितीमुळे व योग्य तिकीट न दिल्यामुळे झालेला होता. सरळ विमानाचे टिकीट तिला मिळाले असते तर हा प्रकार झाला नसता. याबाबत गैरअर्जदारांनी पूर्णपणे दूर्लक्ष करुन तक्रारकर्तीला कुठलीही सुचना दिली नव्हती. तक्रारकर्तीला आधी पुर्व सुचना दिली असती तर त्यासाठी ट्रांझीट व्हीसा मिळवुन घेता आला असता. गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीला तश्याप्रकारचे टिकीट देणे गरजेचे होते, मात्र त्यांनी तसे न करुन आपल्या सेवेत त्रुटी दिलेली आहे म्हणून तक्रारकर्तीला त्रास सहन करावा लागला, मुलांची व तिचे गैरसोय झाली, ऐनवेळेवर भावाकडून टिकीटे प्राप्त करुन घ्यावी लागली आणि गैरअर्जदारांनी दिलेल्या टिकीटांचा उपयोग केवळ बँकॉक सुवमघम पर्यंत झाला, त्यासाठी रु.1,50,000/- एवढी रक्कम व्यर्थ गेली. बॅंकॉक येथे तिला रु.13,399/- एवढा खर्च करावा लागला. याकरीता तक्रारकर्तीने सदर तक्रार मंचात दाखल केली असुन ती व्दारे बँकॉक ते ऑकलॅन्ड विमान प्रवासाचे रु.2,11,203/-, पहील्या टिकीटाचा उपयोग बँकॉक पर्यंतच झाला व बँकॉक ते ऑकलॅन्डसाठीचे जेट एअरवेचे तिकीटाचा उपयोग झाला नाही व ते तिकीट विकत घेण्यासाठी रु.1,50,000/- व्यर्थ गेलेले, बँकॉक येथील विमानतळावर झालेला खर्च रु.13,300/-, मानसिक व शारीरिक त्रासाकरीता रु.2,90,000/- असे एकूण रु.6,64,503/- गैरअर्जदारांकडून मिळावे अश्या मागण्या केलेल्या आहेत.
3. गैरअर्जदारांना नोटीस देण्यांत आली असता त्यांनी मंचात हजर होऊन आपले उत्तर दाखल केले ते खालिल प्रमाणे...
गैरअर्जदार क्र. 1 यांनी आपल्या उत्तरात तक्रारकर्तीला नागपूर ते ऑकलॅन्ड विमानाची 3 प्रवासी टिकीटे उपलब्ध करुन दिल्याचे मान्य केले आहे. त्यांनी तक्रारकर्तीला विमान हे दिल्ली-बॅंकॉक-सिडनी ते ऑकलॅन्ड जाईल व सिडनी येथे ट्रांझीट व्हीसाची गरज भासेल असे सांगितले होते. मात्र तक्रारकर्तीने तिचे नेहमी जाणे-येणे असल्याचे व ट्रांझीट व्हीसाची सोय मी स्वतः करुन घेईल असे सांगितले होते. जर तक्रारकर्तीने त्यांचेकडून ट्रांझीट व्हीसा उपलब्ध करुन घेतला असता तर तिला या सर्व त्रासामधुन जायची गरज पडली नसती. तसेच तक्रारकर्तीचा प्रवास हा दिल्ली येथून सुरु झाला तेव्हा दिल्ली विमानतळावर तक्रारकर्तीचे सर्व कागदपत्रे चेक करण्यांत आली होती तेव्हा दिल्ली विमानतळावरच्या अधिका-यांची जबाबदारी होती की, त्यांनी तक्रारकर्तीला सिडनी येथे ट्रांझीट व्हीसा लागत असल्याचे सुचवायला पाहिजे होते व पुढील प्रवासास प्रतिबंध करावयास पाहिजे होते. त्यामुळे संपूर्ण जबाबदारी ही दिल्ली विमानतळावरील अधिका-यांची असुन गैरअर्जदार क्र.1 हे तक्रारकर्तीच्या कसल्याही प्रकारच्या त्रासास जबाबदार नाहीत, त्यामुळे त्यांचे विरुध्दची तक्रार खारिज करण्यांत यावी अशी मंचास विनंती केलेली आहे.
4. गैरअर्जदार क्र.2 यांनी आपल्या उत्तरात त्यांची विमान कंपनी असुन गैरअर्जदार क्र.1 हे त्यांचेसाठी टिकीट विक्रीचे काम करतात, ही बाब मान्य केलेली आहे. तसेच त्यांची जबाबदारी केवळ तिकीट विक्री करणे व प्रवाश्याने ज्या विमानाची तिकीट काढली असेल त्या विमानात त्याला जागा उपलब्ध करुन देणे ही आहे. प्रवाश्यास एका देशातून दुस-या देशात जावयाचे असेत तर अशा प्रवाश्यास त्या देशाचे नियमाप्रमाणे व्हिसा व इतर बाबींची पुर्तता स्वतः करायची असते त्यास गैरअर्जदार क्र. 2 जबाबदार नाहीत. तक्रारकर्ती नेहमीच भारतात येणे-जाणे करीत असल्याने त्यांना तांत्रिक बाबींची व नियमांची अद्यावत माहिती असुन त्यांना झालेला त्रास हा केवळ त्यांच्या चुकीमुळे झालेला आहे. तसेच तक्रारकर्ती ही भारताची नागरीक नसुन एन.आर.आय. आहेत व त्यांना या सर्व बाबींची संपूर्ण माहिती असल्यामुळे ग्राहक कायद्याचे तरतुदींनुसार ती ग्राहक ठरत नसुन सदर तक्रार खारिज करण्यांत यावी असा उजर घेतला आहे.
5. तक्रारकर्त्यांनी प्रस्तुत तक्रारीसोबत निशानी क्र.3 वर दस्तावेजांची यादी जोडलेली असुन त्यात अनुक्रमांक 1 ते 8 वर टिकीट खरेदी केल्याची रशीद, प्रॉपर्टी रिपोर्ट, गैरअर्जदारास पाठविलेले पत्र, गैरअर्जदाराव्दारे ई-मेलव्दारे आलेले उत्तर, आममुख्त्यारपत्र इत्यादी दस्तावेजांच्या छायांकित प्रती जोडलेल्या आहेत.
6. प्रस्तुत तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि.10.10.2011 रोजी आली असता दोन्ही पक्षांचे वकील हजर त्यांचा युक्तिवाद ऐकला. तसेच तक्रारीसोबत दाखल दस्तावेजांचे व युक्तिवादाचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले.
-// नि ष्क र्ष //-
7. यातील गैरअर्जदारांनी घेतलेल्या आक्षेपांचा सर्वप्रथम विचार होणे गरजेचे आहे. गैरअर्जदारांचा मुख्यतः आक्षेप असा आहे की, सदरच्या तक्रारीवर तक्रारकर्तीची सही नाही आणि त्यामुळे ही तक्रार गैरकायदेशिर आहे. यातील तक्रारकर्ती ही स्पष्टपणे विदेशात न्युझीलंड येथे राहते व ती नागपूर येथे आपल्या पित्याकडे आलेली होती. ती वारंवार भारतात येऊन ही तक्रार दाखल करुन कारवाई करु शकेल ही शक्यता फार कमी आहे, आणि त्यामुळे तिने आपल्या पित्याला अधिकारपत्र दिले असुन त्या अधिकारपत्राचे आधारे तिच्या पित्याने मुखत्यार म्हणून ही तक्रार दाखल केलेली आहे. अडचणी असलेल्या व्यक्तिला अशा प्रकारे दिवाणी दावा सुध्दा दाखल करता येतो. मुंबई उच्च न्यायालयाने ए.आय.आर. 1961 बॉम्बे 192, या ठिकाणी प्रकाशीत केलेल्या निकालाने स्पष्ट केले आहे की, लिखीत स्वरुपाचे अधिकार पत्राशिवायही दावा दाखल करता येतो. सिव्हील प्रोसीजर कोडमध्ये संबंधीत व्यक्ति योग्य त्या कारणासाठी अनुपस्थित राहत असेल तर अन्य व्यक्तिस अश्याप्रकारे अधिकार दिल्या जाऊ शकतो. ग्राहक संरक्षण कायद्यात व त्या खालिल निर्मीत नियमांत अश्या स्वरुपाच्या तक्रारींस कोणत्याही प्रकारे प्रतिबंध घालण्यात आलेला नाही. ही बाब लक्षात घेता गैरअर्जदारांनी या संबंधाने घेतलेला आक्षेप हा निर्रथक आहे. गैरअर्जदार क्र.2 ने आपला जबाबात तक्रारकर्ती ही अनिवासी भारतीय (एन.आर.आय.) आहे, ही बाब स्वतःच मान्य केलेली आहे.
8. यातील गैरअर्जदार क्र.1 चे म्हणणे आहे की, त्यांनी टिकीटे घेतांना ट्रांझीट व्हीसा घ्यावा लागेल अशी सुचना दिली, मात्र तक्रारकर्तीने आम्ही व्हीसाचे पाहून घेऊ सांगितले होते, असा बचाव घेतलेला आहे. ही बाब तक्रारकर्त्याने प्रतिज्ञालेख दाखल करुन नाकारलेली असुन यासंबंधात तक्रारकर्त्याने दाखल केलेला दस्तावेज अत्यंत महत्वाचा आहे. तक्रारकर्तीला मिळालेली टिकीटांत कुठेही सीडनी येथे विमान थांबेल याची नोंद नाही, यासंबंधी माहिती फक्त गैरअर्जदारांनाच असु शकते. आणि असा मध्येच थांबा असेल तर त्यासाठी ट्रांझीट व्हीसा घ्यावा लागतो याबाबत माहिती देणे हे उघडपणे गैरअर्जदारांचे कार्य आहे. यासंबंधी तक्रारकर्तीने दाखल केलेला दस्तावेज जो गैरअर्जदार क्र.2 यांचे मॅनेजरचे ई-मेलच्या स्वरुपातील पत्र आहे ते अतिशय महत्वाचे आहे. त्यामध्ये त्यांनी खेद व्यक्त केलेला आहे व गैरअर्जदार क्र.1 चे विरुध्द तुम्ही कारवाई करा असेही सुचविलेले आहे. तसेच त्यामध्ये तक्रारकर्तीची काय-काय गैरसोय झाली याबाबत गैरअर्जदार क्र. 2 यांनी मान्य केलेले आहे. आणि तक्रारकर्तीची तक्रार सिध्द करण्याचे दृष्टीने सदर दस्तावेज स्वयंस्पष्ट व महत्वाचा आहे. गैरअर्जदार क्र.1 यांनी या प्रकरणात जे उत्तर दाखल केलेले आहे, त्यावर केवीन पिंटो यांनी प्रतिज्ञालेख केलेला आहे. जेव्हा की, गैरअर्जदार क्र.1 चे मॅनेजर जे.ए.एल. पिंटो आहेत व त्यांचे वतीने केवीन पिंटो यांनी वकीलपत्र व प्रतिज्ञालेख सुध्दा दाखल केलेले आहे. त्यामुळे संबंधीत व्यक्तिंना यातील वस्तुस्थीतीसंबंधी योग्य ज्ञान असावे याची शक्यता फारच कमी आहे आणि त्यामुळे त्यांनी यासंबंधाने केलेली विधाने विचारात घेण्या योग्य नाही.
9. गैरअर्जदार क्र.1 ने तक्रारकर्तीला दिलेले टिकीट हे मध्ये सिडनी येथे थांबा असलेले होते व त्या दृष्टीने सुचना देण्याची व व्हीसा कारवाई करण्याची जबाबदारी ही गैरअर्जदार क्र.1 ची होती ती त्यांनी पार पाडलेली नाही. गैरअर्जदार क्र.1 ने आपल्या लेखी उत्तरात कलम 14 मधे स्पष्टपणे नमुद केलेले आहे की, तक्रारकर्तीने त्यांचेकडून ट्रांझीट व्हीसा उपलब्ध करुन घेतला असता तर त्यांना त्रास झाला नसता. याचाच अर्थ यासंबंधीची जबाबदारी ही त्यांचीच होती ही बाब सुध्दा ते मान्य करतात. आणि तक्रारकर्तीला कोणतीही सुचना त्यांनी दिलेली नाही अन्यथा हा प्रसंग उद्भवला नसता, व तक्रारकर्तीला प्रवासात त्रास झाला, तिला 10 तास अडकून रहावे लागले व भावाच्या मदतीने तिला दुसरी टिकीटे काढावी लागली, असे घडले नसते व ही संपूर्ण जबाबदारी गैरअर्जदार क्र.1 यांची आहे.
10. गैरअर्जदारांनी आपली भिस्त CPR- 30 U.P.S.C.D.R.C. यांनी दिलेल्या M/s Saurabh Offset Printers –v/s- Sri K.S. Gupta या प्रकरणात दिलेल्या निकालावर ठेवलेली आहे सदरचा निकाल विचारात घेणे जरुरी नसुन, त्यातील वस्तुस्थिती ही वेगळी आहे.
11. यातील गैरअर्जदार क्र.2 ने असा युक्तिवाद केला आहे की, अशा प्रकरणात जी काही जबाबदारी असते ती ट्रव्हल एजंटची असते, एअर लाईन्सची नसते याकरता त्यांनी आपली भिस्त 2004 (1) CPR 461, Tamilnadu State Consumer Disputes Redressal Commission, Chenni यांनी “The Manager, M/s Air India –v/s- Dr.M.V.Rao & Anr” मधे पारित केलेल्या निकालावर ठेवलेली आहे.
यातील ट्रव्हल एजंट हे वेगळे होते त्यांनी देऊ केलेली सेवा वेगळी होती व सदर प्रकरणातील गैरअर्जदार क्र.1 हे गैरअर्जदार क्र.2 चे अधिकृत प्रतिनिधी आहेत. त्यामुळे त्या निकालातील वस्तुस्थिती पाहता सदरचा निकाल या प्रकरणात उपयुक्त नाही हे स्पष्ट होते.
वरील सर्व परिस्थिचा विचार करता आम्ही खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-// अं ति म आ दे श //-
1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर येते.
2. गैरअर्जदारांनी एकलरित्या किंवा संयुक्तरित्या तक्रारकर्तीस दुसरे टिकीट काढण्याकरीता आलेला खर्च रु.2,11,203/-, बँकॉक येथे 10 तास थांबावे लागल्यामुळे आलेला खर्च रु.13,300/- द्यावा.
3. गैरअर्जदारांनी एकलरित्या किंवा संयुक्तरित्या तक्रारकर्तीस मानसिक व शारीरिक त्रासाबद्दल रु.1,00,000/- व तक्रारीच्या खर्चाकरीता रु.2,000/- अदा करावे.
4. वरील आदेशाचे पालन गैरअर्जदारांनी एकलरित्या किंवा संयुक्तरित्या आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी अन्यथा आदेश क्र.1 मधील रक्कम तक्रार दाखल दि.06.08.2010 पासुन द.सा.द.शे. 9% व्याजासह देय राहील.