निकाल
दिनांक- 28.10.2014
(द्वारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्यक्ष)
तक्रारदार लक्ष्मीबाई मारोती चव्हाण यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाला क्र.2 यांनी शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत लाभ न देऊन सेवेत त्रुटी ठेवली आहे म्हणून विमा रक्कम व नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली आहे.
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात येणेप्रमाणे, तक्रारदार हया मौजे वंजारवाडी तालूका बीड येथील रहिवाशी असून तक्रारदार हया शेती व्यवसाय करुन आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात. तक्रारदार यांचे पती मारोती चव्हाण हे व्यवसायाने शेतकरी होते, ते तक्रारदार यांचे सोबत वंजारवाडी येथे रहात होते. तक्रारदार यांचे पतीचा मृत्यू दि.22.04.2008 रोजी मोटार सायकल अपघातामध्ये झाला. सदरील घटना घडल्यानंतर अपघाताची खबर ग्रामीण पोलीस स्टेशन बीड यांना देण्यात आली. पोलीसांनी घटनास्थळावर जाऊन घटनास्थळ पंचनामा केला व मृत्यूची नोंद घेतली. महाराष्ट्र शासनाने शेतक-यांकरता कल्याणकारी योजना म्हणून शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना सुरु केलेली आहे. महाराष्ट्र शासनाने सर्व शेतक-याकरता विमा उतरविलेला आहे. विम्याची रक्कम सामनेवाला क्र.2 इन्शुरन्स कंपनीकडे भरलेली आहे. शेतक-यांचा अपघाती मृत्यू झाल्यास विमा योजनेची कार्यवाही तहसिलदार कार्यालयामार्फत करावयाची असते. तक्रारदार यांनी शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत मिळण्यासाठी तहसिलदार यांच्याकउे रितसर अर्ज दाखल केलेला आहे. संपूर्ण कागदपत्राची पुर्तता केलेली आहे. सदरील प्रस्ताव दाखल करुनही विमा कंपनीने शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई दिली नाही. सबब तक्रारदार हे सामनेवाला यांचेकडून शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत रक्कम रु.1,00,000/- मिळणेस पात्र आहे. तसेच तक्रारदार यांना झालेल्या शारिरिक, मानसिक त्रासापोटी व तक्रारीचा खर्च मिळण्यास पात्र आहे.
सामनेवाला क्र.1 व 3 यांना रजिस्टर पोस्टाने नोटीस तामिल झाली. परंतू ते या मंचासमोर हजर राहिले नाही.
सामनेवाला क्र.2 रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी हे या मंचासमोर हजर झाले व त्यांनी निशाणी 12 अन्वये लेखी कैफियत दाखल केली. सामनेवाला क्र.2 यांचे कथन की तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे कोणताही क्लेम दाखल केला नाही. प्रस्ताव सामनेवाले यांना प्राप्त झाला नाही. त्यामुळे सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवलेली आहे असे म्हणता येणार नाही. सामनेवाला यांनी असे कथन केले आहे की, तक्रार दाखल करण्यास दोन वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. विलंबास समाधानकारकरित्या कारण दिलेले नाही. सबब तक्रारदार यांची तक्रार रदद करण्यात यावी.
तक्रारदार यांनी पुराव्याकामी स्वतःचे शपथपत्र निशाणी 20 अन्वये दाखल केले आहे. सामनेवाला क्र.2 यांनी सक्षम अधिका-यांचे शपथपत्र निशाणी 13 वर दाखल केले आहे. तक्रारदार यांनी तक्रारीसोबत निशाणी 5 वर कागदपत्र हजर केलेले आहे. तक्रारदार यांचे वकील युक्तीवादाचेवेळेस गैरहजर राहिले. सामनेवाला यांचे वकील श्री.कुलकर्णी यांचा युक्तीवाद ऐकला. तक्रारदार यांनी दाखल केलेले शपथपत्र व कागदपत्राचे अवलोकन केले. न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1) तक्रारदार यांनी शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा
योजनेअंतर्गत सामनेवाला यांच्याकडे क्लेम दाखल
केला आहे, ही बाब शाबीत केली आहे काय? नाही.
2) सामनेवाला यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेत
त्रुटी ठेवली आहे, ही बाब तक्रारदार यांनी शाबीत
केली आहे काय? नाही.
3) आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुददा क्र.1 व 2 ः- तक्रारदार यांनी तक्रारीत नमुद केलेल्या बाबी लक्षात घेतल्या. तसेच शपथपत्रामध्ये नमुद केलेल्या बाबी लक्षात घेतल्या असता तक्रारदार यांचे कथन की, तक्रारदार यांचे पती मारोती हे मयत झाल्यानंतर त्यांनी शेतकरी अपघात विमा योयजनेअंतर्गत रक्कम मिळणेकामी तहसिलदार कार्यालय यांच्याकउे क्लेम दाखल केला व तहसिलदार यांनी सामनेवाला क्र.1 व 2 यांच्याकडे क्लेम पाठविला. सामनेवाला क्र.1 व 3 हे या मंचासमोर हजर झाले नाही. तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.3 यांच्याकडे क्लेम दाखल केल्याबाबत कोणताही दस्त हजर केलेला नाही. तक्रारदार यांनी फक्त तक्रारीसोबत गाव नमुना 8 अ, 7/12 चा उतारा, पोलीसांनी घेतलेला जबाब, घटनास्थळ पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, मृत्यू प्रमाणपत्र हजर केलेले आहे. सदरील दस्तऐवज याचे अवलोकन केले असता त्यावरुन तक्रारदार यांनी सदरील क्लेम तहसिलदार अगर कृषी अधिकारी यांच्याकडे दाखल केल्याबाबत उल्लेख नाही. प्रस्ताव दाखल केल्याबाबत दस्तऐवज तक्रारदार यांनी या मंचासमोर हजर केले नाही. शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत लाभार्थी शेतक-यांच्या वारसांना शेतक-यांचा अपघाती मृत्यू झाल्यास शासनाने विहीत केलेल्या नमुन्यात व विहीत केलेल्या दस्तऐवजासोबत जोडून क्लेम हा कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करावयाचा असतो. कृषी अधिकारी तो क्लेम ब्रोकर कंपनीकडे पाठवितात व ब्रोकर कंपनी सदरील क्लेम मंजूरीसाठी इन्शुरन्स कंपनीकडे पाठवितात. तक्रारदार यांनी अगर त्यांच्या वारसांनी सामनेवाला यांच्याकडे क्लेम दाखल केल्याबाबत कोणताही पुरावा सादर केलेला नाही. सदरील क्लेम हा दोन वर्षानंतर या मंचासमोर दाखल केलेला आहे. क्लेम दाखल करण्यास का विलंब झाला? या बाबतही तक्रारदार यांनी समाधानकारक बाबी या मंचासमोर आणल्या नाही. सामनेवाला यांच्याकडे क्लेम दाखल केला नसल्यामुळे सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे असा निष्कर्ष काढता येणार नाही. तक्रारदार यांनी असे कथन केले आहे की, त्यांनी क्लेम मिळण्यासाठी पाठपुरावा केला परंतू त्या बाबतही कोणतेही दस्तऐवज या मंचासमोर हजर नाही. सबब सामनेवाला यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली आहे ही बाब तक्रारदार यांनी शाबीत केली नाही. सबब तक्रारदाराची तक्रार रदद करण्यात येत आहे. म्हणून मुददा क्र.1 व 2 चे उत्तर नकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार रदद करण्यात येत आहे.
2) खर्चाबददल आदेश नाही.
3) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील
कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला
परत करावेत.
श्री.रविंद्र राठोडकर, श्रीमती मंजूषा चितलांगे, श्री.विनायक लोंढे,
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड