::: आ दे श :::
( पारीत दिनांक : 13/10/2016 )
आदरणीय, अध्यक्ष श्रीमती एस.एम.उंटवाले यांचे अनुसार
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रारीचा सारांश येणेप्रमाणे, …
तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 1 कडून स्वत: करिता व त्याच्या कुटूंबियांकरिता मेडीक्लेम विमा पॉलिसी क्र. 182200/48/2014/2363 घेतली असून त्याचा विमा अवधी दि. 3/7/2013 ते 2/7/2014 पर्यंत होता. तक्रारकर्ता विरुध्दपक्ष क्र. 1 कडून पुष्कळ वर्षापासून सतत विमा घेत आहेत व विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी फक्त पॉलिसीचे शेडयुलच दिलेले आहे व कधीही त्या सोबत अटी व शर्तीचे कोणतेही कागदपत्रे दिली नाहीत. तक्रारकर्त्याचा, पॉलिसी कालावधीत दि. 27/11/2013 रोजी पोलीस स्टेशन फ्रेजरपुरा.जि. अमरावती येथील एफ.आय.आर. क्र. 273/2013 नुसार वडाळी सुपर एक्सप्रेस हायवे वर जेल जवळ अमरावती येथे रोड अपघात झाला. तक्रारकर्त्याला सिध्दी विनायक हॉस्पीटल अकोला येथे दि. 27/11/2013 रोजी भरती करण्यात आले व दि. 28/11/2013 रोजी त्याचेवर ऑपरेशन करण्यात आले. तक्रारकर्ता दि. 13/12/2013 पर्यंत दवाखान्यात भरती होता. तक्रारकर्त्यास एकंदरीत रु. 57,600/- दवाखान्याचा खर्च आला व औषधोपचारापोटी रु. 15,413/- इतका खर्च आला. या सदंर्भात तक्रारकर्त्याने दि. 31/12/2013 रोजी रजिस्टर पोष्टाद्वारे विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 कडे क्लेम फॉर्म व सोबत सर्व कागदपत्रे अटेस्टेड करुन पाठविले. तक्रारकर्त्याच्या पुढील उपचारांची अटेस्टेड बिले सुध्दा विरुध्दपक्षास पाठविण्यात आली. परंतु विरुध्दपक्ष क्र. 1 कडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. विरुध्दपक्ष क्र. 1 ने दि. 30/1/2014 रोजी पत्र पाठवून विविध त्रुटींची पुर्तता करणारी कागदपत्रांची मागणी केली, परंतु तक्रारकर्त्याने त्याच्या कडील संपुर्ण कागदपत्रांची पुर्तता केली होती. विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याचा दावा जाणुनबुजून, हेतुपुरस्सर, बेकायदेशिररित्या कागदपत्रांची व इतरत्र मागणी समोर ठेवून डांबुन ठेवला. अशा प्रकारे विरुध्दपक्षाने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला व सेवेमध्ये न्युनता दर्शविली आहे. तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन विनंती केली आहे की, तक्रारकर्त्याची तक्रार मंजुर करण्यात यावी व तक्रारकर्त्यास हॉस्पीटल कॅश बेनिफिटपोटी व औषधोपचारापोटी केलेल्या खर्चाची एकूण रक्कम रु. 73,013/-, त्यावरील सर्व लाभासह, अपघाताच्या तारखेपासून द.सा.द.शे. 12 टक्के व्याजासह विरुध्दपक्षाकडून मिळावे. तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु. 25,000/- व कार्यवाहीचा खर्च रु. 3000/- तसेच तक्रारीचा खर्च रु. 5000/- देण्याचा आदेश व्हावा.
सदर तक्रार शपथेवर दाखल असून त्यासोबत एकंदर 07 दस्तऐवज पुरावे म्हणून जोडण्यात आले आहेत.
विरुध्दपक्ष 1 यांचा लेखीजवाब :-
विरुध्दपक्ष 1 यांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारीतील आरोप नाकबुल केले व असे नमुद केले की, तक्रारकर्त्याने क्लेम फॉर्म सोबत कोणतेही मुळ कागदपत्रे दिलेली नव्हती, केवळ नोटरी केलेले कागदपत्रे विरुध्दपक्षास सादर केलेली आहेत, ते विचारात घेणे योग्य नसल्याने दि. 13/1/2014 रोजी तक्रारकर्त्यास पत्र पाठवून मुळ कागदपत्रांची मागणी केली, परंतु आज पर्यंत तक्रारकर्त्याने या पत्राची पुर्तता केलेली नाही. विरुध्दपक्ष यांनी सदरहू पत्र देण्यास दोन वर्षाचे वर कालावधी झालेला आहे. पॉलिसी शेडयुलच्या क्लॉज 5.5 नुसार क्लेम सोबत मुळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. तक्रारकर्त्याने मुळ कागदपत्रे पुरविल्यानंतर व सर्व कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर तक्रारकर्त्याचा दावा पॉलिसीनुसार व शर्ती अटीनुसार विचारात घेण्यात येईल. मुळ कागदपत्रे मोटर व्हेईकल केस मध्ये लावण्याची शक्यता दिसत असून तक्रारकर्ता दोन्ही कडून क्लेम घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे विरुध्दपक्षाने सेवेत कोणतीही त्रुटी केलेली नाही. म्हणून तक्रारकर्त्याची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
2. विरुध्दपक्ष 2 यांचा लेखीजवाब :-
विरुध्दपक्ष क्र. 2 यांना नोटीस बजावल्या नंतर देखील विरुध्दपक्ष क्र. 2 गैरहजर असल्यामुळे, सदर प्रकरण विरुध्दपक्ष क्र. 2 विरुध्द एकतर्फी चालविण्याचा आदेश पारीत करण्यात आला.
3. त्यानंतर तक्रारकर्त्याने प्रतिज्ञालेख दाखल केला व विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी प्रतिज्ञालेखास पुरावा दाखल केला. तसेच उभय पक्षांतर्फे तोंडी युक्तीवाद करण्यात आला.
::: का र णे व नि ष्क र्ष :::
4. या प्रकरणात तक्रारदार यांची तक्रार, विरुध्दपक्ष 1 यांचा लेखी जबाब, उभय पक्षाने दाखल केलेले सर्व दस्तऐवज, तक्रारकर्ते यांचे प्रतिउत्तर, विरुध्दपक्ष क्र. 1 यांचा पुरावा व उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद यांचे काळजीपुर्वक अवलोकन करुन खालील निष्कर्ष कारणे देऊन नमुद केला.
तक्रारदार व विरुध्दपक्ष क्र. 1 यांच्यात वाद नसलेल्या बाबी अशा आहेत की, तक्रारदाराने विरुध्दपक्ष क्र. 1 कडून वैयक्तीक मेडीक्लेम विमा पॉलिसी काढलेली आहे. उभय पक्षात, सदर पॉलिसी व पॉलिसीच्या कालावधी बद्दल वाद नाही. तसेच सदर पॉलिसीच्या कालावधी दरम्यान तक्रारदार यांचा अपघात झाला होता व त्यावरील उपचाराबद्दलचा क्लेम त्यांनी विरुध्दपक्ष क्र. 1 कडे नोंदविला होता. दि. 13/1/2014 रोजी विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी सदर दावा निकाली काढण्याकरिता तक्रारदाराला पत्र पाठवून मुळ कागदपत्रांची मागणी केली होती, ही बाब देखील वादात नाही. वरील उभय पक्षाला मान्य असलेल्या बाबींवरुन तक्रारदार हे विरुध्दपक्षाचे ग्राहक आहे, या निष्कर्षाप्रत मंच आले आहे.
सदर प्रकरणात विरुध्दपक्ष क्र. 2 ला मंचाची नोटीस बजावुन देखील ते गैरहजर राहीले, त्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 2 विरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्यात येईल, असे आदेश मंचाने पारीत केले.
तक्रारदार यांनी रेकॉर्डवर Google Search व्दारे…
- Balwinder Singh Vs. The New India Assurance
Company Ltd.,
- 2012(3) All MR 367 United India Insurance Co.Ltd. Vs.
Mrs. Anjana Parmar & Anr.
हे न्यायनिवाडे दाखल करुन, विरुध्दपक्षाने पॉलिसीच्या कोणत्याही अटी पुरविलेल्या नव्हत्या, त्यामुळे त्या तक्रारदारावर बंधनकारक नाही, तसेच विरुध्दपक्षाने असे आश्वासन दिले होते की, मेडीकल कागदपत्रे व उपचाराबद्दलचे प्रपत्रे, मुळ न देता त्यांच्या अटेस्टेड प्रती दाखल केल्या तरी, खर्चाच्या देयकाची रक्कम अदा करण्यात येईल, त्यामुळे त्यांचे मुळ कागदपत्रांची मागणी करणारे पत्र म्हणजे सेवेतील न्युनता आहे. तक्रारदाराने औषधोपचाराची संपुर्ण बिले व इतर दस्त हे नोटरीच्या सहीने अटेस्टेड करुन विरुध्दपक्षाकडे पाठविलेले आहेत. कारण मुळ कागदपत्रे ही पुढील उपचारासाठी राखून ठेवावी लागणार आहे, त्यामुळे प्रार्थनेप्रमाणे विमा दावा मंजुर करावा.
यावर, विरुध्दपक्ष क्र. 1 चा आक्षेप असा आहे की, सदर पॉलिसीच्या अट व शर्त क्र. 5.5 नुसार विमा क्लेम सोबत मुळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे व मुळ कागदपत्रे तक्रारादाराच्या ताब्यात असून सुध्दा त्यांनी विरुध्दपक्ष क्र. 2 च्या मागणी पत्रानुसार ते पुरविलेले नाही, यात तक्रारदाराचा हेतु वाईट आहे. त्यामुळे तक्रारदार स्वच्छ हाताने मंचासमोर आले नाही. तक्रारदार मोटर अपघात क्लेम व मंचासमोरील क्लेम दोन्ही मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे, हे योग्य नाही.
अशा प्रकारे उभय पक्षांचा युक्तीवाद व दाखल दस्त तपासले असता असे दिसते की, विरुध्दपक्षाने तक्रारदाराचा विमा दावा नाकारलेला नाही. त्यांनी तक्रारदाराला पत्र पाठवून मुळ कागदपत्रांची मागणी केली होती, त्याची पुर्तता न करता, तक्रारकर्त्याने ही तक्रार मंचात दाखल केली आहे, शिवाय तक्रारीत मुळ कागदपत्र दाखल न करण्याचे कारण असे नमुद आहे की, ती त्यांना पुढील उपचारासाठी लागणार असल्याने त्यांनी ती सांभाळून ठेवली आहे. मात्र त्यानंतर तक्रारदाराने दि. 17/6/2016 रोजी प्रतिज्ञालेख / प्रतिउत्तर दाखल केले, त्यात तक्रारदाराचे असे कथन आहे की, तक्रारदाराचे मुळ कागदपत्रे अपघातानंतर गहाळ झाले आहे. विरुध्दपक्षाने ॲड जितेंन्द्र टी लढ्ढा यांचे दि. 27/12/2013 रोजीचे प्रमाणपत्र रेकॉर्डवर दाखल केले, त्यातील कथन असे आहे की, सदर वैद्यकीय उपचाराचे व इतर मुळ दस्तऐवज हे ॲङ जे.टी. लढ्ढा यांच्या ऑफीस लिगल फाईल मध्ये आहेत व ते त्यांना पुढील लिगल कार्यवाहीसाठी जरुरी आहेत, म्हणजे विरुध्दपक्षाच्या मागणीनुसार, मुळ कागदपत्रे त्यांच्याकडे सादर न करण्याची वेगवेगळी, परस्पर विरोधी कारणे तक्रारदाराने नमुद केलेली आहेत. तक्रारदाराने मोटर अपघात दावा दाखल केला का ? हे कुठेही नमुद नाही, तसेच त्याबद्दलचा केस नंबर ई. दाखल नसल्यामुळे हे स्पष्ट होत नाही, त्यामुळे तक्रारदाराला त्यांनी दाखल केलेल्या न्यायनिवाड्यांचा फायदा देता येणार नाही, शिवाय तक्रारदार स्वच्छ हाताने मंचात आले नाही, ही बाब स्पष्ट झाली आहे. त्यामुळे तक्रारदाराने त्यांच्या वैद्यकीय उपचारासंबंधीचे मुळ बिले, मुळ डॉक्टर सर्टीफिकेट व इतर मुळ आवश्यक कागदपत्रे विरुध्दपक्षाला पुरवावी व विरुध्दपक्षाने सर्व मुळ कागदपत्रांची पडताळणी करुन, त्यानंतर विमा दावा नियमानुसार कार्यवाही करुन निकाली काढावा, असे आदेश पारीत केल्यास ते न्यायोचित होईल, या निष्कर्षाप्रत सदर मंच एकमताने आले आहे.
सबब अंतीम आदेश पारीत केला, तो खालील प्रमाणे…
:::अं ति म आ दे श:::
- विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी तक्रारदाराचे वैद्यकीय उपचारासंबंधीचे सर्व मुळ बिले व दस्त, तसेच डॉक्टरांचे सर्टीफिकेट अथवा इतर मुळ आवश्यक ते कागदपत्रे तक्रारकर्त्याने पुरविल्यानंतर ते तपासावे व त्यानंतर विमा दाव्यावर नियमानुसार पुढील कार्यवाही 45 दिवसात करावी.
- न्याईक खर्चाबद्दल व इतर खर्चाबद्दल कोणतेही आदेश पारीत करण्यात येत नाही.
सदर आदेशाच्या प्रती संबंधीतांना निशुल्क देण्यात याव्या.