(मंचाचा निर्णय: श्री. रामलाल सोमाणी- प्रभारी अध्यक्ष यांचे आदेशांन्वये) 1. प्रस्तुत तक्रार ही तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारां विरुध्द मंचात दिनांक 01.01.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :- 2. तक्रारकर्ता ही एक लघु उद्योग करणारी नोंदणीकृत संस्था असुन त्याचे प्रोप्रायटर श्री. कमल नारायणदास सारडा हे आहेत. तक्रारकर्ता पेपर रोल व कार्बन रोल विकत घेऊन त्यावर मशीनने छिद्रे पाडून प्रिंटींगचे काम करतो. तसेच इतर कंपनीकडून पेपर घेऊन जॉबवर्कव्दारे प्रिटींगचे काम करतो. तक्रारकर्त्याचा संगणक पेपर निर्मीतीचा कारखाना प्लॉट नं.18-अ मध्ये असलेल्या इमारतीमध्ये पेपर कन्वर्टिंग व प्रिटींग मशीन लावलेली आहे व व्यवसायात येणा-या उत्पन्नावर निर्भर असल्याचे नमुद केले आहे.
3. तक्रारकर्त्याने नमुद केले आहे की, त्याने गैरअर्जदार विमा कंपनीकडे विमा उतरविला त्याचा पॉलिसी क्र.160301/11/07/11/00000173 दि.24.10.2007 ते 23.10.2008 पर्यंतचे कालावधीकरीता इमारतीची रु.11,00,000/-, इलेक्ट्रीक फिटींग व केबल बोर्डचे रु.1,00,000/- व कच्चा माल, तयार मालाचा रु.20,00,000/- असा एकंदर रु.36,00,000/- चा विमा उतरविला होता. तक्रारकर्त्याने नमुद केले आहे की, त्याचे कारखान्यात दि.03.05.2008 रोजी सकाळी 7.40 वाजता इलेक्ट्रिक मिटरमध्ये ठिणगी उडून आग लागून मिटर व जॉब वर्गसाठी अणलेले पेपर रोल पूर्णपणे जळून खाक झाले व त्यात रु.12,16,022/- चे नुकसान झाले. याबाबत गैरअर्जदाराकडे विमा दावा दाखल केला असता त्यांनी फक्त रु.28,000/- नुकसान भरपाईपोटी दिले व उर्वरित रकमेचा दावा नामंजूर केला. यामुळे तक्रारकर्त्याने उर्वरित रक्कम रु.11,54,211/- ची द.सा.द.शे. 12% व्याजासह मागणी केलेली आहे. तसेच गैरअर्जदारांचे कार्यालयात अनेक वेळा जावे लागले त्यामुळे त्याला मानसिक व शारीरिक त्रास झाला असुन त्याबाबत रु.25,000/- ची मागणी केली आहे. 4. प्रस्तुत प्रकरणी मंचामार्फत गैरअर्जदारावंर नोटीस बजावण्यांत आली असता, त्यांना नोटीस मिळाल्यानंतर ते मंचात हजर झाले असुन त्यांनी आपले लेखी उत्तर खालिल प्रमाणे दाखल केलेले आहे. 5. गैरअर्जदाराने आपल्या उत्तरात तक्रारकर्त्याची त्यांचेकडे विमा पॉलिसी असल्याचे मान्य केले आहे. तसेच व्यवसायास उपयोग्य मालाचा साठा हा इमारतीमध्ये सुरक्षीत ठिकाणीच ठेवणे आवश्यक असुन बाहेर ठेवलेल्या मालास विम्याचे संरक्षण प्राप्त होत नसल्याचे नमुद केले आहे. गैरअर्जदाराने नमुद केले आहे की, तक्रारकर्त्याचा कारखाना हा बंद इमारतीत आहे व इमारतीमध्ये ठेवलेला मालसाठा व उपकरणे हे पूर्णपणे सुरक्षीत असुन इमारती बाहेर मोकळया जागेमध्ये ठेवलेले पेपर रोल जळून खाक झाल्याचे नमुद केले आहे. तसेच त्यांचे सर्वेअरने व शाखा व्यवस्थापकाने केलेल्या पाहणीनुसार इमारती बाहेरील मोकळया जागेत ठेवलेल्या वेस्ट मटेरीयललाच फक्त आग लागल्याचे नमुद केले आहे. तसेच इलेक्ट्रीक मिटर व केबलला आगीमुळे नुकसान झाल्याचे मान्य केले असुन त्यासंबंधीची नुकसान भरपाई तक्रारकर्त्यास दिल्याचे म्हटले आहे. 6. गैरअर्जदाराने आपल्या विशेष प्रतिवादनात नमुद केले आहे की, तक्रारकर्त्याकडून आगीची सुचना मिळाल्यानंतर शाखा व्यवस्थापक, श्री. कुंदन सहारे व सर्व्हेअर श्री. संदीप मशरु ह्यांनी घटनास्थळाला भेट दिली व आग लागलेल्या परिसराचे निरीक्षण केले. त्यात त्यांच्या असे लक्षात आले की, तक्रारकर्त्याचे इतारतीला कुठल्याही प्रकारची आग लागलेली नाही तर इमारती बाहेर नष्ट करण्यासाठी ठेवलेल्या वेस्ट मटेरियलला आग लागलेली आहे व उपयुक्त मालसाठा हा इमारतीमध्ये ठेवण्यांत आल्यामुळे सुरक्षीत असुन तक्रारकर्त्याने आग लागल्याच्या घटनेचा फायदा उचलण्याचे दृष्टीने सदर रकमेची मागणी केलेली आहे. गैरअर्जदाराने कोण्त्याही प्रकारे सेवेत त्रुटी किंवा अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला नाही त्यामुळे प्रस्तुत तक्रार मंचासमोर चालण्यायोग्य नाही नसल्यामुळे खारिज करण्याची मंचास विनंती केलेली आहे. 7. प्रस्तुत तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि.13.07.2010 रोजी आली असता तक्रारकर्ता व गैरअर्जदार यांचे तर्फे वकील हजर. गैरअर्जदारांचे भिस्त असलेले निवाडे पान क्र.140 व 145 वर दाखल केलेले आहेत. मंचाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद व दाखल दस्तावेजांचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले.
-// नि ष्क र्ष //- 1. तक्रारकर्त्याने दस्तावेज क्र.2 पॉलिसीची प्रत दिलेली आहे व नमुद केले आहे की, पॉलिसी अंतर्गत मालाचा साठा हा विमाकृत होता, परंतु तो साठा सुरक्षीत असल्याचे कारणाने आणि झालेले नुकसान हे इमारती बाहेर असल्या कारणाने गैरअर्जदाराने केलेली कारवाई योग्य व रास्त आहे, असा युक्तिवाद गैरअर्जदाराने केलेला आहे. गैरअर्जदाराने नमुद केले आहे की, त्याने तक्रारकर्त्याला झालेला योग्य खर्च मंजूर करुन ती रक्कम तक्रारकर्त्याला दिलेली आहे आणि म्हणून तक्रारकर्त्याला कोणतेही कारण नाही व तक्रार खारिज करावी अशी मंचास विनंती केलेली आहे.
2. गैरअर्जदाराने युक्तिवाद केला की, तक्रारकर्त्याने दाखल केलेली कागदपत्रे काल्पनिक आहेत आणि दाखल इमारतीचा नकाशा व साठवण क्षमता काल्पनिक आहे आणि त्याला कोणतेही कायदेशिर स्वरुप देता येऊ शकत नाही. सर्वेअरचा रिपोर्ट त्रयस्त व्यक्तिने दिलेला आहे आणि ते मान्य न करण्यांस कोणतेही कारण नाही. सर्वेअर रिपोर्टनुसार गैरअर्जदाराने विम्याची रक्कम अदा केलेली आहे. गैरअर्जदाराने भिस्त असलेले निवाडे प्रस्तुत प्रकरणाला लागू होते असा युक्तिवाद सादर केला आहे. 3. गैरअर्जदाराने पुढे असे नमुद केले आहे की, तक्रारकर्त्याची अनुपयोगी कचरा (Scrap) माल गोडाऊन व इमारतीबाहेर होता. इलेक्ट्रीक मीटर जवळ महत्वपूर्व, नवीन तयार माल ठेवला होता याचा कोणताही पुरावा नाही. गैरअर्जदाराने नमुद केले आहे की, सदर फॅक्टरीचे आवारात व इमारती बाहेर तक्रारकर्त्याने तयार झालेला माल व रॉ मटेरियल ठेवलेले आहे व त्याला कोणतेही नुकसान झालेले नाही असे सर्वेअरने स्पष्टपणे नमुद केले आहे आणि म्हणून गैरअर्जदारांची कृति योग्य आहे.
4. तक्रारकर्त्याने मंचासमक्ष युक्तिवाद केला असता नमुद केले आहे की, दस्तावेज क्र.3 स्वयंस्पष्ट आहे आणि मालमत्तेचा विमा काढण्यात आला होता ती मालमत्ता प्लॉट नं.18-ए, मोहिते इंडट्रीयल एरिया, नागपूर मध्ये येते आणि त्यावर इमारत व त्याला लागलेली इलेक्ट्रीक फीटींग आणि सदर प्लॉट वरील संपूर्ण मालमत्तेचा व तयार झालेल्या मालाचा साठा विमाकृत केल्या गेला आहे आणि म्हणून गैरअर्जदारांची कृति ही गैरकायदेशिर आहे. सदर युक्तिवाद दस्तावेज क्र.3 पाहता योग्य व रास्त वाटतो, त्यामुळे सदर फॅक्टरीचा संपूर्ण परिसर हा विमाकृत होता असे मंचाचे मत आहे.
5. तक्रारकर्त्याने सिक्यूरिटी गार्ड श्री. रामप्रकाश तिवारी यांनी लिहून दिलेले दस्तावेज क्र.6 मंचासमक्ष वाचून दाखविले त्यात आग लागण्याची घटना दि.03.05.2008 रोजीची आहे. सदर बयाण आणि घटनास्थळ पंचनामा यांचे सुक्ष्म वाचन व अवलोकन केले असता मंचाचे मत स्पष्ट होते की, तक्रारकर्त्याचे फॅक्टरीचे, इमारतीबाहेर कॉम्प्युटर पेपर, तयार झालेला माल, पेपर रिम, रिमचे तुकडे जळालेले आहेत आणि अंदाजे 12 ते 15 लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे. सदर पंचनाम्याबद्दल गैरअर्जदारांनी वाद उपस्थित केलेला नाही.
6. तक्रारकर्त्याने आपला बाजू सिध्द करण्यासाठी मंचासमक्ष दि.31.03.2008 अखेरचे अंकेक्षकाकडून घेतलेले ताळेबंद प्रकरणात दाखल केलेले आहे. त्यामध्ये दि.31.03.2008 ला शिल्लक असलेला कच्चा माल, तयार झालेला माल, अनुपयोगी कचरा (Scrap) या बद्दल स्पष्ट उल्लेख आहे. तक्रारकर्त्याने पुढे युक्तिवाद केला की, दि.31.03.2008 नंतर बराच माल खरेदी करण्यांत आलेला आहे. तक्रारकर्त्याचे फॅक्टरीचे इमारतीचे आतील भागांचे फोटो गैरअर्जदाराने दाखल केलेले आहेत त्यावरुन तसेच तक्रारकर्त्याने खरेदी केलेल्या मालाच्या पावत्यांवरुन व त्याचा व्यास व व्याप पाहता त्याने खरेदी केलेला माल फॅक्टरीच्या इमारतीमध्ये बसु शकत नसल्यामुळे तो माल इमारतीबाहेर साठविण्यांत आलेला होता. 7. गैरअर्जदाराने दाखल केलेल्या फोटोवरुन तक्रारकर्त्याने युक्तिवाद केला की, फॅक्टरीच्या आंत साठविलेल्या मालाने व्यापलेली जागा यावरुन ही बाब स्पष्ट होते की, तक्रारकर्त्याने खरेदी केलेला व तयार झालेला बराचसा माल इमारती बाहेर ठेवल्या गेला होता आणि दि.31.03.2008 अखेर शिल्लक माल आणि त्यानंतर खरेदी करण्यांत आलेला माल यांचा साठा हा इमारतीच्या आंत बसुच शकत नाही. आर्कीटेक्ट श्री. आशिष नशिने यांनी दिलेले जागा उपलब्धते बद्दलचा अहवाल दस्तावेज क्र.17 सोबत दाखल आहे. तक्रारकर्त्याने युक्तिवाद केला की, त्याने खरेदी केलेल्या मालाची साठवण इमारतीच्या आंत होऊच शकत नाही, म्हणून तो बाहेर ठेवल्या गेला होता.
8. मंचाच्या मते ही बाब स्पष्ट होते की, सदर आग लागण्याची घटना दि.03.05.2008 रोजी झालेली आहे आणि त्या आधी तक्रारकर्त्याने पान क्र.137,138,139 व 140 नुसार बराचसा माल खरेदी केलेला आहे आणि त्याबद्दल डिलेव्हरी मेमो वरील प्रमाणे दाखल आहे. दि.31.03.2008 ला शिल्लक असलेला माल आणि त्यानंतर खरेदी करण्यांत आलेला माल हा इमारतीच्या आंत साठविल्या जाऊ शकत नाही, असे तक्रारकर्त्याचे म्हणणे मंचाला योग्य/ रास्त वाटते. 9. गैरअर्जदाराने युक्तिवाद केला की, जळालेल्या मालाचे फोटो पान क्र.102 व 103 वरुन दिसुन येते, त्यामुळे फक्त कचरा (scrap) व अनुपयोगी माल एवढाच जळाल्याचे स्पष्ट होते. तक्रारकर्त्याने यावरुन युक्तिवाद केला की, माल जळाल्यानंतर कार्बन व इतर कागदपत्रांचा (scrap) नगन्य होऊन जातो. म्हणून सदर फोटो मधील दाखविण्यांत आलेला कचरा (scrap) हा आग लागण्या आधी किती होता व त्याने किती जागा व्यापली होती हे स्पष्ट होत नाही. वर्षा अखेर शिल्लक असलेला माल व नवीन खरेदी करण्यांत आलेला माल यांचे एकूण व्यास (Volume) पाहता ते इमारतीच्या आंत ठेवल्या जाऊ शकत नाही असे तक्रारकर्त्याचे म्हणणे रास्त वाटते. Express boxes to keep the material out side the building premises तक्रारकर्त्याने तक्रारीमध्ये नमुद केले आहे की, त्याचे रु.11,54,211/- चा माल जळालेला असुन त्यामध्ये कच्चा माल, पेपर रोल, अर्धा तयार माल, कॉम्प्युटर पेपर, खड्डयाचे बॉक्स तसेच विद्युत संचाचे रु.61,811/- एवढी रक्कम तक्रारकर्त्याला गैरअर्जदारांनी द्यावयास पाहिजे होती, परंतु ती न देऊन त्रुटीपूर्ण सेवा दिलेली आहे. तक्रारकर्त्याने युक्तिवाद केला की, सदर नुकसान भरपाईची मागणी सिध्द करण्यासाठी त्याने दि.31.03.2008 अखेर खरेदी केलेल्या मालाची किंमत दाखविणे, अंकेक्षण करुन घेतलेले ताळेबंद व त्याला अनुसरुन असलेल्या माल खरेदीचे बिल आणि माल पोहचता झाल्याबद्दलचा दस्तावेज प्रकरणात दाखल केलेले आहे. तसेच विद्युत कंपनीचे मीटर व इतर साहीत्य खराब झाल्यामुळे त्याला आलेला खर्च रु.61,811/- ची रक्कम घसारा वजा करुन तक्रारकर्त्याला चुकती केलेली आहे आणि म्हणून तक्रारकर्त्याचा दावा सिध्द झाला असुन तो मान्य करावा अशी प्रार्थना केलेली आहे. 10. तक्रारकर्त्याने असे सुध्दा नमुद केले आहे की, इमारतीच्या बाहेर कोणताही माल ठेऊ नये किंवा फॅक्टरी परिसरात माल ठेवल्यास व नुकसान झाल्यास विमा लाभ मिळणार नाही असे कुठेही स्पष्ट पणे करारात नमुद नाही. 11. गैरअर्जदाराचे वतीने निशाणी 12 वर सर्वेअर, संदीप मशरु आणि कंपनी यांचे प्रतिज्ञा लेख दाखल करण्यांत आलेला आहे. त्याचे सुक्ष्म वाचन करण्यांत आले असता त्याने नमुद केले आहे की, ‘ माझ्या हे लक्षात आले की आग ही केवळ इमारती बाहेर जमाकरुन ठेवलेल्या अनउपयोगी फेकण्या किंवा नष्ट करण्या योग्य वस्तुच्या ढिगाला लागलेली आहे’. परंतु श्री. मशरु यांनी मंचासमक्ष ही बाब मांडलेली नाही की तक्रारकर्त्याने केलेला दावा, खरेदी केलेला माल व जळालेला कच्चा माल त्या अनुषंगाने व्यापलेली जागा किती होऊ शकते व किती आहे हे उपलब्ध मालाच्या बिलावरुन स्पष्ट झाले असते. म्हणून सर्वेअरने दिलेला अहवाल हा अंतिम होऊ शकत नाही कारण तो बराचश्या गोष्टींबद्दल शांत आहे.
12. तक्रारकर्त्याने प्रकरणात दाखल सर्व कागदपत्रे गैरअर्जदाराला दिलेले आहे आणि उपलब्ध इमारतीमधील मालावरुन व बिलांवरुन गैरअर्जदाराने आकलन केले नाही आणि जळालेल्या मालावरुन तो कीती असेल याबाबत काहीही बोध होऊ शकत नाही आणि म्हणून सर्वेअर रिपोर्ट मान्य करता येऊ शकत नाही.
13. उभय पक्षांमध्ये याबाबत वाद आहे की, इमारतीला कोणतेही नुकसान झालेले नाही, परंतु इमारतीबाहेर जिन्याजवळील माल जळालेला आहे म्हणून सर्वेअरचे आकलन योग्य आहे असा गैरअर्जदाराने ठाम युक्तिवाद केला तसेच तक्रारकर्त्याने सर्वेअर रिपोर्ट योग्य नसल्याचा युक्तिवाद केला. मंचाव्दारा सदर सर्वेअर अहवाल वाचण्यांत आला त्यामध्ये त्याने संपूर्ण साठयाची कागदपत्रे व बिले इत्यादी दिल्याचे सर्वेअरने अहवालाचे शेवटी नमुद केले आहे. सर्वेअर अहवाल हा नुकसानाचे योग्य आकलनासाठी मदतगार होऊ शकतो. परंतु सर्वेअरचा अहवाल अंतिम धरता येत नाही, असे माननीय सर्वोच्च न्यायालयाने 2010 NCJ 71 (SC), “New India Assurance Company Limited –v/s- Pradeep Kumar” आपल्या निवाडयात स्पष्ट केले आहे. म्हणून मंचाचे स्पष्ट मत आहे की, इमारतीमधे उपयोगात न आणलेला माल, कच्चा व तयार माल उपलब्ध होता. त्याचा व्याप (Volume) व बिलांवरुन त्या मालाची योग्य पध्दतीचे पाहणी केल्या जाऊ शकली असती. परंतु सर्वेअरने असे काहीही केल्याचे दिसुन येत नाही, म्हणून मंचाचे असे स्पष्ट मत आहे की, सर्वेअर अहवाल पूर्ण नसुन तो मान्य करता येत नाही. 14. मंचा समक्ष ही बाब पान क्र.137 ते 140 वर तक्रारकर्त्याने माल खरेदी केल्याचे डिलेव्हरी मेमोवरुन स्पष्ट होते आणि सदर माल तक्रारकर्त्याचे परिसरात आला होता हे कागदपत्रांवरुन स्पष्ट होते. तक्रारकर्त्याने युक्तिवाद केला की, माल बाहेर ठेवलेला होता आणि म्हणून सर्वेअरने केलेले आकलन योग्य नाही. सदर बिल तपासले असता एक बिल हे कार्बन रोलचे आहे आणि त्यामध्ये 750 बॉक्स (Cartons) आणि प्रत्येक Carton मध्ये 750 Carton अशा प्रकारे आणि दुस-या बिलानुसार एम.एस.ई.बी. रिसीप्ट 13,00,000 नग असे असुन दोन्ही बिलांनुसार माल आलेला आहे, असे दस्तावेज क्र.138 आणि 140 वरुन स्पष्ट होते. तसेच दस्तावेज क्र.137 आणि 139 वर मागे नोंद आहे.
15. मंचाचे असे स्पष्ट मत आहे की, इतर कोणताही माल बाहेर होता किंवा साठवला होता किंवा तयार झालेला माल बाहेर होता हे उपलब्ध कागदपत्रांवरुन सिध्द होत नाही. आणि म्हणून मंचाचे असे स्पष्ट मत आहे की, संदर्भीय दोन्ही बिलां अंतर्गत असलेला माल हा दि.03.05.2008 ला लागलेल्या आगीत भस्मसात झालेला असुन नुकसान भरपाई मिळण्यांस तक्रारकर्ता पात्र आहे.
16. गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याला रास्त दावा ना-मंजूर करुन दोषपूर्ण सेवा दिलेली आहे. म्हणून गैरअर्जदार तक्रारकर्त्याल मानसिक व शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्यांस जबाबदार आहे. म्हणून मंच वरील विवेचनावरुन खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे. -// अं ति म आ दे श //- 1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते. 2. गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याचा रास्त दावा नाकारुन दोषपूर्ण सेवा दिलेली आहे. 3. गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याला रु.7,47,500/-दि.12.01.2009 पासुन द.सा.द.शे.7% दराने व्याजासह आगीमुळे झालेल्या मालाच्या नुकसानी पोटी देय करावी. 4. मानसिक व शारीरिक त्रासापोटी गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याला रु.10,000/- देय करावे. 5. तक्रारीच्या खर्चापोटी गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याला रु.2,000/- देय करावे. 6. उभय आदेशाचे पालन गैरअर्जदाराने आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी अन्यथा आदेशीत रकमेवर द.सा.द.शे.7% ऐवजी द.सा.द.शे.9% व्याज देय राहील. 7. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत सदस्यांकरता दाखल केलेले ब व क संच परत घेऊन जावे.
| HONORABLE Mr. Milind R. Kedar, Member | HONABLE MR. Ramlal Somani, PRESIDENT | , | |