जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 656/2010. तक्रार दाखल दिनांक: 02/12/2010. तक्रार आदेश दिनांक: 30/06/2011. श्री. बलभीम महादेव पायगन, वय 40 वर्षे, व्यवसाय : शेती, रा. मु.पो. कुर्डू, ता. माढा, जि. सोलापूर. तक्रारदार विरुध्द 1. दी ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी लि., विभागीय कार्यालय क्र.1, ए.डी. कॉम्प्लेक्स, माऊंट रोड, सदर, नागपूर - 01. (समन्स/नोटीस डिव्हीजनल मॅनेजर यांचेवर बजावण्यात यावी.) 2. दी ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी लि., रा. 442, पश्चिम मंगळवार पेठ, टेलिफोन भवन समोर, चाटी गल्ली, सोलापूर. (समन्स/नोटीस डिव्हीजनल मॅनेजर यांचेवर बजावण्यात यावी.) विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ : पी.पी. कुलकर्णी विरुध्द पक्ष यांचेतर्फे विधिज्ञ : व्ही.डी. देशमुख आदेश सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य यांचे द्वारा :- 1. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, ते व्यवसायाने शेतकरी असून त्यांच्या घरगुती होस्टर्न जातीच्या गाईचा विरुध्द पक्ष (संक्षीप्त रुपामध्ये 'विमा कंपनी') यांच्याकडे रु.30,000/- रकमेचा विमा उतरविण्यात आलेला आहे. गाईच्या पॉलिसीचा क्रमांक एस.ओ.एल.पी. 107682 असून गाईस टॅग नं. ओ.आय.सी. 181100 / एस.ओ.एल.पी. 107682 देण्यात आला. तक्रारदार यांची गाय आजारी पडली आणि उपचारादरम्यान दि.4/11/2008 रोजी तिचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर गाईचे पोस्टमार्टेम करुन सर्व कागदपत्रे विमा कंपनीकडे पाठविण्यात आली. परंतु विमा कंपनीने त्यांचा विमा क्लेम प्रलंबीत ठेवून विमा रक्कम देण्यास टाळाटाळ केली आहे. तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रारीद्वारे विरुध्द पक्ष यांच्याकडून विमा रक्कम रु.30,000/- व्याजासह मिळावी आणि मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रार खर्चापोटी रु.5,000/- मिळावेत, अशी विनंती केलेली आहे. 2. विरुध्द पक्ष विमा कंपनीने रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार विमापत्रातील अटी व शर्ती स्वंयस्पष्ट असून त्या दोन्ही पक्षांवर बंधनकारक आहेत. कराराच्या अटी व शर्तीनुसार कोणताही वाद लवादाकडे सोपविला पाहिजे आणि त्याची कार्यकक्षा अकोला येथील दिवाणी न्यायालयास असल्यामुळे तक्रार मंचासमोर चालू शकत नाही, असे त्यांनी नमूद केले आहे. तसेच महाराष्ट्र पशुधन विकास महामंडळास पक्षकार म्हणून समाविष्ट न केल्याने तक्रार चालू शकत नाही. त्यांनी पुढे असे नमूद केले आहे की, तक्रारदार यांनी मूळ कव्हरनोट व कानातील बिल्ला दाखल केला नाही आणि त्यांच्या वेगवेगळया सह्या असल्यामुळे दि.9/11/2009 च्या पत्राद्वारे क्लेम नामंजूर करण्यात आला आहे. तक्रारदार यांनी विमापत्रातील अटी व शर्तींचे पालन न केल्यामुळे अटींचा भंग झाला आहे. त्यामुळे ते नुकसान भरपाई देण्यास जबाबदार नाहीत. शेवटी त्यांनी तक्रारी-अर्ज खर्चासह रद्द करण्याची विनंती केली आहे. 3. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. तक्रार चालविण्यास मंचाला अधिकारक्षेत्र प्राप्त होते काय ? होय. 2. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 3. तक्रारदार विमा रक्कम मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय. 4. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 4. मुद्दा क्र. 1:- विमा कंपनीने तक्रारदार यांच्या गाईस विमा संरक्षण दिल्याविषयी विवाद नाही. विमा कालावधीमध्ये तक्रारदार यांची गाय मृत्यू पावल्याविषयी विवाद नाही. विमा कंपनीने तक्रारदार यांचा क्लेम नाकारल्याविषयी विवाद नाही. प्रामुख्याने, गाईच्या विम्याची रक्कम तक्रारदार यांना अप्राप्त असल्याची तक्रारदार यांची प्रमुख तक्रार आहे. 5. तत्पूर्वी, विमा कंपनीने सर्वप्रथम पॉलिसी अग्रीमेंटमधील क्लॉजचा आधार घेत कराराविषयी निर्माण झालेले वाद सामंजस्याने न सुटल्यास ते लवादाकडे पाठविण्यात यावेत आणि त्याचे अधिकारक्षेत्र केवळ अकोला कोर्टास असतील, असे नमूद केले आहे. 6. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 अंतर्गत 'विमा' हा 'सेवा' या तरतुदीमध्ये अंतर्भुत आहे. तक्रारदार यांच्या गाईस विमा कंपनीने विमा संरक्षण दिलेले असल्यामुळे निश्चितच त्यांची तक्रार या मंचाच्या कार्यकक्षेत येते. मा.राष्ट्रीय आयोग व मा.राज्य आयोग यांनी अनेक निवाडयामध्ये लवादाचा क्लॉज असला तरी जिल्हा मंचाचे कार्यक्षेत्रास बाधा पोहोचत नाही, असे न्यायिक तत्व विषद केलेले आहे. त्यामुळे विमा कंपनीने उपस्थित केलेला सदर मुद्दा निरर्थक व तथ्यहीन ठरतो आणि या मंचाला तक्रारदार यांची तक्रार चालविण्यास अधिकारक्षेत्र प्राप्त होते, या मतास आम्ही आलो आहोत. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते. 7. प्रामुख्याने, तक्रारदार यांनी मूळ कव्हरनोट व कानातील बिल्ला दाखल केला नाही आणि त्यांच्या वेगवेगळया सह्या असल्यामुळे दि.9/11/2009 च्या पत्राद्वारे क्लेम नामंजूर करण्यात आल्याचे विमा कंपनीने नमूद केले आहे. 8. रेकॉर्डवर दाखल विमा पॉलिसी, क्लेम फॉर्म, पोस्टमार्टेम रिपोर्ट, व्हॅल्युएशन रिपोर्ट, कॅटल डेथ सर्टिफिकेट, ट्रीटमेंट सर्टिफिकेट, पंचनामा, सरपंच दाखला, शवविच्छेदन शुल्क पावती इ. कागदपत्रांचे अवलोकन करता, तक्रारदार यांची विमा संरक्षीत गाय मृत्यू पावल्याचे निदर्शनास येते. अशा परिस्थितीत, विमा कंपनीने अत्यंत तांत्रिक कारणे देऊन तक्रारदार यांचा विमा क्लेम नाकारला असून आणि सदर कृत्य त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी ठरते. सबब, तक्रारदार हे गाईच्या विम्याची रक्कम रु.30,000/- क्लेम नाकारल्याच्या तारखेपासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दरासह मिळविण्यास पात्र ठरतात. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 विमा कंपनीने तक्रारदार यांना विमा रक्कम रु.30,000/- दि.9/11/2009 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी. 2. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 विमा कंपनीने तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. 3. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 विमा कंपनीने उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी नमूद मुदतीत न केल्यास मुदतीनंतर एकूण देय रक्कम द.सा.द.शे. 12 टक्के व्याज दराने अदा करावी. (सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. संगिता एस. धायगुडे÷) सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/21611)
| [HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT | |