निकालपत्र :- (दि.29/06/2011) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (01) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला त्यांचे वकीलांमार्फत हजर होऊन त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले आहे. उभय पक्षकारांचे वकीलांचा अंतिम युक्तीवाद ऐकला. सदरची तक्रार सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदाराचा योग्य व न्याय क्लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवल्यामुळे दाखल करणेत आली आहे. (02) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- यातील तक्रारदार यांचे पती मयत रंगराव हरी पाटील यांचा गावातील हसुर विकास सेवा संस्था मर्या. हसुर दुमाला ता.करवीर जि.कोल्हापूर यांचेमार्फत सामनेवालांकडे JPA अंतर्गत पॉलीसी उतरविलेली असून सदर पॉलीसीचा क्रमांक 161600/47/08/3543 असा आहे. सदर पॉलीसीच्या कालावधीतच दि.16/10/2009 रोजी तक्रारदाराचे पती रंगराव हरी पाटील हे घरामध्ये खोकला येत असल्यामुळे खोकल्याचे औषध सेवन करुन झोपले होते. परंतु अपघाताने खोकल्याचे औषध समजून कोणतेतरी विषारी औषध सेवन केले गेलेने त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना सी.पी.आर.हॉस्पिटल, कोल्हापूर येथे औषधोपचार चालू असताना ते मयत झाले. तदनंतर आवश्यक ते सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन तक्रारदारांनी सामनेवालांकडे न्याययोग्य क्लेमची मागणी केली असता दि.19/10/2010 रोजी सामनेवाला यांनी ‘’ पॉलिसीच्या अटी व नियमानुसार क्लेम देता येत नाही’’ असे कळवले. तक्रारदारचे पती हे अडाणी अशिक्षीत शेतकरी होते. त्यांना खोकल्याचा खुप त्रास होत असलेने ते घरीच आतल्या खोलीत झोपलेले होते व सदर खोलीमध्ये अंधार असले कारणाने खोकल्यावरच्या औषधाऐवजी अपघाताने वेगळे औषध सेवन केले गेले ज्याचा परिणाम विषासारखा होऊन त्यांचा मृत्यू होण्यात झाला. प्रत्यक्षात मुद्दामहून, हेतूपूर्वक त्यांनी कोणतेही विषारी औषध सेवन केलेले नव्हते निव्वळ अपघातानेच त्यांचा मृत्यू झाला आहे. सामनेवाला कंपनीने अत्यंत चूकीच्या कारणांचा आधार घेऊन तक्रारदाराचा न्याययोग्य व पारदर्शी क्लेम नाकारुन सेवात्रुटी केलेमुळे प्रस्तुतचा तक्रार अर्ज दाखल केलेला आहे. सबब तक्रार अर्ज खर्चासह मंजूर व्हावा. तक्रारदारास सामनेवालांकडून क्लेमची रक्कम रु.1,00,000/- व सदर रक्कमेवर दि.16/01/2010 पासून द.सा.द.शे. 18 टक्के व्याज, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.3,000/- देणेबाबत हुकूम व्हावा अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (04) तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या पुष्टयर्थ सामनेवाला यांचे क्लेम नाकारलेचे पत्र, घटनास्थळाचा पंचनामा, पी.एम.करिता शवासोबत पाठवायचा पोलीस अहवालाची प्रत, इन्क्वेस्ट पंचनामा, पी.एम.रिपोर्ट, मृत्यूचा दाखला, मृत्यूचे कारणाचे शेवटचे मत, मृत्यूबाबतचे केसपेपर, मेडिकल केस रेकॉर्ड इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (05) सामनेवाला यांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार तक्रारदाराची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारलेली आहे. सामनेवाला यांनी कोणतीही सेवा त्रुटी केली नसलेने प्रस्तुतची तक्रार चालणेस पात्र नाही. तसेच सदर तक्रार चालविणेचे अधिकारक्षेत्र मे. मंचास येत नाही. सामनेवालांची जबाबदारी ही पॉलीसीच्या अटी, शर्ती, अपवाद व परिशिष्ट यास अनुसरुन असेल. सामनेवाला पुढे असे प्रतिपादन करतात की, क्लेम कागदपत्रे प्राप्त झालेनंतर सदर कागदपत्रांची तपासणी केली असता प्रस्तुत विमा दावा हा रंगराव हरी पाटील याचे अपघातीमृत्यूबाबत दाखल केलेला आहे. मात्र शवविच्छेदन अहवालानुसार व्हिसेरा हा रासायनिक पृथ्थ्करणासाठी राखून ठेवलेला आहे. सबब मुदतीचे कारण नमुद नसलेने पॉलीसीच्या अट क्र.4 ई नुसार सदर मृत्यू हा अपघाती नसून स्वत:हून घडवून आणलेली दुखापत (Self Injury) आहे. सबब प्रस्तुतचा विमा दावा योग्य कारणास्तव नाकारलेने सामनेवाला यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही; सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी अशी विनंती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे. (06) सामनेवाला यांनी आपले म्हणणेसोबत कोणतेही कागदपत्र दाखल केलेले नाहीत. (07) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवाला यांचे लेखी म्हणणे, उभय पक्षकारांच्या वकीलांचा युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1. प्रस्तुतची तक्रार मे. मंचात चालणेस पात्र आहे काय ? --- होय. 2. सामनेवाला विमा कंपनीने सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? --- होय. 3. काय आदेश ? --- शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क्र.1 :- विमा सेवा या ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या तरतुदीच्या कक्षेत येतात. सदर सेवात्रुटीबाबत तक्रार चालवणेचे अधिकार मे. मंचास प्राप्त होत असलेने प्रस्तुतची तक्रार मे. मंचात चालणेस पात्र आहे व सदर तक्रार चालवणेचे अधिकारक्षेत्र या मंचास आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.2 व 3:- तक्रारदाराचे पती रंगराव हरी पाटील यांचा जेपीए अंतर्गत सामनेवाला यांचेकडे विमा उतरविलेला होता. सदर पॉलीसीचा क्र.161600/47/08/3543 असा आहे. पॉलीसीबाबत वाद नाही. नमुद विमाधारकाचा मृत्यू हा अपघाती आहे की स्वत:हून घडवून आणलेल्या (Self Inflected Injury) दुखापतीमुळे झाला आहे हा वादाचा मुद्दा आहे. सामनेवाला यांनी दि.19/10/2010चे पत्राने तक्रारदाराचा क्लेम नं.161600/47/10/000587 नाकारला आहे. सदर पत्रानुसार सामनेवाला यांनी इन्व्हेस्टीगेशन रिपोर्टनुसार विमाधारकाचा मृत्यू हा अपघाती नसून स्वत:चे जिवीताचे रक्षण करणेबाबत झालेल्या अक्षम्य निष्कळजीपणामुळे झाला असलेमुळे पॉलीसीच्या अट 4-ई नुसार क्लेम नाकारलेचे नमुद केले आहे. सामनेवालांनी सदर पत्रामध्ये इन्व्हेस्टीगेशन रिपोर्टचा उल्लेख केला आहे. मात्र प्रस्तुत प्रकरणी इन्व्हेस्टीगेशन रिपोर्ट अथवा इन्व्हेस्टीगेटरचे शपथपत्र प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेले नाही. तसेच त्यांचे लेखी म्हणणेमध्येही सदर इन्व्हेस्टीगेशन केलेल्या बाबींचा उल्लेखही केलला नाही ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. तक्रारदाराने दाखल केलेल्या घटनास्थळाचा पंचनामा, शवविच्छेदनाकरिता पोलीस अहवालाची प्रत, इन्क्वेस्ट पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, मृत्यू प्रमाणपत्र, मृत्यूच्या अंतिम कारणांचे प्रमाणपत्र, वैद्यकीय केसपेपर्स व रेकॉर्ड इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता डॉ.प्रचिती (एम.ओ.) मेडिकल ऑफिसर, सी.पी.आर.हॉस्पिटल,कोल्हापूर यांची वर्दीदार म्हणून नोंद केलेची दिसून येते. सदर वर्दी दि.16/10/2009 रोजी 18.45 मिनटांनी पोलीसांना प्राप्त झालेची नोंद आहे. प्रस्तुत प्रकरणातील एम.एल.सी.नंबर.8841/09 असा आहे. तर हकीकतमध्ये मयताने विषारी औषध सेवन केलेने उपचारास दाखल केले असता उपचारादरम्यान तो मयत झालेची नोंद आहे. दाखल पंचनाम्यावरुन मयत विमाधारकास खोकल्याचा त्रास होता व खोकल्याचे औषध समजून कोणतेतरी विषारी औषध सेवन केलेमुळे त्यास सी.पी.आर.हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणले. त्याने कोणते औषध सेवन केले हे माहिती होऊ शकले नसलेचे नमुद केले आहे. पोलीस अहवालानुसार विमाधारकाचा मृत्यू हा दि.16/10/2009 रोजी 17.50 वाजता झाला आहे व शव विच्छेदनासाठी पाठवून दिले. सदर अहवालामध्येही विषारी औषध सेवन केलेबाबत नमुद केले आहे. मरणोत्तर पंचनाम्यामध्येही सदरची बाब नमुद केली आहे. शवविच्छेदन अहवालानुसार व्हिसेरा राखून ठेवलेचे नमुद केले आहे. दि.18/09/2010 च्या मृत्यूच्या अंतिम कारणाच्या प्रमाणपत्रावरुन नमुद विमाधारकाचा मृत्यू हा Cerebral Odema c Pul Odema in a Pt Rxed for Unknown( Endosulphan) Poisoning असे स्पष्टपणे नमुद केले असून सदर प्रमाणपत्र वैद्यकीय अधिकारी सी.पी.आर.हॉस्पिटल, कोल्हापूर यांनी सहीशिक्क्यानिशी दिलेला आहे. दाखल वैद्यकीय कागदपत्रांवरुन तात्पुरत्या रोगनिदानामध्येसुध्दा Unknown Poisoning Endosulphan 35 % अशी नोंद दिसून येते. नमुद विमाधारकास दि.16/10/2009 रोजी सायंकाळी 5.30 वाजता उपचारासाठी दाखल केले असता सायंकाळी 5.50 मिनटांनी त्याचा मृत्यू झालेला आहे.मृत्यूचा दाखला प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेला आहे. वरील विस्तृत विवेचन व दाखल कागदपत्रांचा विचार करता मयत विमाधारकाचा मृत्यू हा विषारी औषध सेवन केलेने उपचारादरम्यान झालेचे व तसे अंतिम मृत्यूच्या कारणाचे प्रमाणपत्रात नमुद केलेले आहे. सदर बाबींचा विचार करता तक्रारदाराचे पतीचा मृत्यू हा नैसर्गिक नाही ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. वादाचा विषय आहे तो सदरचा मृत्यू हा नमुद तक्रारदाराचे पतीने स्वत:हून ओढवून घेतलेला आहे. स्वत:चे जिवीताचे रक्षण करणेचे दृष्टीने त्याने अक्षम्य हलगर्जीपणा करुन विषारी औषधाचे सेवन हे अपघाताने केले नसून हेतुपूर्वक केलेले आहे. त्यामुळे प्रस्तुतचा मृत्यू हा Self Inflected Injury असलेमुळे प्रस्तुतचा क्लेम हा पॉलीसीच्या अट 4-ईनुसार नाकारलेला आहे. यासाठी सामनेवाला यांनी इन्व्हेस्टीगेशन रिपोर्ट, इन्व्हेस्टीगेटरचे प्रमाणपत्र, त्यांचेकडे असणा-या तज्ञ वैद्यकीय मत इत्यादी पुरावा प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेला नाही; तसेच प्रस्तुत पॉलीसीच्या अटी व शर्तीही दाखल केलेल्या नाहीत. सबब सामनेवाला यांचे कथनाखेरीज तक्रारदाराचे पतीचा मृत्यू हा अपघाती नसून तो त्याने स्वत:हून घडवून आणलेला दुखापतीमुळे झालेला आहे असे दाखविणारा कोणताही पुरावा दिसून येत नाही. वरील विस्तृत विवेचन व दाखल कागदपत्रांवरुन तक्रारदाराचे पतीने स्वत:हून विष प्राशन करुन आपले जिवन संपवलेचे निदर्शनास आलेले नाही अथवा त्याचेविरुध्द आत्महत्याचा गुन्हाही नोंद झालेला नाही. सबब खोकल्याचे औषध समजून विषारी औषध सेवन केलेचे कथनास पुष्टी मिळते व त्यामुळे त्याचा झालेला मृत्यू हा नैसर्गिक नाही. अपघाती मृत्यू या संज्ञेचा विचार करता अपघातामुळे झालेला मृत्यू होय. अपघात म्हणजे-अनपेक्षीत घटनेमुळे झालेली दुखापत होय.Unexpected incidencewhich occurs injury. Accidental death means death caused by accident. सबब तक्रारदाराचे पतीचा मृत्यू हा नैसर्गिक नसून अपघाती आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. यासाठी हे मंच (II CPJ 2010-272)मे.राज्य आयोग, पंजाब यांनी न्यु इंडिया एशो. कंपनी लि. विरुध्द किरण अग्नीहोत्री प्रथम अपील क्र.381/2003 मध्ये दि.11/12/2009 रोजी पारीत केलेल्या आदेशाचा आधार घेत आहे. सामेनवाला यांनी पॉलीसीचा मूळ हेतू वस्तुस्थितीजन्य पुराव्याचा विचार न करता केवळ तांत्रिक कारणास्तव तक्रारदाराचा न्याययोग्य क्लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवलेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब तक्रारदार पॉलीसीप्रमाणे रक्कम रु.1,00,000/- क्लेम नाकारले तारखेपासून द.सा.द.शे.9 टक्के व्याजाने मिळणेस पात्र आहे. तसेच सामनेवाला यांनी केलेल्या सेवात्रुटीमुळे तक्रारदार हा मानसिक त्रासापोटी व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम मिळणेस पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. 2) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास विमा पॉलीसीप्रमाणे रक्कम रु.1,00,000/-(रु.एक लाख फक्त) अदा करावी. सदर रक्कमेवर दि.19/10/2010 पासून ते संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के प्रमाणे व्याज अदा करावे. 3) तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रु.1,000/-(रु. एक हजार फक्त) अदा करावेत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |