निकालपत्र :- (दि.23/07/2010) (सौ.प्रतिभा जे. करमरकर,सदस्या)
(1) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- यातील तक्रारदारचे पती मयत बाबुराव शिंदे यांनी सामनेवाला विमा कंपनीकडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमा उतरवला होता. श्री बाबुराव शिंदे दि.28/05/2008 रोजी सायंकाळी 8.30 वाजताच्या सुमारास राहत्या घरात जिन्यावरुन पाय घसरुन पडले व त्यांच्या डोक्यास गंभीर जखम होऊन ते बेशुध्द पडले. त्यांना ताबडतोब प्राथमिक उपचार केंद्र चिखली येथे व नंतर छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटल,कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले. श्री बाबुराव शिंदे यांच्या डोक्यावरील जखम गंभीर असल्यामुळे तेथील डॉक्टरांच्या सांगण्यावरुन त्यांना सिटी हॉस्पिटल, राजारामपूरी, कोल्हापूर येथे अॅडमिट करण्यात आले. तेथे त्यांच्यावर दि.10/06/2008 पर्यंत उपचार चालू होते. परंतु दि.11/06/2008 रोजी त्यांचा मृत्यू झाला. सदर अपघाताची नोंद राजारामपूरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारदार यांनी केली आहे. (2) तक्रारदार आपल्या तक्रारीत पुढे सांगतात,तक्रारदारचे पतीचा मृत्यू झालेनंतर सर्व आवश्यक कागदपत्रांसह क्लेम फॉर्म भरुन दि.16/08/2008 रोजी सामनेवाला विमा कंपनीकडे क्लेम दाखल केला होता व आहे. सदर क्लेमबाबत सामनेवाला कंपनीकडे तक्रारदार यांनी चौकशी केली असता तुमचा क्लेम आज मंजूर होईल उदया मंजूर होईल अशी ग्वाही देत होते. तथापि, सदर क्लेमबाबत सामनेवाला कंपनीने आजपर्यंत काहीही कळविलेले नाही. तसेच यातील तक्रारदार यांना क्लेमची रक्कम अदयाप दिलेली नाही. म्हणून तक्रारदार यांनी वकीलांमार्फत सामनेवाला कंपनीस दि.02/12/2009 रोजी नोटीस पाठवली. सदर नोटीस सामनेवाला यांना दि.03/12/2009 रोजी मिळूनसुध्दा सदर नोटीसीबाबत व क्लेमबाबत सामनेवाला कंपनीने तक्रारदार यांना काहीही कळविलेले नाही. सामनेवाला कंपनीचे सदरचे कृत्य अनाधिकाराचे व कायदेशीर आहेत. यातील तक्रारदार यांचे पतीचा अपघाताने डोक्यास मार लागून मृत्यू झाला असले कारणाने यातील तक्रारदार यांचा क्लेम मंजूरीस पात्र होता व आहे. यातील तक्रारदार यांचा क्लेमबाबत विनाविलंब सेवा पुरविण्याची जबाबदारी आपल्यावर होती व आहे. त्यामध्ये आपण प्रचंड हयगय व त्रुटी निर्माण केलेने सदरचा तक्रार अर्ज मे. कोर्टात दाखल करणे भाग पडले आहे. (3) तक्रारदार आपल्या तक्रारीत पुढे सांगतात, यातील तक्रारदार हया एक गरीब, अशिक्षीत महिला असून ते कागल तालुक्यातील मौजे कौलगे येथील दुर्गम भागांतील आहेत. यातील तक्रारदार यांचे पतीचा अपघाती निधन झालेनंतर यातील तक्रारदार यांचे मनावर आघात झाला होता व आहे. यातील तक्रारदार यांचेवर सर्व कुटूंबाची जबाबदारी आहे. यातील तक्रारदार यांचे पती अपघाताने मयत झालेबाबतचा विमा क्लेम तक्रारदार यांना न मिळालेस त्यांचेवर व त्यांचे कुटूंबावर उपासमारीची वेळ येणार आहे. पतीच्या निधनानंतर वेळेवर सर्व कागदपत्रांसह क्लेमफॉर्म सामनेवाला विमा कंपनीकडे दाखल करुनही सामनेवालाने अजूनही त्यांच्या क्लेमबाबत तक्रारदारांना काहीही कळवलेले नाही ही त्यांच्या सेवेतील गंभीर सेवात्रुटी असल्यामुळे तक्रारदाराने सदर तक्रार दाखल केली आहे व आपल्या पुढीलप्रमाणे मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून मागणी केली आहे. विमा क्लेमची रक्कम रु.1,00,000/- दि.11/06/2008 पासून 18 टक्के व्याजासह सामनेवाला यांचेकडून मिळणेबाबत आदेश व्हावेत अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (4) तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या पुष्टयर्थ तक्रारदाराने तहसिलदार यांचेकडे दिलेला अर्ज, क्लेम फॉर्म, तक्रारदाराचे मयत पती यांची वारसा डायरी, 8 अ उतारा खाते नं.214, गट नं.1129 व 7/12 उतारा, राजारामपूरी पोलीस स्टेशन दैनंदिनी उतारा, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र,चिखली यांचे प्रमाणपत्र, सिटी हॉस्पिटल यांचे ट्रिटमेंट समरी व पत्र व सि.टी.स्कॅन रिपोर्ट, मृत्यूचा दाखला, तक्रारदारचे मयत पतीचे इलेक्शन कार्ड, वर्तमानपत्रातील बातमी, रेशनकार्ड, प्रतिज्ञापत्र, तक्रारदाराचे नावची वारसा डायरी उतारा, रहिवाशी दाखला, तक्रारदार यांचे ओळखपत्र, वकीलांमार्फत पाठविलेली नोटीस, पोष्टाच पोच पावती इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (5) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेत तक्रारदाराचा विमा पॉलीसी मान्य केली आहे. परंतु तक्रारदाराच्या इतर सर्व कथनास तीव्र आक्षेप घेतला आहे. सामनेवाला कंपनी तर्फे अजून सदर क्लेम नामंजूर केल्याचे तक्रारदारांना कळवले नसल्यामुळे तक्रारदारचे तक्रारीस कुठलेही कारण घडलेले नाही. सबब ही तक्रार खर्चासह फेटाळून टाकावी असे सामनेवाला यांनी आपल्या युक्तीवादात म्हटले आहे. (6) या मंचाने उभय पक्षाचे वकीलांचा युक्तीवाद ऐकला. तसेच दोन्ही पक्षांनी दाखल केलेले कागदपत्रेही तपासले. तक्रारदार हे सामनेवालाचे ग्राहक आहेत हे निर्विवाद आहे. तक्रारदारने सामनेवाला विमा कंपनीला सदर क्लेमचा निर्णय घेण्यास आवश्यक असणारे कागदपत्र दाखल केल्याचे स्पष्ट होत आहे. विमा पॉलीसी मान्य आहे. विमाधारकाचा अपघाती मृत्यू झाला आहे.तक्रारदाराच्या मृत्यूबद्दलचे मेडिकल रिपोर्टस, पोस्ट मार्टेम रिपोर्ट, मृत्यू दाखला इत्यादी सर्व कागदपत्रे सामनेवाला विमा कंपनीकडे दाखल आहेत अशा परिस्थितीत व तक्रारदाराने वरच्यावर लेखी व तोंडी पाठपुरावा करुनही सामनेवाला विमा कंपनी अपघाताला दोन वर्ष उलटून गेल्यावरही त्याबद्दल कुठलाही निर्णय न घेणे ही सामनेवालाच्या सेवेतील अत्यंत गंभीर त्रुटी आहे. शेतकरी कुटूंबातील कर्ता माणूस अपघाताने मयत झाल्यास त्याच्या कुटूंबाला आधार मिळावा ते उघडयावर पडू नयेत या उदात्त विचाराने महाराष्ट्र शासनाने सदर विमा योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निधीचीही तरतूद केली आहे. असे असता कुठलीतरी तांत्रिक व तकलादू कारणे दाखवून सदर क्लेमचा निर्णय घेण्यात अक्षम्य विलंब केल्याने सदर विमा योजनेचा मूळ हेतुलाच (main purpose) बाधा येते. त्याशिवाय अपघातानंतर दोन वर्षे उलटूनही अजून क्लेम नामंजूर केला नाही त्यामुळे तक्रारीस कारणच घडले नाही असा युक्तीवाद सामनेवाला यांनी करणे म्हणजे अक्षम्य बेपवाई व बेजबाबदारपणा आहे अशा स्पष्ट निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. 2) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास नुकसानभरपाईची रक्कम रु.1,00,000/-(रु.एक लाख फक्त) अदा करावी.सदर रक्कमेवर दि.11/09/2008 पासून ते संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के प्रमाणे व्याज अदा करावे. 3) तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रु.1,500/-(रु.एक हजार पाचशे फक्त) अदा करावेत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |