निकालपत्र :- (दि.03/01/2011) (सौ.प्रतिभा जे.करमरकर,सदस्या) (1) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:-तक्रारदाराचे मयत पती श्री बाबुराव दत्तात्रय शिंदे यांनी प्राथमिक शिक्षक बँकेमार्फत सामनेवाला विमा कंपनीकडे JPA अंतर्गत विमा पॉलीसी उतरवली होती. सदर पॉलीसीचा क्र.161600/47/2009/602 असा आहे. सदर पॉलीसीच्या कालावधीत दि.28/05/2008रोजी सायंकाळी तक्रारदारचे पती बाबुराव दत्तात्रय शिंदे हे स्वत:चे राहते घरात जिन्यावरुन खाली पडलेने त्यांचे डोक्यास गंभीर मार लागला. त्यामुळे त्यांना त्वरीत सिटी हॉस्पिटल,कोल्हापूर येथे उपचार सुरू केले. परंतु तक्रारदाराचे पतीचा सदर औषधोपचारास कोणताच प्रतिसाद मिळत नसलेने त्यांना दि.10/6/2008 रोजी घरी आणले असताना ते दि.11/0/2008 रोजी मयत झाले. त्याबाबत यांनी गावातील मेडिकल ऑफिसर यांना घरी बोलाविले तेव्हा सदर मेडिकल ऑफिसर यांनी मयत बाबुराव दत्तात्रय शिंदे यांची तपासणी करुन मृत्यू दाखला तक्रारदारांना दिला. तदनंतर तक्रारदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह सामनेवाला विमा कंपनीकडे न्याययोग्य क्लेम दाखल केला असता सामनेवाला यांनी दि.31/10/2008 रोजी तक्रारदारच्या पतीचा मृत्यू हा अपघाती नसुन आजाराने झालेला आहे व पोस्ट मार्टेम रिपोर्ट नाही अशा चुकीच्या कारणाने नाकारलेला आहे.सामनेवाला यांनी तक्रारदाराचा न्याययोग्य क्लेम बेजबाबदारपणे नाकारला आहे व ही सामनेवालांच्या सेवेतील गंभीर त्रुटी आहे. म्हणून त्याविरुध्द दाद मागण्यासाठी प्रस्तुत तक्रारदाराने सदर तक्रार नोंदवली आहे. सामनेवालांकडून विमा क्लेमची रक्कम रु.1,00,000/-द.सा.द.शे.18व्याजासहीत मिळावी तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/-,व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.2,000/- सामनेवालांकडून वसुल होऊन मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (03) तक्रारदाराने आपल्या तक्रारीसोबत सामनेवाला यांचे क्लेम नाकारलेचे पत्र, पोलीस रिपोर्ट, ट्रिटमेंट समरी, प्राथमिक मेडिकल ऑफिसर यांचे सर्टीफिकेट इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (04) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेमध्ये तक्रारदाराने प्राथमिक् शिक्षक बँक कोल्हापूर यांचेमार्फत सदरहू जनता अपघात विमा पॉलीसी उतरवली आहे. त्यामुळे त्यांना सदर तक्रारीमध्ये आवश्यक पार्टी म्हणून घेणे आवश्यक होते. तक्रारदाराने तसे न केल्यामुळे प्रस्तुत तक्रारीस नॉन जॉइन्डर ऑफ नेसेसरी पार्टीज ची बाधा येते. सबब या कारणाने तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी विनंती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे. सामनेवाला आपल्या लेखी म्हणणेत पुढे असे सांगतात की, मयत बाबुराव दत्तात्रय शिंदे यांचा मृत्यू त्यांचे राहते घरी अपघाताने झालेला नसून आजाराने झालेला आहे. त्यांचे पोसट मार्टेमही झालेले नाही. त्यामुळे तक्रारदाराचा क्लेम कायदयाने चालण्यास पात्र नाही. त्यामुळे सामनेवालांने पूर्ण विचार करुन व योग्य कारणानेच तक्रारदाराचा क्लेम नामंजूर केला आहे व त्यामध्ये सामनेवालांच्या सेवेमध्ये कुठलीही त्रुटी नाही. त्यामुळे तक्रारदाराची तक्रार खर्चासह काढून टाकावी अशी विंनती सामनेवालाने सदर मंचास केली आहे. (05) सामनेवालांनी आपल्या लेखी म्हणणेसोबत कोणतेही कागदपत्र दाखल केलेले नाहीत. (06) या मंचाने दोन्ही बाजूंच्या वकीलांचे युक्तीवाद ऐकले. तसेच त्यांनी दाखल केलेले कागदपत्रही तपासले. (07) सामनेवालाने तक्रारदाराची विमा पॉलीसी मान्य केली आहे. त्यामुळे तक्रारदार हे सामनेवालांचे ग्राहक आहेत हे निर्विवाद आहे. तक्रारदाराची प्राथमिक शिक्षक बँक कोल्हापूर या संस्थेविरुध्द कुठलीही तक्रार नाही.सदर संस्थेमार्फत तक्रारदाराने पॉलीसी उतरवल्याचे सामनेवालाने अमान्य केलेले नाही. त्यामुळे सदर संस्थेला पार्टी न केल्यामुळे नॉन जॉइन्डर ऑफ नेसेसरी पार्टीज ची बाधा सदर तक्रारीस येते हे सामनेवालांचे कथन हे मंच ग्राहय धरु शकत नाही. (08) तक्रारदाराच्या मयत पतीचा मृत्यू राहत्या घरी झाला हे खरे असले तरी सदर मृत्यू आजाराने झाला नसून तो जिन्यावरुन पडून अपघाताने झाल्यामुळे आहे. याबद्दल तक्रारदाराने पोलीस डायरीतील दि.29/05/2008 ची नोंद दाखल केली आहे. सिटी हॉस्पिटल, कोल्हापूर येथील ज्या डॉक्टरांनी त्याला अडमिट करुन घेतले त्यांनी अडमिशनच्या वेळी मयत बाबुराव शिंदे यांच्या परिस्थितीचे वर्णन केले आहे.” Patient unconscious locked jaw.” तसेच C T scan चा रिपोर्ट इत्यादीचा उल्लेख त्यामध्ये आहे. त्या सर्वावरुन मयत बाबुराव शिंदे हे अपघातामुळे जायबंदी होऊनच सिटी हॉस्पिटल येथे अडमिट झाले होते हे स्पष्ट होत आहे.त्यामुळे विमाधारकाचा मृत्यू जरी राहत्या घरी झाला असला तरी तो अपघाताने झाला नाही हे सामनेवालांचे कथन हे मंच ग्राहय धरु शकत नाही.तसेच पोस्ट मार्टेम रिपोर्ट व FIR हे केवळ अपघात सिध्द करण्यासाठी आवश्यक असतात. केवळ पोसट मार्टेम केले नाही म्हणून मयत बाबुराव शिंदेंचा मृत्यू नैसर्गिक आजाराने झाला हे सामनेवालांचे कथन अग्राहय आहे. त्यामुळे वरील सर्व बाबींचा विचार करता तक्रारदाराचा क्लेम नामंजूर करण्यात सामनेवालांची निश्चित सेवात्रुटी झाली आहे अशा निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब हे मंच पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. 2) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास विमा क्लेमची रक्कम रु.1,00,000/-(रु.एक लाख फक्त) अदा करावी. सदर रक्कमेवर दि.31/10/2008 पासून ते संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के प्रमाणे व्याज अदा करावे. 3) सामनेवाला यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चा पोटी रु. 1,000/-(रु.एक हजार फक्त) अदा करावेत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |