निकालपत्र
निकाल दिनांक – २५/०२/२०२१
(द्वारा मा.सदस्य : श्री.महेश निळकंठ ढाके)
___________________________________________________________
१. तक्रारदाराने सदर तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा १९८६ चे कलम १२ अंतर्गत दाखल केलेली आहे. तक्रारदार हे गरीब शेतकरी कुटुंबामधील असुन राहणार बक्तरापुर, ता. शेवगाव जिल्हा अहमदनगर येथील रहिवासी आहे. तक्रारदाराचे पती हे शेतकरी होते. तक्रारदार हिचे मयत पतीचा सामनेवाले कंपनीकडे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमा उतरविला होता. सदरील विमा पॉलिसीचा कालावधी सन २०१६-२०१७ असा होता. पॉलिसीचे नियमानुसार विमेधारकाचा अपघाती मृत्यु झाल्यास किंवा दोन्ही अवयव्य गेल्यास रक्कम रूपये २,००,०००/- किंवा १ हात एक पाय किंवा एक डोळा गेल्यास रक्कम रूपये १,००,०००/- नुकसान भरपाई देण्याची तरतुद आहे. दिनांक १९-०९-२०१७ रोजी संध्याकाळी ५ वाजता तक्रारदार हिचे पती विश्वनाथ जनार्धन कर्डीले वय ५५ हे त्यांचे शेतातील कापसावर जंतुनाशक फवारणी करीत असतांना अपघाताने जंतुनाशक त्यांचे शरीरात गेले व त्यांचा अपघाती मृत्यु झाला. त्यानंतर ग्रामीण रूग्णालय शेवगाव येथील पोलीस स्टेशन येथे घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला व सदर खबर सी.आर.पी.सी. १७४ प्रमाणे नोंदविण्यात आली व पोलीसांमार्फत स्पॉट पंचनामा करण्यात आला. तक्रारदार यांनी तिचे मयत पतीचे कायदेशीर वारस म्हणुन संपुर्ण कागदपत्रांसहीत तिचा विमा दावा सामनेवाले विमा कंपनीकडे सादर केला. त्यानंतर सामनेवाले यांनी दिनांक ०१-१०-२०१८ रोजी पत्र पाठवुन तक्रारदार हिचा विमा दावा तक्रारदार हिचे मयत पती यांचा व्हिसेरा अहवालावरून त्याचे शरीरात कुठल्याही प्रकारची विषबाधा आढळुन आली नाही, या कारणास्तव विमा दावा नामंजुर केला. अशा प्रकारे चुकीचे कारणाचे तक्रारदार हिचे पतीचा विमा दावा नामंजुर केल्यामुळे तक्रारदार हिने आयोगात तक्रार दाखल करून परिच्छेद क्रमांक १० प्रमाणे मागणी केलेली आहे.
तक्रारदार हिने तिचे तक्रारीसोबत निशाणी १२ वर दस्तऐवज यादीप्रमाणे नामंजुरीचे पत्र, क्लेम फॉर्म, सातबारा उतारा, मृत्यू प्रमाणपत्र, पोलीस स्टेशनचा रिपोर्ट, स्पॉट पंचनामा, पोस्ट मार्टम रिपोर्ट, रेशन कार्ड, निवडणुक ओळखपत्र यांचे छायांकीत प्रती दाखल केलेल्या आहेत.
२. तक्रारदार हिची तक्रार दाखल करण्यात आली, त्यानुसार सामनेवाले यांना नोटीस काढण्यात आली. सामनेवाले यांनी त्यांचा खुलासा निशाणी ६ वर दाखल केलेला आहे. त्यात सामनेवालेने तक्रारदा हिचे पती मयत विश्वनाथ जनार्धन कर्डीले यांनी दिनांक ०१-१२-२०१६ ते ३०-११-२०१७ या कालावधीसाठी पॉलिसी घेतली होती. परंतु सदरची विमा पॉलिसीची रक्कम ही शारीरिक जखम ही अपघातातुन झाली असल्यास अथवा बाहेरील हिंसेमुळे झाली असल्यास व सदरील जखम दिसत असल्यास व त्यात एखादा अवयव निकामी झाला असल्यास तसेच अपघातात मृत्यु झाल्यास शेतकरीचे वारसांना रक्कम रूपये २,००,०००/- आणि शारीरिक अवयव निकामी झाल्यास रक्कम रूपये १,००,०००/- यासाठी दिली जाते. तक्रारदार हिचा विमा दावा हा विमा कंपनीचे अटी शर्तीनुसार योग्यरित्या नाकारला आहे, असे सामनेवालेने कथन केले आहे. तसेच तक्रारदार हिने तालुका कृषी अधिकारी यांचेकडे तक्रार हिचे मयत पतीचा विमा दावा शपथपत्र, क्लेम फॉर्म, कागदपत्र, सातबारा उतारा, ८-अ, मृत्यु प्रमाणपत्र, घटनास्थळ पंचनामा, पोस्ट मार्टम रिपोर्ट या कागदपत्रांसह दाखल केला होता. तालुका कृषी अधिकारी यांनी सदरचा विमा दावा सामनेवाले विमा कंपनीकडे दिला होता. सामनेवाले कडे उपलब्ध कागदपत्रांसह सामनेवाले यांनी विमा दाव्याची पडताळणी केली असता, मृत्युचे कारण या कॉलममध्ये ' cardio-respiratory arrest due to asphyxia due to unknown poison.’ असे कारण दिलेले आहे. तसेच व्हिसेरा व रक्ताचे नमुना रासायनीक तपासणीसाठी पाठविला आहे. तक्रारदार हिला विमा दाव्याचे पुर्ततेसाठी व्हिसेरा रिपोर्ट सामनेवालेकडे दाखल करण्याकरीता सांगितले. तक्रारदार यांनी व्हिसेरा रिपोर्ट सादर केला, त्यानुसार न्यायवैद्यीक प्रयोगशाळा नाशिक यांनी यांनी अपघातात मृतकाचे शरीरात जंतुनाशक औषधे फवारतांना गेली असा कुठल्याही प्रकारचा पुरावा नसल्याने दिनांक ०१-१०-२०१८ रोजीचे पत्रानुसार विमा दावा नाकारला आहे, असे म्हटले आहे. सामनेवाले यांनी कोणतीही त्रुटी केलेली नाही. सामनेवाले यांनी सदरचा विमा दावा योग्य कारणाने नाकारला आहे. सामनेवाले यांनी कुठलीही त्रुटी दिलेली नाही किंवा कुठल्याही प्रकारचा अनुचीत व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला नाही. तक्रारदाराची तक्रार खारीज करण्यात यावी, अशी विनंती सामनेवाले यांनी केलेली आहे.
३. तक्रारदार हिने दाखल दाखल केलेले कागदपत्र, शपथपत्र त्यांनी दाखल केलेला लेखी युक्तिवाद तसेच सामनेवाले यांनी दाखल केलेली कैफीयत, त्यांनी दाखल केलेले कागदपत्र, युक्तिवाद व तक्रारदार यांनी दाखल केलेले न्याय निवाडे यांचे अवलोकन केले असता खालील मुद्दे विचारात घेण्यात येत आहेत.
अ.नं. | मुद्दे | निष्कर्ष |
(१) | तक्ररादार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? | होय |
(२) | सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सेवेत त्रुटी दिली आहे काय ? | होय |
(३) | तक्रारदार नुकसान भरपाईची रक्कम मिळणेस पात्र आहे काय ? | होय |
(४) | आदेश काय | अंतिम आदेशा प्रमाणे |
कारणमिमांसा
४. मुद्दा क्र. (१) : तक्रारदार हिचे मयत पती विश्वनाथ जनार्धन कर्डीले यांचा सामनेवाले यांच्याकडे शासनाच्या निर्णयानुसार गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा रक्कम रूपये २,००,०००/- उतरविला होता, ही बाब सामनेवाले यांना मान्य आहे, यावरून तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहे, असे सिध्द होते. सबब मुददा क्र.१ चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
५. मुद्दा क्र. (२ व ३) - तक्रारदार हिचे मयत पतीचा विमा कालावधीत दिनांक १९-०९-२०१७ रोजी संध्याकाळी ५ वाजता कपाशीवर फवारणी करत असतांना किटक नाशक अपघातामुळे त्यांचे शरीरात गेल्याने तक्रारदाराचे पती विश्वनाथ जनार्धन कर्डीले यांचा मृत्यु झाला. त्यानंतर त्यांचे पोस्टमार्टम रिपोर्ट शेवगाव ग्रामीण रूग्णालयात करण्यात आले व सदर खबर सी.आर.पी.सी. १७४ प्रमाणे शेगाव पोलीस स्टेशन येथे नोंदविण्यात आली. तक्रारदार हिने संपुर्ण कागदपत्रांसह तालुका कृषी अधिकारी तथा नोडल ऑफीसर यांचेमार्फत सामनेवाले विमा कंपनीकडे सादर केला.
तक्रारदार हिने हिचे तक्रारीतील कथनाला सामनेवालेने त्यांचे कैफीयतीत असे उत्तर दिलेले आहे की, तक्रारदार यांचे मयत पती विश्वनाथ जनार्धन कर्डीले यांचा विमा दवा विमा पॉलिसीचे अटी व शर्तीनुसार तक्रारदार हिने दाखल केलेला विमा दावा हा लागु होत नाही. सामनेवालेने तक्रारदार हिचा विमा दावा दिनांक ०१-१०-२०१८ रोजी पत्र पाठवुन व्हिसेरा रिपोर्टमध्ये विषाबाबतचा उल्लेख नाही. तसेच व्हिसेरा रिपोर्ट आणि निशाणी ८ सोबत दाखल रासायनीक नयावैद्यक प्रयोगशाळा, नाशिक यांचे अहवालातील अनुक्रमांक १,२,३ आणि ४ यात कुठल्याही प्रकारचा विषाचा अंश आढळुन आला नाही, म्हणुन हे दाखवुन तक्रारदार हिचा विमा नाकारला. सदर विमा दावा योग्य रितीने नामंजुर केला आहे, असे सामनेवालेने म्हटले आहे.
तक्रारदाराने सदर प्रकरणात पुढील न्यायनिवाडे दाखल केले आहे.
- Maharashtra Consumer Dispute Redressal Commission, Mumbai Circuit Bench at Aurangabad First Appeal No.641/2015 Chhaya Mohan Devade V/s The New India Assurance Co. Ltd.
- National Cnsumer Dispute Redressal Commission, New Delh Revision Petition No.4081/2012
National Insurance Company Ltd. Vs. Bela Mahajan &Anr.
सदर न्यायनिवाडे या तक्रारीस लागू होत नाही, असे आयोगाचे मत आहे तक्रारदाराने दाखल केलेल्या कागदपत्रांवरून तसेच त्यांनी केलेल्या युक्तिवाद यावरून व नमुद कारणांवरून व परिच्छेद १ व २ चे विवेचेनावरून सामनेवालेने तक्रारदाराचा विमा दावा योग्य कारण नसतांना नाकारला आहे. तसेच तक्रारदाराने दाखल केलेला सातबारा उतारा गट क्रमांक २०४/१ वरून व दाखल केलल्या कागदपत्रांवरून मयत विश्वनाथ जनार्धन कर्डीले हे शेतकरी होते, ही बाब सिध्द होते. तसेच तक्रारदाराने दाखल केलेली खबर रिपोर्ट त्याच प्रमाणे स्पॉट पंचनामा व मरणोत्तर पंचनामा, कागदपत्रांचे अवलोकन केले. तसेच पोस्ट मार्टम रिपोर्टमध्ये ‘cardio-respiratory arrest due to asphyxia due to unknown poison’ असे म्हटले आहे. त्यावरून तक्रारदार हिचे मयत पतीचा मृत्यु हा कपाशीवरील किटक नाशक फवारणी करीत असतांना अनावधानाने किटक नाशक पोटात गेल्याने विषबाधा होऊन तक्रारदार हिचे पतीचा मृत्यु झाला आहे. वरील सर्व विवेचनावरून हा एक अपघात आहे, असे आयोगाचे मत आहे. तक्रारदार हिचा विमा दावा अयोग्य कारणाने नाकारून सामनवाले यांनी तक्रारदार हिस द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे. तक्रारदार ही सामनेवालेकडुन विमा दावा रक्कम रूपये २,००,०००/- व्याजासह मिळणेस पात्र आहे व तक्रारदार ही सामनेवालेकडुन शारीरिक, मानसिक त्रास तसेच नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहे व तक्रारीचा खर्च मिळणेस पात्र आहे, असे आयोगाचे मत आहे. त्यामुळे मुद्दा क्रमांक २ व ३ चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
६ मुद्दा क्र. (४) : मुद्दा क्रमांक १, २ व ३ वरील विवेचनावरून खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
आदेश
१. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे. |
२. सामनेवाले यांनी तक्रारदारास विमा दाव्याची रक्कम रूपये २,००,०००/- (अक्षरी दोन लाख मात्र) व त्यावर विमा दावा नामंजुर दिनांक ०१-१०-२०१८ पासून संपुर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे. ९ टक्के दराने व्याज द्यावे. |
३. सामनेवाले यांनी तक्रारदार हिस शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल रूपये ७,०००/- (अक्षरी सात हजार) व सदर तक्रार अर्जाचा खर्च रूपये ३,०००/- (अक्षरी तीन हजार) द्यावा. |
४. वर नमूद आदेशाची पुर्तता सामनेवाले यांनी आदेशाची प्रत मिळण्यापासून ३० दिवसाच्या आत करावी. |
५. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्क देण्यात यावी. |
६. तक्रारदार यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी. |