निकालपत्र
निकाल दिनांक – २६/११/२०२०
(द्वारा सदस्या : श्रीमती.चारु विनोद डोंगरे)
___________________________________________________________
१. तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ प्रमाणे सदर तक्रार दाखल केलेली आहे.
२. तक्रारदाराने तक्रारीत असे कथन केले आहे की, तक्रारदार हे मयत मंदा रामदास भोसले हिचे पती आहे. मयत मंदा रामदास भोसले ही शेतकरी होती व तिचा महाराष्ट्र शासनातर्फे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा या योजनेअंतर्गत विमा उतरविला होता. तक्रारदाराची मयत पत्नीचे दिनांक १४-०६-२०१७ रोजी तिच्या घरी इलेक्ट्रीक शॉक लागुन निधन झाले. सदर अपघाताची एफ.आय.आर. नोंदविण्यात आली व तक्रारदाराचे मयत पत्नीचे शवविच्छेदन करण्यात आला. तक्रारीमध्ये पुढे असे कथन केलेले आहे की, तक्रारदाराने सर्व कागदपत्रांसह तालुका कृषी अधिकारी नोडल ऑफीसर मार्फत विमा दावा सामनेवाले इन्शुरन्स कंपनीकडे सादर केला. सामनेवाले विमा कंपनीचे दिनांक १७-०९-२०१८ रोजी तक्रारदाराचा विमा दावा नाकारणेबाबत पत्र पाठविले. सामनेवाले कंपनी यांनी त्यामध्ये नमुद केले की, मयत व्यक्तीच्या झोपडीत लघुदाब वाहिनीवरून अनाधिकृत रित्या वीज पुरवठा घेतलेला होता, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचा रिपोर्ट अनुसार सदर अपघातास अपघातग्रस्त स्वताः जबाबदार आहे. या दस्ताचा आधार घेऊन विमा दावा रद्द करीत आहोत, असे कारण नमूद करून तक्रारदाराचा विमा दावा नामंजूर केल्याचे कळविले. अशाप्रकारे कोणतेही योग्य कारण नसतांना तक्रारदाराचा विमा दावा नाकारला आहे. त्यामुळे तक्रारदाराने विमा दावा मिळणेकरीता सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे.
३. तक्रारदाराने तक्रारीत अशी मागणी केलेली आहे की, सामनेवाले कंपनीने तक्रारदाराला त्याची मयत पत्नी हिचेकरीता गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेअंतर्गत काढलेल्या विमा दाव्याची रक्कम व्याजासह द्यावी, तसेच तक्रारदाराला झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई व तक्रार अर्जाचा खर्च मिळण्याचा आदेश व्हावा.
४. तक्रारदाराने तक्रारीसोबत शपथपत्र, दस्तऐवज यादीसोबत एकुण १६ कागदपत्रांचे छायांकीत प्रती दाखल केलेल्या आहेत. त्यामध्ये नामंजुरीचे पत्र, क्लेम फॉर्म, घोषणापत्र, ८ ‘अ’, सातबारा उतारा, वारस नोंदवही, ६ ‘सी’, खबर, इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मार्टम रिपोर्ट, रेशन कार्ड, आधार कार्ड, सब डिव्हीजनल ऑफीसर ऑर्डर, एम.एस.ई.बी. लेटर, शासनाचे ठराव दाखल केलेले आहेत. निशाणी ८ वर लेखी युक्तिवाद दाखल केलेला आहे. निशाणी ९ वर मा. वरिष्ठ न्यायालयांचे न्यायनिवाडे दाखल केलेले आहे.
५. तक्रारदाराची तक्रार स्विकृत करून सामनेवाले यांना नोटीस काढण्यात आली. सामनेवाले प्रकरणात हजर झाले व निशाणी ५ वर कैफीयत दाखल केली. सामनेवालेने कैफीयतीत असे कथन केले आहे की, तक्रारदाराचे पत्नीचा मृत्यु हा इलेक्ट्रीक शॉक लागुन झालेला आहे. सदर मृत्यु हा स्वतःचे निष्काळजीपणामुळे झाला असुन पॉलिसीचे एक्लुझन क्लॉज क्रमांक २ आणि १२ नुसार सदर विमा दावा नामंजुर केलेला आहे. तसेच सदर अपघाताबाबत तपासणी केल्यानंतर असे दिसुन आले की, सदर व्यक्तीच्या झोपडीत लघुदाब वाहिनीवरून अनाधिकृत रित्या वीज पुरवठा घेतलेला होता, तसेच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचा रिपोर्ट अनुसार सदर अपघातास अपघातग्रस्त स्वता जबाबदार आहे, असे नमुद आहे. सबब सामनेवालेने सेवेत कोणतीही त्रुटी दिलेली नाही, तक्रारदाराचा विमा दावा रद्द करण्यात यावा, अशी आयोगाला विनंती केली आहे.
सामनेवालेने कैफीयतीचे पुष्ट्यर्थ निशाणी क्रमांक ६ वर शपथपत्र दाखल केले आहे. तसेच निशाणी क्रमांक ८ वर दस्तऐवज यादीसोबत विमा पॉलिसी व अटी व शर्तींची छायांकीत प्रत दाखल केलेली आहे. तसेच मा.सर्वोच्च न्यायालय यांचा सिव्हील अपील क्रमांक १३७५/२००३ – सुरजमल रामनिवास ऑईल मिल्स प्रा.लि. विरूध्द युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि. व इतर हा न्यायनिवाडा दाखल केला आहे.
६. तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार, दस्तऐवज सामनेवालेने दाखल केलेला जबाब, दस्तऐवज पाहता व उभयपक्षांचा तोंडी युक्तिवाद ऐकला असता मंचासमक्ष खालीलप्रमाणे मुद्दे विचारात घेण्यात येत आहे.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
१. | तक्रारदार हे सामनेवालेंचे ग्राहक आहेत काय ? | होय |
२. | सामनेवालेने तक्रारदाराला न्युनतम सेवा दिलेली आहे काय ? | होय |
३. | आदेश काय ? | अंतीम आदेशाप्रमाणे |
मुद्दा क्र.१ -
७. तक्रारदार यांची मयत पत्नी ही शेतकरी होती व तिचे नाव मंदा रामदास भोसले व शेतक-यांकरीता महाराष्ट्र शासनाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा घेतला होता व त्यामध्ये सामनेवाले कंपनीकडुन शेतक-यांचा विमा दावा उतरविण्यात आला होता, ही बाब उभयपक्षांना मान्य आहे. सदरील विमा दाव्याचे अंतर्गत तक्रारदार ही लाभार्थी होती यात कोणताही वाद नसल्याने तक्रारदार हे सामनेवालेचे ग्राहक आहे, असे सिध्द होते. सबब मुद्दा क्र.१ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्र.२ -
८. तक्रारदार याच्या पत्नीचा सामनेवाले यांच्याकडे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमा उतरविला होता. तसेच तक्रारदार याची पत्नी हि शेतकरी होती हि बाब दाखल सातबारा उत-यावरून स्पष्ट झाली आहे. तसेच तिचा मृत्यु हा इलेक्ट्रीक शॉक लागुन झालेला आहे, ही बाब स्पष्ट आहे. मात्र सामनेवाले यांनी त्यांच्या लेखी कैफीयतीमध्ये असा बचाव घेतला की, तक्रारदार यांनी अनाधिकृतरित्या विज पुरवठा घेतला व ही बाब स्पष्ट करण्यासाठी त्यांनी विद्युत वितरण कंपनीचा रिपोर्टचा आधार घेतला आहे व नामंजुर करण्याच्या पत्रामध्ये सदर बाब नमुद केली. परंतु Exclusions clause No.2 & 12 ही बाब नमुद नाही. त्यामुळे सदरची बाब प्रथमतः या आयोगासामोर लेखी कैफीयतीमध्ये नमुद केली आहे. Exclusions clause No.2 चे अवलोकन केले असता self inflicted injury असल्यास विमा दावा नाकारला जावु शकतो. परंतु सदरहु प्रकरणात मृत्यु हा विजेचा धक्का बसुन झालेला आहे. त्यामुळे विजेचा धक्का बसणे ही बाब self infected injury या प्रकारात मोडत नाही. त्यामुळे सामनेवाले यांनी Exclusions clause No.2 चा घेतलेला आधार संयुक्तिक वाटत नाही.
Sr.12 of Exclusions clause चे अवलोकन केले असता त्यामध्ये Breach of law or misfeasance असे नमुद असुन मृतकाने कायद्याचा भंग करून विज पुरवठा घेतला व विजेचा धक्का बसण्यास कारणीभुत आहे. परंतु याठिकाणी नमुद करण्यात येते की, विज पुरवठा जर बेकायदेशीररित्या घेण्यात आला असेल तर त्याबाबत कारवाई करण्याचे अधिकार विज पुरवठा कंपनीला आहे व ती स्वतंत्र बाब असल्यामुळे सामनेवाले या बाबीचा आधार घेऊन अपघाती मृत्युबाबतचा विमा दावा नाकारू शकत नाही. त्यामुळे दावा नाकारण्यास दिलेली दोन्ही अट क्रमांक २ व १२ या सदरहु प्रकरणात लागु पडत नाही. त्यामुळे दावा नाकारण्यास दिलेले कारण ग्राह्य धरता येणार नाही. सामनेवाले यांनी अयोग्य कारणाने दावा नाकारला त्यामुळे ही बाब सेवेतील त्रुटी ठरते. सामनवाले यांनी मा. सर्वोच्च न्यायालय यांचा खालील न्यायनिवाड्याचा आधार घेतला आहे.
Civil Appeal No.1375 of 2013 – Dt.08-10-2010
Suraj Mal Ram Niwas Oil Mills (P) Ltd. Vs. United India Insurance Co. Ltd. and Ors.
सदरहु न्यायनिवाड्याचे अवलोकन केले असता त्यामध्ये उभयपक्षाच्या करारामधील अटी व शर्ती ह्या जशाच्या तशा विचारात घेण्यात याव्यात व त्यामध्ये कोणताही बदल स्वतःहुन करण्यात येऊ नये, असे निर्णीत केलेले आहे. प्रस्तुतचे प्रकरणामध्ये विमा पॉलिसीतील अटी व शर्ती ह्या जशाच्या तशा विचारात घेण्यात आल्या आहेत व Exlcusion Clause हे सुध्दा हा दावा नाकारण्यास लागु पडत नाही, असे निर्णीत केले आहे. त्यामुळे विमा पॉलिसीतील अटी व शर्ती यामध्ये बदल करण्यात न आल्याने संदर्भांकीत न्यायनिवाडा या प्रकरणात लागु पडत नाही.
तक्रारदार यांचे पत्नीला विजेचा शॉक लागला व तिचा मृत्यु झाला, ही बाब कागदपत्रांवरून स्पष्ट झाली आहे. तक्रारदाराचे पत्नीचा अपघाती मृत्यु झाला आहे, त्यामुळे तकारदार हा विमा दाव्याची रक्कम मिळण्यास पात्र ठरतो, या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब मुद्दा क्रमांक २ चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
मुद्दा क्र.३ -
९. मुद्दा क्रमांक १ व २ च्या विवेचनावरून खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करण्यात येत आहे.
आदेश
१. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे. २. सामनेवाले यांनी तक्रारदारास विमा दाव्याची रक्कम रूपये २,००,०००/- (अक्षरी दोन लाख मात्र) व त्यावर दिनांक १७-०९-२०१८ पासून संपुर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे. ७ टक्के दराने व्याज द्यावे. ३. सामनेवाले यांनी तक्रारदार हिस शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल रूपये १०,०००/- (अक्षरी दहा हजार) व सदर तक्रार अर्जाचा खर्च रूपये ५,०००/- (अक्षरी पाच हजार) द्यावा. ४ वर नमूद आदेशाची पुर्तता सामनेवाले यांनी आदेशाची प्रत मिळण्यापासून ३० दिवसाच्या आत करावी. ५. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्क देण्यात यावी. ६. तक्रारदार यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी |