निकालपत्र :- (दि.21/02/2011) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (01) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला त्यांचे वकीलांमार्फत हजर होऊन त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले आहे. उभय पक्षकारांचे वकीलांचा अंतिम युक्तीवाद ऐकला. सदरची तक्रार सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदाराचा योग्य व न्याय क्लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवल्यामुळे दाखल करणेत आली आहे. (02) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- अ) सामनेवाला कंपनी ही वित्तीय व्यवसाय करणारी विमा कंपनी असून यातील तक्रारदार यांचे म्हैशीचा विमा सामनेवाला विमा कंपनीकडे श्री महादेव सह.दुध संस्था कोगे यांचेमार्फत उरतविलेला असून सदर पॉलीसीचा क्र.48/10/7272 व रिटॅगींग केलेल्यास बिल्ल्याचा क्रमांक OIC/161600/43155 असा आहे. सदर म्हैस दि.09/04/2010 रोजी मयत झाली. तदनंतर तक्रारदारांनी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पुर्तता करुन सामनेवालांकडे क्लेम रक्कम रु.14,000/- ची मागणी केली असता सामनेवालांनी दि.11/11/2010 रोजी ‘’ जनावराच्या कानात मारण्यास दिलेला टॅग पूर्णपणे नवीन असून तो ताबडतोब मारलेला नाही.’’ अशा अत्यंत चुकीच्या कारणाने तक्रारदाराचा न्याययोग्य क्लेम नाकारला आहे. (ब) तक्रारदार आपल्या तक्रारीत पुढे सांगतात, वास्तविक तक्रारदारा यांनी दि.09/04/2010 रोजीच रिटॅगींग केलेचे पत्र श्री महादेव दूध संस्थेमार्फत सामनेवाला कंपनीला दिलेले आहे. तरीही सामनेवाला यांनी तक्रारदाराचा क्लेम नाकारुन सेवेत त्रुटी केलेली आहे. त्यामुळे तक्रारदारास सदरची तक्रार मा. मंचासमोर दाखल करणे भाग पडले. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर होऊन विमा क्लेमची रक्कम रु.14,000/- द.सा.द.शे.18 टक्के व्याजासह मिळावी तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/-व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.3,000/- सामनेवालांकडून मिळणेबाबत आदेश व्हावा अशी विनंती सदर मंचास तक्रारदाराने केली आहे. (03) तक्रारदाराने तक्रारीच्या पुष्टीप्रित्यर्थ सामनेवाला यांनी क्लेम नाकारलेले पत्र, पशु विमा दावा पत्र, क्लेम फॉर्म, जनावराचा मृत्यू दाखला, पोस्ट मार्टेम रिपोर्ट, व्हॅल्यूएशन रिपोर्ट, श्री महादेव दुध संस्थेचे सामनेवाला यांना दिलेले पत्र, किसान पॅकेज पॉलीसी प्रस्तावपत्र रिटॅगींग इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (04) सामनेवालांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार अ) तक्रारदाराची तक्रार खोटी असलेने फेटाळण्यात यावी. तक्रारदाराची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारलेली आहे. सामनेवाला पुढे असे प्रतिपादन करतात की, तक्रारदाराने सामनेवालांकडे क्लेम मागणी केलेनंतर त्याबाबत सर्व्हे व इन्व्हेस्टीगेशन केलेले आहे. त्यावेळी मयत म्हैशीच्या कानात असलेला बिल्ला हा नवीन कोरा, स्वच्छ व चकचकीत होता. वस्तुत: जर तो आधी वापरला असता तो घाण व अस्वच्छ असता. सबब पॉलीसीच्या वेळी सदर बिल्ला कानात नव्हता त्यामुळे प्रस्तुतचा क्लेम अपात्र असलेने फाईल बंद करणेत आली व दि.11/11/2010 रोजी क्लेम नाकारलेला आहे. सबब सामनेवाला यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही. तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी व सामनेवालांना विनाकारण खर्चात पाडलेने रक्कम रु.5,000/- तक्रारदाराकडून सामनेवालांना देणेचा आदेश व्हावा अशी विनंती सामनेवालांनी सदर मंचास केली आहे. (05) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेच्या पुष्टयर्थ कोणतेही कागदपत्र दाखल केलेली नाहीत. (06) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवालांचे लेखी म्हणणे व उभय पक्षकारांच्या वकीलांचा युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1) सामनेवाला विमा कंपनीने सेवेत त्रुटी ठेवली आहे काय? -- होय 2) काय आदेश? -- शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क्र.1 :- तक्रारदार यांचे म्हैशीचा विमा सामनेवाला विमा कंपनीकडे श्री महादेव सह.दुध संस्था कोगे यांचेमार्फत उरतविलेला असून सदर पॉलीसीचा क्र.48/10/7272 व रिटॅगींग केलेल्यास बिल्ल्याचा क्रमांक OIC/161600/43155 असा आहे. सदर म्हैस दि.09/04/2010 रोजी मयत झाली. म्हैस मयत झालेनंतर क्लेमची मागणी तक्रारदाराने केलेली आहे. दि.11/11/2010 रोजी ‘’ जनावराच्या कानात मारण्यास दिलेला टॅग पूर्णपणे नवीन असून तो ताबडतोब मारलेला नाही.’’ अशा कारणाने क्लेम नाकारला आहे ही वस्तुस्थिती दाखल कागदपत्रावरुन निदर्शनास येते. वादाचा मुद्दा आहे तो प्रस्तुत पॉलीसी वर नमुद कारणाने नाकारली. ती योग्य कारणास्तव नाकारली आहे का? याचा विचार करता पॉलीसी उतरवितेवेळी म्हैशीच्या कानामध्ये असलेला बिल्ला हरवल्याने रिटॅगींग केलेले होते. दि.09/03/2010 चे महादेव सह.दुध संस्था मर्या कोगे यांनी सामनेवालांना पाठविलेल्या पत्रामध्ये किसान पॅकेज विमा पॉलीसी दि.31/12/2009रोजी उतरवलेली असून पॉलीसी क्र.48/2010/7272, 7271 असून 5 सभासदांचे जनावराचे पडलेले बिल्ले रिटॅगींग केले असून त्याची आपले पॉलीसीमध्ये नोद करुन घेणेबाबत कळवलेचे दिसून येते. सदर पत्राच्या मागील बाजूस अनुक्रमांक 3 वर तक्रारदाराचे नांव असून जूना बिल्ल्याचा क्र.43414 असून नवीन बिल्ल्याचा नंबर 43155 आहे व त्याप्रमाणे पॉलीसीवर नोंद केलेली आहे ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. नमुद म्हैस दि.09/04/2010 रोजी मयत झालेली आहे. त्याबाबत पशुविमा दावा प्रपत्र/ क्लेम फॉर्म, मृत्यू दाखला, पोस्ट मार्टेम रिपोर्ट, व्हॅल्यूएशन रिपोर्ट, रिटॅगींग बाबतचे प्रस्ताव पत्र यामध्ये नमुद रिटॅगींग केलेला बिल्ला मयत म्हैशीच्या कानात असलेची नोंद आहे. सबब सामनेवाला यांनी कागदपत्रांची छाननी न करताच जनावराचा मृत्यू झाला त्यावेळी त्याच्या कानात प्रस्तुतचा बिल्ला असतानादेखील तो नवीन, स्वच्छ व चकचकीत असलेचे चुकीचे कारणास्तव प्रस्ताव नाकारलेला आहे. वस्तुत: अशा प्रकरणामध्ये टॅग नसलेमुळे प्रस्ताव नाकारले जातात. या प्रकरणी सामनेवालांनी कोणतीही शहानिशा न करता व पॉलीसीचा मूळ हेतू व अटी विचारात न घेता केवळ असणारा टॅग हा नवीन स्वच्छ व चकचकीत असलेचे कारणास्तव क्लेम नाकारला आहे व अशा प्रकारे क्लेम नाकारता येतो हे सामनेवालाने दाखवून दिलेले नाही. सबब सामनेवाला यांनी चुकीच्या कारणास्तव तक्रारदाराचा न्याययोग्य क्लेम नाकारुन सेवेत गंभीर त्रुटी ठेवलेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.2 :- तक्रारदार पॉलीसीप्रमाणे विमा रक्कम रु.14,000/- क्लेम नाकारले तारखेपासून व्याजासह मिळणेस पात्र आहेत. तसेच सामनेवाला यांनी सेवेत ठेवलेल्या त्रुटीमुळे तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. 2) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास पॉलीसीप्रमाणे असलेली रक्कम रु.14,000/-(रु.चौदा हजार फक्त) अदा करावी. सदर रक्कमेवर दि.11/11/2010 पासून ते संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के प्रमाणे व्याज अदा करावे. 3) तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रु.1,000/-(रु. एक हजार फक्त) अदा करावेत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |