(मंचाचे निर्णयान्वये,श्री.अनिल एन.कांबळे,मा.अध्यक्ष) (पारीत दिनांक : 18.04.2011) अर्जदार हीने खास मुखत्यार मुलगा नामे पुरुषोत्तम देवीदास मांदाडे मार्फत सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 14 सह 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे. 1. अर्जदार ही खास भेंडाळा येथील रहिवासी असून अर्जदाराचे पती देवीदास मांदाडे हे शेतकरी होते व शेतकरी व्यक्तिगत विमा योजनेचे लाभधारक होते. गै.अ.क्र.1 ही भारतातील एक राष्ट्रीयकृत विमा कंपनी असून भारतात गै.अ.चा विमा व्यवसायात मोठा वाटा आहे. गै.अ.क्र.2 ही गै.अ.क्र.1 ला विमा दावे, तसेच संबंधीत केसेस हाताळून देणारी अधिकृत कंपनी असून याकरीता गै.अ.क्र.2 ला गै.अ.क्र.1 व शासनाकडून मोबदला मिळतो. गै.अ.क्र.3 ही शासनाचे अधिकारी असून शासनाने चालविलेली योजना पूर्ण करण्याचे काम गै.अ.क्र.3 चे आहे. 2. अर्जदाराचे पती देवीदास हे दि.20.9.08 रोजी संध्याकाळच्या सुमारास शेतात काम करीत असतांन त्यांना साप चावला. यामुळे, त्यांना ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे भरती करण्यात आले, दवाखान्याने घटनेची रिपोर्ट पोलीस स्टेशन सिंदेवाही येथे दिली. सिंदेवाही येथे उपचार शक्य नसल्यामुळे नंतर देविदासला ब्रम्हपूरी येथे व तिथून मेडिकल कॉलेज, नागपूर येथे उपचाराकरीता पाठविण्यात आले व उपचारा दरम्यान देविदासचा दि.7.10.08 रोजी सकाळी 8-00 वाजता मृत्यु झाला. देविदासचा मृत्यु झाल्यामुळे त्याचे वारसदारांची नावे शेतजमिनीवर फेरफार झाली. अर्जदाराने विमा क्लेम दि.12.8.09 रोजी केलेले शपथपञ दस्त अ-12 वर दाखल आहे. अर्जदाराने आवश्यक ती सर्व दस्तऐवज गोळा करुन, क्लेम फार्मसह, तसेच मतदार यादीसह गै.अ.क्र.3 चे मार्फत गै.अ.क्र.1 व 2 कडे पाठविली. त्यानंतर, गै.अ.क्र.3 ने अर्जदारास दि.28.10.09 चे पञ पाठवून कागदपञ देण्याची सूचना दिली. सदर प्रञ प्राप्त होताच अर्जदाराने दि.4.11.09 रोजी संपूर्ण कागदपञाची पूर्तता गै.अ.क्र.3 कडे केली. 3. अर्जदारास, गै.अ.क्र.1 कडून दि.25.1.10 चे पञ प्राप्त झाले व त्यामध्ये मय्यत देविदास याचा पॉलिसी क्र.181200/48/2009/939 चा क्लेम क्र.181200/48/2010/1999 हा दस्तऐवज न दिल्यामुळे बंद करण्यात आला आहे, असे कळविले. विशेष म्हणजे या पञात गै.अ.ने कोणते दस्ताऐवज मिळाले नाही याचा कोणताही उल्लेख केला नाही. तसेच, या अगोदर अर्जदारास दस्तऐवज मागीतले हे सुध्दा कळविले नाही. अर्जदाराने, पञ प्राप्त झाल्यानंतर गै.अ.क्र.1 व 2 कडे चौकशी केली. परंतू, गै.अ.ने कोणतीही माहिती सांगीतली नाही. यामुळे, अर्जदाराने अधि.विनय लिंगे यांचे मार्फत दि.10.5.10 चे नोटीस गैरअर्जदारांना पाठवून विमा क्लेम देण्याची विनंती केली. नोटीस प्राप्त झाल्यानंतर गै.अ.क्र.3 ने अर्जदारास दि.20.5.10 च्या पञाव्दारे कळविले की, अर्जदाराकडून दि.4.11.09 रोजी प्राप्त झालेले दस्ताऐवज दि.24.11.09 ला वरिष्ठ कार्यालयाला पाठविले आहे. यावरुन, हे स्पष्ट होते की, गै.अ.क्र.1 व 2 यांनी अत्यंत निष्काळजीपणाने अर्जदाराचा विमा क्लेम दस्तऐवजांची शहानिशा न करता बंद केला. गै.अ.नी अवलंबिलेली अनुचीत व्यापार पध्दती असून अर्जदारास दिलेली न्युनता पूर्ण सेवा आहे. त्यामुळे, गै.अ.ने अर्जदारांना मय्यत देविदासचे अपघाती मृत्युचे नुकसान भरपाई दाखल रुपये 1,00,000/- व त्यावर दि.7.10.08 पासून 18 टक्के दराने व्याज द्यावे. तसेच, अर्जदारास नुकसान भरपाई म्हणून रुपये 50,000/- व केसचा खर्च रुपये 5000/- देण्याचा आदेश पारीत करावा, अशी मागणी केली आहे. 4. अर्जदाराने नि. 4 नुसार 22 झेरॉक्स दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदारांना नोटीस काढण्यात आले. 5. गै.अ.क्र.1 ने लेखी बयानात हे म्हणणे नाकबूल केले आहे की, अर्जदार ही खास भेंडाळा येथील रहिवासी असून तिचे पती देविदास मांदाडे हे शेतकरी होते व शेतकरी व्यक्तीगत विमा योजनेचे लाभधारक होते व त्यांना रुपये 1,00,000/- करीता विमाकृत करण्यात आले होते. गै.अ.क्र.1 ने अर्जदाराचे तक्रारीतील बहूतांश कथन नाकबूल केले आहे.
6. गै.अ.क्र.1 ने लेखी बयानातील विशेष कथनात नमूद केले आहे की, पुरुषोत्तम देविदास मांदाडे यांनी दाखल केलेले मुखत्यार पञ कायद्याने वैध नसून ही तक्रार मुळातच ग्राह्य धरता येणार नाही. गै.अ.ने दि.25.1.10 ला अर्जदाराने आवश्यक कागदपञ वेळेत न पुरविल्यामुळे तिचा क्लेम बंद केला. विमा करारानुसार विहीत मुदतीत अर्जदार हीने कागदपञ न पुरविल्यामुळे अर्जदाराचा क्लेम हा रितसर नाकारला आहे. अर्जदार हिने स्वतःच दाखल केलेल्या अ-2 दस्ताऐवजातील पान क्र.14 वरील कागदपञ पुरविले नाही. अर्जदार हिने देविदासचा संपूर्ण वारसानांना पार्टी न केल्यामुळे ही तक्रार चालु शकत नाही. अर्जदार हिने दाखल केलेले कागदपञ अ-15 व अ-16 यावरुन स्पष्ट होते की, अर्जदाराने शासन निर्णयाप्रमाणे कागदपञ दाखल केलेले नाहीत आणि या गै.अ.ने कायद्याप्रमाणे क्लेम नामंजूर केलेला आहे. अर्जदार हिने दाखल केलेल्या कागदपञावरुन असे दिसून येते की, मय्यत देविदास यांना दि.20.09.08 रोजी साप चावलेला असून ही तक्रार 23.12.08 रोजी उशिराने दाखल केली असल्याने चालु शकत नाही व ती खारीज होण्यास पाञ आहे. मय्यत देविदास हा 17 दिवसानंतर नेमका कोणत्या कारणाने मरण पावला हे कुठेच नमूद नसल्यामुळे त्याच्या मृत्युच्या नेमक्या कारणा अभावी ही तक्रार खारीज होण्यास पाञ आहे. तक्रार व अर्जदारानी दाखल केलेले दस्ताऐवज याची शहानिशा केली असता, अर्जदाराचे निष्काळजीपणामुळे ही तक्रार खारीज होण्यास पाञ आहे. गै.अ.ने दि.25.1.10 रोजी क्लेम न देण्यास स्पष्ट कारण अर्जदाराला कळवून सुध्दा अर्जदाराने तब्बल 4 महिन्यानंतर वकीलामार्फत नोटीस पाठवून ही खोटी तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची तक्रार, अर्जदारावर रुपये 5000/- खर्च लादून खारीज करण्यात यावी अशी मागणी केली आहे. 7. गैरअर्जदार क्र.2 ने लेखी बयानात नमूद केले की, तक्रारदार हे आमचे ग्राहक होऊ शकत नाही कारण, अर्जदार हा विमा कंपनीचा ग्राहक होऊ शकतो ज्यांनी अपघात विम्याची जोखीम राज्य शासनाकडून विमा प्रिमिअम घेऊन स्विकारली आहे. सदरील दाव्यामध्ये ओरीएन्टल इन्शुनरन्स कंपनी नागपूर ही विमा कंपनी असून आम्ही केवळ सल्लागार आहेत व राज्य शासनास विना मोबदला साह्य करतो. कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हिसेस प्रा.लि. ही विमा विनियामक और विकास प्राधिकरण भारत सरकार यांची अनुज्ञत्पि प्राप्त विमा सल्लागार कंपनी आहे. महाराष्ट्र राज्य शासनाला सदरील विमा योजना राबविण्यासाठी विना मोबदला सहाय्य करतो यामध्ये मुख्यत्वे शेतक-यांचा विमा दावा अर्ज तालुका कृषी अधिकारी/तहसिलदार यामार्फत आमच्याकडे आल्यावर विमा दावा अर्ज योग्य पणे भरला आहे कां ? सोबत जोडलेली कागदपञे विमा कंपनीने मागणी केल्याप्रमाणे आहे कां ? नसल्यास तालुका कृषी अधिकारी, तहसिलदार यांना कळवून त्यांची पुर्तता करवून घेणे व सर्व योग्य कागदपञे मिळाल्यावर योग्य त्या विमा कंपनीकडे पाठवून देणे व विमा कंपनीकडून दावा मंजूर होवून आलेला धनादेश संबंधीत वारसदारांना देणे, एवढाच आहे. यासाठी आम्ही राज्य शासन वा शेतकरी यांच्याकडून कोणताही मोबदला घेत नाही, तसेच यासाठी आम्ही कोणताही विमा प्रिमियम घेतलेला नाही. आमच्या म्हणण्या प्रित्यर्थ आपल्या अवलोकनासाठी राज्य शासन आदेश (जी आर) सोबत जोडत आहे. मयत देविदास कोंडूजी मांदाडे , गांव – भेंडाळा, तालुका सिंदेवाही, जि. चंद्रपूर याचा सदरील अपघात दि.20.9.08 रोजी झाला. सदरील प्रस्ताव आमच्या कार्यालयास दि.4.1.09 रोजी प्राप्त झाला. सदरील कागदपञे प्राप्त झाल्यानंतर दावा अर्ज ओरीएंटल इन्शुरन्स कंपनी, नागपूर यांना पाठविण्यात आला. विमा कंपनीने आपल्या दि.25.1.10 च्या पञाव्दारे अर्जदाराचा दावा बंद केल्याचे कळविले आहे. सदरील दाव्यातून आमची निर्दोष मुक्तता करावी. कारण नसतांनाही तक्रारीस सामोर जाण्यास भाग पाडल्याने या अर्जाचा खर्च रक्कम रुपये 5,000/- देण्याचा आदेश व्हावा, अशी मागणी केली आहे. 8. गै.अ.क्र.3 ने लेखी बयानात नमूद केले की, हे म्हणणे खरे आहे की, अर्जदार ही भेंडळा येथील रहिवासी आहे. उर्वरीत मजकूर माहिती अभावी नाकबूल केला. गै.अ.क्र.3 ने, हे म्हणणे खोटे असल्याने नाकबूल केले की, अर्जदाराने आवश्यक ती सर्व दस्ताऐवज गोळा करुन दस्त क्र.अ-13 वरील क्लेम फार्मसह तसेच दस्त क्र.अ-14 वरील मतदार यादीसह गै.अ.क्र.3 यांचे मार्फत गै.अ.क्र.1 व 2 कडे पाठविली. त्यानंतर गै.अ.क्र.3 यांनी अर्जदारास दि.28.10.09 चे दस्त अ-15 वरील पञ पाठवून कागदपञ देण्याची सुचना दिली. हे म्हणणे खरे आहे की, सदर पञ प्राप्त होताच अर्जदाराने दि.4.11.09 रोजी संपूर्ण कागदपञाची पूर्तता गै.अ.क्र.3 कडे केली. 9. गै.अ.क्र.3 ने लेखी बयानातील विशेष कथनात नमूद केले की, अर्जदाराचे पती दि.20.9.08 ला शेतात काम करीत असतांना त्यांना साप चावल्याने उपचारा दरम्यान दि.7.10.08 रोजी मृत्यु झाला याबाबत कोणतीही कल्पना गै.अ.क्र.3 यांना नाही, तसेच अर्जदार यांनी सदर मृत्युच्या संबंधाने शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना अंतर्गत विमा रक्मेच्या दाव्या संबंधात कार्यालयाकडे अर्ज केला होता याबाबतही कोणतीही कल्पना गै.अ.क्र.3 यांना नव्हती. गै.अ.क्र.3 यांना त्यांचे वरिष्ठ अधिकारी मा.जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर यांचे पञ दि.7.10.09 अन्वये अर्जदाराकडून आवश्यक दस्ताऐवजाची पूर्तता करण्यात कळविले, तेंव्हा माहिती झाले की, अर्जदार यांनी तिचे पतीचा झालेल्या मृत्यु संबंधाने शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत दाव्यासाठी अर्ज केलेला आहे. गै.अ.क्र.3 यांनी वरील पञाचे अनुषंगाने दि.28.10.09 ला अर्जदार यांना पञ देऊन त्यामध्ये नमूद एकूण 7 कागदपञे त्यांच्याकडे सादर करावे असे कळविले. त्याप्रमाणे दि.4.11.09 ला अर्जदार हिने नमूद दस्तापैकी पोष्ट मार्टम रिपोर्ट वगळता एकूण 6 दस्तऐवज गै.अ.क्र.3 कडे सादर केले. गै.अ.क्र.3 ने अर्जदाराकडून कागदपञाची पडताळणी करुन दि.24.1.09 ला मा.जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी चंद्रपूर यांच्याकडे सादर करण्यात आले. त्यामुळे, गै.अ.क्र.3 यांचेकडून अर्जदारास न्युनता पूर्ण सेवा दिलेली नाही, तसेच कोणताही अनुचीत व्यापार पध्दतीचा अवलंब झालेला नाही. अर्जदार यांच्या पतीचा कोणताही विमा गै.अ.क्र.3 कडे उतरविला नव्हता, तसेच अशी कोणतीही अपघात विमा सेवा पुरविली जात नाही. त्यामुळे, अर्जदार व गै.अ.क्र.3 यांचे कोणतेही ग्राहक म्हणून संबंध येत नाही. करीता, सदर तक्रार गै.अ.क्र.3 विरुध्द खारीज होण्यास पाञ आहे. सदर तक्रार खर्चासह खारीज व्हावी. 10. अर्जदार हीने तक्रार आममुखत्यार मार्फत दाखल केली आणि नंतर तक्रारीच्या कथना पृष्ठयर्थ स्वतःचा शपथपञ नि.18 नुसार दाखल केला आहे. तसेच, शपथपञा सोबत नि.19 नुसार 2 झेरॉक्स दस्ताऐवज दाखल केले आहे. गै.अ.क्र.1 यांनी लेखी उत्तरच शपथपञाचा भाग समजण्यात यावा या आशयाची पुरसीस नि.20 नुसार दाखल केली. अर्जदार व गै.अ.यांनी दाखल केलेले दस्ताऐवज, शपथपञ आणि उभय पक्षाच्या वकीलांनी केलेल्या तोंडी युक्तीवादावरुन खालील कारणे व निष्कर्ष निघतात. @@ कारणे व निष्कर्ष @@ 11. अर्जदार हिचा पती मृतक देवीदास मांदाडे हा शेतकरी होता. दि.20.9.08 रोजी शेतात काम करीत असतांना त्याला साप चावला, उपचाराअंती दि.7.10.08 रोजी सकाळी 8.00 वाजता मृत्यु झाला. शेतकरी अपघात योजने अंतर्गत विमा क्लेम रुपये 1,00,000/- मिळण्याकरीता गै.अ.ना सर्व दस्ताऐवज सादर करुनही क्लेम दिला नाही, आणि गै.अ.क्र.1 ने दि.25.1.10 चे पञाव्दारे क्लेम नाकारला. म्हणून अर्जदार हीने तक्रार दाखल करुन गै.अ. यांनी सेवा देण्यात न्युनता केली असल्याने विमा क्लेमची रक्कम रुपये 1,00,000/- मागणी केली आहे. 12. गै.अ.क्र.1 यांनी असा मुद्दा घेतला आहे की, अर्जदार बाईने आवश्यक कागदपञ न पुरविल्यामुळे तिचा क्लेम बंद केला. अर्जदार हिने दस्त अ-2 वरील पान क्र.14 नुसार कागदपञ पुरविले नाही. मय्यत देवीदास याचा मृत्यु 17 दिवसानंतर नेमका कोणत्या कारणामुळे मरण पावला हे कुठेच नमूद नसल्यामुळे, तक्रार मृत्यु कारणा, अभावी खारीज होण्यास पाञ आहे. अर्जदाराच्याच निष्काळजीपणामुळे व योग्य कागदपञ पुरविले नाही त्यामुळे विमा क्लेम बंद करण्यात आला. यात सेवेत न्युनता नाही तर विमा करारानुसार मुदतीत कागदपञ न पुरविल्यामुळेच क्लेम नाकारला आहे. गै.अ.क्र.1 च्या आक्षेपावर अर्जदाराचे वकीलांनी असे सांगीतले की, अर्जदार हिने संपूर्ण कागदपञ मृत्यु नंतर विमा क्लेम 25.1.10 रोजी नाकारण्याचे पूर्वीच सादर केले आहे. याबाबत, अ-16 चे पञाचा संदर्भ सांगीतला. सदर दस्त अ-16 चे अवलोकन केले असता, तालुका कृषी अधिकारी सिंदेवाही यांचेकडे कागदपञ सादर करीत असल्याचे दि.4.10.09 चे पञात कथन केले आहे. गै.अ.क्र.1 यांनी दिलेले 25.1.10 चे पञ दस्त अ-17 मध्ये कागदपञ न सादर केल्याचे कारणावरुन पॉलिसीच्या शर्ती व अटी नुसार बंद केल्याचे म्हटले आहे. अर्जदार हिने दाखल केलेल्या दस्ताऐवजावरुन गै.अ.क्र.1 यांनी सेवा देण्यात न्युनता केली नाही असाच निष्कर्ष निघतो. 13. अर्जदार हिने अ-16 मध्ये सादर केलेल्या पञाच्या उल्लेखा प्रमाणे 7/12 चा उतारा, गाव नमुना 6-ड, 6-क, 20 रुपयाचे स्टॅम्प पेपर, एफ.आय.आर., घटनास्थळ पंचनामा पुलीस अधिका-याचे स्वाक्षरीसह पाठविल्याचे म्हटले आहे. परंतू, तालुका कृषी अधिकारी सिंदेवाही यांनी अ-15 नुसार अर्जदार हिला पञ पाठवून कागदपञाची मागणी केली, त्यात पोष्टमार्टम रिपोर्ट सादर करण्यास कळविले, परंतु अर्जदार हिने पोष्टमार्टम रिपोर्ट सादर केला नाही. वास्तविक, शासन निर्णय क्र.सेअवि 2008/प्र.क्र.187/11अ मंञालय विस्तार, मुंबई 400032, दि.6 सप्टेंबर 2008 मध्ये संर्पदंश, विंचुदंश यांनी शेतक-याचा मृत्यु झाल्यास प्रपञ ड प्रमाणे सादर करावयाची कागदपञ अनुक्रमांक 8 मध्ये दिले आहे. त्यात प्रथम माहिती अहवाल किंवा पोलीस पाटील अहवाल, घटनास्थळ पंचनामा, इनक्वेस पंचनामा, पोस्टमार्टम अहवाल, रासायनीक विश्लेषण अहवाल, मृत्यु दाखला (वैद्यकीय उपचारा पूर्वीच निधन झाल्याने पोष्टमार्टम झाले नसल्यास या अहवालातून सुट माञ वैद्यकीय अधिका-याचे प्रमाणपञ शासकीय आरोग्य अधिका-याकडून प्रतिस्वाक्षरीत असने आवश्यक) प्रस्तुत प्रकरणात मृतक देवीदास मांदाडे यास अर्जदाराच्या कथना नुसार दि.20.9.08 रोजी सर्पदंश झाल्यानंतर ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे भर्ती करण्यात आले, पोलीस स्टेशनला रिपोर्ट देण्यात आली. त्यानंतर, ब्रम्हपूरी येथे उपचारासाठी नेण्यात आले, तिथून मेडीकल कॉलेज नागपूर येथे उपचाराकरीता पाठविण्यात आले आणि उपचारा दरम्यान दि.7.10.08 रोजी सकाळी 8.00 वाजता मृत्यु झाला. अर्जदाराने मृत्यु प्रमाणपञाची प्रत अ-6 वर दाखल केली आहे. सदर मृत्यु प्रमाणपञात सर्पदंशाचा उल्लेख केलेला आहे. तसेच, अर्जदाराने नि.19 नुसार संदर्भ चिठ्ठी दाखल केली. त्याचप्रमाणे, शतायु हॉस्पीटल ब्रम्हपूरी यांनी जीएमसी. नागपूर यांना दिलेली चिठ्ठीची झेरॉक्सप्रत दाखल केली आहे. सर्व वैद्यकीय दस्ताऐवजात सर्पदंशाचा उल्लेख केलेला आहे, परंतू नेमके देवीदास मांदाडे याचा मृत्यु 17 दिवसानंतर सर्पदंशाने झाला किंवा काय हे स्पष्ट होण्यासाठी पोष्टमार्टम होणे आवश्यक आहे. मृतक देवीदास मांदाडे याचा मृत्यु वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे होऊनही व पोलीस स्टेशनला सुचना दिल्याचे दाखविले असतांनाही पोष्टमार्टम करण्यात आले नाही. शासन निर्णयानुसार वैद्यकीय उपचार होण्याचे पूर्वी मृत्यु झाल्यास पोष्टमार्टम रिपोर्ट मधून सुट देण्याचे मान्य केले आहे. परंतु, प्रस्तुत प्रकरणात मृतक देवीदास मांदाडे याचा वैद्यकीय उपचार शासकीय ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही, खाजगी रुग्णालय ब्रम्हपूरी आणि त्यानंतर वैद्यकीय महाविद्यालय नागपूर यांचेकडे उपचार होऊन तेथे मृत्यु झाला. मृतकाचे नातेवाईकांनी पोष्टमार्टम करण्यास नकार दिल्यामुळे पोष्टमार्टम करण्यात आले नाही असे अ-6 वर दाखल केलेल्या मृत्युप्रमाणपञात वार्ड क्र.24 मधील वैद्यकीय अधिकारी यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे. यावरुन, अर्जदार व तिच्या नातेवाईकांनी उपचार होऊनही पोष्टमार्टम करु दिले नाही आणि त्यामुळेच पोष्टमार्टमचा रिपोर्ट गै.अ.कडे सादर केला नाही. शासन निर्णयानुसार दिलेल्या बाबीची पुर्तता करण्याची जबाबदारी ही अर्जदाराची आहे. परंतू अर्जदार हिने त्या बाबीची पुर्तता केली नाही. गै.अ.क्र.1 यांनी पोष्टमार्टम रिपोर्टची मागणी करुनही सादर केली नाही. त्यामुळे, योग्य कारणानेच गै.अ.क्र.1 यांनी विमा दावा बंद केला, या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आलेले आहे. 14. गै.अ.चे वकीलांनी युक्तीवादात असा मुद्दा उपस्थित केला आहे की, अर्जदार हिने इनक्वेस्ट पंचनामा, एमएलसी. रिपोर्ट दाखल केला नाही. विमा पॉलिसीच्या करारानुसार इनेक्वेस पंचनामा आवश्यक आहे. अर्जदार हिने अ-3 वर झेरॉक्स दस्ताऐवज दाखल केले. त्याचे अवलोकन केले असता, वैद्यकीय अधिकारी सिंदेवाही यांनी पोलीसांना मेमो दिला. वैद्यकीय अधिकारी डॉ.के.ऐ.बागडे यांनी देवीदास कोंडबाजी मांदाडे याचे तपासणी केले असता, बयान देण्यास सक्षम असल्याचे प्रमाणीत केले आहे. मृतक देवीदास मांदाडे यास झालेल्या सर्पदंशाबाबत पोलीस स्टेशन सिंदेवाहीला सुचना दिल्यानंतर स्टेशन डायरी क्र.30/2008 नुसार नोंद करण्यात आले. पोलीस स्टेशनला गुन्हाची नोंद केल्यानंतरही मृतकाच्या नातेवाईकांनी पोस्टमार्टम, इनक्वेस पंचनामा करु दिला नाही आणि गै.अ.नी कागदपञ सादर न करण्याच्या कारणामुळे क्लेम बंद केला, यात सेवा देण्यात न्युनता केली असे म्हणता येणार नाही. उपलब्ध रेकॉर्डवरुन गै.अ.क्र.1 यांनी शासन निर्णयानुसार दस्ताऐवजाची मागणी केली ती मागणी योग्य व संयुक्तीक आहे. यावरुन, गै.अ.क्र.1 यांनी कोणतीही सेवेत न्युतता केली नाही. गै.अ.क्र.3 ने अर्जदाराकडून प्राप्त झालेले कागदपञ पुढील कार्यवाही कारीता आपल्या वरीष्ठ कार्यालयाकडे पाठविले, त्यामुळे त्यांनी कोणतीही सेवा देण्यात न्युनता केली नाही, या निष्कर्षा प्रत हे न्यायमंच आले आहे. 15. अर्जदाराच्या वकीलांनी युक्तीवादाचे वेळी मा.राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग, नवी दिल्ली यांनी दिलेल्या न्यायनिवाडाचा हवाला दिला, ते खालील प्रमाणे. (1) Dharmisetty Srinivas Rao –Vs.- New India Assurance Co.Ltd. I (2006) CPJ 11 (NC) (2) United India Insurance Company Ltd. –Vs.- Pallamreddy Aruna IV (2007) CPJ 389 (NC) वरील न्यायनिवाडयात दिलेली बाब हया प्रकरणाती कथनाला लागू पडत नाही. प्रस्तुत प्रकरणात मृतकाचा उपचार हा 17 दिवस झालेला असून पोलीस स्टेशनला सुचना दिली असतांनाही इनक्वेस पंचनामा, पोस्टमार्टम अर्जदाराकडून करु देण्यात आले नाही, त्यामुळे मृतकाचा मृत्यु हा नेमका कोणत्या कारणाने झाला, हे स्पष्ट होत नाही आणि शासन निर्णयानुसार दस्ताऐवज सादर केले नाही, त्यामुळे अर्जदाराची तक्रार ही मंजूर करण्यास पाञ नाही, या निर्णयाप्रत हे न्यायमंच आलेले आहे. 16. गै.अ.चे वकीलांनी असा मुद्दा उपस्थित केला की, तक्रार मुदतबाह्य आहे, तसेच वादास कारण घडलेले नाही. मृतकाचा मृत्यु झाल्यानंतर, दोन वर्षानंतर तक्रार दाखल केलेली आहे. त्यामुळे, तक्रार मुदतबाह्य आहे. गै.अ.चे हे म्हणणे संयुक्तीक नाही. अर्जदार हिने सर्व दस्ताऐवज तालुका कृषी अधिकारी गै.अ.क्र.3 यांचे मार्फतीने दस्ताऐवज पाठविले, तसेच गै.अ.क्र.1 यांनी योग्य कागदपञ सादर न केल्याच्या कारणावरुन 25.1.10 रोजी दस्त क्र.अ-17 नुसार क्लेम बंद केला तेंव्हापासून वादास कारण घडले. यावरुन तक्रार मुदतबाह्य आहे हे गै.अ.चे म्हणणे ग्राह्य धरण्यास पाञ नाही या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आलेले आहे. 17. एकंदरीत, वरील कारणे व निष्कर्षावरुन, तक्रार मंजूर करण्यास पाञ नाही या निर्णयाप्रत हे न्यायमंच आले असल्याने, तक्रार नामंजूर करुन, खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे. // अंतिम आदेश //
(1) अर्जदाराची तक्रार खारीज. (2) उभय पक्षांनी आपआपला खर्च सहन करावा. (3) उभय पक्षांना आदेशाची प्रत देण्यात यावी.
| [HONABLE MR. Sadik M. Zaveri] MEMBER[HONORABLE Shri Anil. N.Kamble] PRESIDENT[HONABLE MRS. Adv. Varsha Jamdar] MEMBER | |