तक्रारदार : वकील श्री. एच.आर सिंग हजर.
सा.वाले : वकीलाचे क्लार्क श्री.सुरेश सरदिघी हजर.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
निकालपत्रः- श्री.एस.एस.व्यवहारे, अध्यक्ष. ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
न्यायनिर्णय
1. सा.वाले हे चारचाकी वाहनाचे उत्पादक तसेच चारचाकी वाहनांसाठी पत पुरवठा करणारी कंपनी असून आपला व्यवसाय टाटा मोटर्स या नांवाने मुंबई येथे करतात. सा.वाले यांचे कार्यालय तक्रारीत नमुद केलेल्या ठिकणी आहे.
2. तक्रारदार घाटकोपर, मुंबई येथे राहातात. तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडून दिनांक 7.3.2006 रोजी MH03F-1332 टाटा स्पायको हे चारचाकी वाहन विकत घेतले होते सदर वाहनाची किंमत रु.4,68,469/- येवढी होती व सदर किंमत रु.10,900/- प्रति महीना या प्रमाणे 48 सारख्या हप्त्यात सदर रक्कमेची परतफेड करावयाची होती. तक्रारदार यांचे असे म्हणणे आहे की, सदर वाहन विकत घेतेवेळी सा.वाले यांना रु.25,000/- व रु. 66,284/- चा धनादेश अशी रक्कम दिली होती. तक्रारदार यांचे असे कथन आहे की, चारचाकी वाहनाचे रक्कमेची परतफेड करतेवेळी रु.10,900/- प्रति महीनाप्रमाणे 18 हप्ते त्यांनी नियमित भरले होते. तसेच दिनांक 13.6.2007 रोजी रु.10,900/- व रु.21,000/- असेपण सा.वाले यांना दिले होते. असे असतानासुध्दा सा.वाले यांनी दिनांक 14.6.2007 रोजी तक्रारदारांचे वरील चारचाकी वाहन जप्त केले. ते परत मिळविण्यासाठी तक्रारदार यांनी सा.वाले यांचेकडे वारंवार खेपा घातल्या परंतु सा.वाले यांनी तक्रारदार यांचे सदर चारचाकी वाहन परत केले नाही. तक्रारदार यांचे असे कथन आहे की, त्यांनी चारचाकी वाहनाची रक्कम व्यवस्थित भरली असता व कोणताही हप्ता थकवला नसताना सा.वाले यांनी तक्रारदार यांचे वरील कंपनीचे चारचाकी वाहन जप्त केल्यामुळे तक्रारदार यांचे आर्थिक उत्पन्नाचे साधन नष्ट झाले व दिनांक 14.7.2000 पासून रु.15,000/- त्यांना 38 महीन्याचा तोटा सहन करावा लागला. तक्रारदार यांनी सा.वाले यांचेकडे वरील रक्कमेची वेळोवेळी मागणी केली असता सा.वाले यांनी तक्रारदार यांना लवादासमोर हजर राहण्यास सांगीतले. तक्रारदारांनी लवादासमोर हजर राहण्याचा खर्च सा.वाले यांचेकडे मागीतला असता त्यांनी तो देण्यास नकार दिला.
3. तक्रारदारांचे असे देखील कथन आहे की, सा.वाले यांनी तक्रारदार यांना विकलेले वाहन हे निकृष्ट दर्जाचे होते. सा.वाले यांनी त्यावर केवळ रंग रंगोटी करुन ते तक्रारदारांना विकले. त्यामुळे तक्रारदारांना नुकसान सहन करावे लागेले. तक्रारदार यांनी सा.वाले यांना दिनांक 6.3.2010 रेाजी नोटीसची बजावणी करुन चारचाकी वाहनासाठी नुकसान भरपाईची मागणी केली. नोटीसची पोच सा.वाले यांनी न देता तक्रारदारांच्या नोटीसीस उत्तरही दिलेले नाही. त्यामुळे सा.वाले यांची वरील कृती सेवा सुविधा पुरविकण्यात कसुर या कृतीत येत असल्यामुळे तक्रारदार यांनी सा.वाले यांचे कडून रु.5,75,000/- व त्यावर 12 टक्कके प्रमाणे होणारे व्याज व तक्रारीचा खर्च याची मागणी केली आहे.
4. सा.वाले यांनी आपली कैफीयत दाखल करुन तक्रारदारांचे म्हणणे व मागणे नाकारले. सा.वाले यांचे असे म्हणणे आहे की, तक्रारदारांच्या तक्रारीतील म्हणणे व मागणे खोटे व लबाडपणाचे असून सा.वाले यांचेकडून पैसे मिळण्याचे दृष्टीने केलेले आहे. तक्रारदारांचे म्हणणे म्हणजे सा.वाले यांनी तक्रारदार यांनी निकृष्ट दर्जाचे वाहन केवळ रंगरंगोटी करुन विकले हे म्हणणे सा.वाले नाकारतात. तसेच तक्रारदार यांनी सा.वाले यांचेकडून टाटा स्पायको हे वाहन विकत घेतले व त्यासाठी सा.वाले यांचेकडून रु.4,68,496/- येवढे कर्ज घेतले होते. तसेच सदर कर्जाची रकम रु.10,900/- प्रति महीन्याप्रमाणे 48 सारख्या हप्त्यात परत करावयाचे होते. ही बाब सा.वाले नाकारत नाही. परंतु तक्रारदार यांनी कर्जाची परतफेड नियमितपणे केली व कर्जाच्या परत फेडीत कोणताही खंड पडू दिला नाही हे म्हणणे सा.वाले साफ नाकारतात. सा.वाले यांचे असे म्हणणे आहे की, तक्रारदार यांनी सा.वाले चारचाकी वाहनासाठी कर्ज घेताना सा.वाले यांचे बरोबर केलेला करार व त्या करारातील अटी तक्रारदारांवर बंधनकारक आहेत. तसेच तक्रारार यांनी कर्जाची परतफेड नियमित न केल्यामुळे करारात नमुद केल्याप्रमाणे सा.वाले यांना तक्रारदार यांचे मालकीचे सदर वाहन जप्त करण्याचा अधिकार नाही. सा.वाले यांचे असे देखील म्हणणे आहे की, करारात नमुद केल्याप्रमाणे तक्रारदार व सा.वाले कर्जाच्या परतफेडीपोटी अथवा कर्जा संबंधी वाद निर्माण झाल्यास तो लवादाकडे सोडविण्यासाठी तरतुद असल्यामुळे तसेच लवादाचा निर्णय अंतीम असल्याबाबत उभय पक्षकारांनी मान्य केल्यामुळे सा.वाले यांनी कोणत्याही प्रकारे सेवा सुविधा पुरविकण्यात कसुर केलेली आहे. उलटपक्षी सा.वाले व तक्रारदार यांच्यातील वाद अवादासमोर निकाली काढावयाचा असल्यामुळे त्या बाबत तका्ररदार यांना लवादाकडून आलेल्या नोटीसीला तक्रारदारांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे तक्रारदार यांना सा.वाले यांचे विरुध्द सदर मंचासमोर दाद मागता येत नाही. सबब तक्रारदारांची तक्रार खर्चासह रद्द व्हावी.
5. तक्रारदार यांनी आपल्या तक्रारी सोबत पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद, सा.वाले यांचे कडून विकत घेतलेल्या चारचाकी वाहनाच्या विमा पॉलीसीची प्रत, सा.वाले यांना देण्यात आलेल्या पैशाच्या परत फेडी बद्दल पावत्या, तसेच तक्रारदार यांच्या बचत खात्याच्या उता-याची प्रत, तसेच सा.वाले यांनी तक्रारदार यांचे वाहन जप्त केल्याबाबतचे कागदपत्र, लवादा कडून तक्रारदार यांना आलेल्या नोटीसची प्रत, सा.वाले यांचे सोबत झालेल्या पत्र व्यवहाराच्या प्रती व सा.वाले यांना दिलेल्या नोटीसची प्रत तसेच सा.वाले यांचे सोबत झालेल्या कर्जाच्या कराराची प्रत व त्या बाबतचे सविस्तर विवरण दाखल केले आहे.
6. या उलट सा.वाले यांनी आपल्या कैफीयती सोबत पुरावा शपथपत्र, व लेखी युक्तीवाद दाखल केला.
7. प्रस्तुत मंचाने तक्रार, कैफीयत, कागदपत्रे, शपथपत्र व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले. तक्रारदारांचा तोंडी युक्तीवाद एैकण्यात आला. सा.वाले यांचेतर्फे दाखल केलेला लेखी युक्तीवाद हाच त्यांचा तोंडी युक्तवाद असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार तक्रारीचे निकालाकामी खालील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | तक्रारदारांच्या तक्रारीस मुदतीची बाधा येते काय ? | होय. |
2 | सा.वाले यांनी तक्रारदार यांना विकेलेल्या टाटा स्पायको हे चारचाकी वाहन बे कायदेशीर जप्त करुन सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिंध्द करतात काय ? | निरंक |
3 | तक्रारदार तक्रारीत मागीतलेल्या मागण्या मिळण्यास पात्र आहेत काय | नाही. |
4 | अंतीम आदेश ? | तक्रार रद्द करण्यात येते. येते. |
कारण मिमांसा
मान्य मुद्देः- तक्रारदार यांनी सा.वाले यांचेकडून टाटा स्पायको या कंपनीचे चारचाकी वाहन घेण्यासाठी रु.4,68,469/- येवढे कर्ज घेऊन सदरची रक्कम रु.10,900/- प्रति महीना या प्रमाणे 48 हप्त्यात फेडण्याचे कबुल करुन सदर व्यवहारा संबंधी सा.वाले यांचे बरोबर केलेला करार उभय पक्षकारांना मान्य आहे. तक्रारदार यांच्या मालकीचे चारचाकी वाहन सा.वाले यांनी दिनांक 14.6.2007 रेाजी जप्त केले ही बाब उभय पक्षकारांना मान्य आहे. तक्रारदार व सा.वाले यांच्या वरील व्यवहारा संबंधी तक्रारदार यांना लवादा कडून लवादा समोर चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते ही बाब सा.वाले तक्रारदार नाकारत नाहीत. तक्रारदार व सा.वाले यांच्यातील वरील नमुद कर्जाचे व्यवहाराकामी तक्रारदार यांनी सा.वाले यांना कर्जपुर्तीसाठी काही रक्कम दिली ही बाब सा.वाले नाकारत नाहीत.
8. तक्रारदार यांनी सा.वाले यांचेकडून घेतलेल्या वाहन खरेदीच्या कर्जापोटी कर्ज फेडीची रक्कम वेळोवेळी देऊन देखील सा.वाले यांनी तक्रारदार यांचे चारचाकी वाहन दिनांक 14.6.2007 रोजी जप्त केल्यामुळे सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब सिध्द करण्यासाठी तक्रारदार यांनी आपले पुरावा शपथपत्र व लेखी युक्तीवाद आणि अभिलेखात दाखल केलेली कागदपत्रे या वरुन असे सिध्द करण्याचा प्रयत्न केला की, सदर वाहन विकत घेतेवेळी सा.वाले यांना रु.25,000/- रोजी व रु.66,284/- वरु.1000/- असे धनादेशाव्दारे दिले होते. त्यानंतर मासिक हप्ता रु.10,900/- जे 48 हप्त्यात फेडावयाचे होते त्याचे पैकी 18 हप्ते तक्रारदारांनी नियमित भरले. याचे व्यतिरिक्त सा.वाले यांना दिनांक 14.6.2007 रोजी रु.21,000/- भरणा केला. त्यामुळे दिनांक 14.6.2007 रेाजी तक्रारदारांचे वरील वर्णणाचे चारचाकी वाहन जप्त करण्याची कृती ही बेकायदेशीर असून सेवा सुविधा पुरविण्यात कसुर आहे. तसेच सा.वाले यांनी तक्रारदारांचे वरील वर्णणाचे वाहन जप्त केल्यामुळे दिनांक 14.6.2007 पासून तक्रारदारांना उत्पानाचे साधन न राहील्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान झालेले आहे. त्यामुळे सा.वाले हे तक्रारदारांनी मागीतलेली नुकसान भरपाई व्याजासह देण्यास जबाबदार आहेत.
9. उलटपक्षी सा.वाले यांचेतर्फे पुरावा शपथपत्र व लेखी युक्तीवाद यांचेव्दारे तक्रारदारांची तक्रार ही मुदती बाहेर असल्यामुळे तसेच तक्रारदार हे संधी देऊन देखील लवादा समोर हजर न राहील्यामुळे या मंचासमोर तक्रार दाखल करु शकत नाहत असा लेखी युक्तीवाद करण्यात आला. तसेच तक्रारदार व सा.वाले यांचयातील करण्यात आलेला लेखी करार व सदर कराराच्या अटी या उभय पक्षकारांवर बंधनकारक असल्याने तक्रारदार यांनी कर्जाचा हप्ता थकीत केल्यामुळे कर्जाच्या करारात नमुद केल्याप्रमाणे सा.वाले यांना तक्रारदार यांचे वाहन जप्त करण्याचा कायदेशीर अधिकार आहे. त्यामुळे सा.वाले यांचे कडून कोणत्याही प्रकारे सेवा सुविधा पुरविण्यात कसुर होऊ शकत नाही.
10. उभय पक्षकारांतर्फे करण्यात आलेला युक्तीवाद व अभिलेखातील कागदपत्र यांचे अवलोकन केल्यानंतर असे आढळून येते की, तक्रारदार यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या मालकीची टाटा स्पायको हे चारकचाकी वाहन सा.वाले यांनी दिनांक 14.6.2007 रेाजी जप्त केले. तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार ही दिनांक 21.8.2010 रेाजी दाखल केली आहे. ग्राहक तक्रार कायदा कलम 24 (अ) प्रमाणे तक्रारीस घडलेल्या कारणापासून ग्राहकाने मंचासमोर दोन वर्षाचे आत तक्रार दाखल करणे बंधनकारक असते. सदरचे प्रकरणात तक्रारदारांनी तक्रार दाखल करण्यासाठी दोन वर्षापेक्षा अधिक कालावधी घेतला असल्याने व अभिलेखात विलंब माफीचा अर्ज नसल्याने तसेच तक्रारदारांनी मुदतीच्या कालावधीत तक्रार दाखल न करण्या संबंधी कोणतेही समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे तक्रारीस मुदतीची बाधा येते असे मंचाचे मत आहे.
11. प्रस्तुतच्या प्रकरणात तक्रारदारातर्फे सा.वाले यांना दिनांक 16.10.2009, 9.12.2009, व दिनांक 17.2.2010 रोजी पत्र पाठविण्यात आली. तसेच तक्रारदारांनी वकीलांमार्फत दिनांक 6.10.2010 रेाजी कायदेशीर नोटीस देखील पाठविली. परंतु सदरचा पत्र व्यवहार व वकीलांमार्फत पाठविलेली नोटीस या गोष्टी तक्रार दाखल करण्यासाठी आवश्यक असलेला मुदतीचा कालावधी लांबऊ शकत नाही असे मंचाचे स्पष्ट मत आहे. कारण सा.वाले यांनी तक्रारदार यांचे चारचाकी वाहन ज्या दिवशी जप्त करुन नेले त्या दिवशीच तक्रारीस कारण घडले असे मंचाचे स्पष्ट मत आहे. वरील सर्व गोष्टीचा विचार करुन तक्रारीस मुदतीची बाधा येते असे मंचाचे मत आहे. त्यामुळे मुद्दा क्र.1 होकारार्थी ठरविण्यात येतो.
12. तक्रारदारांची तक्रार मुदती बाहेर असल्यामुळे वास्तविक तक्रारीतील इतर गुणदोषांची चर्चा करणे आवश्यक नाही परंतु न्यायनिर्णयास पूर्णत्व देण्यासाठी तक्रारदार यांच्या कथनांचा विचार करता जरी तक्रारदारांचे असे म्हणणे असले की, त्यांनी सा.वाले यांना कर्जाची रक्कम वेळोवेळी व्यवस्थित दिलेली आहे व कर्जापोटी वाहन जप्त करण्याचे तारखेपर्यत रु.2,48,484/- येवढी रक्कम कर्ज परतफेडीपोटी केली आहे तरी तक्रारदार यांनी सा.वाले यांना कर्जासंबंधी करुन दिलेल्या कराराचे अवलोकन केले असता तक्रारदारांनी सा.वाले यांना रु.10,900/- प्रतीमहा या प्रमाणे 48 सारख्या हप्त्यांत कर्जाची परतफेड करावयाची होती. तक्रारदारांनीच दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन दिनांक 12.7.2006 पासून दिनांक 11.10.2007 पर्यत तक्रारदार यांनी रु.10,750/-, रु. 10,900/- , रु.25,900/- या रक्कमेचे वेळोवेळी दिलेले धनादेश तक्रारदार यांच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने सदर धनादेश न वटविता परत करण्यात आलेले आहेत. वरील वर्णनाचे धनादेश का वटले नाहीत याचे कोणतेही संयुक्तीक कारण तक्रारदार देऊ शकत नाहीत. तसेच कर्जाचे करारात नमुद केल्याप्रमाणे तक्रारदारांनी सा.वाले यांना धनादेशाची रक्कम नियमितपणे दिलेली नाही. वास्तविक कर्जाचा हप्ता रु.10,900/- असताना तक्रारदारांनी रु.10,750/- असे दिनांक 3.1.2007 , दिनांक 2.1.2007 व दिनांक 10.2.2007 रोजी का दिले या बद्दल देखील तक्रारदार यांचे कडून समाधानकारक उत्तर नाही. तक्रारदारांनी सा.वाले यांचे बरोबर दिनांक 14.8.2006 रेाजी केलेल्या पत्र व्यवहारावरुन तक्रारदारांनी विकत घेतलेले वाहन हे निकृष्ट स्वरुपाचे होते व त्यास वेळोवेळी दुरुस्तीची आवश्यकता होती असे दिसून येते. कदाचित वाहनातील सततच्या होणा-या बिघाडामुळे तक्रारदारांना कर्जाची परतफेड नियमितपणे करणे शक्य झाले नसेल असे मंचाचे मत झाले आहे. तक्रारदारांनी करुन दिलेल्या कर्जासंबंधीच्या करारात कर्जदाराने कर्ज रक्कमेची परतफेड ठरल्याप्रमाणे न केल्यास व कर्जाचे हप्ते थकविल्यास सा.वाले यांना वाहन जप्त करण्याचा अधिकार आहे असे कराराचे कलम 18 मध्ये नमुद केलेले आहे. परंतु सदर वाहन जप्त करण्या अगोदर सा.वाले यांनी तक्रारदार यांना नोटीस पाठविणे करारा प्रमाणे आवश्यक होते ते सा.वाले यांनी न केल्यामुळे सा.वाले यांची वाहन जप्त करण्याची कृती कायदेशीर ठरू शकत नाही. असे असले तरी तक्रारदारांचे तक्रारीस मुदतीची बाधा येत असल्यामुळे मुद्दा क्र.2 हा निरंक म्हणून ठरवावा लागतो.
13. वरील मुद्यांचा विचार करता तक्रारदारांची तक्रार रद्द करण्यात येते. म्हणून मंच खालील आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार क्रमांक 20/2010 रद्द करण्यात येते.
2. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात
याव्यात.
ठिकाणः मुंबई.
दिनांकः 06/01/2015