न्या य नि र्ण य
व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 11 व 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांचे मयत पती विलास महादेव पांगे हे शेतकरी होती व त्यांची महाराष्ट्र शासनामार्फत वि.प.क्र.1 विमा कंपनीकडे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना या योजनेअंतर्गत पॉलिसी उतरविलेली होती. सदर पॉलिसीचा कालावधी हा दि. 1/12/2016 ते 30/11/2017 असा होता. सदर पॉलिसीचे कालावधीत दि. 14/2/17 रोजी तक्रारदारांचे पती हे त्यांचे मित्र शंकर महादेव पाटील यांचे मोटरसायकलवरुन मित्राच्या मागे बसून गणपतीपुळे येथून गावाकडे परत येत असताना वाटेत आंबा गावचे हद्दीत रात्री 9.00 चे सुमारास समोरुन आलेल्या चारचाकी वाहनाची लाईट सदरचे श्री शंकर पाटील यांचे डोळयावर पडलेने व त्यांना रोडचा अंदाज न आलेने त्यांची मोटर सायकल रस्त्याचे डावे बाजूस असले सिमेंट कडठयाला धडकले व दोघेही खाली पडले. तक्रारदाराचे पती यांना तातडीने कोल्हापूर येथे सी.पी.आर. हॉस्पीटल येथे दाखल केले. परंतु रुग्णालयात नेत असतानाच ते मयत झाले. याबाबत पोलिसांनी इंक्वेस्ट पंचनामा केला तसेच शवपरिक्षा करुन Death due to head injury with fracture of femur (unnatural) असे मृत्यू कारण नमूद अहवाल दिला आहे. तदनंतर तक्रारदार यांनी मंडल कृषी अधिकारी, वडगांव यांचेकडे विलंबाचे खुलाश्यासह दि. 1/8/2017 रोजी क्लेम दाखल केला आहे. तदनंतर तो तालुका कृषी अधिकारी, हातकणंगले व पुढे जिल्हा कृषी अधिक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर यांचेकडे दि. 4/8/17 रोजी पाठविलेला आहे. परंतु त्याबाबत काहीही माहिती न मिळालेने तक्रारदाराने चौकशी केली असता सदरचा क्लेम विलंबाच्या मुदद्यावर प्रलंबित असल्याची माहिती मिळाली म्हणून तक्रारदाराने पुन्हा संपूर्ण कागदपत्रे वि.प.क्र.1 कंपनीस दि. 30/1/18 रोजी पाठविली. परंतु वि.प. विमा कंपनीने आजअखेर क्लेम मंजूर केलेला नाही. अशा प्रकारे वि.प. यांनी तक्रारदारास द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे. म्हणून, तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रारअर्ज या मंचात दाखल केला आहे.
2. प्रस्तुतकामी तक्रारदाराने वि.प.क्र.1 कंपनीकडून विमाक्लेमची रक्कम रु.2,00,000/-, सदर रकमेवर 18 टक्के दराने व्याज, मानसिक त्रासापोटी रु. 50,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.5,000/- वि.प.क्र.1 कडून वसूल होवून मिळावा अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत अ.क्र.1 व 16 कडे अनुक्रमे विमा कंपनीस दिलेले स्मरणपत्र, सदर पत्राची पोहोचपावती, तालुका कृषी अधिकारी यांनी जिल्हा कृषी अधिकारी यांना दिलेले पत्र, मंडल कृषी अधिकारी यांनी तालुका कृषी अधिकारी यांना दिलेले पत्र, तक्रारदाराने मंडल कृषी अधिकारी यांना दिलेले पत्र, क्लेम फॉर्म, 7/12 उतारा, 6-ड उतारा, 6/क उतारा, क्लेमसोबतचे प्रतिज्ञापत्र, प्रथम खबर अहवाल, फिर्यादी जबाब, पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मॉर्टेम रिपोर्ट, मृत्यू कारणाचे प्रमाणपत्र, तक्रारदाराचे पुराव्याचे शपथपत्र, लेखी युक्तिवाद वगैरे कागदपत्रे दाखल केली आहे.
4. वि.प. क्र.1 यांनी सदरकामी म्हणणे/कैफियत दाखल केले आहेत. वि.प. क्र.1 ने त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. वि.प. क्र.1 ने तक्रारदाराचे तक्रारअर्जावर पुढील आक्षेप घेतलेले आहेत.
i) तक्रारदाराचा तक्रारअर्ज व त्यातील सर्व मजकूर मान्य व कबूल नाही.
ii) वि.प. क्र.1 यांनी कोणत्याही प्रकारे सेवेत त्रुटी केलेली नाही. वि.प. यांनी सर्व बाबींचा विचार करुन तक्रारदाराचा क्लेम योग्य त्या कारणासाठीच नाकारला आहे.
iii) वि.प.क्र.1 यांनी तक्रारदार यांना दि. 25/5/2018 रोजी त्याचा दावा हा मयत व्यक्तीच्या नावांवर दि. 30/11/2016 पूर्वीचा फेरफार उतारा 6-ड नाही या कारणास्तव दावा रद्द करत असलेचे कळविलेले आहे.
iv) तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांमध्ये फिर्यादी जबाबामध्ये शंकर महादेव पाटील यांनी दि. 15/2/2017 रोजीच्या त्यांच्या जबाबामध्ये, काल दि. 14/2/17 रोजी समाळी 11.20 चे सुमारास मी व माझा मित्र विलास पांगे असे मिळून माझे मोटर सायकलीवरुन गणपतीपुळे येथे गणपतीचे देवदर्शनासाठी पारगांव गावाहून निघालो होतो. त्यानंतर गणपती पुळे येथे दर्शन करुन सायंकाळी 6.00 चे सुमारास गणपतीपुळे येथून मी व माझा मित्र विलास पांगे असे निघालो. त्यावेळी विलास पांगे हा मोटार सायकल चालवत होता असे नमूद केले आहे. यावरुन असे दिसून येते की, अपघातावेळी मयत हा मोटार सायकल चालवत होता व नमूद पॉलिसी नुसार जर मयत व्यक्ती वाहन चालवत असेल तर त्या व्यक्तीकडे वाहन चालविण्याचा वेध परवाना असणे बंधनकारक आहे. सदरचा परवाना नसल्यामुळे नंतर दि. 10/3/2017 रोजी शंकर पाटील व मयताचे वारस यांनी संगनमत करुन पुरवणी जबाबामध्ये शंकर महादेव पाटील हेच मोटार सायकल चालवत असलेचे नमूद केले आहे. परंतु दि. 15/2/17 चे जबाबामध्ये शंकर महादेव पाटील हे गाडी चालवत होते असे का नमूद केले, याचे स्पष्टीकरण कोठेही दिलेले नाही. सबब, तक्रार नामंजूर करावी.
अशा स्वरुपाचे आक्षेप वि.प. क्र.1 यांनी तक्रारअर्जावर घेतलेले आहेत.
5. वि.प. क्र.2 यांना नोटीस लागू होवूनही त्यांनी 45 दिवसांचे आत म्हणणे दाखल न केलेने त्यांचेविरुध्द नो से आदेश पारीत करण्यात आला.
6. वर नमूद तक्रारदार व वि.प. क्र.1 यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. क्र.1 हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. क्र.1 विमा कंपनीने तक्रारदाराचा विमाक्लेम नाकारुन तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे वि.प. क्र.1 विमा कंपनीकडून विमाक्लेमची रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
वि वे च न –
7. वर नमूद मुद्दा क्र.1 ते 3 ची उत्तरे आम्ही होकारार्थी दिली आहेत कारण तक्रारदार यांचे पती मयत विलास पांगे यांचा महाराष्ट्र शासनामार्फत वि.प.क्र.1 विमा कंपनीकडे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना या योजनेअंतर्गत विमा उतरविलेला होता. सदर पॉलिसीचा कालावधी हा दि. 1/12/2016 ते 30/11/2017 असा होता. सदरची बाब वि.प. विमा कंपनीने त्यांचे म्हणण्यामध्ये स्पष्टपणे मान्य केली आहे. सबब, तक्रारदार व वि.प.क्र.1 हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट व सिध्द झालेली आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
8. वि.प.क्र.1 यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये, मयत व्यक्तीच्या नावावर दि. 30/11/2016 पूर्वीचा फेरफार उतारा 6-ड नाही तसेच अपघाताचे वेळी तक्रारदाराचे पती मयत विलास पांगे हे स्वतः वाहन चालवित होते व त्यांच्याकडे सदर वाहन चालविणेचा वैध परवाना नव्हता, सबब, तक्रारदार हे विमा रक्कम मिळणेस पात्र नाहीत असे नमूद केले आहे. परंतु तक्रारदाराने याकामी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करता, अ.क्र.8 ला तक्रारदाराने गाव नमुना 6-क फेरफार नोंदवहीची प्रत दाखल केली आहे. सबब, तक्रारदाराकडे सदरचा उतारा उपलब्ध आहे ही बाब यावरुन दिसून येते.
9. तक्रारदाराने याकामी साक्षीदार म्हणून श्री शंकर महादेव पाटील यांचे पुराव्याचे शपथपत्र दाखल केले आहे. सदर शपथपत्रामध्ये श्री पाटील यांनी,
अपघातानंतर पोलिसांनी माझा जो जबाब नोंदविला, त्यावेळी मी प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत होतो, याकारणे मी घाबरुन व अनावधानाने जबाब दिला. त्या जबाबामध्ये ती विलास महादेव पांगे याच्या मागे बसलो होतो व ते गाडी चालवत होते असा जबाब दिला होता. परंतु मित्राचा अपघातामध्ये दुर्दैवी झालेला अंत यात मी पूर्णपणे घाबरलेल्या अवस्थेत तसा जबाब दिला. वास्तविक अपघातावेळी मी गाडी चालवित होतो. माझेकडे दुचाकी चालविणेचा वाहन परवाना असून ते मुदतीत होते. सदर अपघातामध्ये माझे मित्र विलास महादेव पांगे हे माझ्या मागे बसले होते.
असे शपथेवर कथन केले आहे. साक्षीदाराचे सदरचे कथन हे शपथेवर केलेले कथन आहे. सदरचे शपथेवर केलेले कथन खोडून काढण्याकरिता वि.प.क्र.1 यांनी सदर साक्षीदार यांचा उलटतपास घेतलेला नाही अथवा रिजॉइंडर अथवा सदर शपथपत्राला छेद देणारा अन्य कोणताही स्वतंत्र पुरावा दाखल केलेला नाही. सबब, साक्षीदाराने शपथेवर केलेल्या कथनावर विश्वास ठेवणे न्यायोचित होईल असे या मंचाचे मत आहे. सदरची बाब विचारात घेता, तक्रारदाराचे पती मयत विलास पांगे हे अपघातग्रस्त मोटारसायकलवर मागे बसले होते व ते मोटार सायकल चालवित नव्हते ही बाब शाबीत झालेली आहे. सबब, मयत विलास पांगे यांचेकडे वाहन चालविण्याचा परवाना नव्हता हा मुद्दा याठिकाणी गैरलागू ठरतो असे या मंचाचे मत आहे. सबब, वि.प. यांनी चुकीच्या कारणांचे आधारे तक्रारदारांचा न्याययोग्य क्लेम नाकारुन तक्रारदारास सदोष सेवा दिली आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
10. सबब, तक्रारदार हे विमाक्लेमपोटी रक्कम रु.2,00,000/- मिळणेस पात्र आहेत तसेच सदर रकमेवर वि.प.क्र.1 यांनी विमा क्लेम नाकारले तारखेपासून विमाक्लेमची रक्कम तक्रारदाराचे हाती प्रत्यक्ष पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याजदराने वसूल होवून मिळणेस तसेच मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व अर्जाचा खर्च रक्कम रु.3,000/- वि.प.क्र.1 यांचेकडून वसूल होवून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
सबब, प्रस्तुतकामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2) वि.प. क्र.1 विमा कंपनीने तक्रारदार यांना विमाक्लेमपोटी रक्कम रु. 2,00,000/- अदा करावी व सदर रकमेवर वि.प. क्र.1 यांनी विमा क्लेम नाकारले तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज अदा करावे.
3) मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 5,000/- व अर्जाचा खर्च रु.3,000/- वि.प. क्र.1 विमा कंपनीने तक्रारदारास अदा करावेत.
4) वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता वि.प. क्र.1 यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 25 व 27 अन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.