निकालपत्र :- (दि.04/10/2011) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (01) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला त्यांचे वकीलांमार्फत हजर होऊन त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले आहे. उभय पक्षकारांचे वकीलांचा अंतिम युक्तीवाद ऐकला. सदरची तक्रार सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदाराचा योग्य व न्याय क्लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवल्यामुळे दाखल करणेत आली आहे. (02) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- तक्रारदार हे मजकूर गावचे कायमचे रहिवाशी असून त्यांची सदर गावी स्थावर व जंगम मालमत्ता आहे. तक्रारदारचे नांवची शेतजमीन असून त्यांचे शेतजमीनीचे खाते नं.392 असा आहे. सामनेवाला विमा कंपनीकडे तक्रारदाराचा शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेअंतर्गत विमा उतरविलेला होता व आहे. सदर पॉलीसीचा हप्ता शासनामार्फत सामनेवालास अदा केलेला होता. तक्रारदार यांचा मुलगा हा दि.19/04/2010 रोजी सावर्दे ते हळयाचीवाडी जाणारे डांबरी रोडने एम.एच.-09-बीइ-6693 या मोटरसायकलवरुन जात असताना रस्त्याचे कडेला असलेले ऑस्ट्रिलयन बाभळ या झाडास सदरची मोटरसायकल धडकलेने जागीच मयत झाले. त्यावेळी तक्रारदार यांचे मुलाचे शवविच्छेदन हे ग्रामीण रुग्णालय सोळांकूर येथे झालेले असून तक्रारदार यांचा मुलगा हा अपघातामुळे त्यांना झाले जखमामुळे मयत झालेबाबत दाखल दिलेला आहे. सदर अपघाताची नोंद राधानगरी पोलीस ठाणे यांचेकडे मोटर अपघात रजि.नं.20/2010 ची नोंद झाली असून त्याबाबतचा संपूर्ण तपास हा राधानगरी पोलीसांनी केलेला आहे. त्यानंतर तक्रारदार यांनी दि.28/07/2010 रोजी योगय त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन क्लेम फॉर्म भरुन तालूका कृषी अधिकारी, ता.राधानगरी जि.कोल्हापूर यांना तसेच सामनेवाला यांना रजि.पोष्टाने क्लेम फॉर्मस पाठवून विमा क्लेम रक्कमेची सामनेवालांकडे मागणी केलेली होती. त्यानंतर सामनेवाला विमा कंपनीने दि.12/11/2010 रोजीचे पत्राने मयत सुनिल यांचे वाहनधारक परवानाचे झेराक्सची मागणी केली होती. परंतु मयत सुनिल याचा वाहन चालवणेचा परवाना हा अपघाताचे वेळीच हरवलेला आहे. तक्रारदार यांनी वेळोवेळी सामनेवाला विमा कंपनीकडे क्लेमबाबत चौकशी केली परंतु सामनेवाला विमा कंपनीने आजअखेर तक्रारदार यांना क्लेमबाबत काहीही कळवलेले नाही. त्यामुळे सदरचा तक्रार अर्ज मे. मंचात दाखल करणे भाग पडले आहे. सबब तक्रारदारास विमा क्लेमची रक्कम रु.1,00,000/- द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासह तसेच शारिरीक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.5,000/- सामनेवाला यांचेकडून वसूल होऊन मिळावा अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (03) तक्रारदाराने तक्रारीच्या पुष्टीप्रित्यर्थ तक्रारदार यांचा विमा प्रस्ताव, जमीन खाते नं.392 चा 8-अ उतारा, गट नं.30 चा 7/12 उतारा, गाव नमुना 6क वारसा डायरी उतारा, सुनिल शंकर देवूळकर यांचा मृत्यू दाखला, अपघाताचा खबरी जबाब, घटनास्थळाचा पंचनामा, प्राथमिक आरोग्य केंद्र सोळांकूर यांचा दाखला, पी.एम.रिपोर्ट, मरणोत्तर पंचनामा, सामनेवाला यांचे पत्र इत्यादी कागदपत्रे दाखल केले आहे. (04) सामनेवालांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार तक्रारदाराची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारलेली आहे. तक्रारदाराची तक्रार खोटी, लबाडीची व चुकीची असून प्रस्तुतची तक्रार आहे त्यास्थितीत कायदेशिररित्या चालणेस पात्र नाही. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी. सामनेवाला पुढे असे प्रतिपादन करतात की, दि.19/04/2010 रोजी तक्रारदार यांचा मुलगा अपघातामुळे मयत झाला एवढाच मजकूर बरोबर आहे. तक्रारदाराने सामनेवालांकडे क्लेम दाखल करतेवेळी मयत श्री सुनिल शंकर देऊळकर यांचा वाहन चालविणेचा परवाना हजर केलेला नव्हता. सामनेवाला यांनी तक्रारदाराचे क्लेमची छाननी केलेनंतर मयत सुनिल शंकर देऊळकर यांचेकडे मोटारसायकल चालवणेचा वैध परवाना नव्हता असे आढळून आले. तसेचपोलीस पेपर्समध्येही मयत सुनिल शंकर देऊळकर यांचा वानह चालविणेचा परवाना नसलेचे नमुद असून त्याबाबत मोटार व्हेईकल अॅक्ट कलम 3(181) प्रमाणे गुन्हाही नोंद केलेला आहे. त्यामुळे सामनेवाला कंपनीने तक्रारदारांना दि.12/11/2010 चे पत्र पाठवून मयत सुनिल शंकर देऊळकर यांचा वाहन परवानेची मागणी केली. परंतु मागणी करुनही तक्रारदाराने सदर वाहन चालवणेचा परवाना दाखल केला नाही. त्यामुळे सामनेवाला यांना तक्रारदाराचे क्लेमबाबत कोणतीही कारवाई करणे शक्य झालेले नाही. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी व सामनेवाला यांना तक्रारदाराकडून कोर्ट खर्च देवविण्यात यावा अशी विनंती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे. (05) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेच्या पुष्टयर्थ महाराष्ट्र शासनाचा जी.आर. दाखल केलेला आहे. (06) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवालांचे लेखी म्हणणे व उभय पक्षकारांच्या वकीलांचा युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1) सामनेवाला विमा कंपनीने सेवेत त्रुटी ठेवली आहे काय? -- होय. 2) काय आदेश? -- शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क्र.1 :- तक्रारदाराचे मुलाचा विमा सामनेवालांकडे उतरविलेला होता. त्याचा पॉलीसी क्र.181200/42/2008/00091 असून क्लेम नंबर181200/42/2008/0001207 आहे. पॉलीसीबाबत वाद नाही. अपघाताबाबतसुध्दा वाद नाही. तक्रारदाराचे मुलाचा मृत्यू अपघाती झालेला आहे हे क्लेम फॉर्म, वर्दी जबाब, एफ.आय.आर. पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, शवविच्छेदन अहवाल इत्यादी दाखल कागदपत्रांवरुन निर्विवाद आहे. त्याबाबत वाद नाही. वादाचा मुद्दा उपस्थित होतो तो सामनेवाला यांनी दि.12/11/2010 चे पत्राने नमुद विमाधारकाचे लायसन्स तसेच त्याचे नांवे फेरफारची कागदपत्रे 10 दिवसांत दाखल न केलेस फाईल बंद करणेबाबत कळवलेले आहे. सदर बाबींचा विचार करता नमुद विमाधारक श्री सुनिल शंकर देऊळकर यांचा वाहन चालवताना अपघात होऊन मृत्यू झाला. मात्र त्यावेळी त्याचेजवळ वाहन चालविणेचा अधिकृत परवाना गहाळ झाला आहे हे तक्रारदाराचे कथन दाखल कागदपत्रांवरुन स्पष्ट होते. सामनेवाला यांनी दाखल केलेल्या महाराष्ट्र शासनाचा नमुद अपघात योजनेअंतर्गत जी.आर. चे अवलोकन केले असता दि.06/09/2008 च्या शासन निर्णयामध्ये 23(ई)(7) नंतर शासन शुध्दीपत्र 23(ई)(8) म्हणून नव्याने समाविष्ट करणेत येत आहे. 23 (ई) (8) “ जर शेतक-याचा मृत्यू वाहन अपघातामुळे झाला असेल व अपघातग्रस्त शेतकरी स्वत: वाहन चालवत असेल अशा प्रकरणी वैद्य वाहन चालविणेचा परवाना सादर करणे आवश्यक राहीत.” सदरची सुधारणा राज्यात सन 2008-09 करीत कार्यन्वयीत झालेच्या दिनांकापासून राहील. तक्रारदाराचे मुलाचा अपघाती मृत्यू हा दि.19/04/2010 रोजी झालेला आहे. तसेच तक्रारदाराने सामनेवालांकडे दि.28/07/2010 रोजी क्लेम फॉर्म भरुन तहसिल कार्यालयाकडे दिलेला आहे. सदर क्लेम फॉर्मसोबत 7/12 उतारा व 8-अ तसेच गांव नमुना 6-क, त्याचप्रमाणे तसेच तलाठयाचे प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांवरुन नमुद मयत सुनिल शंकर देऊळकर यांचे नांवे 40 आर एवढी जमीन होती. यावरुन तो शेतकरी होता हे निर्विवाद आहे. दाखल पोलीस पेपर, पंचनामा यावरुन त्याचा मृत्यू अपघाती झालेचे निर्विवाद आहे. मात्र अपघातावेळी वाहन परवाना गहाळ झालेमुळे त्याची सत्यप्रत अथवा मूळप्रत देता आलेली नाही. या वस्तुस्थितीचा विचार करता शासन निर्णय हा दि.06/09/2008 चे निर्णयानुसार वर नमुद सुधारीत अट क्र;23(ई)(8) समाविष्ट करणेत आलेली आहे व सदरचे शुध्दीपत्र दि.29/05/2009 रोजी प्रसिध्द करणेत आलेले आहे. प्रस्तुतचा जी.आर. सामनेवाला विमा कंपनीला प्राप्त झालेला आहे. सदर निर्णयानुसार परवाना दाखल करणे क्रमप्राप्त आहे. अशी वस्तुस्थिती असली तरी एकंदरीत वस्तुस्थिती व पुराव्याचा विचार करता वाहन चालकाच्या ताब्यात त्याचा परवाना असतो. वाहन चालकाचा मृत्यू अपघातामध्ये झालेला आहे व सदर अपघातावेळी नमुद परवाना गहाळ झालेची शक्यता नाकारता येत नाही. सदर वस्तुस्थितीचा विचार करता तक्रारदार नमुद मयत विमाधारकाचा चालक परवाना देऊ शकत नाही या वस्तुस्थितीकडे मंचाचे लक्ष वेधलेले आहे. Lex non coget ad impossibilia या तत्वाचा विचार करता The law doesnot compel anyone to do impossible thing. चा विचार करता नमुद परवाना गहाळ झाला असलेने त्याची सत्यप्रत देणे अशक्य आहे. तसेच परवाना रजिस्टर नंबरशिवाय आर.टी.ओ.कडून दुबार प्रत मिळवणेही अशक्य आहे. या वस्तुस्थितीचा विचार करता तसेच पॉलीसीचा मूळ हेतू विचारात घेता मयत विमाधारकाचा मृत्यू अपघाती झालेला आहे. अपघातावेळी त्याचेकडे वैध परवाना होता. मात्र तो गहाळ झालेने दाखल करता आला नाही ही वस्तुस्थिती विचारात न घेता सामनेवाला विमा कंपनीने विमा दावा नाकारुन सेवात्रुटी केली आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.2 :- मुद्दा क्र.1 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता तक्रारदाराचे पतीचा अपघाती मृत्यू झालेने तक्रारदार पॉलीसीप्रमाणे विमा रक्कम रु.1,00,000/- क्लेम नाकारले तारखेपासून म्हणजे दि.28/01/2009 रोजीपासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह मिळणेस पात्र आहेत. तसेच सामनेवाला यांनी सेवेत ठेवलेल्या त्रुटीमुळे तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. 2) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास पॉलीसीप्रमाणे असलेली रक्कम रु.1,00,000/-(रु.एक लाख फक्त) अदा करावी. सदर रक्कमेवर दि.12/11/2010 पासून ते संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के प्रमाणे व्याज अदा करावे. 3) तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रु.1,000/-(रु. एक हजार फक्त) अदा करावेत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |