निकालपत्र :- (दि.21/01/2011) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (01) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला त्यांचे वकीलांमार्फत हजर होऊन त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले आहे. उभय पक्षकारांचे वकीलांचा अंतिम युक्तीवाद ऐकला. सदरची तक्रार सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदाराचा योग्य व न्याय क्लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवल्यामुळे दाखल करणेत आली आहे. (02) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- अ) सामनेवाला कंपनी ही वित्तीय व्यवसाय करणारी विमा कंपनी असून यातील तक्रारदार यांचे पती मयत नामदेव यशवंत तोडकर यांची शासनामार्फत सामनेवाला कंपनीकडे शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत पॉलीसी उतरविलेली असून सदर पॉलीसीचा क्र.181200/48/2009/939 असा आहे. सदर पॉलीसीच्या कालावधीतच दि.07/06/2009 रोजी तक्रारदार यांचे पती रमजान शब्बीर शेख हे पहाटे 6.30 चे सुमारास शेतामध्ये पिकांना पाणी पाजणेसाठी विहीरीवरील इलेक्ट्रीक मोटर चालू करणेसाठी स्टार्टर पेटी उघडत असता त्यांना जोराचा शॉक बसून ते खाली पडले त्यांना औषधोपचाराकरिता दवाखान्यात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. तदनंतर तक्रारदारांनी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पुर्तता करुन सामनेवालांकडे न्याययोग्य क्लेमची मागणी केली असता दि.05/04/2010 रोजी ‘’ क्लेमसोबत एम.एस.ई.बी. रिपोर्ट जोडलेला नाही.’’अशा कारणाने क्लेम नाकारला असलेचे कळवले. (ब) तक्रारदार आपल्या तक्रारीत पुढे सांगतात, वास्तविक तक्रारदार यांनी क्लेमकरिता लागणारे पॉलिसीप्रमाणे आवश्यक ते सर्व कागदपत्रे सामनेवाला यांना दिली होती. तरीदेखील सामनेवाला यांनी अत्यंत चुकीच्या व खोटया कारणाने तक्रारदाराचा न्याययोग्य व पारदर्शी क्लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवलेमुळे सदरी तक्रार मा. मंचासमोर दाखल करणे भाग पडले. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर होऊन विमा क्लेमची रक्कम रु.1,00,000/- दि.07/09/2009 पासून द.सा.द.शे.18 टक्के व्याजासह मिळावी तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.50,000/-व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.3,00/- सामनेवालांकडून मिळणेबाबत आदेश व्हावा अशी विनंती सदर मंचास तक्रारदाराने केली आहे. (03) तक्रारदाराने तक्रारीच्या पुष्टीप्रित्यर्थ्य सामनेवाला यांनी क्लेम नाकारलेचे पत्र, पंचनामा, जबाब, इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मार्टेम रिपोर्ट, एम.एस.ई.बी. चा अपघाताबाबतचा अभिप्राय व पंचनामा इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (04) सामनेवालांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार अ) तक्रारदाराची तक्रार खोटी, व लबाडीची व चुकीची असून सामनेवालांना मान्य व कबूल नाही. तक्रारदाराची तक्रार आहे त्या स्थितीत कायदेशीररित्या चालणेस पात्र नाही. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी. सामनेवाला पुढे असे प्रतिपादन करतात की, तक्रार अर्ज कलम 1 मधील मजकूराबाबत सामनेवाला यांना जादा काही म्हणावयाचे नाही. कलम 2 मधील मजकूराबाबत सामनेवाला यांना काहीही माहिती नाही. सदरील बाब तक्रारदाराने पुराव्यानिशी सिध्द करणेची आहे. तक्रारदाराचे पती दि.07/06/2009 रोजी मयत झाले हे बरोबर आहे. तक्रारदारांनी सामनेवाला विमा कंपनीकडे दाखल केलेल्या कागदपत्रामध्ये एम.एस.ई.बी. चा रिपोर्ट जोडलेला नव्हता. तक्रारदाराचे पती श्री रमजान शेख हे पहाटे 6.30 वा.चे सुमारास शेतामध्ये पिकांना पाणी पाजणेसाठी विहीरीवरील इलेक्ट्रीक मोटार चालू करणेसाठी स्टार्टर पेटी उघडत असताना त्यांना जोराचा शॉक बसून ते मयत झालेचे कथन केले आहे. यावरुन तक्रारदार वापरत असलेली इलेक्ट्रीक मोटारीमध्ये दोष असलेने तक्रारदाराचे पती शॉक बसून मयत झाले. सबब सदर कामी एम.एस.ई.बी. चा रिपोर्ट आवश्यक आहे. तक्रारदाराने मागणी करुनही सदर रिपोर्ट दाखल न केलेने सामनेवालांना तक्रारदाराचा क्लेम नाकारणे भाग पडले आहे. ब) तक्रारदाराचे तक्रार अर्जातील कलम 3 ते 8 मधील सर्व मजकूर खोटा व लबाडीचा, चुकीचा असून तो सामनेवालांना कोणत्याही प्रकारे मान्य व कबूल नाही. सामनेवालांनी तक्रारदाराकडे वेळोवेळी मागणी करुनही एस.एस.ई.बी. रिपोर्ट दाखल नसलेने सामनेवालांनी क्लेम नाकारलेला आहे. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करावी व सामनेवालांना विनाकारण खर्चात पाडलेने तक्रारदाराकडून कोर्ट खर्च मिळावा अशी विनंती सामनेवालांनी सदर मंचास केली आहे. (05) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेसोबत कोणतेही कागदपत्र दाखल केलेले नाहीत. (06) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवालांचे लेखी म्हणणे व उभय पक्षकारांच्या वकीलांचा युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1) सामनेवाला विमा कंपनीने सेवेत त्रुटी ठेवली आहे काय? -- होय 2) काय आदेश? -- शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क्र.1:-तक्रारदाराचे पती मयत रमजान शब्बीर शेख यांचा शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत विमा उतरविलेला होता. त्याचा पॉलीसी क्र.181200/48/2009/939 असा आहे. त्याच्या मृत्यू दि.07/06/2009 रोजी पहाटे 6.30 चे सुमारास शेतामध्ये पिकांना पाणी पाजणेसाठी विहीरीवरील इलेक्ट्रीक मोटर चालू करणेसाठी स्टार्टर पेटी उघडत असताना त्यांना विजेचा जोराचा शॉक बसून खाली पडले व उपचाराकरिता नेत असताना वाटेतच मयत झालेला आहे. ही बाब सामनेवाला यांनाही मान्य आहे. तक्रारदाराने दाखल केलेल्या पंचनामा, जबाब, मरणोत्तर पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, एम.एस.ई.बी.चा अपघाताबाबतचा अभिप्राय व पंचनामा यावरुन तक्रारदाराचे पतीचा मृत्यू हा अपघाती असलेचे निर्विवाद आहे. तक्रारदाराने वर नमुद कागदपत्रासह क्लेम मागणी केला असता सामनेवाला विमा कंपनीने दि.05/04/2009 रोजीचे पत्राने क्लेमसोबत एम.एस.ई.बी. रिपोर्ट जोडलेला नाही या कारणास्तव क्लेम नाकारलेला आहे. येथेच वादाचा मुद्दा उपस्थित झाला आहे. तक्रारदाराचे पतीचा मृत्यू हा इलेक्ट्रिक शॉकमुळे झालेचे मृत्यू प्रमाणपत्र तसेच शवविच्छेदन अहवालत निर्विवाद आहे. त्याला अपघात झालेचे एम.एस.ई.बी. चा रेखाचित्रासह अहवाल व अभिप्राय दाखल आहे.तक्रारदाराने वर नमुद कागदपत्रे क्लेमसोबत कबाल इन्शुरन्स मार्फत सामनेवाला विमा कंपनीस पाठवलेचे तक्रारदाराचे वकीलांनी ठामपणे प्रतिपादन केले आहे. वादाकरिता जर असा एम.एस.ई.बी. चा अपघात अहवाल व त्या संदर्भात कागदपत्रे दिली नसती तर तशी लेखी मागणी अथवा सदर कागदपत्रे जमा करणेची सुचना दयावयास हवी होती तसेच तक्रारदारास कळवलेबाबत अथवा सुचना दिलेबाबत कोणतेही कागदपत्रे दिसून येत नाही. सबब सामनेवालांच्या या एम.एस.ई.बी. चा रिपोर्ट दिला नाही यास कथनास कोणताही कागदपत्री पुरावा व आधार नाही. युक्तीवादाचे वेळी सामनेवालांचे वकीलांनी एम.एस.ई.बी. रिपोर्ट असलेचे मान्य केले आहे. याची न्यायिक नोंद या मंचाने घेतलेली आहे. सबब कोणत्याही आधाराशिवाय सामनेवाला कंपनीने सदर कागदपत्रे देऊनही चुकीच्या कारणास्तव क्लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवली आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.2 :- मुद्दा क्र.1 मधील विस्तृत विवेचनानुसार तक्रारदार हे पॉलीसीप्रमाणे रक्कम रु.1,00,000/- व्याजासह मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच सामनेवाला यांनी सेवेत ठेवलेल्या त्रुटीमुळे तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. 2) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास नुकसान भरपाई रक्कम रु.1,00,000/- (रु.एक लाख फक्त) अदा करावी. सदर रक्कमेवर दि.05/04/2010 पासून ते संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के प्रमाणे व्याज अदा करावे. 3) तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रु.2,000/-(रु.दोन हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रु.1,000/-(रु. एक हजार फक्त) अदा करावेत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |