तक्रारदारांच्या तक्रारी प्रमाणे त्यांची आई श्रीमती देवकाबाई श्रीराम नेवारे हिचे मालकीची मौजा आंबागड, तालुका तुमसर सरांडी, तालुका-तिरोडा, जिल्हा गोंदीया येथील शेतीचा भूमापन क्रं-48/2 असा आहे. विरुध्दपक्ष क्रं-1विमा कंपनी आहे तर विरुध्दपक्ष क्रं 2 ही विमा सल्लागार कंपनी आहे तर विरुध्दपक्ष क्रं-3)तालुका कृषी अधिकारी असून ते महाराष्ट्रशासनाचे वतीने शेतक-याचा विमा काढतात व विमा दावा स्विकारुन व आवश्यक दस्तऐवजाची पुर्तता करुन घेऊन पुढे तो विमा दावा विमा कंपनीकडे दाखल करतात. सदर विमा योजने अंतर्गत तक्रारदारांचे आईचा रुपये-2,00,000/-एवढया रकमेचा शेतकरी अपघात विमा शासना मार्फत काढण्यात आला होता. आईचे मृत्यूनंतर उभय तक्रारदार ही तिचे मुले या नात्याने कायदेशीर वारसदार म्हणून “लाभार्थी” आहेत. तक्रारदारांनी पुढे असे नमुद केले की, त्यांची आई श्रीमती देवकाबाई श्रीराम नेवारे ही दिनांक-16.12.2016 रोजी पाय घसरुन विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाला. तक्रारदारांनी त्यांचे आईचा शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा असल्याने आवश्यक दस्तऐवजांसह विरुध्दपक्ष क्रं-3 तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयात विमा दावा प्रस्ताव दाखल केला व वेळोवेळी विरुध्दपक्षा तर्फे मागणी केलेले दस्तऐवजांची पुर्तता केली. परंतु विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने तक्रारदारांचा विमा दावा आज पर्यंत विनाकारण प्रलंबित ठेवला. महाराष्ट्र शासनाचे जारी केलेल्या परिपत्रका प्रमाणे 90 दिवसात विमा दावा निकाली काढण्याचे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत परंतु विरुध्दपक्ष विमा कंपनीने त्यांची फसवणूक केली असून विमा दाव्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करीत आहे. ज्या उद्देश्याने शासनाने मृतक शेतक-यांच्या वारसदारांसाठी हीयोजना सुरु केली त्या उद्देश्यालाच विरुध्दपक्ष विमा कंपनी तडा देत आहेत आणि दोषपूर्ण सेवा दिलेली आहे, म्हणून उभय तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल करुन त्याव्दारे पुढील मागण्या विरुध्दपक्षा विरुध्द केल्यात- - विरुध्दपक्षांना आदेशित करण्यात यावे की, त्यांनी तक्रारदारांना त्यांचे आईचे अपघाती मृत्यू संबधात विमा राशी रुपये-2,00,000/-दयावी आणि सदर रकमेवर विमा प्रस्ताव दाखल केल्याचा दिनांक-15/03/2017 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-18% दराने व्याज दयावे.
- तक्रारदारांना झालेल्या मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-50,000/-तसेच तक्रारखर्च म्हणून रुपये-20,000/-विरुध्दपक्षांनी देण्याचे आदेशित व्हावे.
(03) या शिवाय योग्य ती दाद त्यांचे बाजूने मंजूर करण्यात यावी. 03. विरुध्दपक्ष क्रं 1 ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, नागपूर तर्फे लेखी उत्तर जिल्हाग्राहक आयोगा समक्ष दाखल करण्यात आले. त्यांनी आपल्या लेखी उत्तरात असे नमुद केले की, पोलीस दस्तऐवजां वरुन असे दिसून येते की, तक्रारदारांची आई श्रीमती देवकीबाई हिने अन्य व्यक्ती श्री राधेश्याम कंधारे यांचे शेतातील विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्याकेली, त्यामुळे तक्रारदारांचे आईचा अपघाती मृत्यू झाला असे म्हणता येणार नाही परंतु तक्रारदारांनी ही बाब तक्रारीमध्ये लपवून ठेऊन ते विमा कंपनीने दोषपूर्ण सेवा दिली असा चुकीचा आरोप करीत आहेत. पोलीस चौकशी दस्तऐवजा वरुन असे दिसून येते की, तक्रारदारांची आई हीने रात्री घर सोडले आणि तिचे मृत शरीर हे दुस-याच्या विहिरी मध्येआढळून आले, तिला दुस-याचे विहिरीवर जाण्याची आवश्यकता नव्हती, त्यामुळे तिचा अपघाती मृत्यू होता या बाबत साशंकता निर्माण होते. तक्रारदारांचा विमा दावा विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने त्यांचे दिनांक-17.10.2018 रोजीचे पत्राव्दारे नामंजूर करण्यात आला आणि सदर पत्रात विमा दावा नामंजूर करण्याचे कारण हे आत्महत्या असून अपघाती मृत्यूनसल्याचे नमुद केले. सदर विमा दावा नामंजूरीचे पत्राची प्रत विरुध्दपक्ष क्रं 2 व विरुध्दपक्ष क्रं 3 यांना सुध्दापाठविलेली आहे. तक्रारदारांनी गाव नमुना-6-ड दाखल केला त्यावरुन त्यांची आई मृतक देवकीबाई हिचे नावाने कोणतीही शेती नसल्याचे दिसून येते. विमा सुरु होण्याचे कालावधी मध्ये मृतक देवकीबाई हिचे नावाने शेती नसल्याने तिचा विमा हप्ता शासना मार्फत विमा कंपनीला मिळालेला नाही. तिचे मृत्यू पूर्वी सुध्दा तिचे नावाने शासकीय अभिलेखामध्येजमीनीची नोंद नाही. परिच्छेद निहाय लेखी उत्तरात असे नमुद केले की, श्रीमती देवकीबाई श्रीराम नेवारे हिचे नावाने मौजा आंबागड, तहसिल तुमसर, जिल्हा भंडारा येथे सर्व्हे क्रं 48/2 शेती आहे ही बाब नामंजूर केली. सन-2014 ते 2017 या कालावधीत मृतक देवकीबाई हिचे नावाने शेतजमीन असल्याचे शासकीय अभिलेखा मध्ये नोंद नाही असे अभिलेखावरुन दिसून येते. तक्रारदारांची तक्रार मुदतबाहय आहे. तक्रारदारांची तक्रार चुकीची असल्याने ती खर्चासह खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी तर्फे करण्यात आली. 04. विरुध्दपक्ष क्रं 2 जयका इन्शुरन्स सर्व्हीस ब्रोकरेज प्रायव्हेट लिमिटेड यांनी लेखी उत्तर जिल्हा ग्राहक आयोगा समोर दाखल केले. त्यांनी असे नमुद केले की, जिल्हा कृषी अधिकारी यांचे कडून प्राप्त झालेल्या विमा दाव्यांची छाननी करुन संबधितां कडून पुर्तता करुन घेऊन पुढे तो विमा दावा निश्चीतीसाठी विमा कंपनीकडे पाठवितात. ते फक्त शासन आणि विमा कंपनी यांचे मध्ये मध्यस्थ म्हणून कार्य करतात. विमा दावा मंजूर करणे वा नामंजूर करणे ही विमा कंपनीचे अखत्यारीतील बाब आहे. त्यांनी कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही करीता त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती केली. 05. विरुध्दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी, तुमसर यांनी लेखी उत्तर जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केले. त्यांनी उत्तरा मध्ये नमुद केले की, श्रीमती देवकी नेवारे हिचा विहिरीचे पाण्यात बुडून दिनांक-16.12.2016 रोजी मृत्यू झाला. तिचे अपघाती मृत्यू बाबत विमा प्रस्ताव त्यांचे कार्यालयात दिनांक-15.03.2017 रोजी सादर करण्यात आला. त्यानंतर त्यांनी सदर प्रस्ताव त्यांचे कार्यालयाचे जावक क्रं-630, दिनांक-17 मार्च, 2017 अन्वये जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी कार्यालयात सादर केला. दिनांक-18.11.2017 रोजी विमा दावा प्रस्तावातील काही बाबीची पुर्तता करण्यात आली. दि ओरीएन्टल इन्शुरन्स कंपनी पुणे विभागीय कार्यालय यांनी दिनांक-17.10.2018 रोजीचे पत्राअन्वये विमा दावा नामंजूर केल्याचे कळविले. त्यांनी सोबत विमा दावा प्रस्ताव व दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात. 06. तक्रारदारांनी तक्रारीचे पृष्टयर्थ दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्या असून ज्यामध्ये प्रामुख्याने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना-2016-17 शासन निर्णय, त्यांनी तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयात दाखल केलेला विमा दावा प्रस्ताव तसेच आईचे नावाचे शेतीचे दस्तऐवज, अपघाती मृत्यू झाल्या बाबत मृत्यू सुचना व इतर पोलीस दस्तऐवज, शवविच्छेदन अहवाल, आईचे मृत्यूचे प्रमाणपत्र, आईचे वयाचा पुरावा, वारसान प्रमाणपत्र अशा दस्तऐवजाचे प्रतींचा समावेश आहे. तक्रारदारांनी लेखी युक्तीवाद दाखल केला. 07. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी तर्फे विमा दावा नामंजूरीचे दिनांक-17.10.2018 रोजीचे पत्राची प्रत दाखल केली. तसेच विमा कंपनी तर्फे शपथे वरील पुरावा दाखल केला आणि लेखी युक्तीवाद दाखल केला. 08. तक्रारदारां तर्फे वकील श्री उदय क्षिरसागर तर विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी तर्फे वकील श्रीमती अवचट यांचे सहकारी वकील श्रीमती रामटेके यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. उभय पक्षां तर्फे प्रकरणांत दाखल केलेल्या दस्तऐवजांचे/ साक्षी पुराव्यांचे जिल्हा ग्राहक आयोगा व्दारे अवलोकन करण्यात आले, त्यावरुन जिल्हा ग्राहक आयोगाव्दारे प्रकरणात न्यायनिवारणार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात- अक्रं | मुद्दा | उत्तर | 01 | मृतक देवकाबाई हिचे नावाने शेतकरी अपघात विमा योजनेच्या सुरुवातीचे काळात शेती होती काय | -होय- | 02 | तक्रारदार हे विरुध्दपक्ष विमा कंपनीचे ग्राहक होतात काय | -होय- | 03 | सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदी नुसार मुदतीमध्ये आहे काय? | -होय- | 04 | मृतक देवकाबाई हिचा अपघाती मृत्यू नसून आत्महत्या आहे ही बाब विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने सिध्द केलेली आहे काय? | -नाही- | 05 | विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने तक्रारदारांना विमा दाव्याची रक्कम न देऊन दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते काय? | -होय- | 06 | काय आदेश | अंतीम आदेशा नुसार |
मुद्दा क्रं 1- 09. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने लेखी उत्तरात असा आक्षेप घेतलेला आहे की, मृतक देवकाबाई नेवारे हिचे नावाने शेतकरी अपघात विमा योजनेच्या सुरुवातीचे काळात शेती नव्हती, त्यामुळे शासना कडून तिचे विमा हप्त्याची रक्कम त्यांना मिळालेली नाही कारण ज्याशेतक-यांचे नावाने जमीनीची मालकी असते त्यांचा विमा हप्ताशासनाचे वतीने विमा कंपनीला देण्यात येतो. मृतक श्रीमती देवकाबाई नेवारे हिचे नावाने शेती असल्या बाबत महसूल दस्तऐवजा वरुन दिसून येत नाही. या आक्षेपा संबधात जिल्हा ग्राहक आयोगाव्दारे गाव नमुना सात-बाराचे आणि गाव नमुना आठ-अ या दस्तऐवजांचे अवलोकन करण्यात आलेत्यामध्ये मौजा आंबागड, तालुका तुमसर, जिल्हा भंडारा भूमापन क्रं 599 मध्ये मृतक श्रीमती देवका ज. श्रीराम नेवारे हिचे नावाची वारसदार म्हणून फेरफार क्रं 783, फेरफार घेतल्याचा दिनांक-21.01.2014 अशी नोंद आहे. मृतक देवकाबाई नेवारे हिचा मृत्यू दिनांक-16.12.2016 रोजी झालेला असून मृत्यूचे पूर्वीपासूनच तिचे नावाने शेती आहे ही बाब सिध्द होते. त्यामुळे विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे आक्षेपा मध्ये की अपघाताचे वेळी मृतक श्रीमती देवकाबाई हिचे नावाने शेती नव्हती यामध्ये काहीही तथ्य जिल्हा ग्राहक आयोगास दिसून येत नाही. त्यामुळे मृतक हिचे नावे अपघाती मृत्यू पूर्वी पासून शेती होती ही बाब दस्तऐवजी पुराव्या वरुन सिध्द होत असल्याने आम्ही मुद्दा क्रं 1 चे उत्तर होकारार्थी नोंदवित आहोत. मुद्दा क्रं -2 10 तक्रारदारांनी ग्राम अधिकारी, डोंगरी बु, तहसिल तुमसर, जिल्हा भंडारा यांनी दिनांक-14.02.2017 रोजी निर्गमित केलेले वारसान प्रमाणपत्र दाखल केले त्यामध्ये मृतक देवकी श्रीराम नेवारे हिचा मृत्यू दिनांक-16.12.2016 रोजी झालेला असून तिचे मृत्यू नंतर रामेश्वर श्रीराम नेवारे, मुलगा, संदिप श्रीराम नेवारे, मुलगा आणि मंजु संजय मुलगी असे कायदेशीर वारसदार असल्याचे नमुद केले. तक्रारदारांची आई श्रीमती देवका नेवारे हिचा मृत्यू झालेला असल्यामुळे दोन्ही तक्रारदार हे मुले या नात्याने कायदेशीर वारसदार असल्याने शेतकरी अपघात विमा योजने मध्ये ते लाभार्थी होतात आणि म्हणून तक्रारदार हे विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे ग्राहक होत असल्याने आम्ही मुद्दा क्रं 2 चे उत्तर होकारार्थी नोंदवित आहोत. मुद्दा क्रं 3 11. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने आपले लेखी उत्तरात प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदी नुसार मुदती मध्ये येत नसल्याने ती खारीज करावी असे नमुद केले. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे असे म्हणणे आहे की, मृतक देवकाबाई नेवारे हिने आत्महत्या केलेली असल्याने तक्रारकर्ता श्री रामदास श्रीराम नेवारे याचे नावाने दिनांक-17.10.2018 रोजी विमा दावा रद्द केल्या बाबतचे पत्र पाठविले होते. सदर पत्राच्या प्रतीचे अवलोकन केले असता त्यावर विभागीय व्यवस्थापक यांची स्वाक्षरी नसल्याचे दिसून येते. दुसरी महत्वाची बाब अशी आहे की, विमा नामंजूरीचे पत्र रजिस्टर पोस्टाने पाठविल्या बाबत रजि. पोस्टाची पावतीव सदर पत्र तक्रारकर्त्याला मिळाल्या बाबत रजि. पोच पुराव्या दाखल सादर केलेली नाही. तक्रारदारांचे असे म्हणणे आहे की, त्यांचे विमा दाव्या संबधी त्यांना आज पर्यंत काहीही कळविण्यात आलेले नाही. क्षणभरासाठी असेही गृहीत धरले की, विमा दावा मंजूरीचे पत्र दिनांक-17.10.2018 रोजी पाठविले होते आणि प्रस्तुत ग्राहक तक्रार ही दिनांक-04/10/2019 रोजी जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष पंजीबध्द करण्यात आलेली आहे. विमा दावा नामंजूरीचे पत्रा पासून दोन वर्षाचे आत जिल्हा ग्राहक आयोगा समोर तक्रार दाखल केलेली असल्यामुळे ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदी प्रमाणे तक्रार मुदती मध्ये आहे आणि म्हणून आम्ही मुद्दा क्रं 3 चे उत्तर होकारार्थी नोंदवित आहोत. मुद्दा क्रं-4 12. पोलीस चौकशी दस्तऐवजा वरुन असे दिसून येते की, तक्रारदारांची आई मृतक देवकाबाई हीने रात्री घर सोडले आणि तिचे मृत शरीर हे दुस-याच्या विहिरी मध्येआढळून आले, तिला दुस-याचे विहिरीवर जाण्याची आवश्यकता नव्हती, त्यामुळे तिचा अपघाती मृत्यू नसून ती आत्महत्या असल्याने तक्रारदारांचा विमा दावा नामंजूर करण्यात आला होता. तिने दुस-यांच्या शेतातील विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली असे नमुद केले. या संदर्भात जिल्हा ग्राहक आयोगाव्दारे पोलीसांचे दस्तऐवजाचे अवलोकन करण्यात आले. मृतक देवकाबाई हिनेदुस-याचे राधेश्याम कंधारे यांचे शेतातील विहिरी मध्ये उडी घेऊन आत्महत्याच केली असे पाहणारा कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षदार (Eye Witness) या प्रकरणा मध्ये नाही. पोलीस स्टेशन गोबरवाही, उपविभाग तुमसर, जिल्हा भंडारा यांनी अकस्मात मृत्यू सूचना दस्तऐवजा मध्ये मृतक हिचा मुलगा श्री रामेश्वर श्रीराम नेवारे याचे बयान नोंदविले त्यामध्ये दिनांक-16.12.2016 रोजी त्याला समजले की, श्री राधेश्याम कंधारे याचे शेतात एका स्त्रीचे प्रेत तरंगताना दिसत आहे म्हणून त्याने जाऊन पाहिले असता ते प्रत त्याचे आईचे होते. यावरुन असे दिसून येते की, घटनेच्या वेळी कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तेथे नव्हता ज्याने ही घटना पाहिलेली आहे. अशाच प्रकारचा मजकूर अन्य पोलीस दस्तऐवजा मध्ये आहे. यावरुन असे दिसून येते की, मृतक श्रीमती देवकाबाई नेवारे हिचा विहिरीत पाण्यात बुडून मृत्यू झाला परंतु तिने नेमकी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली असा निष्कर्ष निघत नाही. त्यामुळे केवळ पोलीसांनी नोंदविलेल्या बयानाच्या आधारे विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने मृतकाने आत्महत्या केली होती असा जो निष्कर्ष काढलेला आहे त्यानिष्कर्षाला सिध्द करण्यासाठी पुराव्या दाखल कोणतेही दसतऐवज विमा कंपनीने दाखल केलेले नाहीत, त्यामुळे मृतक देवकाबाई नेवारे हिने आत्महत्याच केली होती ही बाब पुराव्यानिशी विरुदपक्ष क्रं 1 विमा कंपनीने सिध्द केलेली नाही म्हणून आम्ही मुद्दा क्रं 4 चे उत्तर नकारार्थी नोंदवित आहोत. केवळ पोलीस दस्तऐवजाच्या आधारे आत्महत्येचा निष्कर्ष काढून विमाधारकाचे मृत्यू पःश्चात विमा दावा विमा कंपनीला नामंजूर करता येणार नाही या बाबत वेळोवेळी मा. वरिष्ठ न्यायालयांनी पारीत केलेल्या खालील नमुद न्याय-निवाडयांचा आधार जिल्हा ग्राहक आयोगाव्दारे घेण्यात येत आहे- - 2011 (4) CPR-23 (NC) “New India Assurance Co.Ltd.-Versus-M.S.Vyakatesh Babu”.
सदर मा.राष्ट्रीय ग्राहक आयोगाचे न्यायनिवाडया मध्ये “FIR as also the statements recorded by police cannot be used by Insurance Company in support of its case” पोलीसांनी नोंदविलेल्या एफआयआरचा उपयोग विमा कंपनीला होणार नाही असे मत नोंदविलेले आहे. - 2007 (3) CPR 142 -“New India Assurance Co.Ltd.-Versus-Hausabai Pannalal Dhoka”
सदर प्रकरणात मा.राज्य ग्राहक आयोग, मुंबई यांनी, पोलीसानीं गुन्हयाचे प्रकरणात नोंदविलेला जबाब हा पुरावा म्हणून ग्राहय धरता येणार नाही जो पर्यंत ग्राहक मंचा तर्फे जबाब देण्या-याची साक्षी नोंदविल्या जात नाही असे मत नोंदविले. - Hon’ble State Consumer Dispute Redressal Commission, Mumbai, Circuit Bench at Aurangabad, First Appeal No.FA/427/2011, Decided on-21/11/2011- “United India Insurance Company Limited-Versus-Smt. Sumanbai Rangrao Mugal and others”
मा. राज्य ग्राहक आयोग, खंडपिठ औरंगाबाद यांनी आदेशा मध्ये स्पष्टपणे नमुद केलेले आहे की, सदर मृत्यू प्रकरणात पोलीसांनी फौजदारी प्रक्रिया संहिते अंतर्गत कलम 174 अनुसार गुन्हा नोंदविलेला असून पोलीस चौकशी प्रलंबित आहे. विमा कंपनीने विमाधारकाने आत्महत्या केल्या बाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही, ज्यावरुन सिध्द होईल की, विमाधारकाने आत्महत्या केलेली आहे. - Hon’ble National Consumer Commission, New Delhi-Revision Petition No.-421 of 2013 Decided on-05 Sep., 2019- “Oriental Insurance Company Ltd.-Versus-Rishikesh Sandeep Kale & 04 others.”
मा. राष्ट्रीय ग्राहक आयोगाचे सदरचे निवाडयात विमा कंपनीने मृतकाने आत्महत्या केलया बाबत कोणताही पुरावा दाखल न केल्याने विमा कंपनीचे अपिल खारीज केले.. - 2015 (2) CPR 316 (NC) Executive Engineer-Versus-Shisma Devi”.
It is pointed out by the learned counsel for the Insurance Company that even in the inquest report, it was stated that the deceased was under influence of alcohol when he had a fall. However, it is not known on what basis the aforesaid statement was made in the inquest report. No witness was examined by the Insurance Company to prove that the deceased had taken alcohol before he met with an accident. सदर प्रकरणात विमा कंपनीने पोलीसांनी नोंदविलेल्या इन्क्वेस्ट रिपोर्टचे आधारे मृतकाने अपघाताचे वेळी दारुचे सेवन केले होते आणि त्या आधारे विमा दावा नामंजूर केला होता परंतु मा.राष्ट्रीय ग्राहक आयोगाने केवळ पोलीसांनी नोंदविलेल्या स्टेटमेंटचे आधारावर विमा दावा नामंजूर करता येणार नाही, मृतकाने अपघाताचे वेळी दारुचे सेवन केले होते असे दर्शविणारा साक्षीदार विमा कंपनीने तपासलेला नाही असे निवाडया मध्ये नमुद केले. हातातील प्रकरणात सुध्दा कोणताही साक्षीदार नाही की ज्याने मृतक श्रीमती देवकाबाई हिने विहिरीत उडी मारुन आत्महत्याच केली, त्यामुळे मा.राष्ट्रीय ग्राहक आयोगाचे निवाडयातील वस्तुस्थिती जरी भिन्न असली तरी त्यामधील काढलेला निष्कर्ष हातातील प्रकरणात लागू होतो असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे. - III (2016) CPJ-574 (NC) “S.B.I.Life Insurance Co.-Versus-Sudesh Khanduja & Anr.”
Now, we turn to the report of the police. The report of the police carries exiguous value. The report of the police has to be proved by producing cogent and plausible evidence. The police submit that he was in debt for sum of more than Rs. 75 lakhs but there is no proof. The police report cannot be made the basis for the repudiation of the claim. There is no corroborative evidence. Such like stories can be created at any time. सदर प्रकरणात मा.राष्ट्रीय ग्राहक आयोगाने डॉक्टरांचा अहवाला वरुन मृतकाने विष घेतले किंवा नाही हे स्पष्ट होऊ शकले नाही. पोलीसांनी घेतलेल्या जबाबाचा आधार हा विमा दावा नामंजूर करताना विमा कंपनीला घेता येणार नसल्याचे मत नोंदविले. उपरोक्त नमुद मा. वरिष्ठ न्यायालयांनी दिलेले न्यायनिवाडे हातातील प्रकरणात लागू होतात असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे. मुद्दा क्रं -5 13. मुद्दा क्रं 4 मध्ये नमुद केल्या प्रमाणे केवळ पोलीसांनी नोंदविलेल्या बयानाचे आधारे आणि घटनेच्या वेळी कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसताना मृतक देवकाबाई नेवारे हिने दुस-याचे शेतातील विहिरी मध्ये उडी घेऊन आत्महत्या केली त्यामुळे मृतकाचा अपघाती मृत्यू नसून आत्महत्या आहे असा निष्कर्ष विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने काढून तक्रारदारांचा विमा दावा नामंजूर केला. कोणत्याही सबळ पुराव्या शिवाय (Without any substantial evidence) केवळ पोलीसांनी नोंदविलेल्या बयानाचे आधारे काढलेला निष्कर्ष आणि त्या आधारावर तक्रारदारांचा विमा दावा नामंजूर करण्याची विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीची कृती ही दोषपूर्ण सेवा ठरते असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे, त्यामुळे आम्ही मुद्दा क्रं 5 चे उत्तर होकारार्थी नोंदवित आहोत.मुद्दा क्रं 1 ते 3 आणि मुद्दा क्रं 5 चे उत्तर होकारार्थी आल्याने मुद्दा क्रं 6 अनुसार तक्रारदारांची तक्रार अंशतः मंजूर होण्यास पात्र आहे असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे. 14 मृतक विमाधारक श्रीमती देवकाबाई श्रीराम नेवारे हिचे अपघाती मृत्यू संबधाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत देय विमा रक्कम रुपये-2,00,000/- आणि सदर रकमेवर विमा दावा नामंजूर केल्याचे पत्र दिनांक-17.10.2018 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9 टक्के दराने व्याज या प्रमाणे तक्रारदारांना विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी कडून रकमा मंजूर करणे योग्य व न्यायोचित होईल. या शिवाय तक्रारदारांना झालेल्या शारिरीक, मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई रुपये-15,000/-आणि तक्रारीचा खर्च रुपये-10,000/-विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी कडून मंजूर करणे योग्य व न्यायोचित आहे. विरुध्दपक्ष क्रं 2 हे वि.प.क्रं 1 विमा कंपनीकडे विमा दाव्यांची छाननी करुन पुढे विमा दावा निश्चीतीसाठी पाठवितात एवढेच त्यांचे कार्य असल्याने व त्यांनी कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नसल्याने त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते. त्याच प्रमाणे विरुध्दपक्ष क्रं 3तालुका कृषी अधिकारी, तुमसर, तालुका तुमसर, जिल्हा भंडारा यांनी त्यांचे कर्तव्य योग्यरितीने पार पाडल्याने व त्यांनी कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नसल्याने त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे असे जिल्हा ग्राहक आयोगाचे स्पष्ट मत आहे. 15. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन जिल्हा ग्राहक आयोग प्रस्तुत तक्रारी मध्ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे- :: अंतिम आदेश :: (01) उभय तकारदारांची तक्रार विरुध्दपक्ष क्रं 1 ओरिएन्टल इनशुरन्स कंपनी नागपूर तर्फे क्षेत्रीय व्यवस्थापक यांचे विरुध्द अंशतः मंजूर करण्यात येते. (02) विरुध्दपक्ष क्रं-1 विमा कंपनीला आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदारांना त्यांचे आईचे अपघाती मृत्यू संबधाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत देय विमा रक्कम रुपये-2,00,000/- (अक्षरी रुपये दोन लक्ष फक्त) दयावेत आणि सदर रकमेवर विमा दावा नाकारल्याचा दिनांक-17.10.2018 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्याज तक्रारदारांना दयावे. (03) विरुध्दपक्ष क्रं. 1विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारदारांना झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासाबद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-15,000/-(अक्षरी रुपये पंधरा हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्त) अशा रकमा विरुध्दपक्ष क्रं- 1 विमा कंपनीने तक्रारदारांना दयाव्यात. (04) विरुध्दपक्ष क्रं 2 जयका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रायव्हेट लिमिटेड यांनी तक्रारदारांना कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नसल्याने त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते. (05) विरुध्दपक्ष क्रं 3तालुका कृषी अधिकारी, तुमसर, जिल्हा भंडारा यांनी तक्रारदारांना कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नसल्याने त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते. (06) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं-1 विमा कंपनीने निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे.विहित मुदतीत सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने न केल्यास अंतिम आदेशातील मुद्दा क्रं-(02) मध्ये नमुद केलेली विमा राशी मुदती नंतर पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12% दराने दंडनीय व्याजासह तक्रारदारांना देण्यास विरुध्दपक्ष क्रं 1विमा कंपनी जबाबदार राहिल. (07) निकालपत्राच्या प्रथम प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात. (08) उभय पक्षकांरानी जिल्हा ग्राहक आयोगा मध्ये दाखल केलेले अतिरिक्त संच परत घेऊन जावेत. |