निकालपत्र :- (दि.16/05/2011) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (01) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला त्यांचे वकीलांमार्फत हजर होऊन त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले आहे. उभय पक्षकारांचे वकीलांचा अंतिम युक्तीवाद ऐकला. सदरची तक्रार सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदाराचा योग्य व न्याय क्लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवल्यामुळे दाखल करणेत आली आहे. (02) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- अ) सामनेवाला कंपनी ही वित्तीय व्यवसाय करणारी विमा कंपनी असून यातील तक्रारदार यांचे पती मयत आनंदा विष्णू पाटील यांचा श्री केदारलिंग विकास सेवा संस्था मर्या. क।। ठाणे ता.पन्हाळा जि.कोल्हापूर मार्फत सामनेवालांकडे JPA अंतर्गत पॉलीसी उतरविलेली असून सदर पॉलीसीचा क्र.47/08/3510 असा आहे. सदर पॉलीसीच्या कालावधीतच दि.19/03/2009 रोजी तक्रारदारांचे पती आनंदा विष्णू पाटील हे सवत:चे उसाचे शेतामध्ये तण वाढलेने तणनाशक औषध फवारणीकरिता गेले असता औषध फवारणी करीत असताना अचानक तहान लागलेने पाटातील पाणी पिल्यानंतर त्यांचा अचानक उलटया सुरु होऊन प्रकृती अत्यवस्थ झालेने त्यांना कोल्हापूर येथील डॉ.भूपाळी यांचे दवाखान्यात दाखल करुन उपचार सुरु असताना दि.26/03/2009 रोजी ते मयत झाले. तदनंतर तक्रारदारांनी योग्य त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन सामनेवालांकडे न्याययोग्य क्लेमची मागणी असता दि.02/11/2010 रोजी “ नैसर्गिेक मृत्यू अथवा विषारी औषध सेवन करुन आत्महत्या या दोन्ही बाबी पॉलीसी नियमांमध्ये बसत नसलेने क्लेम नाकारणेत येत आहे’’ असे कळवले. वास्तविक तक्रारदार यांचे पती मयत आनंदा विष्णू पाटील हे शेतामध्ये औषध फवारणी करीत असताना त्यांचा अपघाती मृत्यू झालेला आहे. मृत्यूपूर्वी तक्रारदाराचे पतींनी दि.25/3/009 रोजी स्वत:चा मृत्यूपूर्व जबाब दिलेला असून त्यामध्ये अपघाताबाबतची वस्तुस्थिती स्पष्ट झालेली आहे. तसेच व्हिसेरा रिपोर्ट उशिरा मिळालेने मृत्यूचे अंतिम मत हे कागदपत्र सामनेवालाकडे पाठविलेनंतर देखील सामनेवाला यांनी चुकीचे कारण देऊन तक्रारदाराचा न्याययोग्य व पारदर्शी क्लेम नाकारलेने सदरची तक्रार मे. मंचात दाखल करणे भाग पडले आहे. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासहीत मंजूर करुन विमा क्लेमची रक्कम रु.1,00,000/- द.सा.द.शे.18 टक्के व्याजासह मिळावी तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.2,000/- सामनेवालांकडून मिळणेबाबत आदेश व्हावा अशी विनंती सदर मंचास तक्रारदाराने केली आहे. (03) तक्रारदाराने तक्रारीच्या पुष्टीप्रित्यर्थ सामनेवाला यांचे क्लेम नाकारलेचे पत्र, सोसायटीने सामनेवाला यांना सर्व कागदपत्रांची पूर्तता केलेबाबतचे दिलेले पत्र, क्लेम फॉर्म, समरी, इन्क्वेस्ट पंचनामा, मृतयूचे कारण प्रमाणपत्र, डॉक्टरांचे सर्टीफिकेट, जबाब, जबाब(मृत्यूपूर्व), घटनास्थळ पंचनामा, तपास टिप्पण, पी.एम.रिपोर्ट, केमिकल्स रिपोर्ट, मृत्यूचे अंतिम कारण प्रमाणपत्र, पेपर कात्रण, वारसा शपथपत्र इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (04) सामनेवालांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार अ) तक्रारदाराची तक्रार खोडसाळ, लबाडीची असलेमुळे खर्चासह नामंजूर करणेत यावी. प्रस्तुतची तक्रार कायदयाचे दृष्टीने तसेच वस्तुस्थितीचा विचार करता चालणेस पात्र नाही. तक्रारदाराचे तक्रार अर्जातील कलम 1 मधील विधाने सर्वसाधारणपणे बरोबर आहेत. तसेच कलम 2 व 3 मधील सर्व मजकूर सामनेवालांना मान्य व कबूल नाही. तक्रारदाराने सामनेवालांकडे क्लेम दाखल केल्यावर त्याचे अवलोकन केले असता तक्रारदार यांचे पतीचा मृत्यू हा नैसर्गिक मृत्यू नसून विषारी औषध सेवन करुन आत्महत्या आहे. अशा प्रकारचया केसीस पॉलीसीच्या नियमामध्ये बसत नसलेने सामनेवाला यांनी तक्रारदाराचा क्लेम नाकारला आहे व तो योग्य कारणास्तव नाकारलेला आहे; त्यात सामनेवाला यांनी कोणतीही सेवात्रुटी ठेवलेली नाही. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी व सामनेवालांना तक्रारदाराकडून रक्कम रु.5,000/- दंडात्मक खर्च देणेबाबतचा हुकूम व्हावा अशी विनंती सामनेवालांनी सदर मंचास केली आहे. (05) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेच्या पुष्टयर्थ क्लेम फॉर्म, मरणोत्तर पंचनामा, मृत्यू बाबतचा अंतिम अहवाल, इन्व्हेस्टीगेशन रिपोर्ट, सरस्वती हॉस्पिटल यांचा केसपेपर इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (06) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवालांचे लेखी म्हणणे, दाखल कागदपत्रे व उभय पक्षकारांच्या वकीलांचा युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1) सामनेवाला विमा कंपनीने सेवेत त्रुटी ठेवली आहे काय? -- होय. 2) तक्रारदार विमा रक्कम मिळणेस पात्र आहे काय? -- होय. 3) काय आदेश? -- शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क्र.1 :- तक्रारदाराचे पती मयत आनंदा विष्णू पाटील यांचा सामनेवालांकडे जनता व्यक्तीगत अपघात विमा योजनेखाली पॉलीसी क्र.47/08/1035 अन्वये विमा उतरविलेला होता. पॉलीसी कालावधीमध्ये दि.19/03/2009 रोजी तक्रारदाराचे पती त्यांचे स्वत:चे शेतामध्ये तणनाशक औषध फवारणी करीत असताना अचानक तहान लागलेने पाटातील पाणी पिल्याने उलटया सुरु होऊन अत्यवस्थ अवस्थेत कोल्हापूर येथील डॉ. भूपाळी यांचेकडे उपचारासाठी दाखल केले असता दि.26/03/2009 रोजी मयत झालेले आहेत. तदनंतर दि.02/11/2010 रोजीचे पत्राने सामनेवालांनी तक्रारदाराचा क्लेम नैसर्गिक मृत्यू अथवा विषारी औषध सेवन करुन आत्महत्या या दोन्ही बाबी पॉलीसी नियमामध्ये बसत नसलेने क्लेम देण्यास नकार दिलेला आहे. सदर क्लेम नाकारणेसाठी सामनेवाला यांनी संग्राम जाधव यांनी दिलेल्या इन्व्हेसटीगेशनच्या अहवालाचा आधार घेतलेला आहे. प्रस्तुत अहवाल व त्यासंबंधीची वैद्यकीय कागदपत्रे दाखल केलेली आहेत. इन्व्हेस्टीगेटर नमुद संग्राम जाधव यांचे शपथपत्र दाखल केलेले नाही अथवा तज्ञ वैद्यकीय मताचा अहवाल दाखल केलेला नाही. वरील वस्तुस्थितीचा विचार करता पॉलीसीबाबत वाद नाही. दाखल पन्हाळा पोलीस ठाणे यांचेकडील वर्दी जबाब व तपास टिप्पणाप्रमाणे तक्रारदाराचे पती गुरुवार दि.19/03/2009 रोजी सकाळी 7 चे सुमारास त्यांचे शेतामध्ये ऊस पिकामध्ये तणनाशक औषध मारणेसाठी गेला असता तहान लागलेने शेतातील पाटाचे पाणी पिल्याने त्याला उलटया होऊ लागल्याने डॉ. भूपाळी यांचे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले होते. नमुद हॉस्पिटलने दिलेल्या पत्रानुसार श्री आनंद पाटील यास दि.19/03/2009 रोजी 11.35 चे दरम्यान उपचारासाठी दाखल केले होते व दि.26/03/2009 रोजी 5.20 वाजता मयत झाला. प्रस्तुत पाटील याचे Paraquat Compound हे विषारी औषध पोटात गेलेने त्यापध्दतीने त्याचेवर उपचार केलेचे नमुद केले आहे. तसेच इन्व्हेस्टीगेटर यांनी आपल्या अहवालासोबत दिलेल्या नमुद हॉस्पिटलच्या नंबर 2577 मध्ये नमुद पेशंटबाबत Unknown Poisioning बाबत निष्कर्ष नोंदविलेला आहे. तसेच प्रस्तुत मयतास अस्थमा असलेचे दिसून येते. तसेच तो नेहमी अल्कोहोल घेत असलेचे नमुद केलेले आहे. मात्र प्रस्तुत केसपेपरमध्ये वर नमुद विषारी औषध पोटात गेलेने त्याचा मृत्यू झालेचे स्पष्ट नमुद केले आहे. तसेच दि.19/03/2009 रोजी तक्रारदाराचा मुलगा प्रकाश आंनदा पाटील यांनी दिलेल्या जबाबाचा आधार घेऊन क्लेम नाकारला आहे. मात्र प्रस्तुत जबाबाचे अवलोकन केले असता तक्रारदाराचे मुलाने त्याचे वडीलांस उलटया होत असलेची बाब तो त्याचे जनावरांना घेऊन जनावरांचे दवाखान्यात असताना समजले त्यामुळे वडीलांनी धापेचे औषध समजून किटकनाशक घेतले असावे असा अंदाज वर्तविलेला आहे. त्यावेळी त्यास नक्की वस्तुस्थिती माहिती नव्हती ही बाब नाकारता येत नाही. तसेच पोलीस पेपर, पंचनामा, तपास टिप्पण तसेच मृत्यूच्या कारणाच्या अंतिम प्रमाणपत्रामध्ये Buat Pnumonia c Pul. Odema c cevelrue odema in a PL R ed frr paragon compaud poesioning नमुद केलेले आहे. तसेच शवविच्छेदन अहवालामध्ये मृत्यूचे कारण राखून ठेवलेले होते व प्रस्तुत व्हिसेरा तपासणीसाठी पाठवून दिलेला होता. व्हिसेराचा रिपोर्ट आलेला आहे. त्यावरुनच अंतिम कारण दिलेले आहे. तसेच पोलीसांनी प्रस्तुत प्रकरणाबाबत नमुद घटनेचा उल्लेख करुन विषारी औषध पाण्यावाटे पोटात गेलेने मृत्यू झाला असलेने अन्य कोणावरही संशय अथवा तक्रार नसलेने तसेच वैद्यकीय अधिका-यांनी मयतास विषारी द्रव्यामुळे न्युमोनिया होऊन फुफुसास व मेंदूस सुज येऊन मृत्यू असे स्पष्ट मत दिलेने समरी मंजूर करणेबाबत विनंती केलेचे दिसून येते. वरील विस्तृत विवेचन व दाखल कागदपत्रांचा वस्तुस्थितीजन्य व वैद्यकिय पुराव्याचा विचार करता तक्रारदाराचा मृत्यू हा paragon compaud हे विषारी औषध पोटात गेलेने त्याचा मृत्यू झालेला आहे ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. यावरुन तक्रारदाराचे पतीचा मृत्यू हा नैसर्गिक मृत्यू नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सामनेवालांनी प्रस्तुतचा क्लेम नैसर्गिक मृत्यू अथवा आत्महत्या या कारणास्तव नाकारलेला आहे. वरील कागदपत्रांवरुन तक्रारदाराचे पतीचा मृत्यू हा नैसर्गिक नाही हे सिध्द होते तसेच तक्रारदाराचे पतीने स्वत:हून विष प्याले दाखल असणा-या वस्तुस्थितीजन्य व वैद्यकीय पुराव्यावरुन दिसून येत नाही. याउलट दि.25/03/2009रोजी तक्रारदाराचे पती आनंदा विष्णू पाटील यांनी पोलीसासमोर जबाब दिलेला आहे व सदरचा जबाब हा हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिका-यांसमोर दिलेला आहे. तदनंतर दुस-या दिवशी दि.26/03/2009 रोजी त्याचा मृत्यू झालेला आहे. सबब तत्पुर्वी त्याने दिलेला जबाब हा मृत्यूपूर्व जबाब म्हणून ग्राहय धरणेच्या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब विस्तृत विवेचन व पुराव्याचा विचार करता तक्रारदाराने पतीने आत्महत्या केली किंवा तसा त्याचेवर गुन्हा नोंद असलेचे निदर्शनास आलेले नाही. सबब प्रस्तुत तक्रारदाराचे पतीचा मृत्यू हे आत्महत्या नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. वरील विस्तृत विवेचनाचा विचार करता तक्रारदाराचा पतीचा मृत्यू हा नैसर्गिक नाही तसेच आत्महत्याही नाही. सबब तक्रारदाराचे पतीचा मृत्यू हा अपघाती असलेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब सामनेवाला यांनी वस्तुस्थितीजन्य पुरावा व वैद्यकीय पुरावा, मृत्यूच्या अंतिम कारणाचे मत, प्रमाणपत्र, समरी रिपोर्ट, पोलीस पेपर्स इत्यादीचा विचार न करता केवळ इन्व्हेस्टीगेटरच्या अहवालावर प्रस्तुतचा क्लेम नाकारलेला आहे. सामनेवाला विमा कंपनीकडे तज्ञ वैद्यकीय पॅनेल असते. सदर तज्ञ वैद्यकीय मताचा अहवाल न घेता इन्व्हेस्टीगेटरच्या अहवालावर अवलंबून सामनेवाला यांनी तक्रारदाराचा क्लेम नाकारुन सेवेत गंभीर त्रुटी ठेवलेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.2 :- मुद्दा क्र.1 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता तक्रारदाराचे पतीचा अपघाती मृत्यू झालेने तक्रारदार पॉलीसीप्रमाणे विमा रक्कम रु.1,00,000/- क्लेम नाकारले तारखेपासून म्हणजे दि.02/11/2010 रोजीपासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह मिळणेस पात्र आहेत. मुद्दा क्र.3 :- सामनेवाला यांनी तक्रारदाराचा न्याययोग्य क्लेम नाकारुन सेवेत ठेवलेल्या त्रुटीमुळे तक्रारदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम मिळणेस तक्रारदार पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. 2) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास पॉलीसीप्रमाणे असलेली रक्कम रु.1,00,000/-(रु.एक लाख फक्त) अदा करावी. सदर रक्कमेवर दि.02/11/2010 पासून ते संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के प्रमाणे व्याज अदा करावे. 3) तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रु.1,000/-(रु. एक हजार फक्त) अदा करावेत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |