निकालपत्र :- (दि.03/10/2011) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (01) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला त्यांचे वकीलांमार्फत हजर होऊन त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले आहे. उभय पक्षकारांचे वकीलांचा अंतिम युक्तीवाद ऐकला. सदरची तक्रार सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदाराचा योग्य व न्याय क्लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवल्यामुळे दाखल करणेत आली आहे. (02) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- अ) यातील तक्रारदार यांचे पती मयत सर्जेराव गोविंद पाटील यांची सामनेवाला विमा कंपनीकडे महाराष्ट्र शासनामार्फत सामनेवालांकडे शेतकरी वैयक्तिक अपघात विमा पॉलीसी उतरविलेली असून सदर अपघाती विमा दावा क्र.181200/47/2011/000590 असा आहे. सदर पॉलीसीच्या कालावधीच दि.21/05/2010 रोजी तक्रारदाराचे पती सर्जेराव गोविंद पाटील हे नेहमीप्रमाणे मेाटारसायकलवरुन वडगांव या गावी शेतीकामाकरिता लागणारी औषधे व साहित्ये आणणेकरिता निघाले असता त्यांच्या मोटरसायकलला मागच्या बाजूने आलेल्या अत्यंत भरधाव व निष्काळजी मोटर कार चालकाने पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेने सर्जेराव गोविंद पाटील यांचे डोकीस व दोन्ही पायांना अत्यंत जबरदस्त मार लागला. तदनंतर गंभीर जखमी अवस्थेत त्यांना त्वरीत अॅम्बुलन्समधून सी.पी.आर.हॉस्पिटलमध्ये दाखल करुन उपचार सुरु करण्यात आले. वेस्टर्न इंडिया इन्सटीटयुट ऑफ न्युरोसायन्सेस व शेवटी ग्रामीण रुग्णालय कोडोली ता.पन्हाळा जि.कोल्हापूर येथे उपचार सुरु असताना दि.23/06/2010 रोजी मयत झाले. तदनंतर आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसहीत सामनेवालांकडे शासनाने नियुक्त केलेल्या अधिकारीमार्फत क्लेम पाठविला असता सामनेवाला यांनी दि.30/03/2011 रोजी ‘’ अपघातावेळी मृतकाजवळ वाहन चालविणेचा वैध परवाना नव्हता.’’ अशा चुकीच्यास कारणे नाकारलेला आहे. वास्तविक तक्रारदार या अडाणी अशिक्षीत असून त्यांना पतीच्या लायसेनबाबत फक्त एवढीच माहिती होती की, त्यांचे पती हे वाहन चालविताना नेहमी स्वत:जवळ वाहनाचा अधिकृत परवाना बाळगत होते व सदर अपघातावेळी देखील त्यांचेजवळ वाहनाचा अधिकृत व वैध परवाना होता व सदर अपघातामध्ये पतीच्या औषधोपचाराचा कालावधी व तदनंतर झालेला मृत्यू यामध्ये तक्रारदाराची मानसिक व शारीरीक अवस्था अतिशय बिकट झालेली आहे. सदरचा क्लेम देखील तक्रारदाराचे वतीने गावातील अन्य हितचिंतकांनी लागणारी सर्व कागदपत्रे गोळा करुन शासकीय ऑफिसमार्फत सामनेवालांकडे पाठविलेला आहे इतकीच माहिती तक्रारदारास आहे. तरी सामनेवाला यांना सदर वस्तुस्थितीची कल्पना असूनही चुकीच्या कारणाने तक्रारदाराचां न्याययोग्य व पारदर्शी क्लेम नाकारल्याने सदरची तक्रार मे. मंचात दाखल करणे भाग पडले आहे. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह मंजूर व्हावी व सामनेवाला यांचेकडून क्लेमची रक्कम रु.1,00,000/- द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासह, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.2,000/- वसुल होऊन मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (03) तक्रारदाराने तक्रारीच्या पुष्टीप्रित्यर्थ सामनेवाला यांनी तक्रारदाराचा क्लेम नाकारलेचे पत्र, पी.एम.करिता पाठवावयाचा पोलीस अहवाल, इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मार्टेम रिपोर्ट, मृत्यूचा दाखला, वर्दी जबाब इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (04) सामनेवालांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसारतक्रारदाराची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारली आहे. सामनेवाला आपल्या लेखी म्हणणेत पुढे सांगतात, तक्रारदाराची तक्रार साफ खोटी, लबाडीची व चुकीची असून आहे त्यास्थितीत कायदेशिररित्या चालणेस पात्र नाही. तक्रार अर्जातील कलम 1 व 2 बाबत सामनेवाला यांना काही म्हणावयाचे नाही. तक्रार अर्जातील कलम 3 मध्ये दि.23/06/2010 रोजी तक्रारदार यांचे पती अपघातामुळे मयत झाला एवढाच मजकूर खरा व बरोबर आहे. महाराष्ट्र शासनाचे व्यक्तिगत शेतकरी अपघात योजनेचे परिपत्रकाप्रमाणेही मयत शेतकरी हा वाहन चालवत असेल तर त्यांचा वाहन परवाना असलेखेरीज मयताचा क्लेमची कार्यवाही करता येत नाही. तक्रारदार यांनी क्लमे दाखल करताना सर्जेराव गोविंद पाटील यांचा वाहन चालवणेचा परवाना वेळोवळी मागणी करुनही दाखल केलेला नाही. त्यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदाराचा क्लेम योग्य कारणासाठी नाकारलेला आहे. सबब तक्रारदाराकडून कोर्ट खर्च सामनेवाला यांना मिळावा व तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी अशी विनंती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे. (05) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेसोबत कोणतेही कागदपत्र दाखल केलेले नाहीत. (06) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवालांचे लेखी म्हणणे व उभय पक्षकारांच्या वकीलांचा युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1) सामनेवाला विमा कंपनीने सेवेत त्रुटी ठेवली आहे काय? -- नाही. 2) काय आदेश? -- शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क्र.1:- तक्रारदार यांचे पती मयत सर्जेराव गोविंद पाटील यांची सामनेवाला विमा कंपनीकडे महाराष्ट्र शासनामार्फत सामनेवालांकडे शेतकरी वैयक्तिक अपघात विमा पॉलीसी उतरविलेली होती. सदर पॉलीसीच्या कालावधीत दि.21/05/2010 रोजी तक्रारदाराचे पती सर्जेराव गोविंद पाटील हे मेाटारसायकलवरुन वडगांव या गावी निघाले असता त्यांच्या मोटरसायकलला मागच्या बाजूने आलेल्या मोटर कार चालकाने पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेने गंभीर जखमी झालेल्या अवस्थेत त्यांना अॅम्बुलन्समधून हॉस्पिटलमध्ये दाखल करुन उपचार सुरु करण्यात आले व उपचार सुरु असताना दि.23/06/2010रोजी मयत झाले. तक्रारदाराने दाखल केलेल्या इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मार्टेम रिपोर्ट, मृत्यूचा दाखला, वर्दी जबाब इत्यादी कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारदाराचे पतीचा मृत्यू हा अपघाती मृत्यू असलेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब दाखल कागदपत्रांचा विचार करता विमा पॉलीसीबाबत वाद नाही. तसेच तक्रारदाराचे पतीच्या अपघाती मृत्यूबाबत वाद नाही. अपघातावेळी तक्रारदाराचे पतीकडे वैध वाहन चालवणेचा परवाना नव्हता. त्यामुळे क्लेम नाकारलेला आहे. हा वादाचा मुद्दा आहे. तक्रारदाराने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसहीत सामनेवालांकडे शासनाने नियुक्त केलेल्या अधिकारीमार्फत क्लेम पाठविला असता सामनेवाला यांनी तक्रारदाराचा क्लेम दि.30/03/2011 चे पत्राने नाकारलेला आहे हे तक्रारदाराने दाखल केलेल्या क्लेम नाकारलेचे दाखल पत्रावरुन निर्विवाद आहे. सदर पत्रानुसार दावा क्र.181200/47/ 2011/000509 आहे. प्रस्तुत विमा दावा सामनेवाला कंपनीने ‘’अपघातावेळी मृतकाजवळ वाहन चालविणेचा वैध परवाना नव्हता.’’ याकारणे नाकारला आहे. हा वादाचा मुद्दा आहे. सदर कारणाचा विचार करता सामनेवाला कंपनीने दाखल केलेला महाराष्ट्र शासनाचा दि.29मे,2009 चे शुध्दीपत्रकातील शासन निर्णय,कृषि व पदुम विभाग क्रमांक शेअवि-2008/प्र.क्र.187/11-अे, दि.6सप्टेंबर,2008 मधील अ.क्र.2(ई) (8) मध्ये सुधारणा करण्यात येत असून तो खालीलप्रमाणे सुधारित स्वरुपात वाचावा. याचा विचार करता अ.क्र.23(इ)(8) ‘’ जर शेतक-याचा मृत्यू वाहन अपघातामुळे झाला असेल व अपघातग्रस्त शेतकरी स्वत: वाहन चालवित असेल अशा प्रकरणी वैध वाहन चालविण्याचा परवाना (Valid Driving License) सादर करणे आवश्यक राहील.’’ याचा आधार घेऊन प्रस्तुतचा क्लेम नाकारला आहे. सदर शासन निर्णयानुसार शेतकरी स्वत: वाहन चालवत असताना अपघात झालेस त्यास वैध चालक परवाना दाखल करणे आवश्यक आहे हे दाखल शासन निर्णयावरुन निर्विवाद आहे. सबब सदरची अट ही अनिवार्य(मॅडेटरी) आहे.तक्रारदाराने खालीलप्रमाणे दाखल केलेले पूर्वाधार- II(2008) CPJ 403 MAHARASHTRA STATE CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION MUMBAI – ICICI Lombard General Insurance Co. Ltd. Vs Sindhubhai Khanderao Khairnar - Decided on 07.01.2008 III (2007) PUNJAB STATE CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION CHANDIGARH – National Insurance Company Vs Surinder Kumar - Decided on 20.9.2006 चा विचार करता प्रस्तुत पूर्वाधार प्रस्तुत प्रकरणी लागू होत नाही. सदरचे पूर्वाधार हे मूलभूत अटींचा भंग होत नसेल तर लागू आहे. प्रस्तुत प्रकरणी मुलभूत अटीचा भंग झालेने प्रस्तुत पूर्वाधार प्रस्तुत तक्रारीस लागू होत नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच प्रस्तुत पूर्वाधार हे वर नमुद शासन निर्णय अंमलात येणेपूर्वीचे आहेत. सबब सामनेवाला यांनी योग्य कारणास्तव विमा दावा नाकारलेला असलेने सामनेवालां यांनी त्यांचे सेवेमध्ये कोणतीही त्रुटी केली नसलेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.2 :- मुद्दा क्र.1 मधील विस्तृत विवेचनानुसार सामनेवाला यांनी योग्य कारणासाठी तक्रारदाराचा क्लेम नाकारला आहे. त्यामुळे सामनेवाला यांनी त्यांचे सेवेमध्ये कोणतीही त्रुटी केली नसलेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येते. 2) खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |