निकालपत्र :- (दि.07/09/2011) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (01) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला त्यांचे वकीलांमार्फत हजर झाले. त्यांना संधी देऊनही त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले नाही. उभय पक्षकारांचे वकीलांचा अंतिम युक्तीवाद ऐकला. सदरची तक्रार सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदाराचा योग्य व न्याय क्लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवल्यामुळे दाखल करणेत आली आहे. (02) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी :- यातील तक्रारदारांचे पती मयत मारुती भाऊ पाटील यांची शासनामार्फत सामनेवालांकडे शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत पॉलीसी उतरविलेली असून सदर पॉलीसीचा क्र.181200/48/2009/939 असा आहे. सदर पॉलीसीच्या कालावधीतच दि.28/02/2009 रोजी सायंकाळी 5 वाजता तक्रारदाराचे पती मारुती भाऊ पाटील हे शेतामध्ये पाणी पाजत असताना ऊसातील कोंब काढण्याकरिता ऊसात शिरले असताना अचानक त्यांच्यावर असंख्य मधमाशांनी तीव्र हल्ला चढविला. यामध्ये त्यांचे चेह-यावर व शरीरावर मधमाशांनी जोरदार दंश करणेस सुरुवात केली. त्यामुळे ते सैरभैर पळत सुटले असताना तोल जाऊन विहीरीत पडले व सदर अपघातामध्येच त्यांचा मृत्यू झाला. तदनंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन तक्रारदारांनी सामनेवालांकडे क्लेमची मागणी केली असता सामनेवाला यांनी दि.22/03/2010रोजीचे पत्राने ‘’क्लेमकरिता आवश्यक असणारी कागदपत्रे जमा केली नाहीत व क्लेम वेळेत दाखल केला नाही.’’ असे कारण देऊन क्लेम नाकारलेचे कळवले आहे. वास्तविक तक्रारदार या अडाणी-अशिक्षीत व वृध्द निराधार विधवा महिला असून त्यांना कधीही सामनेवाला यांनी अथवा शासकीय ऑफिसमधून शेतकरी अपघात विमा योजनेच्या अटी व नियम यांची माहिती दिली नव्हती. तक्रारदाराने शासनामार्फत सामनेवालांकडे क्लेम फॉर्म आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह जमा केलेला आहे. सामनेवाला यांनी अतिशय बेजबाबदारपणे तक्रारदाराचा न्याययोग्य क्लेम नाकारलेने प्रस्तुतची तक्रार मे. मंचात दाखल करणे भाग पडले. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह मंजूर करुन सामनेवाला यांचेकडून क्लेमची रक्कम रु.1,00,000/- व्याजासह, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- व तक्रारीचा खर्च रु.3,000/- सामनेवाला यांचेकडून वसुल होऊन मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (04) तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या पुष्टयर्थ सामनेवाला यांनी क्लेम नाकारलेचे दि.22/03/2010 रोजीचे पत्र, वर्दी, पोलीस पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा, शवपरिक्षेकरिता पाठवण्याचा पोलीस अहवाल, पोस्ट मार्टेम रिपोर्ट, तहसीलदार करवीर तर्फे कबाल ब्रोकर्स पुणे यांना दि.25/05/2009 रोजी पाठवलेले पत्र इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (05) सामनेवाला हे त्यांचे वकीलांमार्फत हजर झाले. परंतु त्यांना संधी देऊनही त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले नाही. (06) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, उभय पक्षकारांच्या वकीलांचा युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1. सामनेवाला विमा कंपनीने सेवेत त्रुटी ठेवली आहे काय? --- होय. 2. काय आदेश? --- शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क्र.1 व 2 :- तक्रारदाराचे पती मयत मारुती भाऊ पाटील यांचा शेतकरी व्यक्तीगत अपघात योजनेअंतर्गत सामेनवाला विमा कंपनीकडे पॉलीसी क्र.181200/48/2009/939 अन्वये विमा उतरविलेला होता याबाबत वाद नाही. तक्रारदारचे पती शेतामध्ये पाणी पाजत असताना ऊसातील कोंब काढणेसाठी ऊसात शिरले असता अचानक त्यांचेवर मधमाशांनी तिव्र हल्ला चढवला यामध्ये त्याचे चेह-यावर व शरिरावर मधमाशांनी जोरदार दंश करणेस सुरुवात केलेमुळे ते सैरावैरा पळत सुटले असताना तोल जाऊन विहीरीत पडले व सदर अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला. तदनंतर तक्रारदाराने विमा रक्कमेची मागणी केली असता दि.22/03/2010 रोजीचे पत्राने सामनेवाला यांनी आवश्यक कागदपत्रे जमा केली नाही व क्लेम वेळेत दाखल केला नाही म्हणून क्लेम नाकारला. सदरचे पत्र प्रस्तुत प्रकरणी दाखल आहे. तसेच युक्तीवादाच्या वेळेस सामनेवालांचे वकीलांनी वर्दी दिली नसलेबाबतचा आक्षेप घेतलेला आहे. सदर बाबींचा विचार करता डॉ. अमोल आपटे वैद्यकीय अधिकारी सी.पी.आर.हॉस्पिटल,कोल्हापूर यांनी करवीर पोलीस ठाणेमध्ये वर्दी दिलेली आहे. त्यानुसार दि.28/02/009 रोजी अ.म.र.नं.27/09 सदर पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे व सदर वर्दीस अनुसरुन पंचनामा केलेला आहे. मरणोत्तर पंचनामा दाखल आहे. तसेच शवविच्छेदन अहवालही दाखल आहे. तक्रारदाराने दि.25/05/2009 चे तहसिलदार करवीर यांनी कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस यांचे व्यवस्थापकांना पाठवलेल्या पत्राचे अवलोकन केले असता त्या अनुषंगाने सर्व कागदपत्रे पाठवलेचे नमुद केले आहे. वरील वस्तुस्थिती व दाखल कागदपत्रांचा विचार करता सामनेवाला यांनी क्लेम नाकारलेचे पत्रामध्ये वर्दी व इन्क्वेस्ट पंचनाम्याची मागणी केलेचे दिसून येते. प्रस्तुत प्रकरणी इन्क्वेस्ट पंचनामा हजर केलेला आहे. तसेच जागेचा पंचनामाही हजर केलेला आहे. सदर दोन्ही पंचनामे हे डॉक्टर अमोल आपटे यांनी दिलेल्या वर्दीस अनुसरुन करवीर पोलीस ठाणे यांनी केले असलेमुळे सामनेवालांचे सदर आक्षेप हे मंच फेटाळत आहे. तसेच प्रस्तुतची कागदपत्रे सामनेवाला यांना पाठवलेले आहे हे तहसिलदार करवीर यांचे पत्रावरुन दिसून येते. सामनेवाला यांनी नमुद विमाधारकाच्या मृत्यूबाबत वाद उपस्थित केलेला नाही. दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता मरणोत्तर पंचनामा कलम 10 मध्ये डोके, चेहरा या ठिकाणी मधमाशा चावल्याचे खुणा दिसत आहे व चेहरा सुजलेला आहे असे नमुद केले आहे. सदर मधमाशांच्या दंशामुळे सैरभैर होऊन तो पळत असताना विहीरीत पडून त्याचा मृत्यू झालेला आहे हे शवविच्छेदन अहवालावरुन निर्विवाद आहे. सबब तक्रारदाराचे पतीचा मृत्यू हा नैसर्गिक नसून अपघाती आहे ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. तक्रारदाराचे पतीचा मृत्यू हा दि.28/02/2009 रोजी झालेला आहे. तर प्रस्तुत कागदपत्रे ही दि.25/05/2009 रोजी पाठवलेली आहेत. सदर कागदपत्रे कबाल इन्शुरन्सला आवक क्र.3208 नुसार दि.04/6/2009 रोजी प्राप्त झालेली आहेत हे निदर्शनास येते. सामनेवाला यांनी प्रस्तुतचा क्लेम हा कट ऑफ डेट नंतर म्हणजेच दि.15/11/2009 नंतर आलेने शासनाचे जी.आर.प्रमाणे नाकारलेला आहे. सदर बाबींचा विचार करता प्रस्तुतचा क्लेम कबाल इन्शुरन्सला 04, जुन-2009 मध्ये प्राप्त झालेला दिसून येतो. त्यामुळे कट ऑफ डेट पूर्वीच तक्रारदाराने तहसिलदार मार्फत कागदपत्रांची पूर्तता करुन क्लेम मागणी केलेचे दिसून येते. वादाकरिता कट ऑफ डेट नंतरही सामनेवालांना सदर क्लेम प्राप्त झाला असेल तर शासन निर्णयाप्रमाणे विशेषत्व कारणांचा विचार करुन तसेच पॉलीसीचा मूळ हेतू विचारात घेऊन सदरचा विलंब माफ करणेबाबत ऐच्छिक अधिकार दिलेले आहेत. सामनेवाला विमा कंपनी हया शासनाने कार्यान्वयीत केलेल्या सदर विमा योजनेच्या मूळ उद्दीष्टाचा गांभीर्याने विचार न करता क्लेम नाकारणेकडे त्याचा वापर करतात व मूळ हेतूला हरताळ फासतात. ही सामनेवालांचे सेवेतील त्रुटी आहे. सबब तक्रारदाराचा क्लेम हा न्याययोग्य व पारदर्शी असतानाही तसेच तो मंजूर करणेचा अधिकार असतानाही सामनेवालांनी सदर योजनेचा मूळ हेतू लक्षात न घेता केवळ तांत्रिक कारणास्तव तक्रारदाराचा न्याययोग्य क्लेम नाकारला आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. घरातील कर्त्या पुरुषाचा असा अपघाती मृत्यू झालेनंतर घरातील स्त्रीवर त्याचे कुटूंबावर ओढवलेल्या आघाताचा विचार करता प्रस्तुत क्लेम तक्रारदारास वेळेत मिळणे न्याययोग्य होते. त्यामुळे पॉलीसीप्रमाणे रक्कम रु.1,00,000/-व्याजासह मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. त्यासाठी तक्रारदारास सदर मंचाचा दरवाजा ठोठवावा लागलेमुळे तक्रारदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम मिळणेस पात्र आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. 2) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास विमा पॉलीसीप्रमाणे रक्कम रु.1,00,000/-(रु.एक लाख फक्त) अदा करावी. सदर रक्कमेवर दि.22/03/2010 पासून ते संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के प्रमाणे व्याज अदा करावे. 3) तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रु.2,000/-(रु.दोन हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रु.1,000/-(रु. एक हजार फक्त) अदा करावेत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |