जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 713/2010. तक्रार दाखल दिनांक : 18/01/2011. तक्रार आदेश दिनांक : 08/06/2011. श्रीमती काशिबाई लक्ष्मण लाटे, वय 50 वर्षे, व्यवसाय : घरकाम व शेती, रा. घोळवेवाडी, ता. बार्शी, जि. सोलापूर. तक्रारदार विरुध्द 1. रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि., इन्फोटेक, आर.बी. मेहता मार्ग, पाटील चौक, घाटकोपर (ईस्ट), मुंबई – 400 077. (समन्स/नोटीस व्यवस्थापक यांचेवर बजावण्यात यावे.) 2. रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि., शाखा सोलापूर, सन प्लाझा, 8516/11, मुरारजी पेठ, शिवपार्वती हॉटेलसमोर, लकी चौक, सोलापूर. (समन्स/नोटीस डिव्हीजनल मॅनेजर यांचेवर बजावण्यात यावे.) 3. व्यवस्थापक, कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीसेस प्रा.लि. , 101, शिवाजी नगर, तिसरा मजला, मंगला टॉकीजजवळ, पुणे - 411 005. (नोटीस/समन्स व्यवस्थापक यांचेवर बजावण्यात यावे.) 4. तहसीलदार, तहसील कार्यालय, बार्शी. विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ : सौ. बबिता एम. महंत-गाजरे विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांचेतर्फे विधिज्ञ : श्री. राजेंद्र एम. कोनापुरे आदेश सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष यांचे द्वारा :- 1. प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारदार यांनी उपस्थित केलेला विवाद थोडक्यात असा आहे की, शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेंतर्गत त्यांचे पती लक्ष्मण लाटे (संक्षिप्त रुपामध्ये 'मयत लक्ष्मण') यांचा विरुध्द पक्ष क्र.3 (संक्षिप्त रुपामध्ये 'कबाल इन्शुरन्स') यांच्या मार्फत विरुध्द पक्ष क्र.1 व 2 (संक्षिप्त रुपामध्ये 'विमा कंपनी') यांच्याकडे रु.1,00,000/- चा विमा उतरविण्यात आलेला आहे. दि.17/6/2007 रोजी मयत लक्ष्मण हे ट्रॅक्टरवर बसून जात असताना टँकरने धडक दिल्यामुळे झालेल्या रस्ता अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर पांगरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आणि पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा, जबाब नोंदविण्यात आले. तसेच पांगरी येथील सरकारी रुग्णालयामध्ये पोस्टमार्टेम करण्यात आला आहे. त्यानंतर तक्रारदार यांनी विमा रक्कम मिळविण्यासाठी अर्ज व कागदपत्रे पाठवून दिलेली आहेत. परंतु त्यांचा क्लेम प्रलंबीत ठेवून विमा रक्कम देण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रस्तुत तक्रारीद्वारे तक्रारदार यांनी विमा रक्कम रु.1,00,000/- व्याजासह मिळावी आणि मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रार खर्चापोटी रु.5,000/- मिळावेत, अशी विनंती केली आहे. 2. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार पॉलिसी अटी प्रमाणे तक्रारदार यांनी त्यांच्याकडे एफ.आय.आर., पंचनामा, पी.एम. रिपोर्ट, पॉलिसी इ. कागदपत्रे दाखल करणे आवश्यक असून ती कागदपत्रे अप्राप्त आहेत. तक्रारदार यांनी मयत लक्ष्मण यांचा मृत्यू अपघाती असल्याचे कागदोपत्री सिध्द करणे आवश्यक आहे. तक्रारदार याची तक्रार मुदतबाह्य आहे. शेवटी त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नसल्यामुळे तक्रार खर्चासह रद्द करण्याची त्यांनी विनंती केली आहे. 3. विरुध्द पक्ष क्र.3 व 4 यांना मंचाची नोटीस बजावणी होऊनही ते मंचासमोर हजर राहिले नाहीत आणि म्हणणे दाखल केले नाही. त्यामुळे त्यांच्या विरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करण्यात आले. 4. तक्रारदार यांची तक्रार, विमा कंपनीचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होत आहेत. मुद्दे उत्तर 1. विमा कंपनीने तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 2. तक्रारदार विमा रक्कम मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय. 3. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 5. मुद्दा क्र. 1 व 2 :- महाराष्ट्र शासनाच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या शासन निर्णय क्र.पीएआयएस 1205/प्र.क्र.310/11ए, दि.7 जुलै, 2006 चे अवलोकन करता, शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेखाली विरुध्द पक्ष क्र.1 विमा कंपनीकडे सन 2006-2007 कालावधीमध्ये शेतक-यांचा प्रत्येकी रु.1,00,000/- रकमेचा अपघाती विमा उतरविल्याचे निदर्शनास येते. 6. तक्रारदार यांचे पती लक्ष्मण यांचा मृत्यू विमा कालावधीमध्ये म्हणजेच दि.17/6/2007 रोजी झाल्याचे निदर्शनास येते. रेकॉर्डवर दाखल पोलीस पेपर्स व पोस्टमार्टेम रिपोर्टचे अवलोकन करता, मयत लक्ष्मण यांना रस्ता अपघातामध्ये डोक्यास गंभीर इजा होऊन मृत्यू झाल्याचे निदर्शनास येते. तसेच रेकॉर्डवर दाखल 7/12 उता-याचे अवलोकन करता, मयत लक्ष्मण हे शेतकरी असल्याचे निदर्शनास येते. 7. विमा कंपनीच्या म्हणण्यानुसार पॉलिसी अटी प्रमाणे तक्रारदार यांनी त्यांच्याकडे एफ.आय.आर., पंचनामा, पी.एम. रिपोर्ट, पॉलिसी इ. कागदपत्रे दाखल करणे आवश्यक असून ती कागदपत्रे अप्राप्त असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. रेकॉर्डवर दाखल कागदपत्रांवरुन मयत लक्ष्मण यांचा मृत्यू रस्ता अपघातामध्ये झाल्याचे सिध्द होते. तसेच तक्रारदार यांनी पोलीस पेपर्स व पोस्टमार्टेम रिपोर्ट मंचासमोर दाखल केलेले असून जे त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. यदाकदाचित तक्रारदार यांच्याकडून सदर कागदपत्रे अप्राप्त असल्यास क्लेम सेटल करणेकामी अप्राप्त कागदपत्रे मागणी करणारा कोणताही पत्रव्यवहार विमा कंपनीने केला नसल्याचे दिसून येते. त्यामुळे निश्चितच पोलीस पेपर्स व पोस्टमार्टेम रिपोर्ट विमा कंपनीस पाठविण्यात आलेले असावेत, या अनुमानास आम्ही येत आहोत. विमा कंपनीने अत्यंत तांत्रिक कारण देऊन विमा रक्कम दिलेली नाही आणि सदर कृत्य त्यांच्या सेवेतील त्रुटी ठरते. त्यामुळे तक्रारदार विमा रक्कम रु.1,00,000/- तक्रार दाखल तारखेपासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने मिळविण्यास पात्र ठरतात, या मतास आलो आहोत. 8. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 विमा कंपनीने तक्रारदार यांना विमा रक्कम रु.1,00,000/- दि.18/1/2011 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाच्या आत द्यावी. 2. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 विमा कंपनीने तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. 3. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 विमा कंपनीने उपरोक्त आदेशाची विहीत मुदतीत न केल्यास एकूण देय रक्कम मुदतीनंतर 12 टक्के दराने अदा करावी. (सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. संगिता एस. धायगुडे÷) सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/1611)
| [HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT | |