निकालपत्र :- (दि.15/02/2011) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (01) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला त्यांचे वकीलांमार्फत हजर होऊन त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले आहे. उभय पक्षकारांचे वकीलांचा अंतिम युक्तीवाद ऐकला. सदरची तक्रार सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदाराचा योग्य व न्याय क्लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवल्यामुळे दाखल करणेत आली आहे. (02) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- अ) सामनेवाला कंपनी ही वित्तीय व्यवसाय करणारी विमा कंपनी असून यातील तक्रारदार यांचे म्हैशीचा विमा सामनेवाला विमा कंपनीकडे उरतविलेला असून सदर पॉलीसीचा क्र.161600/47/2009/2887 असा आहे. सदर म्हैस दि.13/12/2009 रोजी मयत झाली. तदनंतर तक्रारदारांनी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पुर्तता करुन सामनेवालांकडे क्लेमची मागणी केली असता दि.21/06/2010 रोजी ‘’ म्हैशीचा मृत्यू पॉलीसी अस्तित्वात येणेपूर्वी झालेला आहे.’’ अशा अत्यंत चुकीच्या कारणाने क्लेम नाकारला आहे. (ब) तक्रारदार आपल्या तक्रारीत पुढे सांगतात, वास्तविक तक्रारदाराची म्हैस ही दि.13/12/009 रोजी म्हणजेच पॉलीसीच्या कालावधीतच मयत झालेने सामनेवाला यांनी तक्रारदाराचा क्लेम नाकारुन सेवेत त्रुटी केलेली आहे. त्यामुळे तक्रारदारास सदरची तक्रार मा. मंचासमोर दाखल करणे भाग पडले. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर होऊन विमा क्लेमची रक्कम द.सा.द.शे.18 टक्के व्याजासह मिळावी तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/-व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.2,000/- सामनेवालांकडून मिळणेबाबत आदेश व्हावा अशी विनंती सदर मंचास तक्रारदाराने केली आहे. (03) तक्रारदाराने तक्रारीच्या पुष्टीप्रित्यर्थ्य सामनेवाला यांनी क्लेम नाकारलेचे पत्र दाखल केले आहे. तसेच दि.24/01/11 रोजी तक्रारदाराने सरपंच, ग्रामपंचायत राणेवाडी ता.भुदरगड यांचेकडील ग्रामपंचायत दाखला दाखल केला आहे. (04) सामनेवालांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार अ) तक्रारदाराचे तक्रार अर्जातील मजकूर मान्य व कबूल नाही. तक्रारदाराचा तक्रार अर्ज कायदयाने चालणेस पात्र नाही. सामनेवाला यांनी कोणतीही त्रुटी केलेली नाही. सदर कामी तक्रारदाराने संस्थेस पार्टी केले नसलेने सदर दावा चालणेस पात्र नाही. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह फेटाळणेत यावा. सामनेवाला आपल्या म्हणणेत पुढे सांगतात, तक्रार अर्जातील कलम 1 मधील सामनेवाला ही विमा कंपनी असून ती विमा व्यवसाय करते हा मजकूर वगळता इतर मजकूर मान्य व कबूल नाही. तक्रार अर्जातील कलम 2 व 3 मधील मजकूर पूर्णपणे खोटा व चुकीचा आहे. सामनेवाला यांनी तक्रारदाराचा क्लेम योग्य त्या कारणाकरिता कायदेशीररित्या नाकारलेला आहे. तक्रार अर्जातील कलम 6(अ) ते 6 (इ) मधील विंनती बेकायदेशीर असलेने ती मान्य करता येणार नाही. ब) याबाबत वस्तुस्थिती अशी आहे की, तक्रारदार यांनी त्यांचे म्हैशीचा क्लेम फॉर्म भरुन दिलेनंतर सामनेवाला यांनी इन्व्हेस्टीगेटर पाठविले असता त्यांनी श्री पांडूरंग गोपाळ शिंदे यांचे म्हैशीच्या संदर्भात चौकशी केली असता सदर म्हैस दोन वर्षापूर्वी मयत झाली असलेचे समजले. त्यानंतर इन्व्हेस्टीगेटर श्री झांजगे यांनी स्वत: पांडूरंग गोपाळ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्या मयत म्हैशीच्या मृत्यू संदर्भात चौकशी केली असता विमेदार यांनी सांगितले की त्यांची म्हैस विमा उतरविण्यापूर्वी मयत झाली आहे. त्यावेळी तिचा विमा नसलेमुळै त्यांनी सदर म्हैशीचे पोस्ट मार्टेम करुन फोटो घेतले व त्यानंतर सदर म्हैशीचा इन्शुरन्स करणेत आला व त्यानंतर कंपनीकडे क्लेम करणेत आला आहे. त्यामुळे तक्रारदाराचे मयत म्हैशीचा मृत्यू विमा उतरविणेपूर्वी झाला असलेने सदरचा क्लेम The she buffello died before inception of policy या कारणाने नाकारला आहे. अशाप्रकारच्या कारणासाठी विमा संरक्षण नसलेने सामनेवालांनी योग्य कारणास्तव क्लेम नाकारलेला आहे. सबब सामनेवाला यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही. सबब तक्रारीस कोणतेही कारण उदभवलेले नाही. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करावी अशी विनंती सामनेवालांनी सदर मंचास केली आहे. (05) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेसोबत श्री पांडूरंग गोपाळ शिंदे यांचा जबाब, डॉ. श्री अनिल झांजगे इन्व्हेस्टीगेटर यांचा रिपोर्ट इत्यादी कागदपत्र दाखल केलेली आहेत. (06) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवालांचे लेखी म्हणणे व उभय पक्षकारांच्या वकीलांचा युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1) सामनेवाला विमा कंपनीने सेवेत त्रुटी ठेवली आहे काय? -- होय 2) काय आदेश? -- शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क्र.1 :- तक्रारदाराचे म्हैशीचा विमा उतरविलेला होता. सदर पॉलीसीचा क्र.161600/47/2009/2887 असा आहे. सदर म्हैस दि.13/12/2009 रोजी मयत झालेली आहे. म्हैस मयत झालेनंतर क्लेमची मागणी तक्रारदाराने केलेली आहे. दि.21/06/2010 रोजी सामनेवाला यांनी ‘’ म्हैशीचा मृत्यू पॉलीसी अस्तित्वात येणेपूर्वी झालेला आहे.’’ अशा कारणाने क्लेम नाकारला आहे ही वस्तुस्थिती दाखल कागदपत्रावरुन निदर्शनास येते. वादाचा मुद्दा आहे तो प्रस्तुत पॉलीसी वर नमुद कारणाने नाकारली. ती योग्य कारणास्तव नाकारली आहे का? याचा विचार करता सामनेवालांनी नेमणूक केलेले इन्व्हेस्टीगेटर श्री झांजगे यांनी केलेल्या चौकशीमध्ये प्रस्तुतची म्हैस दोन वर्षापूर्वीच मयत झालेचे समजले व सदर चौकशी अहवालावरुन प्रस्तुतची म्हैस विमा उतरविण्यापूर्वीच मयत झालेमुळे नाकारलेला आहे. तसे पत्र प्रस्तुत प्रकरणी दाखल आहे. याबाबत झाजंगे यांनी केलेला चौकशी अहवाल प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेला आहे. सदर प्रकारानुसार दि.17/02/2010 रोजी राणेवाडी येथे जाऊन विमेदाराची म्हैशीची स्थानिक चौकशी अंती विमा उतरविणेपूर्वीच म्हैस मयत झालेचे व तदवेळी पोस्ट मार्टेम करुन मिळतेजुळते वातावरण करुन, फोटो काढून त्याप्रमाणे विमा उतरविणेत आलेला आहे. प्रस्तुत अहवालामध्ये इन्व्हेस्टीगेटर झांजगे यांनी दि.17/02/2010 रोजी तक्रारदाराचे वर नमुद वस्तुस्थितीबाबत घेतलेला लेखी जबाब अथवा तसे लेखी पत्र घेतलेचा साधा उल्लेख प्रस्तुत अहवालामध्ये केलेला नाही. सदर अहवालामध्ये फक्त चौकशी केलेचे नमुद केले आहे. तक्रारदाराकडून लेखी घेतलेचे कुठेही अहवालामध्ये नमुद केलेले नाही. तक्रारदाराने जर स्वत:हून लेखी दिले असते तर त्यांना अहवालामध्ये त्याचा उल्लेख करणे अडचणीचे नव्हते. प्रस्तुत लेखी जबाबावर पुंडलिक पांडूरंग यादव यांची सही असून त्यांचेसमोर प्रस्तुतचा लेखी जबाब घेतलेचे नमुद केलेले आहे. तक्रारदाराने ग्रामपंचायत राणेवाडी ता.भुदरगड जि.कोल्हापूर येथील सरपंचाचा दाखला प्रस्तुत प्रकरणी हजर केलेला आहे. सदर दाखल्यानुसार पुंडलीक पांडूरंग यादव या नावाची व्यक्ती मौजे राणेवाडीमध्ये पूर्वी व सध्याही रहिवाशी नसलेबाबत दाखल दिलेला आहे. तसेच त्याअनुषंगाने तक्रारदाराने शपथपत्र दाखल केलेले आहे. प्रस्तुत झांजगे यांनी को-या कागदावर सही घेतली असून प्रस्तुत जबाबावरील अक्षर तक्रारदाराचे नसून ते ओळखत नाही. तसेच श्री पुंडलीक पांडरंग यादव या तथाकथीत व्यक्तीची सही अथवा अशा कोणत्याही व्यक्तीस ओळखत नसलेचे शपथपत्र दाखल केलेले आहे. वरील वस्तुस्थितीचा विचार करता ज्या जबाबाचे आधारे इन्व्हेस्टीगेटर यांनी अहवाल दिलेला आहे. तो जबाबच निर्विवादरित्या सिध्द झालेला नाही. सबब म्हैशीच्या वर्णनाबाबत वाद नाही. तसेच नमुद जनावराच्या विमा उतरविणेच्या प्रक्रियेचा विचार करता विमा कंपन्यांकडून नमुद जनावराचे वर्णन, नमुद जनावर आस्तत्वात असणे, त्याची खरेदीची पावती, तदनंतर कानात टॅग मारणे इत्यादी प्रक्रिया पूर्ण केल्या जातात. सदर प्रक्रिया दरम्यान खात्री करुनच जनावराचा विमा उतरविला जातो. याचा विचार करता विमा उतरवितेवेळी सामनेवाला कंपनीने ही प्रक्रिया करुनच विमा दिलेला असणार आहे. त्यामुळे नमुद जनावर मयत झालेनंतर विम्याची रक्कम मागणी करताना मात्र पॉलीसीपूर्वीच नमुद जनावर मयत असलेचे कारणास्तव केवळ कोणत्याही कागदोपत्री पुराव्याचा विचार न करता केवळ इन्व्हेस्टीगेटरच्या चौकशी अहवालावरुन तक्रारदाराचा न्याययोग्य क्लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवलेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.2 :- मुद्दा क्र.1 मधील विस्तृत विवेचनानुसार तक्रारदार तसेच सामनेवालांकडून प्रस्तूतच प्रकरणी पॉलीसी दाखल केलेली नाही. तसेच पॉलीसीच्या रक्कमेबाबत कुठेही उल्लेख केलेला नाही. मात्र सामनेवालांनी पॉलीसी मान्य केलेली आहे याचा विचार करता पॉलीसीप्रमाणे रक्कम व्याजासह मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच सामनेवाला यांनी सेवेत ठेवलेल्या त्रुटीमुळे तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. 2) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास पॉलीसीप्रमाणे असलेली रक्कम अदा करावी. सदर रक्कमेवर दि.21/06/2010 पासून ते संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के प्रमाणे व्याज अदा करावे. 3) तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रु.1,000/-(रु. एक हजार फक्त) अदा करावेत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |