निकालपत्र
निकाल दिनांक – १०/०१/२०२०
(द्वारा मा.सदस्या : श्रीमती.चारु विनोद डोंगरे)
___________________________________________________________
१. तक्रारदार हा मृतक निवृत्ती यशवंता गवारे यांचा मुलगा आहे. तक्रादार याचे वडील यांचे नावे मौजे कोकनगाव, ता.कर्जत जि. अहमदनगर येथे शेतजमीन आहे. तक्रारदाराचे वडील शेतकरी असतांना त्यांचा सामनेवाले यांच्याकडे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अतंर्गत विमा उतरविला होता. सदरचा विमेचा कालावधी दिनांक ०१-१२-२०१६ ते ३०-११-०२०१७ असा होता. विमा पॉलिसीची रक्कम रूपये २,००,०००/- अशी होती. विमा पॉलिसीच्या कालावधी चालु असतांना दिनांक २८-११-२०१७ रोजी रात्री ९.३० वाजेचे सुमारास तक्रारदार याचे वडील हे एम.एच.१६-बी.पी.-७९५३ या वाहनावर मागे बसुन नागापुर कडुन जात असतांना मागुन येणा-या मोटारसायकलने धडक दिली व त्यामध्ये तक्रारदार यांचे वडील गंभीर जखमी झाले व त्यात मुत्यू झाला. त्यानंतर त्यांचे सिव्हील हॉस्पीटल, कर्जत येथे शवविच्छेदन करण्यात आले व सदर गुन्हा पोलीस स्टेशन कर्जत येथे नोंदविण्यात आला. त्यानंतर तक्रारदार यांनी संपुर्ण कागदपत्रांसह सामनेवाले यांच्याकडे विमा दावा सादर केला. परंतु सामनेवाले यांनी तक्रारदार यांचे मृतक वडील यांचे वय ७५ वर्षे असल्याने पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार विमा दावा देता येणार नाही म्हणुन नामंजुर केला. अशाप्रकारे सामनेवाले यांनी अनुचीत व्यापारी प्रथेचा अवलंब केला म्हणुन तक्रारदाराने मंचात तक्रार दाखल करून परिच्छेद क्रमांक १० प्रमोण मागणी केली आहे.
२. सामनेवाले यांनी त्यांची लेखी कैफीयत निशाणी १० वर दाखल केली आहे. सामनेवाले यांनी लेखी कैफीयतीमध्ये तक्रारदार यांचे वडीलांचा विमा कालावधी मान्य केलेला आहे. तसेच त्यांनी कथन केले की, तक्रारदाराने विमा दाव्यासोबत दाखल केलेल्या दस्तऐवजावरून असे स्पष्ट झाले की, तक्रारदार यांचे वडीलांचे अपघात झाला त्यावेळी त्यांचे वय हे ७५ वर्ष होते व पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार ७५ वर्षे असलेल्या व्यक्तीला विमा दावा देता येणार नाही. या कारणासाठी दिनांक ०३-०५-२०१८ रोजी पत्र पाठवुन सदरचा विमा दावा नाकारला. पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार सदर विमा दावा योग्य नाही म्हणुन सामनेवाले यांनी नाकारला आहे. सामनेवाले यांनी सेवेत त्रुटी दिली नाही. त्यामुळे तक्रारदाराची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी, अशी विनंती केली आहे.
३. तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्र, शपथपत्र व त्यांचे वकील श्री.नितीन काळे यांनी दाखल केलेला लेखी युक्तिवाद सामनेवाले यांनी दाखल केलेला खुलासा, कागदपत्र, शपथपत्र तसेच सामनेवाले यांचे वकील श्री.अशोक के. बंग यांनी केलेला युक्तिवाद यावरून न्यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्यांचे उत्तर आम्ही सकारण खालील विवेचनाप्रमाणे देत आहोत.
अ.नं. | मुद्दे | निष्कर्ष |
(१) | तक्ररादार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? | होय |
(२) | सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सेवेत त्रुटी दिली आहे काय ? | नाही |
(३) | आदेश काय | अंतिम आदेशा प्रमाणे |
कारणमिमांसा
४. मुद्दा क्र. (१) : तक्रारदार हे मौजे कोकणगाव, ता.कर्जत जि. अहमदनगर येथरन रहिवासी आहेत. तक्रारदार यांचे वडीलांचा रोड अपघातात गंभीर जखमी होऊन मृत्यू झालेला आहे व तक्रारदार यांचे मयत वडीलांचे नावे गट क्रमांक ३/१ कोकणगांव, तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर येथे शेतजीमन आहे. ही बाब सिध्द करणेसाठी तक्रारदार यांनी सातबारा उतारा दाखल केला आहे. यावरून मृतक शेतकरी होते, ही बाब सिध्द होते. तक्रारदार यांचे वडीलांचा सामनेवाले यांच्याकडे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अतंर्गत विमा उतरविला होता, ही बाब सामनेवाले यांना मान्य आहे. तसेच तक्रारदार हे वारस असलेबाबतचे तहसिलदार तथ कार्यकारी दंडाधिकारी यांचेसमोर केलेले प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे. यावरून स्पष्ट होते की, तक्रारदार याने मयत वडीलांचे वारस म्हणून तक्रारदाराने सदर तक्रार दाखल केली आहे व त्या अनुशंगाने तक्रारदार ही सामनेवाले यांची ग्राहक आहे, ही बाब सिध्द होते. सबब मुददा क्र.१ चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
५. मुद्दा क्र. (२) - तक्रारदार यांचे वडील शेतकरी होते ही बाब तक्रारदार यांनी दाखल केलेल्या सातबारा उता-यावरून सिध्द झाली आहे. तक्रारदाराचे वडील शेतकरी असतांना त्यांचा सामनेवाले यांच्याकडे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अतंर्गत विमा उतरविला होता व विमा कालावधी दिनांक ०१-१२-२०१६ ते ३०-११-०२०१७ असा होता. विमा पॉलिसीच्या कालावधी चालु असतांना दिनांक २८-११-२०१७ रोजी तक्रारदार यांचे वडीलांचा रस्ते अपघाता मृत्यु झाला. त्यानंतर तक्रारदार यांनी संपुर्ण कागदपत्रांसह सामनेवाले यांच्याकडे विमा दावा सादर केला. परंतु सामनेवाले यांनी तक्रारदार यांचे मृतक वडील यांचे वय ७५ वर्षे असल्याने पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार विमा दावा देता येणार नाही या कारणासाठी दिनांक ०३-०५-२०१८ रोजी पत्र पाठवुन सदरचा विमा दावा नाकारला. याबाबत सामनेवालेने निशाणी १५ वर लेखी युक्तिवादासोबत शासन निर्णयांचे छायांकीत प्रती दाखल केलेल्या आहेत. त्यामधील शेतकरी जनता अपघात विमा योजनेसंदर्भातील मार्गदर्शक सुचना मधील क्रमांक १ मध्ये असे नमुद आहे की, ‘राज्यातील महसूल विभागातील७/१२ नोंदीप्रमाणे १० ते ७५ वयोगटातील खातेदार शेतकरी यांचेवतीने त्यांचा व्यक्तिगत अपघात व अपंगत्व यासाठी शासन प्रस्तुत निर्णयान्वये विमा पॉलिसी उतरवित आहे.’ तसेच सामनेवाले विमा कंपनीने आपल्या लेखी कैफियतीसोबत मृतकाचा शाळा सोडल्याचा दाखला दाखल केला आहे. त्यावरून स्पष्ट होते की, मृतकाचे वय ७५ वर्षांपेक्षा जास्त होते. तक्रारदारांचे वकिलांनी तोंंडी युक्तिवादादरम्यान सदरची बाब मान्य केली आहे. याचबरोबर विमा पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार तक्रारदार यांना विमा दावा देता येणार नाही, ही बाब स्पष्ट झाली आहे. त्यामुळे सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा विमा दावा नाकारून सेवेत त्रुटी केली नाही, असे मंचाचे मत आहे. त्यामुळे मुद्दा क्र.१ चे उत्तर नकारार्थी देण्यात येत आहे.
६. मुद्दा क्र. (३) : मुद्दा क्र.१ व २ चे विवेचनावरून खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
आदेश
१. तक्रारदाराची तक्रार खारीज करण्यात येत आहे. |
२. उभय पक्षकार यांनी तक्रारीचा खर्च स्वतः सहन करावा. |
३. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना नि:शुल्क देण्यात यावी |
४. तक्रारकर्ता यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी. |