निकालपत्र
निकाल दिनांक – १३/०१/२०२०
(द्वारा मा.सदस्य : श्री.महेश निळकंठ ढाके)
___________________________________________________________
१. तक्रारदार हिने ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ प्रमाणे सदर तक्रार दाखल केलेली आहे.
२. तक्रारदार ही शेतकरी कुटुंबातील असुन ती मौजे ब-हाणपुर, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर येथील रहीवासी आहे. तक्रारदर हिचे पती अर्जुन गोरक्षनाथ चव्हाण हे शेतकरी होते. तक्रारदार हिचे मयत पतीचा विमा सामनेवाले यांच्याकडे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत उतरविला होता. सदर विमा पॉलिसीचा कालावधी दिनांक ०१-१२-२०१६ ते ३०-११-२०१७ असा होता. पॉलिसीच्या नियमानुसार मयताच्या वारसांचा अपघाती मृत्यु आल्यास किंवा दोन अवयव गेल्यास रक्कम रूपये २,००,०००/- किंवा १ हात, १ पाय किंवा एक डोळा निकामी झाल्यास रक्कम रूपये १,००,०००/- नुकसान भरपाई देण्याची तरतुद आहे. दिनांक ०७-०६-२०१७ रोजी रात्री तक्रारदार हिचे पती कानगोनी फाट्याजवळ उभे असतांना ओमीनी मारूती कार क्रमांक एम.एच.१६-एबी-१७५३ या वाहनाने धडक दिली. त्यामध्ये तक्रारदार हिचे पतीचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचे सिव्हील हॉस्पीटल, अहमदनगर येथे शवविच्छेदन करण्यात आले व शनिशिंगणापूर पोलीस स्टेशन येथे FIR दाखल करण्यात आली. सदर अपघाताबाबत आय.पी.सी. कलम ३०४ ए, २७९ व एफ.आय.आर. क्र.आय-२२/२०१७ अन्वये ओमीनी चालकाचेविरूध्द शनिशिंगणापुर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदविण्यात आला व पोलींसामार्फत स्पॉट पंचनामा व इन्क्वेस्ट पंचनामा करण्यात आला. तक्रारदार हिने कायदेशीर वारस म्हणुन संपुर्ण कागदपत्रांसह विमा प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी तथा नोडल ऑफीसर यांचेमार्फत सामनेवाले विमा कंपनीकडे सादर केला. त्यानंतर सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दिनांक २३-०४-२०१८ रोजी पत्र देऊन तक्रारदाराचे पतीचे नाव सातबारा उता-यावर पॉलिसी उतरविल्यानंतर नोंदविण्यात आले. त्यामुळे तक्रारदार हिचा विमा दावा नामंजुर करण्यात आलेला आहे, असे कारण देऊन विमा दावा नामंजुर केला आहे. अशा प्रकारे चुकीचे कारणाने तक्रारदार हिचा विमा दावा नाकारला म्हणुन तक्रारदार हिने मंचात तक्रार दाखल करून परिच्छेद क्र.१० प्रमाणे मागणी केली आहे.
तक्रारदार हिने तक्रारीसोबत निशाणी क्र.६ दस्तऐवज यादीसोबत एकुण १३ कागदपत्रांचे छायांकीत प्रती जोडलेल्या आहेत. त्यामध्ये सामनेवाले यांचे नामंजुरीचे पत्र, क्लेम फॉर्म, सातबारा उतारा, ‘८ अ’ चा उतारा, गाव नमुना, ६ सी, एफ.आय.आर., स्पॉट पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, मृत्यू प्रमाणपत्र, निवडणुक ओळखपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड दाखल केले आहे.
३. तक्रारदाराची तक्रार दाखल करण्यात येऊन सामनेवाले यांना मंचामार्फत नोटीस काढण्यात आली. सामनेवालेने त्यांची कैफीयत नि.१३ ला दाखल केली आहे. त्यात सामनेवालेने तक्रारदार यांचे पती मयत अर्जुन गोरखनाथ चव्हाण यांचे नाव सातबारा उता-यावर नोंदविण्यात आलेले नव्हते, विमा पॉलिसीनुसार सातबारा उता-यावर नोंद असणा-या व्यक्तींना शेतकरी म्हणुन सदर विमा पॉलिसीचा लाभ मिळतो, तसेच मे. जायका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रा.लि. या कंपनीला यांना शेतकरी अपघाताचे क्लेम तपासणी करीता नियुक्त करण्यात आले होते. सदर कंपनी व कृषी आयुक्त यांना पक्षकार करणे आवश्यक होते. सदर पॉलिसीच्या अटी व नियमानुसार सदरील विमा दावा नाकारल्याचे सामनेवालेने म्हटले आहे. तसेच कुठल्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिलेली नाही. त्यामुळे तक्रारदाराची तक्रार खारीज करण्यात यावी, अशी विनंती सामनेवाले यांनी मंचात केली आहे.
४. तक्रारदार हिने दाखल केलेले कागदपत्र, शपथपत्र व त्यांचे वकील श्री.एन.जी. काळे यांनी केलेला युक्तिवाद. तसेच सामनेवाले यांनी दाखल केलेला खुलासा, त्यांनी दाखल केलेले कागदपत्र, सामनेवालेतर्फे वकील श्री.ए.के. बंग यांनी केलेला युक्तिवाद याचे अवलोकन केले असता न्यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्यांचे उत्तर आम्ही सकारण खालील विवेचनाप्रमाणे देत आहोत.
अ.नं. | मुद्दे | निष्कर्ष |
(१) | तक्ररादार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? | होय |
(२) | सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सेवेत त्रुटी दिली आहे काय ? | होय |
(३) | तक्रारदार नुकसान भरपाईची रक्कम मिळणेस पात्र आहे काय ? | होय |
(४) | आदेश काय | अंतिम आदेशा प्रमाणे |
कारणमिमांसा
५. मुद्दा क्र. (१) : तक्रारदार हिचे मयत पती अर्जुन गोरक्षनाथ चव्हाण यांनी सामनेवाले यांच्याकडे शासनाच्या निर्णयानुसार गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत २ लाख रूपयांचा विमा उतरविला होता. सदर विम्याचा कालावधी ०१-१२-२०१६ ते ३०-११-२०१७ असा होता. विमा उतरविलेची बाब सामनेवालेने त्यांच्या लेखी कैफीयतीत मान्य केले आहे. यावरून तक्रारदार हे सामनेवालेचे ग्राहक आहेत ही बाब सिध्द होते. सबब मुद्दा क्र.१ चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
६. मुद्दा क्र. (२ व ३) - तक्रारदार हिचे पतीचा विमा कालावधीत दिनांक ०७-०६-२०१७ रोजी रात्री तक्रारदार हिचे पती कानगोनी फाट्याजवळ उभे असतांना ओमीनी मारूती कार क्रमांक एम.एच.१६-ए.बी.-१७५३ या वाहनाने धडक दिली. त्यामध्ये तक्रारदार हिचे पतीचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचे सिव्हील हॉस्पीटल, अहमदनगर येथे शवविच्छेदन करण्यात आले. सदर अपघाताबाबत आय.पी.सी. कलम ३०४ ए, २७९ व एफ.आय.आर. क्र.आय-२२/२०१७ अन्वये ओमीनी चालकाचेविरूध्द शनिशिंगणापुर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदविण्यात आला व पोलींसामार्फत स्पॉट पंचनामा व इन्क्वेस्ट पंचनामा करण्यात आला. तक्रारदार हिने कायदेशीर वारस म्हणुन संपुर्ण कागदपत्रांसह विमा प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी तथा नोडल ऑफीसर यांचेमार्फत सामनेवाले विमा कंपनीकडे सादर केला. त्यानंतर सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दिनांक २३-०४-२०१८ रोजी पत्र देऊन तक्रारदाराचे पतीचे नाव सातबारा उता-यावर पॉलिसी उतरविल्यानंतर नोंदविण्यात आला व मयत व्यक्तीच्या नावावर दिनांक ३०-११-२०१६ पुर्वीचा फेरफार उतारा ६ ड नाही. त्यामुळे तक्रारदार हिचा विमा दावा नामंजुर करण्यात आलेला आहे, असे सामनेवाले यांनी म्हटले आहे. या संदर्भात उभयपक्षांचा युक्तिवाद ऐकण्यात आला. तक्रारदार यांनी निशाणी क्र.६ वर कागदपत्रांसोबत सातबारा उतारा व गाव नमुना आठ-अ ची प्रत दाखल केली आहे. सदर कागदपत्राचे अवलोकन केले असता त्यावर तक्रारदार यांचे मयत पती मयत अर्जुन गोरक्षनाथ चव्हाण यांचे नाव नमुद आहे. यावरून तक्रारदार हिचे मयत पती मयत अर्जुन गोरक्षनाथ चव्हाण हे शेतकरी होते ही बाब सिध्द होते. तक्रारदार हिचे मयत पतीचा विमा सामनेवाले यांच्याकडे उतरविला होता. त्यामुळे सामनेवाले यांनी सदरची विमा रक्कम देणे आवश्यक होते. परंतु सामनेवाले यांनी चुकीच्या कारणाने विमा दावा नाकारला आहे, ही बाब सिध्द झाली आहे. अशाप्रकारे चुकीचे कारण देऊन विमा दावा नाकारणे ही सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्याप्रती सेवेत दिलेली त्रुटी आहे. तक्रारदार यांनी विमा दाव्याची नुकसान भरपाई मिळणेसाठी सामनेवाले यांच्याकडे आवश्यक क्लेम फॉर्म, सातबारा उतारा, मृत्यु प्रमाणपत्र दाखल केले आहे. त्यामुळे सामनेवाले यांनी घेतलेला बचाव ग्राह्य धरता येत नाही. सबब मुद्दा क्र.२ व ३ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
७. तक्रारदार हिला सदरची तक्रार सामनेवाले यांनी चुकीचे कारणाने विमा दावा नाकारला म्हणुन सदरील मंचात तक्रार दाखल करावी लागली आहे व मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला, या त्रासापोटी काही रक्कम तक्रारदार हिस देणे न्यायाचे ठरेल.
८ मुद्दा क्र. (४) : मुद्दा क्रमांक १, २ व ३ वरील विवेचनावरून खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
आदेश
१. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे. |
२. सामनेवाले यांनी तक्रारदारास विमा दाव्याची रक्कम रूपये २,००,०००/- (अक्षरी दोन लाख मात्र) व त्यावर दिनांक २३-०४-२०१८ पासून संपुर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे. ९ टक्के दराने व्याज द्यावे. |
३. सामनेवाले यांनी तक्रारदार हिस शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल रूपये ५,०००/- (अक्षरी पाच हजार) व सदर तक्रार अर्जाचा खर्च रूपये ३,०००/- (अक्षरी तीन हजार) द्यावा. |
४. वर नमूद आदेशाची पुर्तता सामनेवाले यांनी आदेशाची प्रत मिळण्यापासून ३० दिवसाच्या आत करावी. |
५. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्क देण्यात यावी. |
६. तक्रारदार यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी. |