निकालपत्र
निकाल दिनांक – २२/०१/२०२०
(द्वारा अध्यक्ष : श्री.विजय चंद्रलाल प्रेमचंदानी)
___________________________________________________________
१. तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ प्रमाणे सदर तक्रार दाखल केलेली आहे.
२. तक्रारदाराने तक्रारीत असे कथन केले आहे की, तक्रारदाराने सामनेवाले बॅंकेचे ए.टी.एम. कार्ड घेतले होते व त्याची मुदत ३०-११-२०१६ पर्यंत होती. दिनांक ०७-०१-२०१७ रोजी तक्रारदारचे मोबाईलवर अशी सुचना आली की, तक्रारदाराचे खात्यातुन रक्कम रूपये १,०००/- कमी कमी करण्यात आले आहे. तक्रारदाराने त्याचे खात्यातुन कोणतीही रक्कम काढलेली नव्हती व सदर रक्कम काढण्याकरीता वापरण्यात आलेले ए.टी.एम. कार्ड हे तक्रारदाराचे नव्हते. सबब तक्रारदाराने सामनेवाले यांच्याकडे त्याची तक्रार नोंदवुन व त्याचे खात्यात रूपये १,०००/- जमा करण्यात यावे, अशी विनंती केली. तक्रारदाराला दिनांक १८-०२-२०१७ रोजी दुपारी ३:२१ ला मोबाईलवर मेसेज आला की, तक्रारदाराचे ए.टी.एम. ३६९९ चा क्रमांक सक्सेसफुल झाला आहे. परंतु सदर कार्ड तक्रारदाराचे नव्हते व नाही. तक्रारदाराचे खात्यातुन बेकायदेशीरपणे रक्कम रूपये १,०००/- काढण्यात आले व त्यासंदर्भात कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही व तक्रार करूनही त्यावर कोणतीही दखल घेतली नसल्याने तक्रारदाराने सामनेवालेकडे स्वतः नोटीस दिली. परंतु काही दखल घेतली नसल्याने तक्रारदार यांनी सामनेवालेविरूध्द सदर तक्रार दाखल केली आहे.
३. तक्रारदाराने तक्रारीत अशी विनंती केली आहे की, सामनेवालेकडुन तक्रारदाराला बेकायदेशिररीतीने कपात केलेली रक्कम रूपये १,०००/- तसेच मानसीक, शारीरिक त्रासापोटी व तक्रारीचा खर्च व रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया ने दिलेल्या नियमाप्रमाणे दंडाची रक्कम मिळण्याचा आदेश व्हावा.
४. तक्रारदाराची तक्रार स्विकृत करून सामनेवाले यांना नोटीस काढण्यात आली. सदर नोटीस प्राप्त झाल्यावर सामनेवाले हजर झाले. सामनेवालेने निशाणी क्रमांक १० वर कैफीयत दाखल केली व सदर कैफीयतीमध्ये सामनेवालेने असे कथन केलेले आहे की, तक्रारदाराने तक्ररीत लावलेले आरोप खोटे असुन त्यांना नाकबुल आहे. दिनांक ०८-०१-२०१६ रोजी नोट बंदी असल्यामुळे बॅंकेच्या कामकाजामध्ये मध्ये प्रचंड ताण तणाव असल्याने व सोशल मिडीयावरून बॅंकेच्याविरूध्द वातावरण निर्माण झाले असल्याने अनावधानाने बॅंकेकडुन नजरचुक झाली व दोन ए.टी.एम.ची आदलाबदल झाली व त्या अदलाबदलीमुळे तक्रारदाराचे कार्ड ए.टी.एम.मध्ये लिंक झाले. तक्रारदाराचे तक्रार अर्जाची दखल घेऊन त्यासंदर्भात बॅंकेने तक्रारदाराचे खात्यातुन काढण्यात आलेले रक्कम रूपये १,०००/- व्याजासह त्याच्या खात्यात दिनांक ०३-०५-२०१७ रोजी जमा करण्यात आलेले होते. त्यात सामनेवाले बॅंकेची कोणतीही सेवेत त्रुटी किंवा चुक नाही. म्हणुन सदर तक्रार खारीज करण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.
५. तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार, दस्तऐवज, सामनेवालेने दाखल केलेला जबाब, शपथपत्र, तक्रारदाराचा शपथपत्र पुरावा व उभयपक्षांचा तोंडी युक्तिवाद ऐकला असता मंचासमक्ष खालीलप्रमाणे मुद्दे विचारात घेण्यात येत आहे.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
१. | तक्रारदार हे सामनेवालेंचे ग्राहक आहेत काय ? | होय |
२. | सामनेवालेने तक्रारदाराला न्युनतम सेवा दिलेली आहे काय ? | होय |
३. | आदेश काय ? | अंतीम आदेशाप्रमाणे |
मुद्दा क्र.१ -
६. तक्रारदार यांनी सामनेवाले बॅंकेते त्यांचे पेन्शनचे बचत खाते होते व त्या खात्यातुन सामनेवाले बॅंकेने तक्रारदाराला ए.टी.एम. कार्ड पुरवीले होते, ही बाब उभयपक्षांना मान्य असुन, तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहे, हे सिध्द होते. सबब मुद्दा क्र.१ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्र.२ -
७. सामनेवाले बॅंकेने कैफीयतीत स्वतः नमुद केले आहे की, त्यांचे नजुरचुकीने तक्रारदारचे ए.टी.एम. कार्डमध्ये बदल झाला व त्यांच्या नजरचुकीने तक्रारदाराचे खाते दुस-या ए.टी.एम. कार्डला लिंक झाले. तक्रारदाराचे खात्यातुन रक्कम रूपये १,०००/- वगळण्यात आले होते, त्या संदर्भात तक्रारदाराने दिनांक १०-०१-२०१७ रोजी तक्रार केलेली होती. त्यावर दखल घेऊन त्यांनी तक्रारदाराचे खात्यात रक्कम रूपये १,०००/- व्याजासह जमा केले होते. सदरील रक्कम दिनांक ०३-०५-२०१७ रोजी जमा करण्यात आली होती, असेही सामनेवाले कैफीयतीमध्ये नमुद केलेले आहे. तक्रारदाराने निशाणी २१ वर दस्त क्रमांक १ दाखल केलेले आहे. तो रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया यांचे दिनांक ०५-१२-२०१७ रोजीचे सुचना का अधिकार अधिनियम २००५ मध्ये करण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे दिलेली आहे. त्या वान्छित सूचना ००१ मध्ये असे नमुद करण्यात आलेले आहे की, ए.टी.एम. संदर्भात असलेली कोणतीही तक्रार बॅंकेने ७ दिवसांचे आत त्या तक्रारीवर दखल घेण्यात यावी, खात्यातुन कपात करण्यात आलेली रक्कम परत जमा करावी, ती जमा केली नाही तर प्रतिदिवस बॅंकेने रूपये १००/- देण्याचे दंड संबंधीत खातेदाराला द्यावा लागेल, असे नमुद करण्यात आले आहे. सदर प्रकरणात सामनेवालेने कैफीयतीमध्ये त्याची चुक मानलेली आहे व तक्रारदाराचे खात्यातुन कपात करण्यात आलेली रक्कम परत जमा केलेली आहे. परंतु नियमाप्रमाणे तक्रारदाराची रक्कम जमा केलेली नसल्याने ही बाब सामनेवालेची तक्रारदाराप्रती न्युनतम सेवा दर्शविेते, असे सिध्द होते. म्हणुन मुद्दा क्रमांक २ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्र.३ -
८. मुद्दा क्र.१ व २ चे विवेचनावरून खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करण्यात येत आहे.
आदेश
१. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे. |
२. सामनेवालेने तक्रारदाराला रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडीयाचे नियमाप्रमाणे दिनांक १७-०१-२०१७ पासुन ते ०३-०५-२०१७ पर्यंत प्रतिदिवस १०० रूपये प्रमाणे १०६ दिवसांची रक्कम रूपये १०,६००/- (अक्षरी दहा हजार सहाशे मात्र) तक्रारदाराचे खात्यात जमा करावे. |
३. सामनेवाले यांनी तक्रारदाराला शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल रूपये २,०००/- (अक्षरी दोन हजार मात्र) व सदर तक्रार अर्जाचा खर्च रूपये १,०००/- (अक्षरी एक हजार मात्र) द्यावा. |
४. वर नमूद आदेशाची पुर्तता सामनेवाले यांनी वैयक्तिकरित्या किंवा संयुक्तिकरित्या आदेशाची प्रत मिळण्यापासून ३० दिवसाच्या आत करावी. |
५. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्क देण्यात यावी. |
६. तक्रारदार यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी. |