निकालपत्र :- (दि.19/01/2011) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (01) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला त्यांचे वकीलांमार्फत हजर होऊन त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले आहे. उभय पक्षकारांचे वकीलांचा अंतिम युक्तीवाद ऐकला. सदरची तक्रार सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदाराचा योग्य व न्याय क्लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवल्यामुळे दाखल करणेत आली आहे. (02) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- अ) सामनेवाला कंपनी ही वित्तीय व्यवसाय करणारी विमा कंपनी असून यातील तक्रारदार यांचे पती मयत यशवंत हरी पाटील यांची शासनामार्फत सामनेवालांकडे ‘शेतकरी अपघात विमा योजने’ अंतर्गत पॉलिसी उतरविलेली असून सदर पॉलीसीचा क्र.181200/48/2009/939 असा आहे. सदर पॉलीसीच्या कालावधीत दि.11/10/2008 रोजी तक्रारदार यांचे पती यशवंत हरी पाटील हे पहाटे गायीस पाणी पाजणेसाठी भैरवनाथ तळयाकडे गेले. त्यानंतर ते घरी न आलेने शोधाशोध केली असता दि.12/10/008 रोजी ते सदर तळयात पडून बुडून मयत झालेचे आढळून आले. (ब)तक्रारदार आपल्या तक्रारीत पुढे सांगतात, त्यानंतर तक्रारदारांनी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन सामनेवालांकडे न्याययोग्य क्लेमची मागणी केली असता सामनेवालांनी दि.22/03/2010 रोजी ‘ पोलीस रेकॉर्डनुसार मयत व्यक्तीचे मानसिक संतूलन बिघडलेले होते व त्यांना गेले 4 महिनेपासून उपचार चालू होते.’ या कारणाने क्लेम नाकारत असलेचे कळवले. वास्तविक मयत यशवंत हरी पाटील यांचे मानसिक संतूलन ठीक होते. त्यांना औषधोपचार सुरु नव्हते. तक्रारदार या अडाणी,अशिक्षीत असून त्यांचा मुलगा दारुचे व्यसनाचे अधीन गेलेला आहे. तसेच गावातील इतर भाऊबंद यांचे व तक्रारदाराचे घराचे सबंध सलोख्याचे नाहीत. त्यामुळे जाबजबाब हे चुकीचे व गैरसमजूतीचे दिले गेले आहेत. तसेच कोणताही वैद्यकीय पुराव्याशिवाय तक्रारदाराचे पतीस ‘अनसाऊंड माईंड’ ठरवून तक्रारदाराचा न्याययोग्य क्लेम नाकारुन सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवलेमुळे सदरी तक्रार मा. मंचासमोर दाखल करणे भाग पडले. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर होऊन विमा क्लेमची रक्कम रु.1,00,000/- दि.12/01/2009 पासून द.सा.द.शे.18 टक्के व्याजासह मिळावी तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.3,00/- सामनेवालांकडून मिळणेबाबत आदेश व्हावा अशी विनंती सदर मंचास तक्रारदाराने केली आहे. (03) तक्रारदाराने तक्रारीच्या पुष्टीप्रित्यर्थ्य सामनेवाला यांनी क्लेम नाकारलेचे पत्र,पंचनामा,इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मार्टेम रिपोर्ट इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (04) सामनेवालांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार तक्रारदाराची तक्रार खोटी, व लबाडीची असलेने नामंजूर करणेत यावी. सामनेवाला पुढे असे प्रतिपादन करतात की, तक्रार अर्ज कलम 1 मधील मजकूराबाबत सामनेवाला अनभिज्ञ असलेने प्रस्तुत मजकूर मान्य नाही. कलम 2 व 3 व 6 मधील मजकूर अमान्य केलेला आहे. सामनेवालां यांनी प्रस्तुत प्रकरणी इन्व्हेस्टीगेशन केलेल्या त्यावेळी उपलब्ध पोलीस रेकॉर्डवरुन नमुद मयत यशवंत हरी पाटील हा अनसाऊंड माईंड होता तसेच गेले चार महिन्यापासून त्याचेवर त्या पध्दतीचे उपचार सुरु होते व अशाप्रकारच्या कारणासाठी विमा संरक्षण नसलेने सामनेवालांनी योग्य कारणास्तव क्लेम नाकारलेला आहे. सबब सामनेवाला यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही. सबब तक्रारीस कोणतेही कारण उदभवलेले नाही. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करावी व सामनेवालांना विनाकारण खर्चात पाडलेने तक्रारदाराकडून रक्कम रु.5,000/- मिळावेत अशी विनंती सामनेवालांनी सदर मंचास केली आहे. (05) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेत सोबत पॉलीसी व त्यासोबतचे करारपत्र तसेच महाराष्ट्र राज्य सरकारचा जी.आर. दाखल केले आहे. (06) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवालांचे लेखी म्हणणे दाखल कागदपत्रे व उभय पक्षकारांच्या वकीलांचा युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1) सामनेवाला विमा कंपनीने सेवेत त्रुटी ठेवली आहे काय? -- होय 2) तक्रारदार विमा रक्कम मिळणेस पात्र आहेत काय? -- होय 3) काय आदेश? -- शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क्र.1 :- सामनेवालांनी दि.22/3/2010 रोजीचे पत्राने तक्रारदाराचा क्लेम नाकारलेला आहे. यावरुन त्याबाबतची पॉलिसी अस्तित्वात होती ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. सदर पत्रानुसार क्लेम नं.181200/48/2010/643 नोंद असून पॉलीसी नं.181200/48/ 2009/939 नमुद असून विमाधारकाचे नांवे यशवंत हरी पाटील नमुद केलेले आहे. सदर पत्रानुसार नमुद विमाधारकाचा मृत्यू हा तो अनसाऊंड माईंड असलेने तसेच गेले चार महिन्यापासून त्याबाबतचे तो उपचार घेत असलेचे पोलीस रेकॉडवरुन दिसून येत असलेने क्लेम नाकारलेला आहे. दाखल पंचनाम्यानुसार नमुद विमाधारकाचा भैरवनाथ तळयात बुडून मृत्यू झालेचे दिसून येते. तसेच दाखल मरणोत्तर पंचनामामध्येही त्याची नोंद आहे. शवविच्छेदन अहवालामध्येही बुडून मृत्यू झालेच्या कारणाची नोंद आहे ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. तक्रारदाराने सर्व कागदपत्रांसहीत सामनेवालांकडे क्लेमची मागणी केलेली होती. सदर क्लेम हा वर नमुद केले पत्राव्दारे नाकारलेला आहे. सामनेवालांनी प्रस्तुतचा क्लेम नाकारताना उपलब्ध पोलीस रेकॉर्डवरील कागदपत्रांवरील मजकूराचा तसेच साक्षीदाराने दिलेले जाबजबाबाच्या आधारे नमुद विमाधारका यशवंत हरी पाटील याचे मानसिक संतूलन बिघडलेले होते व त्यास चार महिन्यापासून उपचार सुरु होते व त्यामुळे गायींना पाणी पाजणेस तळयात गेला असता त्यांचा बुडून मृत्यू झालेचा तर्क केलेला आहे. एखादी व्यक्ती अनसाऊंड मार्इंड आहे हे ठरवणेसाठी वैद्यकिय पुराव्याची गरज आहे. तसेच तो अनसाऊंड असेल तर त्याबाबत तो 4 महिन्यापासून उपचार घेत होता याबाबतचे इन्व्हेस्टीगेशन केलेचे व त्याबाबतची कागदपत्रे सामनेवाला कंपनीने प्रस्तुत कामी दाखल केलेले नाहीत. निव्वळ नमुद घटनेच्या तर्काच्या आधारावर कोणत्याही वैद्यकीय पुराव्याशिवाय नमुद मयत विमाधारकास अनसाऊंड माईंड ठरवून तांत्रिक कारणास्तव क्लेम नाकारला आहे. तसेच नमुद पॉलीसीच्या करारातील अटी व शर्तीप्रमाणे क्लॉज 8(III) Exclusion चा आधार घेऊन प्रस्तुतचा क्लेम नाकारलेला आहे. मात्र सदर Exclusion प्रमाणे सामनेवाला सदरची बाब सिध्द करु शकलेले नाहीत. सबब वरील विस्तृत विवेचन व दाखल कागदपत्रांचा विचार करता नमुद विमाधारकाचा मृत्यू हा गायींना पाणी पाजणेस नमुद तळयावर गेला असता बुडून मृत्यू झालेला आहे व सदरचा मृत्यू हा अपघाती आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. शासनाने शेतक-यांच्या हितासाठी शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना सुरु केली. विमा उतरविणेमागचा मूळ उद्देश हा शेतक-याचा अपघाती मृत्यू झाल्यास प्रस्तुत कुटूंब उघडयावर पडू नये तसेच शेतक-यास सदर अपघातादरम्यान एखादा अवयव गमवावा लागला तर त्यास आर्थिक मदत मिळावी हा होता सदर उद्देश डोळयासमोर ठेवून शासनाने शेतक-यांसाठी शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना सुरु केली. त्याबाबतचे महाराष्ट्र राज्य शासनाचे परिपत्रक प्रस्तुत कामी दाखल आहे. सामनेवाला कंपनीने सदर योजनेचा मूळ उद्देश लक्षात न घेता कोणत्याही वैद्यकीय पुराव्याशिवाय नमुद विमाधारकास अनसाऊंड माईंडचा ठरवून त्यामुळे त्याचा मृत्यू झालेने विमा क्लेम नाकारला आहे ही सामनेवालांच्या सेवेतील गंभीर त्रुटी आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.2 :- मुद्दा क्र.1 मधील विस्तृत विवेचनानुसार तक्रारदार हे पॉलीसीप्रमाणे रक्कम रु.1,00,000/- व्याजासह मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.3 :- सामनेवाला यांनी सेवेत ठेवलेल्या त्रुटीमुळे तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. 2) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास नुकसान भरपाई रक्कम रु.1,00,000/- (रु.एक लाख फक्त) अदा करावी. सदर रक्कमेवर दि.22/03/2010 पासून ते संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के प्रमाणे व्याज अदा करावे. 3) तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रु.1,000/-(रु. एक हजार फक्त) अदा करावेत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |