तक्रारदार : वकील श्रीमती वारुंजीकर यांचे सोबत हजर.
सामनेवाले 1 ते 4 आणि 7 : एकतर्फा.
सामनेवाले 2 व 3 : गैरहजर. :
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
1. सा.वाले क्र.1 ही सहकारी गृह निर्माण संस्था असून तक्रारदार हे संस्थेचे सभासद आहेत. सा.वाले क्र.2 ते 7 हे संस्थेच्या ताब्यात असलेल्या भुखंड क्र.5 वर बांधण्यात आलेल्या सदनिकांचे/गाळयांचे ताब्यामध्ये आहेत. तक्रारदारांची जागा ही प्लॅाट क्र.3 मध्ये आहे. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथना प्रमाणे प्लॅाट क्र.3 व 5 हयांचे करीता समाईक नळ जोडणी होती व त्याचा वापर प्लॅाट क्र.3 व 5 मध्ये बांधण्यात आलेल्या जागांचे रहीवासी करीत होते. तक्रादारांचे तक्रारीतील कथना प्रमाणे तक्रारदार सा.वाले क्र.1 संस्थेकडे पाणी वापराचे देयकाप्रमाणे पैसे जमा करीत होते. तथापी संस्थेने महानगर पालिकेकडे देयका प्रमाणे रक्कम जमा करण्यास विलंब केला व पाणी पट्टीची रक्कम थकबाकी झाली. तक्रारदारांचे कथना प्रमाणे दिनांक 2.9.2007 रोजी पाणीपट्टीची एकंदर देय रक्कम रु.63,473/- मागील दोन वर्षाकरीता अशी देय होती. नळ जोडणीचा वापर तक्रारदार तसेच प्लॅाट क्र.5 वरील अन्य रहीवासी हे एकत्रित करीत असल्याने तक्रारदारांनी त्यांचे हिश्याची 1/7 रक्क्म रु.9,067/- सा.वाले क्र.1 संस्थेकडे पाठविली. तसेच स्वतंत्र नळ जोडणीकामी नाहरकत द्यावी असा अर्ज दिला. परंतु सा.वाले क्र.1 संस्थेने पाणी पट्टीची बाकी रक्कम सा.वाले क्र.2 ते 7 यांचे कडून वसुल करुन महानगर पालिकेकडे जमा केली नाही. परीणामतः दिनांक 7.9.2007 रोजी महानगर पालिकेने नळ जोडणी तोडून टाकली. परीणामतः तक्रारदारांना महानगर पालीकेचे पाणी मिळू शकले नाही व तक्रारदारांची खुपच गैरसोय व कुचंबणा झाली. त्याच प्रमाणे सा.वाले क्र.1 संस्थेने नविन नळ जोडणीकरीता आपले नाहरकत प्रमाणपत्र दिले नाही. तर महानगर पालिकेने त्या जागेस पूर्वीच नळ जोडणी असल्याने व त्या नळ जोडणीची संपूर्ण बाकी अदा केल्याशिवाय नविन नळ जोडणी होणार नाही असे तक्रारदारांना कळविले. तक्रारदारांची खुपच कुचंबणा होत असल्याने तक्रारदारांनी पूर्वी जमा केलेले रु.9,067/- अधिक रु,66,400/- असे एकंदर रुपये 75,466/- महानगर पालिकेकडे जमा केले. त्यानंतर तक्रारदारांनी त्यांच्या सातव्या हिश्याची रक्कम वजा करता उर्वरित रक्कम परत मागीतली. परंतु त्या बद्दल सा.वाले क्र.1संस्थेने कुठलीही कार्यवाही केली नाही. या प्रकारे सा.वाले क्र.1 संस्थेने तक्रारदार सदस्यास पाणी पुरवठयाचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असा आरोप करुन तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली.
2. सा.वाले क्र.1 संस्था तसेच सा.वाले क्र.4 ते 7 यांनी आपली कैफीयत दाखल केली नाही. परीणामतः त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला. सा.वाले क्र.2 व 3 यांनी आपली एकत्रित कैफीयत दाखल केली. त्यामध्ये सा.वाले क्र.2 व 3 हे तक्रारदारांचे नळ जोडणीचे संदर्भात सेवा सुविधा पुरविणारे होऊ शकत नाहीत असे कथन केले. त्याच प्रमाणे तक्रारदार व सा.वाले क्र.2 व 3 हयांना एकाच नळ जोडणीने पाणी पुरवठा होत होता या कथनास देखील सा.वाले क्र. 2 व 3 यांनी नकार दिला. तक्रारदारांनी सा.वाले क्र.2 व 3 यांच्या कैफीयतीला आपले प्रति उत्तराचे शपथपत्र दाखल केले. दोन्ही बाजुंनी लेखी युक्तीवाद दाखल केला. तक्रारदारांचे वकीलांचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला.
3. प्रस्तुत मंचाने तक्रार, कैफीयत, शपथपत्रे, कागदपत्रे, व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले. त्यावरुन तक्रारीचे निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सा.वाले यांनी तक्रारदारांना पाणी पुरवठयाचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | नाही. |
2 | तक्रारदार सा.वाले यांचेकडून तक्रारीत मागीतलेल्या दादी मिळण्यास पात्र आहेत काय ? | नाही. |
3 | अंतीम आदेश ? | तक्रार रद्द करण्यात येते. |
कारण मिमांसा
4. तक्रारदारांचे तक्रारीतील कथना प्रमाणे वादग्रस्त नळ जोडणीचा वापर तक्रारदार तसेच सा.वाले क्र.2 ते 7 असे एकत्रितपणे करीत होते, व त्यामुळे पाणीपट्टीच्या देयकामधील तक्रारदारांचा हिस्सा 1/7 असा होता. तक्रारदारांनी तक्रारीसोबत निशाणी अ येथे देयक दिनांक 28.8.2007 ची प्रत दाखल केलेली आहे. त्यामध्ये चालु बाकी रु.9,229/- व थकबाकी रु.54,244/- अशी एकूण रक्कम रु.63,473/- दाखविलेली आहे. त्या देयकामध्ये एकूण सदनिकांची संख्या 6 नमुद आहे. व देयक सा.वाले क्र.1 संस्थेच्या नांवे देण्यात आलेले आहे. थोडक्यामध्ये सर्व सहा सदस्यांकडून पाणीपट्टीची रक्कम वसुल करुन संस्थेने ती महानगर पालिकेकडे जमा करणेची जबाबदारी वरील देयकाप्रमाणे सा.वाले क्र.1 संस्थेचे होती असे दिसून येते. सा.वाले क्र.2 व 3 यांच्याकडे दोन सदनिका होत्या असे तक्रारीत दाखविण्यात आल्याने व सा.वाले क्र.2 व 3 ही एकच कंपनी असल्याने नळ जोडणीच्या लाभार्थींची एकंदर संख्या 6 होते. महत्वाची बाब म्हणजे नळ जोडणीच्या देयकामध्ये सर्व लाभधारकांनी समान हिश्यांने देयकाची रक्कम अदा करावयाची होती असे नमुद नाही.
5. वरील नळ जोडणीच्या थकबाकीचा मुद्दा सा.वाले क्र.1 संस्थेच्या सर्वसाधारण सभा दिनांक 11.8.2007 यामध्ये चर्चेकामी घेण्यात आलेला होता. त्यामध्ये प्लॅाट क्र.3 व 5 या मधील सदनिका धारकांकडून वरील नळ जोडणीच्या थकबाकीची रक्कम वसुल करण्यात यावी अन्यथा नळ जोडणी रद्द करण्याबद्दल महापालिकेस कळविण्या यावे असा ठराव पारीत करण्यात आला. या ठरावाची प्रत तक्रारदारांनी तक्रारीसोबत निशाणी बी येथे दाखल केलेली आहे. त्यापूर्वी संस्थेच्या दिनांक 26.2.2007 रोजीच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीमध्ये देखील या मुद्यावर चर्चा करण्यात आलेली होती. व सदनिका प्लॅाट क्र.3 व 5 या मधील असलेल्या सदनिका/गाळेधारक यांनी आपसात चर्चा करुन पाणीपट्टीची थकबाकीची रक्कम महानगर पालिकेस अदा करावी असा ठराव पारीत करण्यात आला.
6. तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन असे दिसून येते की, तक्रारदार यांचा गाळा प्लॅाट क्र.3 मध्ये आहे. तर सा.वाले क्र.2 ते 7 यांच्या जागा प्लॅाट क्र.5 मध्ये आहेत. तक्रारदारांचे स्वतःचे कथना प्रमाणे दोन्ही प्लॅाटकरीता समाईक नळ जोडणी देण्यात आलेली होती. तथापी नळ जोडणीच्या लाभार्थींनी प्रत्येकी 1/7 या प्रमाणात पाणी पट्टीची रक्कम संस्थेकडे अदा करावयाची होती असा ठराव अथवा निर्णय पूर्वी कधीही झालेला दिसून येत नाही. महानगर पालिकेने दिलेल्या देयकामध्ये देखील तसा उल्लेख नाही. सहाजिकच तक्रारदार व सा.वाले क्र.2 व 7 यांचे दरम्यान वाद उपस्थित होऊन पाणी पट्टीची देय रक्कम दोन वर्ष थकबाकीत राहीली. महानगर पालिकेने परीणामतः नळ जोडणी रद्द केली व त्यानंतर तक्रारदारांनी तक्रारीचे परीच्छेद क्र. 27 मध्ये नमुद केल्याप्रमाणे थकबाकीची संपूर्ण रक्कम महानगर पालिकेस अदा केली. त्यानंतर तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली व त्यामध्ये संस्थेमार्फत सा.वाले क्र.2 ते 7 यांचेकडून पाणीपट्टीची त्यांचे हिश्याची रक्कम तक्रारदारांना वसुल करुन मिळावी व नुकसान भरपाई अदा करण्यात यावी या कामी प्रस्तुतची तक्रार दाखल केली.
7. वर नमुद केल्याप्रमाणे तक्रारदार व सा.वाले क्र.2 ते 7 हे एकाच नळ जोडणीचे समाईक लाभार्थी होते परंतु पाणी पट्टीची रक्कम अदा करण्याबद्दल त्यांचे दरम्यान कुठलाही करार झालेला नव्हता. सहाजिकच सा.वाले क्र.2 ते 7 व तक्रारदार यांचे दरम्यान ग्राहक व सेवा सुविधा पुरविणारे असे नाते निर्माण झाले नव्हते. संस्थेने आपल्या ठरावामध्ये नमुद केल्याप्रमाणे प्लॅाट क्र.3 व 5 मधील गाळेधारक समाईक लाभार्थी असल्याने त्यांनी चर्चा करुन आपली जबाबदारी निश्चित करणे आवश्यक होते. त्या प्रकारची चर्चा अथवा निर्णय पुर्वी कधी झालेला दिसून येत नाही. त्यामुळे पाणीपट्टीची थकबाकी राहीली व महानगर पालिकेने नळ जोडणी रद्द केली.
8. उपलब्ध पुराव्यावरुन तक्रारदारांची तक्रार ही सा.वाले यांचेकडून पाणीपट्टीची जादा अदा केलेली रक्कम तक्रारदारांना वसुल करुन मिळावी या बद्दल दाखल केलेली दिसून येते. ग्राहक संरक्षण कायद्याप्रमाणे रक्कम वसुलीकामी ग्राहक व सेवा सुविधा पुरविणारे असे नाते पूर्वी निर्माण झाले नसेल तर व त्या नात्या अंतर्गत व्यवहार झाला नसेल तर ग्राहक मंचास दाद देता येत नाही. सदरीत परिस्थितीमध्ये तक्रारदारांनी अन्य न्यायिक अथवा अर्धन्यायिक न्यायपिठाकडे दाद मागणे योग्य राहीले असते.
9. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन पुढील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 557/2008 रद्द करण्यात येते.
3. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात
याव्यात.
ठिकाणः मुंबई.
दिनांकः 07/06/2013