निकालपत्र :- (दि.01/03/2011) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (01) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला त्यांचे वकीलांमार्फत हजर झाले. त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे दाखल केले आहे. उभय पक्षकारांचे वकीलांचा अंतिम युक्तीवाद ऐकला. सदरची तक्रार सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदाराचा योग्य व न्याय क्लेम कोणताही निर्णय न देऊन सेवेत त्रुटी ठेवल्यामुळे दाखल करणेत आली आहे. (02) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- अ) यातील तक्रारदार या वर नमुद पत्तयावर कायमच्या रहिवाशी असून सदर गावी त्यांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे. तक्रारदार हिचे पती मयत होणेपूर्वी शेती हाच व्यवसाय करत होते. यातील सामनेवाला ही विमा कंपनी असून ती विमा व्यवसाय करते. तक्रारदार हिचे पती धोंडीराम मारुती कांबळे यांचा सामनेवाला विमा कंपनीकडे चाळकेश्वर विकास सेवा संस्था मर्या. कासारवाडा ता.राधानगरी यांचेमार्फत ‘’जनता ग्रुप इन्शुरन्स पॉलीसी’’ या योजनेअंतर्गत उतरविलेला होता. सदर पॉलीसीचा हप्ता सदर सेवा संस्थेमार्फत सामनेवालांकडे अदा केलेला आहे. ब) तक्रारदार हिचे पती कै. धोंडीराम मारुती कांबळे दि.28/02/2009 रोजी भात रोपास पाणी पाजणेसाठी गेले असता त्यांना शेतात सर्पदंश झाला त्यावेळी ते चक्कर येऊन बेशुध्द पडले. त्यावेळी त्यांना ग्रामीण रुग्णालय सोळांकुर, राधानगरी येथे अॅडमिट केले होते. परंतु उपचारापूर्वीच ते मयत झालेबाबत ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले होते व आहे. तसा मृत्यू दाखलाही तेथील डॉक्टरांनी दिलेला आहे. तसेच शवविच्छेदनही ग्रामीण रुग्णालय, सोळांकूर येथे झालेले आहे. तक्रारदार हिचे पती सर्पदंशाने मयत झालेबाबतची नोंद राधानगरी पोलीस स्टेशनल येथे अ.म.र.ण.18/2009 ची झालेली आहे. त्याबाबतचा पूर्ण तपास राधानगरी पोलीसांनी केलेला आहे. त्यानंतर तक्रारदार हिने श्री चाळकेश्वर विकास सेवा संस्था मर्या. कासारवाडा यांचे माध्यमातून दि.14/05/2009 रोजी योग्य त्या सर्व कागदपत्रांसह क्लेम फॉर्म भरुन दिलेला होता. तथापि, सामनेवाला कंपनीने तक्रारदारास आपला क्लेम मंजूरीस ठेवलेला आहे. तो मंजूर होईल अशी आश्वासने वेळोवेळी दिलेली आहेत. परंतु सामनेवाला कंपनीने तक्रारदार हिस क्लेमबाबत आजतागायत कोणत्याही प्रकारे कळविलेले नाही. क) शेवटी तक्रारदार हिने दि.23/01/2010 रोजी त्यांचे वकीलांमार्फत सामनेवाला यांना नोटीस देऊन जनता अपघात विमा योजनेअंतर्गत मिळणारे विमा क्लेमची मागणी केली. परंतु सदरची वकील नोटीस सामनेवाला यांना मिळूनही त्यांनी सदर नोटीसला उत्तर दिले नाही किंवा क्लेमही दिलेला नाही. तक्रारदार या दुर्गम भागातील असून तीला तीन लहान मुली असून अन्य कोणताही कामधंदा नाही. त्यामुळे प्रस्तुतची तक्रार मे. मंचात दाखल करणे भाग पडले. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर होऊन विमा क्लेमची रक्कम रु.1,00,000/-द.सा.द.शे.14 टक्के व्याजासह तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/-व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.3,000/-सामनेवाला यांचेकडून वसुल होऊन मिळणेबाबत आदेश व्हावा अशी विनंती सदर मंचास तक्रारदाराने केली आहे. (03) तक्रारदाराने तक्रारीच्या पुष्टीप्रित्यर्थ चाळकेश्वर विकास सेवा संस्थेने सामनेवाला कंपनीला दिलेले पत्र, तक्रारदार हिने भरुन दिलेला क्लेम फॉर्म, ग्रामीण रुग्णालय सोळांकूर ता.राधानगरी यांची राधानगरी पोलीसांना दिली वर्दी, सदाशिव मारुती कांबळे यांचा जबाब, पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा, मेडिकल सर्टीफिकेट, पी.एम.रिपोर्ट, तक्रारदाराने सामनेवाला यांना पाठविलेली वकील नोटीस, त्याची पोहोच पावती इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (04) सामनेवाला यांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार अ) तक्रारदाराची तक्रार नाकारलेली आहे. तक्रारदाराची तक्रारीचे स्वरुप पाहता मे. कोर्टात चालणेस पात्र नाही. सबब तो खर्चासह नामंजूर करणेत यावा. सामनेवाला आपल्या लेखी म्हणणेत पुढे सांगतात, तक्रार अर्जातील कलम 1 विमा कंपनी संदर्भातील व जनता ग्रुप इन्शुरन्स पॉलीसीतील संदर्भ वगळता इतर मजकूर तक्रारदाराने शाबीत करावा. सामनेवाला कंपनीस तो मान्य नाही. तक्रार अर्जातील कलम 2 मधील तक्रारदाराचे पतीचे मृत्यूबाबतचे सर्व कथन तक्रारदाराने शाबीत करावा. तक्रारदाराने हजर केलेली कागदपत्रे व पोलीस पेपर्स पाहता मयत हा कशाने व कोणत्या कारणाने मयत झाला त्या संदर्भातील घटनामध्ये विसंगती दिसून येते. तक्रारदाराचे पती कशामुळे मयत झाले हेच कळून येत नाही. त्यामुळे तक्रारदाराचा क्लेम चालणेस पात्र नाही तो कोर्ट खर्चासह नामंजूर करावा. तक्रार अर्जातील कलम 3 मधील सर्व मजकूर नाकारला आहे. सामनेवाला कंपनीने मयत धोंडीराम मारुती कांबळे याचे बाबतचा व्हिसेरा रिपोर्ट व अंतिम मृत्यू अहवाल सादर करणेबाबत वेळोवेळी तक्रारदार व नमुद सेवा संस्थेस कळवूनही त्यांनी आजअखेर सामनेवालांकडे नमुद कागदपत्रे सादर केलेली नाहीत. तक्रार अर्जातील कलम 4 व 5 मधील मजकूर वस्तुस्थितीस सोडून आहे. तक्रारदाराचे पतीचा मृत्यूचे नेमके कारण कळून येत नसलेने सामनेवाला कंपनीने सोसायटी व तक्रारदारास अॅड. एन.डी.जोशी यांचे मार्फत नोटीस देऊन तसेच दि.30/01/09, 02/03/09, 10/09/09, 06/10/09 रोजी मृत्यू कारणाचे अंतिम अहवाल व व्हिसेरा रिपोर्ट घेऊन येणेचे कळवूनही तक्रारदाराने आजअखेर कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही. यात सामनेवाला यांनी त्यांचे सेवेत कोणतीही त्रुटी केलेली नाही. ब) श्री चाळकेश्वर विकास सेवा संस्था, कासारवाडा यांचे माध्यमातून ग्रुप जनता अपघात विमा योजना सामनेवाला कंपनीकडून घेतलेली होती त्यामुळे त्यांना आवश्यक पक्षकार केलेले नाही. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज नॉन जॉईंडर ऑफ नेसेसरीज पार्टी या कायदेशीर कारणाने रद्द होणेस पात्र आहे. तसेच तक्रारदारास ब-याचवेळा पत्रे पाठवूनही तक्रारदाराने त्यांचे मयत पतीचा अंतीम मृत्यू अहवाल व व्हिसेरा रिपोर्ट हजर केला नाही. तसेच तक्रारदाराचे वकील नोटीसला सामनेवाला कंपनीच्या वकीलांनी रजि.ए.डी.ने उत्तर दिलेले आहे.त्यानंतरही तक्रारदाराने वरील संदर्भीय कागदपत्रे सामनेवालांकडे सादर केलेली नाही. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात यावी अशी विनंती सामनेवालांनी सदर मंचास केली आहे. (05) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेच्या पुष्टयर्थ तक्रारदारास सामनेवाला यांनी पाठविलेली स्मरणपत्रे दाखल केलेले आहेत. (06) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवाला यांचे लेखी म्हणणे व उभय पक्षकारांच्या वकीलांचा युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1) सामनेवाला विमा कंपनीने सेवेत त्रुटी ठेवली आहे काय? -- होय. 2) तक्रारदार विमा रक्कम मिळणेस पात्र आहे काय? -- होय. 3) काय आदेश? -- शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क्र.1 :- तक्रारदाराचे मयत पती धोंडीराम मारुती कांबळे यांचा सामनेवाला विमा कंपनीकडे जनता ग्रुप इन्शुरन्स पॉलीसी अंतर्गत विमा उतरविलेचे सामनेवालांनी लेखी म्हणणेत मान्य केले आहे. पॉलीसीबाबत वाद नाही. प्रस्तुत तक्रारदाराचे पतीचा विमा चाळककेश्वर विकास सेवा संस्था मर्या. कासारवाडा यांचेमार्फत उतरविलेला होता. तक्रारदाराचे पती दि.28/09/09 रोजी भात रोपास पाणी पाजणेसाठी गेले असता सर्पदंशाने चक्कर येऊन बेशुध्द पडले. त्यांना ग्रामीण रुग्णालय सोळांकुर राधानगरी येथे अडमिट केले. मात्र उपचारापूर्वीच मयत झाले. तक्रारदाराने दि.14/05/2009 रोजी योग्य त्या कागदपत्रांसह क्लेम फॉर्म भरुन दिला. मात्र आजतागायत क्लेम संदर्भात कोणताही निर्णय सामनेवाला विमा कंपनीने कळविलेला नाही. अशी तक्रारदाराची तक्रार आहे. याउलट सामनेवाला विमा कंपनीने आपले लेखी म्हणणेत त्यांचे वकीलांमार्फत नमुद संस्थेस नोटीस देऊन मृत्यू कारणाचे अंतिम अहवाल व व्हिसेरा रिपोर्ट घेऊन येणेबाबत कळवले. तसेच दि.30/01/09, 02/03/09, 10/09/09, 06/10/09 रोजी पत्रे पाठवूनही नमुद कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही. यामध्ये तक्रारदाराचा निष्काळजीपणा आहे. सामनेवालांची कोणतीही सेवात्रुटी नाही असे प्रतिपादन केले आहे. वरील कथनांचा विचार करता पॉलीसीबाबत वाद नाही. पॉलीसी कालावधीत नमुद विमाधारकाचा मृत्यू झाला आहे. सदरचा मृत्यू सर्पदंशाने झालेला आहे. त्याबाबत क्लेमफॉर्मसोबत वर्दी जबाब, पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, मृत्यूचा दाखला, वैद्यकीय प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे दिलेली होती. तसेच प्रस्तुत प्रकरणी दाखल केले आहे. शवविच्छेदन अहवालामध्ये मृत्यूचे कारण राखून ठेवलेचे दिसून येते. मात्र वर्दी जबाब, पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, यामध्ये नमुद विमाधारकास भात पिकास पाणी पाजत असताना सर्पदंशाने मृत्यू झाला. सदर सर्पदंश नमुद विमाधारकाचे डाव्या पायाचे घोटयाच्या आतील बाजूस झाला. उपचारापूर्वीच तो मयत झाला आहे. मरणोत्तर पंचनामा, कलम 10 क्लॉज एफ-(IV) डावा पाय सरळ असून आतील घोटयाचे पासून धोंड शिरेजवळ दोन बारीक ताज्या जखमेचे खरचटलेचे व्रण दिसत असलेचे नमुद केले आहे. कलम 13 मध्ये सदर व्रण या ठिकाणी सर्पदंश झाला असावा ही शक्यता नमुद केली आहे. शवविच्छेदन अहवाल कलम 17 मध्ये सदर डाव्या पायाचे घोटयाचे बाजूस दोन जखमांचे व्रण आढळतात. तसेच सदर व्रणामधील अंतर नमुद केले आहे. तसेच काही अवयवांचे व्हिसेरा राखून ठेवलेचे तसेच मृत्यूचे कारण राखून ठेवलेचे दाखल कागदपत्रावरुन निदर्शनास येते. वादाचा मुद्दा आहे तो मृत्यूचे अंतीम कारण व व्हिसेरा रिपोर्टची मागणीबाबत सामनेवालांनी नमुद संस्थेस वर नमुद तारखांना पत्रे पाठवलेचे नमुद केले आहे. मात्र त्यासंबंधीचे कागदपत्रे/पत्राच्या सत्यप्रती दाखल केलेल्या नाहीत. सबब सामनेवालांचे नुसते कथनावर विश्वास ठेवता येणार नाही. तसेच वरील सर्व कागदपत्रांवरुन तक्रारदाराचे पतीचा मृत्यू हा सर्पदंशाने झाला असलेचे दिसून येतो. मृत्यूचे अंतीम कारण व व्हिसेरा रिपोर्ट ही तक्रारदाराचे हातातील बाब नाही. संबंधीत पोलीस प्रक्रियेमार्फत होणा-या बाबी आहेत. दि.14/05/2009 रोजी तक्रारदाराने क्लेम मागणी केला आहे. मात्र सदर क्लेम संदर्भात सामनेवालांनी तीन महिन्याचे आत सदर क्लेम नाकारला किंवा मंजूर केला याबाबत कोणताही निर्णय तक्रारदारास कळवलेला नाही सदर क्लेम संदर्भात त्रुटींची पूर्तता केली नसेल तर त्याचा उल्लेख करुन सामनेवालांना क्लेम नाकारता आला असता मात्र सामनेवालांनी तसे कळवणेचे कष्ट घेतलेले नाहीत. तसेच वेळेत क्लेम मंजूर केला अथवा नाकारला हे कळवणेची कायदेशीर जबाबदारी सामनेवालांनी पार पाडलेली नाही. सबब सामनेवाला यांनी सेवेत गंभीर त्रुटी ठेवली आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मु्द्दा क्र.2 व 3 :- दाखल कागदपत्रे, वस्तुस्थितीजन्य पुरावा व दाखल वैद्यकीय पुराव्यावरुन तक्रारदाराचे पतीचा मृत्यू हा सर्पदंशाने झालेचे निदर्शनास येते. सबब पॉलीसीचा मूळ हेतू तसेच वस्तुस्थितीजन्य वैद्यकीय पुरावा याचा विचार करता तसेच दाखल कागदपत्रे, पोलीस पेपर्सवरुन सदर मृत्यू हा नैसर्गिक नसून तो अपघाती दिसून येतो. तसेच सदर केस आत्महत्येची नाही. सबब सदर मृत्यू हा नैसर्गिक नाही अशी वस्तुस्थिती निदर्शनास येते.अशी वस्तुस्थिती असतानाही सामनेवालांनी सदर क्लेमबाबत कोणताही निर्णय न देऊन सेवात्रुटी केली आहे. वस्तुत: क्लेम दाखल झालेनंतर किमान तीन महिन्याच्या आत क्लेमबाबतचा निर्णय कळवणे कायदयाने अपेक्षीत आहे. याचा विचार करता तक्रारदार पॉलीसीप्रमाणे विमा क्लेम रक्कम रु.1,00,000/- व क्लेम दाखल केलेपासून म्हणजे दि.14/05/2009 पासून तीन महिन्यानंतर म्हणजेच 14/08/2009 पासून ते संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत व्याजासह मिळणेस पात्र आहेत. तसेच सामनेवाला यांनी सेवेत ठेवलेल्या त्रुटीमुळे तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. 2) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास पॉलीसीप्रमाणे असलेली क्लेम रक्कम रु.1,00,000/-(रु.एक लाख फक्त) अदा करावी. सदर रक्कमेवर दि.14/08/2009 पासून ते संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के प्रमाणे व्याज अदा करावे. 3) तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रु.1,000/-(रु. एक हजार फक्त) अदा करावेत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |