निकालपत्र :- (दि.29/06/2011) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (01) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.1 हे त्यांचे वकीलांमार्फत हजर झाले. त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे दाखल केले आहे. सामनेवाला क्र.2 यांना नोटीस लागू होऊनदेखील ते सदर कामी हजर झाले नाहीत किंवा त्यांनी आपले लेखी म्हणणेही दाखल केले नाही. तक्रारदाराचे वकील व सामनेवाला क्र.1 यांचे वकीलांचा अंतिम युक्तीवाद ऐकला. सदरची तक्रार सामनेवाला क्र.1 विमा कंपनीने तक्रारदाराचा योग्य व न्याय क्लेम कोणताही निर्णय न देऊन सेवेत त्रुटी ठेवल्यामुळे दाखल करणेत आली आहे. (02) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- अ) तक्रारदार हे कसबा तारळे ता.राधानगरी जि.कोल्हापूर येथील कायमचे रहिवाशी असून सदर गावी त्यांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे. तक्रारदाराचे पत्नीचे नांवे शेतजमीन असून त्याचा खाते क्र.93 असा आहे. तक्रारदाराचा मुख्य व्यवसाय शेती हा आहे. यातील तक्रारदार यांचे पत्नीचा सामनेवाला क्र.1 या विमा कंपनीकडे सामनेवाला क्र.2 मार्फत शेतकरी व्यक्तीगत अपघात योजनेअतंर्गत विमा उतरविलेला होता. सामनेवाला क्र.2 हे मध्यस्थाचे काम करतात. प्रस्तुत पॉलीसीचा हप्ता शासनामार्फत अदा केलेला होता व आहे. सबब तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत. तक्रारदाराची पत्नी दि.28/5/2010 रोजी पिरळ ता.राधानगरी या गांवी दवाखान्यासाठी गेली असता ती कालव्याचे रस्त्याने चालत जात असताना अनावधानाने व अपघाताने पाय घसरुन कालव्यातील पाण्यात पडल्याने मयत झाली. तिचा शोध घेण्याचा प्रयत्न करुनही ती न मिळून आलेने राधानगरी पोलीस ठाणेमध्ये मिसींगची तक्रार दिलेली आहे. दि.31/05/2010 रोजी कुडित्रे ता.राधानगरी या गावचे कोलरांग या नावाने ओळखल्या जाणा-या कालव्यात मृत अवस्थेत आढळून आली. प्रस्तुत प्रेत कालव्यातून काढून ग्रामीण रुग्णालय राधानगरी येथे शवविच्छेदनासाठी नेले. तेथील डॉक्टरांनी तिचे मृत्यूचे कारण पाण्यात बुडून मयत झालेने असा दाखला दिला आहे. प्रस्तुत तक्रारदाराचे पत्नीचा अपघाती मृत्यू झालेने दि.15/07/2010 रोजी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन तालुका कृषी अधिका-यांमार्फत सामनेवालांकडे विमा दावा रक्कमेची मागणी केलेली होती व आहे. सदर दाव्याबाबत सामनेवाला कंपनीने अदयापही कोणताही निर्णय दिलेला नाही. तक्रारदाराने वारंवार त्यांचे कार्यालयात जाऊन चौकशी केली असता क्लेम मंजूर होईल इतकेच आश्वासन अधिका-यांनी दिले आहे. तक्रारदार हे दुर्गम भागातील गरीब शेतकरी असून त्यास कायदयाचे योग्य व पूर्ण ज्ञान नाही. प्रस्तुत विमा रक्कम मिळणे जरुरीचे आहे. सामनेवाला यांनी क्लेमबाबत निर्णय न घेऊन सेवात्रुटी केलेली आहे. त्यामुळे प्रस्तुतची तक्रार मे. मंचात दाखल करावी लागली. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह मंजूर होऊन विमा रक्कम रु.1,00,000/- द.सा.द.शे. 18 टक्के व्याजाने, मानसिक वशारिरीक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व तक्रारीचा खर्च रु.5,000/- सामनेवालांकडून वसुल होऊन मिळावेत अशी विनंती सदर मंचास केली आहे. (03) तक्रारदाराने तक्रारीच्या पुष्टीप्रित्यर्थ क्लेम फॉर्म, मयताचे नावाचा 8-अ उतारा, 7/12 उतारा, फेरफार नं.469 चा उतारा, मृत्यू दाखला, वर्दी जबाब, घटनास्थळाचा पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, मरणोत्तर पंचनामा, तक्रारदाराचा राधानगरी पोलीसांनी घेतलेला जबाब, गुरुनाथ पाटील यांचा जबाब इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (04) सामनेवाला क्र.1 यांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार प्रस्तुतची तक्रार खोटी, निरर्थक असलेने फेटाळणेस पात्र आहे. प्रस्तुतची तक्रार कायदा व वस्तुस्थितीचा विचार केल्यास चालणेस पात्र नाही. तक्रारदार हा सामनेवाला यांचा ग्राहक आहे ही बाब नाकारलेली आहे. तक्रार अर्ज कलम 2, 3, 4, 5 मधील मजकूर नाकारलेला आहे. तक्रारीस कोणतेही कारण घडलेले नाही. क्लेमसोबत असलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता पोलीस पेपर्सवरुन मयताबाबत मिसींगची क्मप्लेंट दिलेली होती. तसेच प्रस्तुतचा मृत्यू हा अपघात असल्याचा दाखविणारा कोणताही कागद प्रस्तुत कामी दाखल नाही. सबब प्रसतुत क्लेमचा विचार करता येणार नाही; तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी. सामनेवाला यांना विनाकारण खर्चात टाकलेबाबत सामनेवाला यांना तक्रारदाराकडून रक्कम रु.5,000/- देणेबाबत हुकूम व्हावा अशी विनंती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे. (05) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेच्या पुष्टयर्थ कोणतेही कागदपत्र दाखल केलेली नाहीत. (06) सामनेवाला क्र.2 यांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार सामनेवाला हे शेतकरी अपघात विमा योजना राबवणेसाठी विनामोबदला सहाय्य करतात. त्यांचे काम मध्यस्थाचे आहे. प्रस्तुत सामनेवाला हे शेतक-याकडून अथवा राज्यशासनाकडून कोणताही मोबदला घेत नाहीत अथवा विमा हप्ताही घेत नाहीत. सबब सामनेवाला हे कोणत्याही सेवात्रुटीसाठी जबाबदार नाहीत. सदर म्हणणेच्या पुष्टयर्थ मा. राज्य आयोग, मुंबई यांचे औरंगाबाद खंडपीठाने दि.16/03/2009 रोजी पारीत केलेला आदेश क्र.1414/2008 दाखल केलेला आहे. तसेच मयत इंदूबाई दिनकर पोवार रा.कसबा तारळे ता.राधानगरी जि.कोल्हापूर यांचा सदरील अपघात हा दि.28/05/2010 रोजी झाला. त्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा अधिक्षक कृषी अधिका-यांकडून सामनेवाला क्र.2 यांचे कार्यालयास दि.17/08/2010 रोजी प्राप्त झाला. सदरील दावा सामनेवाला क्र.1 यांचेकडे पुढील कार्यवाहीसाठी दि.02/09/2010 रोजी पाठवणेत आला. सदरील प्रस्तावाबाबत वारंवार विचारणा करुनही सदर प्रस्ताव सामनेवाला विमा कंपनीकडे प्रलंबीत आहे. सबब तक्रारदाराने विनाकारण खर्चात पाडलेबद्दल रक्कम रु.5,000/- देणेचा आदेश व्हावा अशी विनंती केलेली आहे. सामनेवाला क्र.2 यांनी आपल्या लेखी म्हणणेसोबत महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय क्र.शेअवि-2009/प्र.क्र.268/11-अे दि.12ऑगस्ट-2009 ची सत्यप्रत व वर नमुद मा. राज्य आयोग,मुंबई यांनी दिलेला आदेशाची प्रत प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेला आहे. (07) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवाला यांचे लेखी म्हणणे व उभय पक्षकारांच्या वकीलांचा युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1) सामनेवाला विमा कंपनीने सेवेत त्रुटी ठेवली आहे काय? -- होय. 2) काय आदेश? -- शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क्र.1 व 2:- तक्रारदाराची पत्नी ही शेतकरी असल्याने शेतकरी अपघात योजनेअंतर्गत तिचा विमा शासनामार्फत सामनेवाला क्र.1 यांचेकडे उतरविलेला होता याबाबत वाद नाही. नमुद तक्रारदाराची पत्नी मयत इंदूबाई दिनकर पोवार हिचेबाबत राधानगरी पोलीस ठाणे येथे मिसींगची तक्रार दिलेची वस्तुस्थिती निर्विवाद आहे. प्रस्तुत तक्रारदाराची पत्नी ही कुडित्रे गावचे नागरिकांकडून दि.31/05/2010 रोजी दुपारी 2 वाजता फोनवरुन मिळालेल्या माहितीनुसार सदर गावचे कॅनॉनमध्ये एक वयोवृध्द स्त्री मृत अवस्थेत पडलेली दिसली. प्रत्यक्ष जाऊन खात्री केली असता प्रस्तुत स्त्रीचे उजव्या हातावर इंदूबाई दिनकर पोवार असे नांव गोंदले असलेने सदर मयत स्त्री ही वर्दी देणार श्री उदय श्रीपती पाटील यांची मयत स्त्री ही शेजारी गावचे असलेची खात्री पटल्यावर तिचे नातेवाईक व पती, मित्रमंडळींना कळवले व पोलीस ठाणेस वर्दी देणेस आलेचे वर्दी जबाबात नमुद केले आहे. सदर वर्दी जबाबावरुन तक्रारदाराची पत्नी ही मृत अवस्थेत कुडित्रे गावच्या कॅनॉलमध्ये आढळून आलेली आहे. घटनास्थळाचा पंचनामा प्रस्तुत कामी दाखल आहे. प्रस्तुत पंचनाम्यानुसार मयत इंदूबाई या पिरळ गावी औषध आणणेस निघून गेली ती दि.31/05/2010 रोजी दुपारी 2.30 चे सुमारास कोलरंग नावाच्या कालव्यात तरंगत असलेली दिसली. सदर प्रेत सापडल्या ठिकाणचा पंचनामा केलेला आहे. शवविच्छेदन अहवालामध्ये मृत्यूचे कारण हे Wet Drowning असे नमुद केलेले आहे. मरणोत्तर पंचनामा दाखल आहे. सदर मरणोत्तर पंचनाम्यानुसार मयताचे उजव्या हातावर इंदूबाई दिनकर पोवार नांव गोंदलेले आहे. तसेच प्रस्तुत मयताचे प्रेत हे पाण्यात सापडल्याने कुजल्याचे नमुद केले आहे. पोलीसांनी दाखल केलेल्या तपास टिप्पणामध्ये तक्रारदाराचा पुतण्या हा डॉक्टर असलेने त्याचा दवाखाना पिरळ येथे आहे. तक्रारदाराचे पत्नीस बी.पी.चा त्रास व झालेल्या जाखमेवर ड्रेसींग करता जात होती. दि.28/05/2010 रोजी दवाखान्यात तब्येत दाखवून येते असे सांगून ती निघून गेली; मात्र चौकशी केली असता औषधोपचार करुन तारळे गावी जाते असे सांगू तेथून ती निघाली असे कळले. मात्र सर्वत्र चौकशी करुनही ती न मिळालेने मिसींगची तक्रार दाखल केलेचे नमुद केले आहे. वरील विस्तृत विवेचनाचा विचार करता तक्रारदाराचा मयत पत्नी ही पिरळ गावच्या कालव्याच्या रस्त्याने चालत जात असताना अनवधानाने व अपघाताने पाय घसरुन कालव्यात पडून मृत्यू पावली आहे ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. सबब तिचा मृत्यू हा अपघाती आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सामनेवाला क्र.2 यांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार तक्रारदाराने दि.28/05/2010 रोजी जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी यांचेकडून पाठविलेला प्रस्ताव दि.17/08/2010 रोजी सामनेवाला यांना प्राप्त झाला. सदरचा प्रस्ताव सामनेवाला क्र.2 यांनी पुढील कार्यवाहीसाठी दि.02/09/2010 रोजी सामनेवाला क्र.1 विमा कंपनीकडे पाठवला होता व वारंवार विचारणा करुनही प्रस्तुत प्रस्ताव प्रलंबीत ठेवलेला आहे. युक्तीवादाच्या वेळेस सामनेवालांचे वकीलांनी क्लेमसोबत अदयापही निर्णय कळवला नसलेचे मान्य केले ओह. मात्र कागदपत्रांची पूर्तता केली नसलेने क्लेमबाबत निर्णय घेतलेला नाही असे प्रतिपादन युक्तीवादाच्या वेळेस केलेले आहे. सदर युक्तीवादाचा विचार करता प्रस्तुतचा प्रस्ताव सामनेवाला क्र.1 यांना मिळाला आहे ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. तसेच प्रस्तुत प्रस्तावासोबत योग्य ते कागदपत्रे पाठवलेचे दिसून येते. सामनेवाला क्र.1 यांनी कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता करणेबाबत मागण केलेचे पत्र अथवा पुरावा प्रस्तुत प्रकरणी दिसून येत नाही अथवा कागदपत्रांची पूर्तता करणेबाबत कळवले नाही हे सामनेवालांचे वकीलांनी मान्य केले आहे. वस्तुत: दावा प्राप्त झालेपासून 90 दिवसांचे आत विमा दाव्याबाबत निर्णय घेणे व तो निर्णय संबंधीतांना कळवणे सामनेवाला क्र.1 विमा कंपनीला बंधनकारक आहे. सबब विमा दावा व त्यासोबत योग्य ती कागदपत्रे मिळूनही सामनेवाला क्र.1 या विमा कंपनीने कोणताही निर्णय घेतलेला नाही. तसेच नमुद योजनेच्या मूळ हेतूसच सामनेवाला क्र.1 यांनी हरताळ फासलेला आहे ही सामनेवाला क्र.1 यांचे सेवेतील गंभीर त्रुटी आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सामनेवाला क्र.2 यांचे काम फक्त मध्यस्थाचे आहे. त्यांचेकडे आलेला क्लेम, प्रस्ताव व कागदपत्रे त्यांनी सामनेवाला क्र.1 यांचेकडे पाठविलेला आहे. इथे त्यांची जबाबदारी संपलेली आहे. त्यांनी दाखल केलेला शासन निर्णय क्र.शेअवि-2009/प्र.क्र.268/11-अे दि.12ऑगस्ट-2009 ची सत्यप्रत व वर नमुद मा. राज्य आयोग, मुंबई यांनी दिलेला आदेशाचा विचार करता सामनेवाला क्र.2 यांना विमा रक्कम देणेसाठी अथवा सेवात्रुटीसाठी जबाबदार धरता येणार नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सामनेवाला क्र.1 यांनी प्रस्तुत तक्रारदाराचे मयत पत्नीचा विमा हप्ता स्विकारलेला आहे. ती शेतकरी आहे व तिचा मृत्यू अपघाती झालेला आहे. तसेच सामनेवाला क्र.1 यांनी केलेल्या सेवात्रुटीमुळे तक्रारदारास झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. सबब प्रसतुत पॉलीसीप्रमाणे रक्कम रु.1,00,000/-व्याजासहीत मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. प्रस्तुतचा प्रस्ताव सामनेवाला क्र.2 यांनी दि.02/09/2010रोजी सामनेवालांकडे पाठवलेला आहे. याचा विचार करता प्रस्ताव दाखल झालेपासून तीन महिन्यानंतर म्हणजेच दि.02/12/2010पासून ते संपूर्ण विमा रक्कम मिळेपर्यत द.सा.द.शे.9 प्रमाणे व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करणेत येत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. 2) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास पॉलीसीप्रमाणे असलेली क्लेम रक्कम रु.1,00,000/-(रु.एक लाख फक्त) अदा करावी. सदर रक्कमेवर दि.02/12/2010 पासून ते संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के प्रमाणे व्याज अदा करावे. 3) तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रु.1,000/-(रु. एक हजार फक्त) अदा करावेत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |