आदेश आदेश पारीत व्दारा श्री. एस आर आजने, मा. सदस्य - तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 नुसार दाखल केलेली आहे.
- तक्रारदाराचे वि.प. बॅंकेत बचत खाते होते व त्याचा खाते क्रमांक 0499000100188042 असा आहे. तक्रारकर्ता हा वि.प. बॅकेची फार पूर्वीपासुन सेवा घेत होता. तकारदाराला त्याच्या बचत खात्यातुन प्रत्येक दिवशी रुपये 25,000/- एवढी रक्कम काढण्याची मर्यादा होती. तक्रारदाराला पैशाची गरज असल्याने त्यांने वि.प. बॅंकेच्या, खामलास्थीत असलेल्या एटीएमला भेट दिली आणि रुपये 35,000/- इतकी रक्कम काढण्याचा प्रयत्न केला व तो प्रयत्न अपयशी ठरला. म्हणुन तक्रारदाराने एटीएम मधुन रुपये 10,000/- काढण्याचा दोनदा प्रयत्न केला आणि तो व्यवहार यशस्वी झाला व तक्रारदाराला एटीएम व्दारे रुपये 20,000/- प्राप्त झाले आणि त्यामूळे तक्रारदाराने परत रुपये 10,000/- एटीएम मशीनव्दारे काढण्याचा प्रयत्न केला असता मशीन व्दारे नकार देण्यात आला म्हणुन तकारदाराने रुपये 5,000/- एटीएम मशीन व्दारे काढण्याचा प्रयत्न केला आणि तक्रारदाराला रुपये 5,000/- प्राप्त झाले कारण एटीएम मशीनव्दारे रक्कम काढण्याची अधिकतम मर्यादा ही रुपये 25,000/- इतकी होती.
- तक्रारदाराला बॅंकेव्दारे माहे सप्टेंबर-2017 चे विवरण प्राप्त झाले त्यातील नोंदणी पाहता तक्रारदाराला धक्का बसला. तक्रारदाराने दिनांक 23.9.2017 रुपये 35,000/- खात्यातुन काढले असे त्यांत दिसुन आले. परंतु वस्तुस्थीती अशी आहे की, तक्रारदाराने फक्त रुपये 25,000/- एटीएम मशीनव्दारे काढले आणि रुपये 10,000/- व्यवहार हा नाकारण्यात आला होता आणि त्यामूळे तक्रारदाराला केवळ रुपये 25,000/- एवढी रक्कम प्राप्त झाली. कोणत्याही व्यक्तीला रुपये 25,000/- अधिकतम मर्यादा असतांना व्यक्ती प्रत्येक दिवशी फक्त रुपये 25,000/- एटीएम मशीनव्दारे काढू शकते आणि म्हणुन एका दिवशी रुपये 35,000/- मशीनव्दारे काढण्याची परवानगी नाही. त्यामूळे तकारदाराने माहे आक्टोबर-2017 ला वि.प.क्रं.1 यांचे कडे तक्रारीचे निवारण करण्याकरिता तक्रार दाखल केली.
- वि.प.ने तक्रारदाराचे तक्रारीची दखल घेतली नाही. त्यामूळे तक्रारदाराला वि.प.कडे ई-मेल व्दारे 2.10.2019 ला तक्रार दाखल करावी लागली. सदरची तक्रार ग्राहक तक्रार केन्द्राकडे पाठविण्यात आली परंतु वि.प.ने तक्रारीचे निवारण केले नाही. तक्रारदाराने दिनांक 26.12.2019 ला वि.प. ला कायदेशीर नोटीस पाठविला परंतु वि.प. ने नोटीसची दखल घेतली नाही. म्हणुन तक्रारदाराने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन वि.प. ने तक्रारदाराला रुपये 10,000/- परत करावे व दिनांक 23.9.2017 पासुन द.सा.द.शे.18 टक्के व्याजासह रक्कम अदा करावी. तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी व तक्रारीचा खर्च मिळावा.
- वि.प.1 व 2 यांना मंचामार्फत नोटीस पाठविण्यात आली. वि.प.क्रं.1 व 2 यांना दिनांक 5.8.2021 नोटीस प्राप्त होऊनही वि.प. 1 व 2 तक्रारीत हजर झाले नाही म्हणुन वि.प.क्रं.1 व 2 यांचे विरुध्द तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश दिनांक 11.10.2021 रोजी पारित करण्यात आला.
- तक्रारदाराने अभिलेखावर दाखल केलेले दस्तावेजांचे व दाखल पुरसिसचे अवलोकन करता खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले.
मुद्दे उत्तरे - तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे काय ? होय
- विरुध्द पक्षाने तक्रारदाराला त्रुटीपूर्ण सेवा दिली काय ? होय
- विरुध्दपक्षाने तक्रारदाराचे प्रती अनुचित व्यापारी
पध्दतीचा अवलंब केला आहे काय ? होय - काय आदेश अंतिम आदेशानुसार
का र ण मि मां सा - तक्रारदाराने वि.प.चे बॅंकेत बचत खाते होते व त्याचा बचत खाता क्रं. 0499000100188042 खामला शाखा नागपूर येथे होते हे नि.क्रं.2 (अॅंनेक्शर -1) चे अवलोकन केले असता निर्देशनास येते यावरुन तक्रारकर्ता हा वि.प.चा ग्राहक आहे हे सिध्द होते. वि.प.च खामला स्थीत एटीएम मधुन रक्कम काढण्याची अधिकतम मर्यादा 25,000/- इतकी होती. तक्रारकर्ता वि.प.चे खामलास्थीत एटीएम मधुन दिनांक 23.9.2017 ला रक्कम काढण्याकरिता गेला व तक्रारदाराने सुरुवातीला रुपये 35,000/- एवढी रक्कम काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर व्यवहार अयशस्वी झाला. तक्रारदाराने दुस-यांदा अनुक्रमे रुपये 10,000/- प्रमाणे दोनदा रक्कम काढली व पुनश्च रुपये 10,000/- काढण्याचा प्रयत्न केला असता सदर रक्कम मशीनव्दारे नाकारण्यात आली. त्यानंतर पुनश्च रुपये 5000/- मशीनव्दारे काढली. वि.प.चे खामला शाखा , नागपूर येथील एटीएम मधुन एकावेळी रुपये 25,000/- काढायची मर्यादा असतांना तक्रारदाराला रुपये 25,000/- प्राप्त झाले परंतु तक्रारदाराचे खातेपुस्तक विवरणामधे दिनांक 23.9.2017 ला रुपये 10,000/-, रुपये 10,000/- व रुपये 5,000/- तसेच रुपये 10,000/- असे एकुण 35,000/- काढल्याची नोंद खाते पूरस्तकात असल्याचे नि.कं.2 (अॅनेक्शर-1) बॅंकचे विवरणापत्रात दिसून येते. तक्रारदाराने वि.प.ला रुपये 10,000/- रक्कम परत खात्यात वळती करण्याबाबत विनंती केली असता वि.प. ने तक्रारदाराचे तक्रारीची दखल घेतली नाही ही वि.प.ची तक्रारदाराचे प्रती त्रुटीपूर्ण सेवा असुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
सबब आदेश खालीलप्रमाणे .... अंतिम आदेश - तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर.
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला रुपये 10,000/- परत करावे. सदर रक्कमेवर दिनांक 23.9.2017 पासुन द.सा.द.शे.5 टक्के व्याजासह मिळुन येणारी रक्कम परत करावी.
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्ते यांना झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता व नुकसान भरपाई म्हणून रुपये 3,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 2,000/- द्यावे.
- वरील आदेशाचे पालन वि.प.क्रं.1 व 2 ने संयुक्तीक अथवा वैयक्तीकरित्या करावे.
- विरुध्द पक्षांनी वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या तारखेपासून 45 दिवसाच्या आंत करावी.
- उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्क द्यावी.
- तक्रारकर्त्याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
|