निकालपत्र
दिनांक 06.12.2013
(घोषित द्वारा ः-श्रीमती मजुंषा चितलांगे, सदस्या)
तक्रारदार श्रीमती सखुबाई सदाशिव ढाकणे यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये शेतकरी वैयक्तीक अपघात विमा योजने अंतर्गत लाभ व नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे,तक्रारदाराचे पती सदाशिव माधव ढाकणे हे मौजे सारुळ ता.केज जि.बीड येथील रहिवासी आहेत. तक्रारदार हे व्यवसायाने शेतकरी आहेत. तक्रारदार यांचे पती यांचा मृत्यू दि.09.07.2011 रोजी जनावरांना पाणी पाजण्यासाठी गावातील तलावाकडे गेले असता, एक वासरु हे पाण्यात पडल्याने त्यांचा जीव वाचवण्यासाठी ते तलावात पोहत गेले असता, पाण्यात बूडून त्यांचा मृत्यू झाला आहे. घटनेबाबत तक्रार चिंतामण ढाकणे यांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन घटनास्थळ पंचनामा तयार केला. मयताचे शवविच्छेदन करण्यात आले व त्यांचा अहवाल तयार केला.. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील सर्व शेतक-यांचा शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत विमा काढलेला आहे. तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.1 मार्फत विमा दावा दाखल केला. सामनेवाले क्र.1 यांनी दि.7.4.2012 रोजी पत्र पाठवून अपुर्ण कागदपत्रांची पूर्तता करण्याचे कळविले. तक्रारदाराने दि.13.4.2012 रोजी कागदपत्राची पूर्तता केली. त्यानंतर सामनेवाले क्र. 3 यानी दि.6.3.2012 रोजी तक्रारदाराला कळविले की, मयताचे वय 75 वर्ष पेक्षा जास्त होते म्हणुन नुकसान भरपाई देता येणार नाही. परंत तक्रारदाराने दि.28.5.2012 रोजी सामनेवाले यांना विनंती केली, त्यावर सामनेवाले क्र.3 यांनी दि.4.6.2012 रोजी उत्तर देऊन रक्कम देता येणार नाही असे कळविले. सर्व माहीती सामनेवाले क्र.1 यांना सांगितली असता त्यांनी ग्राहक मंचात तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला. विमा कालावधी दि.15.8.2010 ते 14.8.2011 पर्यतचा आहे. सामनेवाले क्र.1 ते 3 यांनी विमा दावा आजपर्यत मंजूर केला नाही. म्हणून तक्रारदार यांनी सदर तक्रार दाखल करुन तक्रारदाराला विमा रक्कम रु.1,00,000/- व्याजासह देण्यात यावेत व शारीरिक व मानसिक त्रासापोटी व तक्रारीच्या खर्चा वगैरे खर्च देण्यात यावा अशी मागणी केली आहे.
सामनेवाले क्र.1 हे मंचात हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे.तक्रारदारांचे पती यांचा मृत्यू दि.9.07.2011 रोजी पाण्यात बूडून झालेला आहे. महाराष्ट्र शासनाने शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत राज्यातील 10 ते 75 वयोगटातील शेतक-यासाठी दि.15.08.2010 ते 14.08.2011 या कालावधीसाठी काढलेला आहे. सदरचा विमा प्रस्ताव दि.3.11.2011 रोजी प्राप्त झाला. सदरचा प्रस्ताव दि.4.11.2011 रोजी सामनेवाले क्र.2 कडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविला आहे. नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी सामनेवाले क्र.3 यांची आहे. तक्रारदाराची तक्रार सामनेवाले क्र.1 विरुध्द खारीज करावी अशी विनंती केली आहे.
सामनेवाले क्र.2 हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे.विमा कालावधी मान्य आहे. माझी संस्था मध्यस्थ म्हणून काम करते. तक्रारदाराचा विमा दावा कागदपत्राची छाननी करुन सामनेवाले क्र. 3 कडे पाठविण्यात आलेला आहे. त्यामुळे त्यांचे सेवेत कोणतीही त्रूटी नाही म्हणून त्यांचे विरुध्दची तक्रार फेटाळण्यात यावी अशी विंनती केली आहे.
सामनेवाले क्र.3 हे स्वतः हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे.तक्रारदाराचे कागदपत्राचे अवलोकन केले असता तक्रारदाराचे पतीचे वय मृत्यू समयी 75 वर्षा पेक्षा जास्त असल्यामुळे त्यांचा दावा विमा कायदयाप्रमाणे दि.6.3.2012 रोजी नामंजूर केला.त्यामुळे तक्रारदाराच्या इतर तक्रारीस उत्तर देणे लागत नाही. म्हणून त्यांचे विरुध्दची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी अशी विनंती केली आहे.
तक्रारदार यांनी स्वतःचे शपथपत्र दाखल केले आहे.तसेच तक्रारीसोबत क्लेम फॉर्म, सातबारा उतारा व आठ-अ चा उतारा, मृत्यू प्रमाणपत्र, घटनास्थास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा,शवविच्छेदन अहवाल, वयाचे प्रमाणपत्र, विमा कंपनीचे पत्र, फेरफार रजिस्टर, इत्यादी कागदपत्र दाखल केली आहेत. सामनेवाले क्र.1 यांनी श्री.सुरेश बाळासाहेब खंदारे यांचे पुराव्याकामी शपथपत्र दाखल केले आहे. तसेच सामनेवाले क्र.3 यांनी श्री.विश्वास बन्सी गायकवाड यांचे शपथपत्र दाखल केले आहे.तक्रारदार यांचे वकील श्री.राजपूत यांचा यूक्तीवाद ऐकला, सामनेवाले क्र.3 यांना संधी देऊनही त्यांनी यूक्तीवाद केला नाही. न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1. तक्रारदार यांनी त्यांचे मयत पती त्यांचे वय मृत्यू
समयी 75 वर्षापेखा कमी होते ही बाब सिध्द केली
काय ? होय.
2. तक्रारदार हे तक्रारीतील मागणी मिळण्यास
पात्र आहेत काय ? होय.
3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुददा क्र.1 व 2 ः-
तक्रारदार यांचे वकील श्री.राजपूत यांनी यूक्तीवाद केला. तसेच तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्र यांचे अवलोकन केले असता तक्रारदार यांच्या मयत पतीच्या नांवे मौजे सारुळ ता.केज जि.बीड येथे शेत जमिन आहे. तक्रारदार हे शेती व्यवसाय करीत होते. त्यावरुन तक्रारदार यांचे मयत पती सदाशीव ढाकणे हे शेतकरी होते ही बाब सिध्द होते. पोलिस पेपरचे अवलोकन केले. तक्रारदार यांचे मयत पती हे पाण्यात पडलेल्या वासराचे जीव वाचविण्यासाठी तलावात पोहत गेले व तेथेच पाण्यात बूडून त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवाल यांचे अवलोकन केले. त्यावरुन तक्रारदार यांचे मयत पती यांचा मृत्यू पाण्यात बुडून झाला ही बाब सिध्द होते. तकारदार यांच्या पतीच्या मृत्यू बाबत सामनेवाले क्र.3 यांनी कोणताही आक्षेप घेतलेला नाही. यावरुन सामनेवाले क्र.3 यांना ही बाब मान्य आहे.
तक्रारदार यांने पतीच्या निधनानंतर सामनेवाले क्र.1 यांच्याकडे वैयक्तीक विमा अपघात योजनेचा लाभ मिळण्याकामी रितसर अर्ज दाखल केला. सामनेवाले क्र.1 यांनी सदर प्रस्ताव सामनेवाले क्र.2 मार्फत सामनेवाले क्र.3 म्हणजे विमा इन्शुरन्स कंपनीकडे पाठविला. सामनेवाले क्र.3 यांनी सदर प्रस्ताव हा दि.3.6.2012 रोजी निकाली काढला. तक्रारदार यांचे मयत पती यांचे वय 75 वर्षा पेक्षा जास्त असल्याकारणाने विमा रक्कम देता येत नाही असे सामनेवाले क्र.3 यांनी पत्राद्वारे तक्रारदार यांना कळविले आहे.
महाराष्ट्र सरकारने शेतकरी वैयक्तीक अपघात योजना ही शेतक-यांच्या हितासाठी राबविली आहे. सदर योजनेचा उददेश शेतक-याच्या वारसदारांना लाभ मिळावा असा आहे म्हणून इन्शुरन्स कंपनीने पुर्णपणे विचार करुन शेतक-याचा विमा दावा निकाली काढावा जेणेकरुन शेतक-यांना त्यांचा लाभ मिळावा.
तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्र यांचे अवलोकन केले. तसेच तक्रारदाराचे वकील श्री.राजपूत यांनी केलेला युक्तीवाद व सामनेवाले क्र.3 यांनी दाखल केलेला जवाब यांचे अवलोकन केले. तक्रारदार यांनी त्यांचे पती सदाशिव ढाकणे याचे वय मृत्यू समयी 75 वर्षा पेक्षा कमी होते ही बाब शाबीत करण्यासाठी तक्रारदार यांने ग्रामपंचायत सारुळ, पंचायत समिती केज ता.केज जि.बीड येथील मृत्यूचे नोंदणी फॉर्म दाखल केले आहे. त्या कागदपत्राचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, तक्रारदार यांचे मयत पती हे मृत्यू समयी 60 वर्षाचे होते. महाराष्ट्र शासनाने राबविलेली शेतकरी वैयक्तीक अपघात विमा योजना ही शेतक-याचे वय वर्ष 10 पासून ते 75 वर्षापर्यत लागू आहे. यावरुन मंचाचे असे मत आहे की, तक्रारदार यांचे मयत पती हे मृत्यू समयी 60 वर्षाचे होते. सबब, तक्रारदार हे शेतकरी व्यक्तीगत विमा योजने अंतर्गत रु.1,00,000/- विमा रक्कम मिळण्यास पात्र आहेत. सामनेवाले क्र.3 यांनी सदर दावा नाकारुन तक्रारदार यांना सेवा देण्यात त्रुटी ठेवली आहे. त्यामुळे तक्रारदारास मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला. शारीरिक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.2,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.1,000/- मिळण्यास पात्र आहेत.
मुददा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले क्र.3 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदार
यांना विमा दावा रक्कम रु.1,00,000/-(अक्षरी रुपये एक लाख फक्त)
निकाल कळाल्यापासून 30 दिवसांचे आंत दयावेत. सदरील रक्कम 30
दिवसांचे आंत न दिल्यास त्यावर द.सा.द.शे. 9 टक्के व्याज तक्रार
दाखल दि.21.12.2012 पासून संपुर्ण रक्कम वसुल होईपर्यत दयावे.
3. सामनेवाले क्र.1 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदार
यांना मानसिक व शारीरिक त्रासापोटी रक्कम रु.2,000/- व दाव्याच्या
खर्चापोटी रक्कम रु.1000/- दयावेत.
4. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्रीमती मंजुषा चितलांगे श्री.विनायक लोंढे
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड.