निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 09/07/2013
तक्रार नोदणी दिनांकः- 16/07/2013
तक्रार निकाल दिनांकः- 10/02/2014
कालावधी. 06 महिने. 25 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल. M.Sc.LLB.
---------------------------------------------------------------------------------------------------------
सौ.सिमा एस कत्रुवार, अर्जदार
वय 30 वर्षे,धंदा.व्यापार. अॅड.डि.यु.दराडे.
रा.मानवत ता.मानवत.जि.परभणी.
विरुध्द
दि न्यु इंडिया अशोरंस कंपणी लि. गैरअर्जदार.
तर्फे शाखा व्यवस्थापक, अॅड.जी.एच.दोडीया.
यशोदिप बिल्डींग, शिवाजी रोड, परभणी. ता.जि.परभणी.
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदाराने अर्जदारास सत्यपरिस्थितीची पहाणी न करता कमी रक्कमेचा दावा मंजूर करुन सेवेत त्रुटी दिल्या बद्दलची तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार ही मानवत येथील रहिवाशी असून तिच्या गणेश गोडाऊन ही संस्था मानवत जि.परभणी येथे आहे. सदर गोडाऊन मध्ये शेतकरी तसेच व्यापारी यांचा माल ठेवला जातो. अर्जदाराने सदर गोदामाची आपत्ती विमा गैरअर्जदाराकडे पॉलिसी क्रमांक 160902/11/10/01/00200493 अन्वये काढली होती.
अर्जदाराचे म्हणणे की, दिनांक 21/06/2011 रोजी मानवत शहर व परिसरात जोराचे वादळ व पाऊस झाला व त्यामुळे अर्जदाराचे सदरचे गोडाऊन पूर्णपणे उधवस्त झाले. सदर घटनेमुळे अर्जदाराच्या भिंती पडल्या तसेच पत्रे उडून गेली व पावसामुळे आतील माल पूर्णतः भिजला व खराब झाला.
अर्जदाराचे म्हणणे की, सदर घटनेची माहिती तहसिलदार मानवत यांना देण्यात आली व त्यांच्या समक्ष झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला, सदर पंचनामा करतांना पंच व तहसिलदाराने अर्जदारास झालेले नुकसान 100 पोते सोयाबीन अंदाजे रु. 1,19,000/- तसेच 1400 पोते तुर अंदाजे 2,10,000/- व तसेच पत्रे यांचे अंदाजे नुकसान 20,000/- झाले, असे पंचनाम्याच्या वेळी दाखवले, अर्जदाराचे म्हणणे की, सदर घटनेबाबत त्याने गैरअर्जदार विमा कंपनीला माहिती दिली. त्यानंतर विमा कंपनीने त्यांचे सर्व्हेअर तथा लॉस असेसर श्री मनोहर तोतला यांनी गोदामास भेट दिली व त्यांनी दिनांक 25/06/2011 रोजी अर्जदारास कागदपत्रे दाखल करणे संबंधी पत्र दिले. अर्जदाराने दिनांक 10/09/2011 रोजी गैरअर्जदाराकडे विमादावा दाखल केला, त्यासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडली होती, परंतु अर्जदाराचा सदर विमादावा लवकर निकाली काढला नाही.
अर्जदाराने दिनांक 24/02/2012 रोजी तसेच 21/06/2012 रोजी दावा लवकर मंजूर करावा यासाठी अर्ज केला, परंतु विमा कंपनीने अनेक कारणे दाखवुन विमादावा मंजूर करण्यास टाळाटाळ केली. याबाबत परत विमा कंपनीकडे चौकशी केली असता, अर्जदारास विमादावा केवळ 72,000/- मंजूर केल्याचे कळले. तेव्हा अर्जदाराने दिनांक 19/03/2013 रोजीच्या पत्राव्दारे विमादावा हा कमी मंजूर केल्याचे कळविले व परत एकदा त्याचा प्रस्ताव पडताळून पहावा, अशी विनंती केली, परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही, शेवटी विमा कंपनीने दिनांक 28/03/2013 रोजी पत्राव्दारे दोन वर्षांनी उशीरा 72,000/- रु. मंजूर केल्याचे कळविले व सोबत रु. 72,000/- चे व्हाऊचर पाठविले.
अर्जदाराचे म्हणणे की, त्याचे रु. 3,90,000/- चे नुकसान झालेले असतांना केवळ रु. 72,000/- अपुरी रक्कम मंजूर केली, त्यावर अर्जदाराने दिनांक 03/04/2013 रोजी पत्राव्दारे सदरील मंजूर रक्कम मान्य नसले बाबत व सदर 72,000/- रु. ही Under Protest By reserving right to claim amount by court अशी अट व विनंती करुन सदर रक्कम उचण्यास होकार दिला. सदरचे अर्जदाराचे पत्र विमा कंपनीला मिळाल्यानंतर विमा कंपनीने त्यांच्या वकीला मार्फत अर्जदारास नोटीस पाठविली व कळविले की, जर मंजूर रक्कम घ्यावयाची असेल तर विना नाराजीने व पूर्ण रक्कम मिळाली असे लिहून द्यावे लागेल. अन्यथा आपणास सदर रक्कम मिळणार नाही.
अर्जदाराचे म्हणणे की, गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराचा विमा दावा कमी रक्कमेचा मंजूर करुन अर्जदारास मानसिक व शारिरीकत्रास दिला, म्हणून सदरची तक्रार मंचात दाखल करणे भाग पडले. व मंचास विनंती केली आहे की, सदरचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात यावा. व गैरअर्जदाराना आदेश द्यावा की, त्यांनी रु. 3,90,000/- विमा रक्कम 12 टक्के दराने द.सा.द.शे. दिनांक 21/06/2011 पासून अर्जदारास द्यावे व तसेच गैरअर्जदाराने मानसिक त्रासापोटी 10,000/- व तक्रार अर्ज खर्चापोटी 3000/- रु. अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा.
तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 2 वर अर्जदाराने आपले शपथपत्र दाखल केले आहे.
अर्जदाराने पुराव्याबाबत 17 कागदपत्रे दाखल केली आहेत, ज्यामध्ये
माल जमा पावत्या, सुचनापत्र, सर्व्हेअर पत्र, पंचनामा, प्रमाणपत्र, सर्व्हेअर यांना पत्र, विमा कंपनीस पत्र, कंपनीस पत्र, कंपनीस पत्र, विमा कंपनीचे तक्रारदारास पत्र, कंपनीस पत्र, कोरा धनादेश, विमा कंपनीच्या वकिलाची अर्जदारास नोटीस, पमेंट स्लीप, घटनावृत, Loss Statement, गोदाम नुकसान इस्टीमेट, पॉलिसीची प्रत, इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.
तक्रार अर्जास लेखी निवेदन सादर करण्यासाठी मंचातर्फे गैरअर्जदारास नोटीस काढण्यात आली, गैरअर्जदार वकिला मार्फत मंचासमोर हजर, व नि.क्रमांक 7 वर आपला लेखी जबाब सादर केला, त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरची तक्रार ही खोटी व बनावटी आहे व ती ग्राहक संरक्षण कायद्याच्या विरोधात आहे व ती खारीज होणे योग्य आहे. विमा कंपनीने अर्जदारास कसल्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिली नाही.
गैरअर्जदाराचे म्हणणे की, अर्जदाराने घटनेची माहिती दिल्यानंतर विमा कंपनीने सर्व्हेअर म्हणून श्री. एम.आर.तोतला यांना नियुक्त केले व त्यांने अर्जदाराच्या गोडाऊनची पहाणी केली व समोर आलेल्या कागदपत्राची पहाणी केली व पॉलिसी प्रमाणे 97,792/- रु. अर्जदाराचे नुकसान झाले होते व पॉलिसीच्या नियमा प्रमाणे 25,000/- रु. सदर रक्कमेतून वजा करुन 72,792/- रु.चे अर्जदाराचे नुकसान झाले होते असा अहवाल दिला. त्यानंतर विमा कंपनीने दिनांक 26/08/2012 रोजीच्या पत्राव्दारे Meterological Report सादर करावा म्हणून अर्जदारास कळविले व सदरची माहिती गैरअर्जदाराने दुरध्वनीव्दारे अर्जदारास कळविली होती व शेवटी विमा कंपनीने अर्जदारास त्याच्या नुकसानी पोटी 72,000/- रु. देण्याची तयारी दर्शविली व विमा कंपनीने अर्जदारास Discharge Voucher पाठविले होते, परंतु अर्जदाराने तो न स्विकारता सदरची रक्कम Under Protest उचलण्यास तयार आहे, असे विमा कंपनीस कळविले त्यानंतर विमा कंपनीने त्याच्या वकिला मार्फत सदरची रक्कम विना अट स्विकारावी म्हणून नोटीस पाठविली होती, गैरअर्जदार विमा कंपनीचे म्हणणे की, अर्जदाराची सदरची तक्रार ही Premature असले कारणाने खारीज होणे योग्य आहे. तसेच तलाठ्याला पंचनामा करण्याचा अधिकार नाही. विमा कंपनी आज रोजी देखील विना अट रु. 72,000/- रु. घेण्यास अर्जदार तयार असल्यास ती देण्यास तयार आहे.
विमा कंपनीचे म्हणणे की, त्याने अर्जदारास कसल्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिली नाही, म्हणून मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
विमा कंपनीने लेखी जबाबाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 8 वर आपले शपथपत्र दाखल केलेले आहे.
विमा कंपनीने पुराव्याबाबत नि.क्रमांक 10 वर 7 कागदपत्र दाखल केली आहेत, ज्यामध्ये पॉलिसीची प्रत, सर्व्हे रिपोर्ट, विमा कंपनीने पाठविलेले पत्र, (18/07/2012) विमा कंपनीने दिनांक 26/08/2012 रोजी पाठविलेले पत्र, अर्जदाराने गैरअर्जदारास लिहलेले पत्र, Discharge Card विमा कंपनीच्या वकिलाने अर्जदारास दिलेले उत्तर इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.
दोन्ही बाजुंच्या कैफीयतीवरुन निर्णयास उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराच्या मालकीचे गोडाऊनचे
झालेले नुकसान विमादावा कमी मंजूर करुन अर्जदारास सेवेत
त्रुटी दिली आहे काय ? होय.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1
अर्जदाराचे मानवत ता.मानवत जि.परभणी येथे शेतक-याचा माल ठेवण्याकरीता “गणेश गोडाऊन” होते व सदर अर्जदाराच्या मालकीचे गोडाऊन गैरअर्जदार विमा कंपनीकडे पॉलिसी क्रमांक 160902/11/10/01/00200493 अन्वये विमाकृत केली होती व सदरचा विमा कालावधी 16/03/2011 ते 15/03/2012 पर्यंत वैध होती व सदरचा विमा बिल्डींग करीता 10,00000/- व Stock held in trust (मालाकरीता) 30,00000/- असे एकूण 40,00000/- रु. चा विमा अर्जदाराने गैरअर्जदाराकडे सदर गोडाऊनचा विमा काढला होता, ही बाब नि.क्रमांक 10/1 वर दाखल केलेल्या पॉलिसीच्या प्रतवरुन सिध्द होते.
अर्जदाराचे गोडाऊनचे दिनांक 21/06/2011 रोजी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास अचानक झालेल्या वादळ व पावसामुळे नुकसान झाले होते, ही बाब नि.क्रमांक 4/4 वरील दाखल केलेल्या तलाठी वसमत यांने केलेल्या पंचनाम्याच्या प्रत वरुन दिसून येते. सदरच्या घटनेमुळे अर्जदाराच्या गोडाऊनचे 100 पोते सोयाबीनचे अंदाजे किंमत 1,19,000/- रु. चे तसेच 1400 पोते पांढ-या तुरीचे अंदाजे किंमत रु. 2,10,000/- रु. चे तसेच गोडाऊनचे पत्रे किंमत 20,000/- असे एकुण 3,49,000/- रु. चे अर्जदाराचे नुकसान झाले होते, ही बाब नि.क्रमांक 4/4 वर दाखल केलेल्या तलाठ्याने केलेल्या पंचनाम्याच्या प्रतीवरुन दिसून येते.
सदर घटनेनंतर अर्जदाराने त्यांनी काढलेल्या गैरअर्जदार विमा कंपनीकडे पॉलिसी अंतर्गत नुकसान भरपाई मिळावी म्हणून गैरअर्जदार विमा कंपनीकडे दिनांक 22/06/2011 च्या पत्रान्वये कळविले होते, व सदर पत्राव्दारे अर्जदाराने त्याच्या गोडाऊनचे झालेले नुकसान Damage Of Stock अंतर्गत अंदाजे 2 लाख रु. चे व गोडाऊनच्या इमारतीचे अंदाजे 1 लाख रु. असे तीन लाख रु. चे नुकसान झाले व विमा कंपनीने आवश्यक ती कार्यवाही करावी, असे विमा कंपनीला कळविले होते, ही बाब नि.क्रमांक 4/2 वर दाखल केलेल्या अर्जदाराने विमा कंपनीला लिहिलेल्या पत्रावरुन दिसून येते. त्यानंतर विमा कंपनीचे सर्व्हेअरने सदरचे अर्जदाराचे पत्र मिळाल्यानंतर दिनांक 25/06/2011 रोजीच्या पत्राव्दारे अर्जदारास 1) क्लेमफॉर्म 2) तहसिल पंचनामा 3) मेटरॉलॉजिकल रिपोर्ट 4) स्टॉक स्टेटमेंट 5) लॉस स्टेटमेंट 6) Statement of happening 7) फोटा 8) Estimate Of loss of building 9) गोडाऊनचा नकाशा, कागदपत्राची मागणी केली होती, ही बाब नि.क्रमांक 4/3 वरील कागदपत्रावरुन दिसून येते.
सदर केलेल्या कागदपत्रांपैकी अर्जदाराने Meteorological Report Agriculture university Parbhani येथून मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु संबंधीत विद्यापीठाने ते दिले नाही व त्यास तोंडी सांगीतले की, संबंधीत विमा कंपनीस आम्ही देवुन टाकू म्हंटल्यावर अर्जदाराने सदरचे कागदपत्र विद्यापीठाकडून घ्यावे, म्हणून दिनांक 21/06/2012 रोजीच्या पत्राव्दारे विमा कंपनीस कळविले होते, ही बाब नि.क्रमांक 4/8 वर दाखल केलेले पत्रावरुन सिध्द होते.
अर्जदाराने सदर घटनेमुळे 3,90,000/- नुकसान भरपाई मिळावे म्हणून विमादावा गैरअर्जदाराकडे दाखल केला होता, ही बाब नि.क्रमांक 4/20 वर दाखल केलेल्या Fire Insurance Claim form वरुन सिध्द होते व सदर क्लेमफॉर्म मध्ये अर्जदाराने गोडाऊन मधील मालाचे 2,10,000/- व गोडाऊन इमारीतचे 1,80,000/- असे एकुण 3,90,000/- नुकसान झाले होते, असे दर्शविलेचे दिसून येते. सदर घटनेची माहिती अर्जदाराकडून विमा कंपनीस मिळाल्यानंतर विमा कंपनीने शासन मान्य सर्व्हेअर श्री. एम. आर. तोतला यांची नियुक्ती करुन नुकसान पहाणी अहवाल सादर करण्यास सांगीतले व त्याप्रमाणे सर्व्हेअर यांनी गोडाऊनची व मालाची पहाणी करुन झालेल्या नुकसानीचा अहवाल विमा कंपनीस सादर केला होता, ही बाब नि.क्रमांक 10/2 वर दाखल केलेल्या सर्व्हे रिपोर्ट वरुन सिध्द होते.
अर्जदाराच्या मालकीचे गोडाऊनचे व मालाचे दिनांक 21/06/2011 रोजी झालेल्या वादळी पावसा मध्ये खालील प्रमाणे नुकसान झाले होते, असे सर्व्हेअरने आपल्या अहवालात म्हंटले आहे.
Net Loss Liability on Stock 84,000/-
Net Liability Loss on Building 13,792/-
-----------------
एकुण 97,792/-
सर्व्हेअरने अर्जदारास झालेल्या रु. 97,792/- च्या रक्कमेतून वजा – 10,000/- करुन 87,792/- रु. चे नुकसान झाले,म्हंटले आहे,परंतु कोणताही नियमाचा उल्लेख न करता Less excess च्या सदराखाली वजा – 10,000/- रु. अयोग्यपणे वजा करणे मंचास योग्य वाटत नाही. व तसेच गैरअर्जदार विमा कंपनीने दाखल केलेल्या नि.क्रमांक 7 वरील लेखी जबाबात परिच्छेद क्रमांक 1 मध्ये 97,792/- मधून 25,000/- रु. वजा जाता अर्जदारास 72,000/- रु. चे अर्जदाराचे नुकसान झाले असे म्हंणणे मंचास योग्य वाटत नाही, कारण 25,000/- रु. कोणत्या नियमाखाली वजा केले ते गैरअर्जदार विमा कंपनीने ठोसपणे सांगीतले नाही वा तसा कोणत्याही नियमांचा गैरअर्जदाराने दाखल केलेल्या नि.क्रमांक 10/1 वरील पॉलिसीत आढळून येत नाही,याचाच अर्थ असा निघतो की, अर्जदाराच्या गोडाऊनचे व मालाचे सदर घटनेमुळे रु. 97,792/- चे नुकसान झाले होते, ही बाब नि.क्रमांक 10/2 वर दाखल केलेल्या सर्व्हेअर रिपोर्ट वरुन सिध्द होते.
गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदारास गोडाऊन मालाच्या नुकसान भरपाई पोटी रु. 72,000/- चा विमादावा मंजूर केला होता, ही बाब नि.क्रमांक 4/17 वर दाखल केलेल्या कागदपत्रावरुन सिध्द होते, सदरचा विमादावा रु. 72,000/- मंजूर केलेला Under Protest स्विकारतो असे अर्जदाराने गैरअर्जदारास कळविले होते, ही बाब नि.क्रमांक 4/13 वरील कागदपत्रावरुन दिसून येते. व सदर 72,000/- रक्कम अर्जदाराने स्विकारली नव्हती, ही बाब नि.क्रमांक 4/15 वरील कागदपत्रावरुन सिध्द होते.
अर्जदाराचे म्हणणे की, सदर घटने मध्ये त्याचे रु. 3,90,000/- चे नुकसान झाले होते, हे म्हंणणे मंचास योग्य वाटत नाही, कारण अर्जदाराने याबाबत कोणताही ठोस कागदोपत्री पुरावा मंचासमोर आणला नाही. अर्जदाराचे सदर घटनेमुळे सर्व्हेअर रिपोर्ट प्रमाणे रु.97,792/- चे नुकसान झालेले असतांना विमा कंपनीने फक्त रु. 72,000/- चे कमी नुकसान चुकीच्या पध्दतीने मंजूर करुन अर्जदारास निश्चितच मानसिकत्रास व सेवेत त्रुटी दिली आहे. असे मंचाचे ठाम मत आहे, म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे होकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदार विमा कंपनीने आदेश तारेख पासून 30 दिवसांच्या आत अर्जदारास
त्याच्या मालकीचे गोडाऊन व मालाचे नुकसान भरपाई पोटी रु.97,792/-
फक्त ( अक्षरी रु. सत्यान्न्व हजार सातशे ब्यान्नव फक्त ) द्यावेत.
3 गैरअर्जदार विमा कंपनीने आदेश मुदतीत मानसिक त्रासापोटी रु. 5,000/- फक्त
(अक्षरी रु. पाचहजार फक्त) व तक्रार अर्ज खर्चापोटी रु. 2,000/-फक्त
(अक्षरी रु. दोनहजार फक्त ) अर्जदारास द्यावेत.
4 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.