नि का ल प त्र :- (दि.19.07.2011) (द्वारा-श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तिवाद केला. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, तक्रारदार यांची मयत कमलाबाई रामचंद्र शिंत्रे यांची शासनामार्फत ’शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजने’ अंतर्गत पॉलिसी उतरविलेली आहे. सदरच्या पॉलिसीचा क्र. 181200/48/2009/1345 असा आहे. पॉलिसीच्या कालावधीत दि. 13/06/2008 रोजी संध्याकाळचे वेळेस तक्रारदारांची आई कमलाबाई रामचंद्र शिंत्रे या घरामध्ये स्वयंपाक करीत असताना चिमणी दिवा अंगावर पडून त्या 80 टक्के इतक्या गंभीररित्या जखमी झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. सर्व आवश्यक कागदपत्रांसह सामनेवाला विमा कंपनीकडे क्लेम केला असता दि. 31/03/2009 रोजी ’मानसिक असंतुलन व पूर्वीपासून चालत आलेली बिमारी या पॉलिसी अंतर्गत कव्हर होत नाही’ या कारणास्तवक्लेम नाकारला आहे. तक्रारदार पुढे सांगतात की, तक्रारदारांची आई मयत कमलाबाई रामचंद्र शिंत्रे यांचे मानसिक संतुलन सर्वसाधारण माणसासारखेच होते. त्या दैनंदिन कामे व्यवस्थित पार पाडत होत्या. चुकीचे कारण देऊन क्लेम नाकारला आहे. सबब, विमा रक्कम रु. 1,00,000/- द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासहीत मिळावी, मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 25,000/- व तक्रारीचा खर्च रक्कम रु. 3,000/- देणेबाबत आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे. (3) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत तक्रारदारानी विमा कंपनीने दि. 31/03/2009 रोजीचे विमा क्लेम नाकारलेल्या पत्राची प्रत दाखल केली आहे. (4) सामनेवाला विमा कंपनीने त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने नाकारलेली आहेत. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, मयत कमलाबाई रामचंद्र शिंत्रे यांचा भाजून अपघाती मृत्यू झाला असून पोलिस स्टेशनमधील एफ.आय.आर. मध्ये मयत कमलाबाई रामचंद्र शिंत्रे यांचे दोन वर्षा पूर्वीपासून मानसिक संतुलन ढळलेले होते व कृपामाई हॉस्पिटल, मिरज येथे उपचार घेत होत्या. त्यांना मानसिक असंतुलनाचा झटका आलेला होता. व त्यामध्येच गॅसवर दुध गरज करत असताना साडीस आग लागून भाजलेल्या आहेत असे नमूद आहे. तक्रारदार सांगतात त्याच्यापेक्षा वेगळी घटना पोलिस स्टेशनकडील अपघाताच्या स्टेटमेंटमध्ये नमूद केलेली आहे. उपरोक्त कारणास्तव तक्रारदारांचा क्लेम नाकारला आहे. सामनेवाला कंपनीची कोणतीही सेवा त्रुटी नाही व तक्रारदारांचा तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा अशी विनंती केली आहे. (5) सामनेवाला यांनी त्यांच्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ सामनेवाला यांनी पाठविलेले पत्र, श्री. आनंदा जानबा शिंत्रे याचा जबाब वर्दी एफ.आय.आर., इन्क्वेस्ट पंचनामा, पोलिसानी सिव्हील सर्जन यांना पाठवलेला पोलिस रिपोर्ट इत्यादीच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. 6) या मंचाने दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकला व उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केलेले आहे. प्रस्तुत प्रकरणी पोलिस स्टेशनकडील दिलेला वर्दी जबाब व पंचनामा इत्यादीचे अवलोकन केलेले आहे. प्रस्तुत प्रकरणातील वस्तुस्थितीचे अवलोकन केले असता तक्रारदारांच्या आई कमलाबाई रामचंद्र शिंत्रे यांचा मृत्यू हा स्वयंपाक घरात काम करीत असताना साडीच्या पदरास आग लागू भाजून मृत्यू झालेला आहे. ही वस्तुस्थिती या मंचाचे निदर्शनास येत आहे. सदरचा मृत्यू हा अपघाती मृत्यू या सदरात येतो. सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांचे आईचे मानसिक असंतुलन ढळलेले आहे त्यांना वेडाचे झटके येत होते असे कारण देऊन विमा क्लेम नाकारला आहे. कोणताही तपास केलेला नाही. कोणत्याही मेडीकल पेपर्स वरुन निष्कर्ष काढलेला नाही. तक्रारदारांच्या आईचा झालेला मृत्यू हा अपघाती मृत्यू आहे. व सदरचा अपघाती मृत्यू ’शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजने’ अंतर्गत कव्हर होत आहे ही बाब विचारात घेणे आवश्यक आहे. सबब, त्या पध्दतीने तक्रारदारांचा क्लेम विचारात घेऊन क्लेम रक्कम न दिल्याने सामनेवाला विमा कंपनीच्या सेवेत त्रुटी झालेली आहे असा निष्कर्ष हे मंच काढीत आहे. तक्रारदार हे व्याजाची रक्कम मिळण्यास पात्र असल्याने मानसिक त्रासापोटी रक्कम देण्यात आलेली नाही. सबब, आदेश. - आ दे श - 1. तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते. 2. सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांना क्लेम रक्कम रुपये 1,00,000/- (अक्षरी रुपये एक लाख फक्त) द्यावी. तसेच, सदर रक्कमेवर दि.31.03.2009 पासून संपूर्ण रक्कम अदा होईपावेतो द.सा.द.शे.9 टक्के प्रमाणे व्याज द्यावे. 3. सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांना तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 1,000/- (अक्षरी रुपये एक हजार फक्त) द्यावेत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |