निकालपत्र :- (दि.10/05/2011) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (01) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.1 हे त्यांचे वकीलांमार्फत हजर झाले. त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे दाखल केले आहे. सामनेवाला क्र.2 यांना नोटीस लागू होऊनदेखील ते सदर कामी हजर झाले नाहीत किंवा त्यांनी आपले लेखी म्हणणेही दाखल केले नाही. तक्रारदाराचे वकील व सामनेवाला क्र.1 यांचे वकीलांचा अंतिम युक्तीवाद ऐकला. सदरची तक्रार सामनेवाला क्र.1 विमा कंपनीने तक्रारदाराचा योग्य व न्याय क्लेम कोणताही निर्णय न देऊन सेवेत त्रुटी ठेवल्यामुळे दाखल करणेत आली आहे. (02) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- अ) यातील तक्रारदार या वर नमुद पत्त्यावर कायमच्या रहिवाशी असून सदर गावी त्यांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे. तक्रारदार हिचे पती मयत होणेपूर्वी शेती हाच व्यवसाय करत होते. यातील सामनेवाला ही विमा कंपनी असून ती विमा व्यवसाय करते. तक्रारदार हिचे पतीचा सामनेवाला विमा कंपनीकडे श्री विठ्ठल विकास सेवा संस्था मर्या. दिंडनेर्ली ता.करवीर यांचेमार्फत ‘’जनता व्यक्तीगत अपघात विमा’’या योजनेअंतर्गत विमा उतरविलेला होता. सदर पॉलीसीचा क्र.47/2009/272 असा होता व आहे. सदर पॉलीसीचा हप्ता सदर सेवा संस्थेमार्फत सामनेवालांकडे अदा केलेला होता. ब) तक्रारदार हिचे पती कै. प्रकाश आनंदा पाटील दि.06/06/2009 रोजी त्यांचे स्वत:च्या शेतात ऊसाचा पाला काढणेसाठी गेले असता त्यांचे शेतात असणारे इलेक्ट्रीक पोलचा शॉक लागून ते जागेवरच मयत झाले. त्यावेळी तक्रारदार यांचे पतीचे प्रेताचे शवविच्छेदन सी.पी.आर.हॉस्पिटल कोल्हापूर येथे झालेले आहे. त्यावेळी ते इलेक्ट्रीक पोलचा शॉक लागून मयत झालेचे डॉक्टरांनी सांगितले होते व आहे. तसा मृत्यू दाखलाही तेथील डॉक्टरांनी दिलेला आहे. तक्रारदार हिचे पती शॉक लागू मयत झालेबाबतची नोंद करवीर पोलीस स्टेशन येथे अ.म.र.ण.98/2009 ची झालेली आहे. त्याबाबतचा पूर्ण तपास करवीर पोलीसांनी केलेला आहे. त्यांनतर तक्रारदार यांनी श्री विठ्ठल विकास सेवा संस्था मर्या. दिंडनेर्ली यांचे मार्फत दि.17/08/2009 रोजी सामनेवाला विमा कंपनीकडे क्लेम फॉर्मची मागणी केली होती. त्यानुसार सामनेवाला क्र.1 यांनी सामनेवाला क्र.2 यांचेकडे क्लेम फॉर्म दिला होता. परंतु सामनेवाला क्र.1 यांनी सदरचा क्लेम फॉर्म यातील तक्रारदार यांचेकडे पुढील पुर्ततेकरिता दिलेला नव्हता. यातील तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.2 यांचेकडे वेळोवेळी चौकशी केली असता तक्रारदार हिस उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर यातील सामनेवाला क्र.1 यांनी दि.17/08/2009 व दि.25/01/2010 रोजी तक्रारदार यांचे क्लेमबाबत कागदपत्रांची पूर्तता करणेबाबत कळविले होते. परंतु यातील सामनेवाला क्र.1 यांनी सदरच्या पत्राबाबत तक्रारदार यांना काहीही कळविले नव्हते व नाही. त्यांनतर सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदारास सप्टेंबर-2010 मध्ये क्लेम फॉर्म व सामनेवाला विमा कंपनीचे दि.17/08/09 व दि.25/01/2010 चे पत्र दिले. त्यानंतर तक्रारदार यांनी क्लेम फॉर्म भरुन सोबत योग्य ती कागदपत्रे जोडून दि.14/09/2010 रोजी क्लेम फॉर्म सामनेवालांकडे रजि.पोष्टाने पाठवून दिलेला होता व आहे. तथापि, सामनेवाला यांनी क्लेमबाबत तक्रारदारास काही कळविलेले नाही. तक्रारदार आपल्या तक्रारीत पुढे सांगतात, सदर तक्रारदार ही दिंडनेर्ली ता.करवीर या भागातील असून विधवा व अबला नारी आहे. ती निराधार आहे. तक्रारदार हिचा उदरनिर्वाह हा शेतीवरच अवलंबून असलेने अन्य कोणताही कामधंदा नाही. त्यामुळे तक्रारदार हिचा प्रस्तुत क्लेमची रक्कम तात्काळ मिळणे न्यायाचे व जरुरीचे आहे. तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक असून सामनेवाला यांनी तक्रारदारास विना विलंब, सुलभ व तात्काळ सेवा देणेची कायदेशीर जबाबदारी असतानासुध्दा त्यामध्ये सामनेवाला यांनी प्रचंड त्रुटी व हयगय केली म्हणून सदरची तक्रार मे. मंचात दाखल करणे भाग पडले आहे. क) सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह मंजूर होऊन तक्रारदारास विमा क्लेमची रक्कम रु.1,00,000/- द.सा.द.शे. 15 टक्के व्याजाने तसेच मानसिक व शारीरीक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.3,000/-सामनेवाला यांचेकडून वसुल होऊन मिळणेबाबत आदेश व्हावा अशी विनंती सदर मंचास तक्रारदाराने केली आहे. (03) तक्रारदाराने तक्रारीच्या पुष्टीप्रित्यर्थ तक्रारदार यांनी सामनेवाला यांना भरुन दिलेला क्लेम फॉर्म, घटनास्थळाचा पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, प्रकाश आनंदा पाटील यांचे प्रेताचा पंचनामा, प्रेत ताब्यात मिळालेची पावती, सी.पी.आर.हॉस्पिटलचा फायनल रिपोर्ट,पॅथॉलॉजीचा रिपोर्ट,सामनेवाला विमा कंपनीचे तक्रारदारास दिलेली पत्रे,तक्रारदाराने सामनेवाला यांना R.P.A.D.ने क्लेम पाठविलेबाबतची पोष्टाची पोहोच पावती,सामनेवाला कंपनीने तक्रारदारास क्लेम बंद केलेबाबत कळवलेले पत्र इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (04) सामनेवाला यांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार अ) तक्रारदाराची तक्रार नाकारलेली आहे. तक्रारदाराची तक्रार आहे त्यास्थितीत कायदेशीररित्या चालणेस पात्र नाही. सबब खर्चासह नामंजूर करणेत यावी. सामनेवाला आपल्या लेखी म्हणणेत पुढे सांगतात, तक्रार अर्जातील कलम 1 मधील मजकूराबाबत सामनेवाला यांना जादा काही म्हणावयाचे नाही. तक्रार अर्जातील कलम 2 व 3 मधील मजकूराबाबत प्रस्तुत सामनेवाला यांना काहीही माहिती नाही. तक्रारदाराने सदरील बाब पुराव्यानिशी सिध्द करणे जरुर आहे. तक्रारदाराचे पती मयत झाले एवढाच मजकूर खरा व बरोबर आहे. सामनेवाला क्र;2 यांनी त्यांचे सभासदांचा विमा प्रस्तुत सामनेवाला कंपनीकडे उतरविलेला होता. तक्रारदार यांचे पती प्रकाश आनंदा पाटील यांचे मृत्यूबाबत दाखल केले कागदपत्रांबाबत सामनेवाला विमा कंपनीने सामनेवाला क्र.2 संस्थेकडे दि.17/08/09 रोजी व दि.25/01/2010 रोजी पत्राने आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता करणेबाबत कळविले. परंतु तक्रारदाराने योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे सामनेवाला विमा कंपनीस तक्रारदाराची क्लेम फाईल बंद करुन त्यांना तसे कळविणे भाग पडले. सबब प्रस्तुत सामनेवाला यांनी तक्रारदारास सेवा देणेबाबत केव्हाही कसूर केलेला नाही. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी व तक्रारदाराकडून सामनेवालांना कोर्ट खर्च देवविण्यात यावा अशी विनंती सामनेवाला विमा कंपनीने सदर मंचास केली आहे. (05) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेच्या पुष्टयर्थ कोणतेही कागदपत्र दाखल केलेली नाहीत. (06) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवाला यांचे लेखी म्हणणे व उभय पक्षकारांच्या वकीलांचा युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1) सामनेवाला विमा कंपनीने सेवेत त्रुटी ठेवली आहे काय? -- होय. 2) काय आदेश? -- शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क्र.1 :- तक्रारदाराचे मयत पती प्रकाश आनंदा पाटील यांचा सामनेवाला विमा कंपनीकडे जनता व्यक्तिगत अपघात विमा योजनेअंतर्गत विमा पॉलीसी उतरविलेचे सामनेवालांनी लेखी म्हणणेत मान्य केले आहे. पॉलीसीबाबत वाद नाही. प्रस्तुत तक्रारदाराचे पतीचा विमा विठ्ठल विकास सेवा संस्था मर्या. दिंडनेर्ली यांचेमार्फत उतरविलेला होता. सदर विमा कालावधीत विमाधारक त्यांचे शेतात ऊसाचा पाला काढत असताना शेतामध्ये असलेल्या इलेक्ट्रीक पोलचा शॉकचा धक्का बसला व तो जागेवरच मयत झाला हे दाखल पी.एम.रिपोर्ट, वर्दी जबाब या कागदपत्रांवरुन निर्विवाद आहे. डॉक्टरांनी दिलेले मृत्यूचे अंतीम कारण हे विजेचा धक्का बसून मयत झालेचे नमुद केले आहे. सबब प्रस्तुत विमाधारकाचा मृत्यू हा अपघाती आहे ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. क्लेमसोबत दयावयाची यादीप्रमाणे सर्व कागदपत्रे प्रस्तुत प्रकरणी तक्रारदाराने दाखल केली आहेत. प्रस्तुत दि.17/08/09 च्या पत्राने क्लेम फॉर्म सामनेवाला क्र.1 यांनी सामनेवाला क्र.2 कडे पाठवला आहे. तक्रारदाराने प्रस्तुत क्लेम फॉर्म भरुन यादीप्रमाणे सर्व कागदपत्रे क्लेम सोबत दि.14/9/09 रोजी R.P.A.D.ने पाठवून दिलेची पोष्टाची रिसीट दाखल आहे. तरीही दि.25/01/2010 रोजीचे पत्राने दि.17/08/09 च्या पत्राचा संदर्भ देऊन 7 दिवसांचे आत कागदपत्रांची पूर्तता न केल्यास विमा दावा रद्द करणेत येईल व फाईल बंद केली जाईल असे कळवले आहे. वस्तुत: दि.25/01/2010 चे पत्रापूर्वीच जवळजवळ 3 महिने अगोदर म्हणजे दि.14/09/2009 रोजी क्लेम व तयासोबतची योग्य कागदपत्रे आर.पी.ए.डी.व्दारे पाठवून दिलेली आहेत ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. तदनंतर दि.25/01/2010 चे पत्र असून सदर पत्रामध्ये प्रस्तुत कागदपत्रांची पुन:श्च मागणी केली आहे. मात्र सदर तारखेनंतर सामनेवाला विमा कंपनीने सदर कागदपत्रे मिळाली नाहीत म्हणून प्रस्तुतचा दावा रद्द करुन फाईल बंद केलेचे निदर्शनास येते. मात्र तसे तक्रारदारास कळवणेची दखल घेतलेली नाही. प्रस्तुतचा क्लेम हा अपघाती मृत्यूसाठी असूनही तसेच दि.14/09/2009 रोजी आर.पी.ए.डी. पावती क्र.3064 मूल्य रु.40/- भरुन पोष्टामार्फत कागदपत्रे पाठवलेली आहेत. सदर आर.पी.ए.डी.रजि.बाबतचे कथन सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेमध्ये स्पष्टपणे नाकारलेले नाही. सबब प्रस्तुतची कागदपत्रे सामनेवाला यांना मिळूनही सामनेवालांनी सदरचा क्लेम नाकारला आहे ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. त्यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदाराचा न्याययोग्य क्लेम नाकारुन सेवेतील गंभीर त्रुटी आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मु्द्दा क्र.2 :- वरील विस्तृत विवेचनाचा विचार करता तक्रारदार पॉलीसीप्रमाणे विमा क्लेम रक्कम रु.1,00,000/- मिळणेस तसेच सदर रक्कमेवर दि.25/01/2010 पासून ते संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याज मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सामनेवाला यांनी सेवेत ठेवलेल्या त्रुटीमुळे तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. 2) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास पॉलीसीप्रमाणे असलेली क्लेम रक्कम रु.1,00,000/-(रु.एक लाख फक्त) अदा करावी. सदर रक्कमेवर दि.25/01/2010 पासून ते संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के प्रमाणे व्याज अदा करावे. 3) तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रु.1,000/-(रु. एक हजार फक्त) अदा करावेत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |