निकालपत्र :- (दि.03/01/2011) (सौ.प्रतिभा जे.करमरकर,सदस्या) (1) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- यातील तक्रारदाराचे पती मयत लक्ष्मण ज्योती जाधव यांनी श्री जय हनुमान विकास सेवा सोसायटी, हाजगोळी ता.आजरा मार्फत सामनेवाला विमा कंपनीकडे JPAअतंर्गत विमा पॉलीसी उतरवली होती.सदर पॉलीसीचा नं.161600/47/2008/ 3526 असा आहे. सदर पॉलीसीच्या कालावधीत दि.25/06/2009 रोजी सायंकाळी तक्रारदाराचे पती लक्ष्मण ज्योति जाधव हे शेतामधून बैल जोडीची खंदाडी घेऊन येत असताना बैल अचानक उधळल्याने बैलाचा कासरा हातातून सुटून त्यांचा पाय कुळवाचे दांडीत अडकलेने ते ब-याच दुरपर्यंत बैलांमागून फरफटत गेले. त्यामुळे ते अत्यंत गंभिररित्या जखमी झाले. त्यांना गडहिंग्लज येथील दवाखान्यात नेणेत आले. त्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर झालेने त्यांना सिटी हॉस्पिटल,कोल्हापूर येथे उपचाराकरिता आणले. तक्रारदार यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून मुलगा मतिमंद आहे. औषधोपचाराचा भरमसाठ खर्च तक्रारदारांचे आवाक्याबाहेरचा होता तरीदेखील शक्य तितके उपचार लक्ष्मण ज्योति जाधव यांचेवर सुरु होते. परंतु औषधोपचारास त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे दि.27/6/2009 रोजी त्यांना घरी आणले व त्यांना पुन्हा दि.28/6/2009 रोजी गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु ते दि.29/06/2009 रोजी सदर अपघाती दुखण्यामूळे मयत झाले. तक्रारदाराने त्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रांसह सामनेवाला विमा कंपनीकडे क्लेम दाखल केला. परंतु सामनेवाला विमा कंपनीने दि.24/06/2010 रोजी पोस्ट मार्टेम रिपोर्ट, इन्क्वेस्ट पंचनामा तसेच डिस्चार्ज सर्टीफिकेट नाही अशा केवळ तांत्रिक व चुकीच्या कारणांनी तक्रारदाराचा न्याययोग्य क्लेम नामंजूर केला आहे. ही सामनेवालांच्या सेवेतील गंभीर त्रुटी असून त्याविरुध्द दाद मागण्यासाठी तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे व सामनेवालांकडून क्लेमची रक्कम रु.1,00,000/- द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासहीत तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/-,व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.2,000/- सामनेवालांकडून वसुल होऊन मिळावी अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (02) तक्रारदाराने आपल्या तक्रारीसोबत सामनेवाला यांचे क्लेम नाकारलेचे पत्र, पोलिस वर्दी सिटी हॉस्पिटल, मेडिकल ऑफिसर,जिल्हा(उप) हॉस्पिटल, गडहिंग्लज यांचा रिपोर्ट, पोलीस स्टेशन दवाखाना नोंद डायरी आदेश, दवाखाना वर्दी पाठविणेबद्दल, राजारामपूरी पोलीस स्टेशन रिपोर्ट, रुग्णालयातील मृत्यूबाबत प्रमाणपत्र, भैरु लक्ष्मण जाधव यांचा जबाब, पंचनामा व इतर जबाब इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (03) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेमध्ये तक्रारदाराचा विमा पॉलीसी मान्य केली आहे. तथापि, ज्या हनुमान विकास सोसायटीमार्फत विमा पॉलीसी उतरवली त्यांना सदर कामात पार्टी केले नाही त्यामुळे नॉन जॉइन्डर ऑफ नेसेसरी पार्टीज च्या कारणाने सदर तक्रार रद्द होणेस पात्र आहे असे कथन केले आहे. सामनेवाला आपल्या लेखी म्हणणेत पुढे असे कथन करतात की, तक्रारदाराच्या पतीस गडहिंग्लज येथील दवाखान्यात अडमिट केले त्यानंतर तेथील डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे त्यांना सिटी हॉस्पिटल कोल्हापूर येथे अॅडमिट केले. परंतु तेथील डॉक्टरांच्या सल्लयाविरुध्द तक्रारदाराने पतीस घरी आणले व परत गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथेच मयत जाधव यांचा दि.29/06/2009 रोजी मृत्यू झाला. यासर्वावरुन तक्रारदाराच्या पतीच्या मृत्यू हा योग्य उपचार न केल्यामुळे झाला होता हे स्पष्ट होते. तक्रारदाराने क्लेम फॉर्म सोबत कन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मार्टेम रिपोर्ट, इत्यादी कुठलीही आवश्यक कागदपत्रे दाखल केली नाहीत. त्यामुळे वरील सर्व बाबींचा पूर्ण विचार करुनच सामनेवालाने तक्रारदाराचा क्लेम नामंजूर केला आहे व त्यामध्ये सामनेवालाची कुठलीही सेवात्रुटी नाही. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह काढून टाकावी अशी विनंती सामनेवालाने सदर मंचास केली आहे. (04) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेसोबत कोणतेही कागदपत्र दाखल केलेले नाहीत. (05) या मंचाने दोन्ही बाजूंच्या वकीलांचे युक्तीवाद ऐकले तसेच त्यांनी दाखल केलेली कागदपत्रेही तपासले. (06) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदाराची विमा पॉलीसी मान्य केली आहे. सदर पॉलीसी श्री जय हनुमान विकास सोसायटीतर्फे उतरवली होती. त्या सोसायटी विरुध्द तक्रारदाराची कुठलीच तक्रार किंवा मागणी नव्हती व नाही. त्यामुळे तक्रारदाराने त्यांना प्रस्तुत तक्रारीत पार्टी केले नाही. तक्रारदाराची पॉलीसी केल्यानंतर केवळ सदर सोसायटीला पार्टी केले नाही हे तांत्रिक कारण तक्रारदाराचा क्लेम नामंजूर करण्यास पुरेसे आहे हे सामनेवालांचे कथन हे मंच ग्राहय धरत नाही. (07) तक्रारदाराच्या पतीस अपघात झाल्यानंतर प्रथम त्यांना गडहिंग्लज येथील दवाखान्यात व नंतर सिटी हॉस्पिटल, कोल्हापूर येथे अडमिट केले असल्याचे कागदपत्रांवरुन दिसून येत आहे. गडहिंग्लज नगरपालीकेने दिलेल्या मृत्यूच्या दाखल्यावरुन त्यांचा मृत्यू Cardiac failure due to head injury झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे तक्रारदारावर गडहिंग्लज व कोल्हापूरातील रुग्णालयात उपचार झाल्याचेही स्पष्ट होत आहे. त्यामुळे योग्य उपचार न झाल्यामुळे विमाधारक श्री लक्ष्मण ज्योति जाधव यांचा मृत्यू झाला हे सामनेवालांचे कथन हे मंच ग्राहय धरत नाही. (08) सामनेवालाने क्लेम नामंजूर करण्यासाठी तक्रारदाराने पोस्ट मार्टेम रिपोर्ट, पोलीस पंचनामा, इत्यादी कागदपत्रे दिली नसल्याचेही कारण दिले आहे. परंतु सदर कागदपत्रे ही अपघात सिध्द करण्यासाठी आवश्यक असतात. विमाधारकाला अपघात झाला असल्याबद्दल सामनेवालांचे दुमत नाही. त्यामुळे केवळ तांत्रिक कारण दाखवून तक्रारदाराचा क्लेम नामंजूर करणे ही सामनेवालांच्या सेवेतील त्रुटी आहे असे या मंचाचे स्पष्ट मत आहे. सबब हे मंच पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. 2) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास विमा क्लेमची रक्कम रु.1,00,000/-(रु.एक लाख फक्त) अदा करावी. सदर रक्कमेवर दि.24/06/2010 पासून ते संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के प्रमाणे व्याज अदा करावे. 3) सामनेवाला यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चा पोटी रु. 1,000/-(रु.एक हजार फक्त) अदा करावेत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |