निकालपत्र :- (दि.25/07/2011) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (01) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला त्यांचे वकीलांमार्फत हजर होऊन त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले आहे. उभय पक्षकारांचे वकीलांचा अंतिम युक्तीवाद ऐकला. सदरची तक्रार सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदाराचा योग्य व न्याय क्लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवल्यामुळे दाखल करणेत आली आहे. (02) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- तक्रारदारचे पती मयत प्रशांत सदाशिव पाटील यांचा शासनामार्फत व्यक्तीगत शेतकरी अपघात योजनेखाली विमा उतरविलेला होता. त्याचा विमा पॉलीसी क्र.181200/42/2008/91 असा आहे. विमा कालावधीत तक्रारदाराचे पतीचा दि.05/08/2008 रोजी दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारामध्ये जागीच मृत्यू झाला. तदनंतर तक्रारदारांचे वतीने शासकीय ऑफिस मधून आवश्यक ती सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन सामनेवालांकडे विमा रक्कमेची मागणी केली असता दि.15/12/2009 रोजी क्लेमसोबत आवश्यक कागदपत्रे पाठवलेली नाहीत व क्लेम कट-ऑफ डेट नंतर पाठवलेने क्लेम नाकारणेत येत आहे.’’ असे पत्र पाठवले. तक्रारदार आपल्या तक्रारीत पुढे सांगतात, वास्तविक पॉलिसीच्यास नियमाप्रमाणे आवश्यक ती सर्व कागदपत्रे तक्रारदारांनी क्लेमसोबत जोडलेली आहेत. सामनेवालांकडे क्लेम पाठवणेपूर्वी शासकीय ऑफिसमधून कागदपत्रांची आवश्यकता तपासूनच क्लेम पाठविलेला आहे. तसेच तक्रारदार या अडाणी अशिक्षीत महिला असलेने व तक्रारदारचे पतीचा दरोडयासारख्या भयावह घटनेमध्ये गोळी लागून झालेल्या अपघाती मृत्यूमुळे मानसिक तणावाखाली असले कारणाने क्लेम पाठवणेस थोडा विलंब झालेला आहे. तरीदेखील सामनेवाला यांनी अत्यंत चूकीचे व तांत्रिक कारणांचा आधार घेऊन तक्रारदाराचा न्याययोग्य व पारदर्शी क्लेम नाकारुन सेवात्रुटी केलेमुळे प्रस्तुतचा तक्रार अर्ज दाखल केलेला आहे. सबब तक्रार अर्ज खर्चासह मंजूर व्हावा. तक्रारदारास सामनेवालांकडून क्लेमची रक्कम रु.1,00,000/- व सदर रक्कमेवर दि.05/11/2008 पासून द.सा.द.शे. 18 टक्के व्याज मानसिक त्रासापोटी रक्कम रु.50,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.3,000/- देणेबाबत हुकूम व्हावा अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (04) तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या पुष्टयर्थ सामनेवाला यांचे क्लेम नाकारलेचे पत्र, सी.पी.आर.हॉस्पिटलचे मृत्यूच्या कारणाचा दाखला, दैनिकामध्ये प्रसिध्द झालेली बातमी इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (05) सामनेवाला यांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार तक्रारदाराची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारलेली आहे. सामनेवाला यांनी कोणतीही सेवा त्रुटी केली नसलेने प्रस्तुतची तक्रार चालणेस पात्र नाही. कबाल इनशुरन्स सर्व्हीसेस प्रा. लि. यांना पक्षकार केलेले नाही. त्यामुळे प्रस्तुत तक्रारीस नॉन जॉइन्डर ऑफ नेसेसरी पार्टीजची बाधा येते. तसेच सदर तक्रार चालविणेचे अधिकारक्षेत्र मे. मंचास येत नाही. तथापि सदर विम्याचे तक्रारदार यांना कव्हरेज असेल तर सदरचे कव्हरेज हे सदर विमा पॉलीसीच्या अटी व शर्तीस अनुसरुन बांधील राहील. सामनेवाला पुढे असे प्रतिपादन करतात की, तक्रारदाराने क्लेम दाखल करतेवेळी क्लेमसोबत योग्य ती कागदपत्रे दाखल केली नव्हती. तसेच सदरचा क्लेम मुदतीत दाखल केलेला नाही. त्यामुळे दि.15/12/2009 रोजी सदर कारणावरुन क्लेम फाईल बंद केली याची पूर्ण कल्पना तक्रारदाराला होती व आहे. तक्रारदाराने क्लेमसोबत खबरी जबाब, पंचनामा, पोलीस पेपर्स हजर केलेले नाहीत. त्यामुळे तक्रारदाराचे पतीचा मृत्यू हा पॉलीसीच्या अटी व शर्तीप्रमाणे देय नाही. सदर अटी व शर्तीचा भंग झालेस तक्रारदारास कोणतीही दाद मागणेचा हक्क नाही. निव्वळ पैसे उकळण्याच्या दूष्ट हेतूने सदरची तक्रार दाखल केली आहे. सबब सदरचा तक्रार अर्ज नामंजूर करणेत यावा अशी विनंती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे. (06) सामनेवाला यांनी आपले म्हणणेसोबत कोणतेही कागदपत्र दाखल केलेले नाहीत. (07) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवाला यांचे लेखी म्हणणे, उभय पक्षकारांच्या वकीलांचा युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1) सामनेवाला विमा कंपनीने सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? --- होय. 2) तक्रारदार हा विमा रक्कम मिळणेस पात्र आहे काय ? --- होय. 3) काय आदेश ? --- शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क्र.1 :- तक्रारदारचे पती मयत प्रशांत सदाशिव पाटील यांचा शासनामार्फत व्यक्तीगत शेतकरी अपघात योजनेखाली विमा उतरविलेला होता. त्याचा विमा पॉलीसी क्र.181200/42/2008/91 असा आहे. विमा कालावधीत तक्रारदाराचे पतीचा दि.05/08/2008 रोजी दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारामध्ये जागीच मृत्यू झालेला आहे हे तक्रारदाराने दाखल केलेले वर्दी, शवविच्छेदन अहवाल, मरणोत्तर पंचनामा, मृत्यूच्या कारणाचे प्रमाणपत्र, पंचनामा, तपास टिप्पण इत्यादीवरुन दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारामध्ये जखमी होऊन त्यातच त्याचा मृत्यू झालेला आहे. तसेच दाखल इन्युरी सर्टीफिकेटवरुन तक्रारदारही जखमी झालेल्या होत्या. सबब तक्रारदाराचे पतीचा मृत्यू हा नैसर्गिक नसून अपघाती आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. अपघाती मृत्यू हा अनपेक्षीत घडणा-या घटनेमुळे होत असतो. तक्रारदाराचे विमाधारक पतीस स्वप्नातही नसेल की त्याचा गोळीबाराने मृत्यू होईल. प्रस्तुत प्रकरणी अशी कोणतीही वस्तुस्थिती दिसून येत नाही. सदरची घटना तक्रारदाराचे पतीने जाणीवपूर्वक घडवून आणले. ज्यायोगे सामनेवाला विमा कंपनीकडून विमा रक्कम मिळेल. सबब उपरोक्त विवेचनाचा विचार करता तक्रारदाराचे पतीचा मृत्यू हा अपघाती असून सदर नमुद पॉलीसी अंतर्गत तो समाविष्ट आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सामनेवालांनी प्रस्तुतचा क्लेम हा आवश्यक कागदपत्रे दाखल केले नाहीत तसेच कागदपत्रे वेळाने मिळालेमुळे म्हणजेच कट ऑफ डेट म्हणजेच दि.15/11/2008 नंतर मिळालेमुळे जी.आर.प्रमाणे प्रस्तुतचा क्लेम नाकारलेला आहे. सदर बाबींचा विचार करता शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना ही शेतक-याच्या अपघाती मृतयू तसेच अपघातामुळे येणारे अपंगत्वासाठी शासनाने सुरु केलेली योजना आहे. तसेच सदर पॉलीसीचा मूळ हेतू हा शेतक-याच्या अपघाती मृत्यूनंतर त्याचे कुटूंब उघडे पडू नये हा आहे. यातील तक्रारदार हया अडाणी, अशिक्षीत, असहाय्य विधवा आहे. तसेच सदर घटनेमुळे पतीच्या मृत्यूमुळे आलेल्या मानसिक ताणामुळे विलंब झालेला आहे. तसेच क्लेम पाठवण्यास शासकीय ऑफिसमधून कागदपत्रांची छाननी व तपासणी करुनच पाठवला जातो. याउपरही काही कागदपत्रांची आवश्यकता भासलेस तशी मागणी सामनेवाला विमा कंपनीकडून केली जाते. त्याप्रकारची मागणीची पत्रे सामनेवाला यांनी दाखल केलेली नाहीत. याउलट कबाल इन्शुरन्सला आवश्यक पार्टी केली नाही म्हणून आक्षेप घेतलेला आहे. वस्तुत: कबाल इनशुरन्स हे मध्यस्थीचे काम करतात. त्यांचेकडे आलेले क्लेम प्रस्ताव ते सामनेवाला क्र.1 कडे पाठवतात. इतकी त्यांची भूमिका मर्यादित आहे. प्रस्तुत कबाल इन्शुरन्सने कागदपत्रे पाठवलेचे दिसून येते. सबब त्यांना आवश्यक पक्षकार केले नाही म्हणून प्रस्तुत तक्रार चालणेस पात्र नाही हा मुद्दा हे मंच फेटाळत आहे. वादाकरिता त्यांना पक्षकार जरी केले असते तरी क्लेम देणेबाबत त्यांना जबाबदार धरता आले नसते. याबाबत पूर्वाधार मा. राज्य आयोग, मुंबई यांचे औरंगाबाद खंडपीठाने दि.16/03/2009 रोजी पारीत केलेला आदेश क्र.1414/2008चा आधार हे मंच आधार घेत आहे. सामनेवालांनी प्रस्तुत प्रकरणी जी.आर.दाखल केलेला नाही. शेतकरी व्यक्तीगत अपघात विमायोजनेखाली विमाधारक शेतक-याच्या अपघाती मृत्यूसाठी लाभार्थींना रु.1,00,000/- नुकसान भरपाई देणेची तरतुद आहे. तसेच जरी क्लेम कागदपत्रे कट ऑफ डेट नंतर मिळाली तरी सदर क्लेम दाखल करणेस झालेला विलंब हा कोणत्या कारणास्तव झालेला आहे. त्याचा विशेषत्वाने विचार करुन विलंब माफ करणेची तरतुद प्रस्तुत जी.आर.मध्ये आहे. सबब पॉलीसीचा मूळ हेतू विचारात न घेता तसेच प्रस्तुत जी.आर.मधील माहिती व त्याची सफलता विचारात न घेता केवळ तांत्रिक कारणास्तव तक्रारदाराचा न्याय योग्य क्लेम नाकारुन सामनेवाला यांनी सेवेत गंभीर त्रुटी ठेवली आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.2 :- सामनेवाला यांनी चुकीचे कारण देऊन तक्रारदाराचा योग्य व न्याय क्लेम नाकारला आहे. तसेच तक्रारदार या विमाधारकाच्या पत्नी असलेचे त्या बेनेफिशरी आहेत. सबब तक्रारदार विमा पॉलीसीप्रमाणे विमा रक्कम रु.1,00,000/-क्लेम नाकारले तारखे पासून ते संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के व्याजासहीत मिळणेस पात्र आहेत. मुद्दा क्र.3 :- सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदाराचा न्याय व योग्य क्लेम चुकीच्या कारणास्तव नाकारलेमुळे तक्रारदाराला झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. 2) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास विमा पॉलीसीप्रमाणे रक्कम रु.1,00,000/-(रु.एक लाख फक्त) अदा करावी. सदर रक्कमेवर दि.15/12/2009 पासून ते संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के प्रमाणे व्याज अदा करावे. 3) तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रु.1,000/-(रु. एक हजार फक्त) अदा करावेत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |