कोरम-
श्री.विनायक रावजी लोंढे अध्यक्ष
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
तक्रारदारातर्फे श्री.विजय बाबुलाल दर्जी वकील.
निकाल-पत्र
आदेश व्दारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्यक्षः
1. तक्रारदार अरुण शिवप्रकाश चांगरे यांनी सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 अन्वये सामनेवाला यांनी द्यावयाचे सेवेत त्रृटी ठेवली आहे म्हणुन नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केलेली आहे. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात येणेप्रमाणेः-
2. सदरील तक्रार दाखल केल्यानंतर सदरील तक्रार या मंचापुढे चालण्यास पात्र आहे काय असा मुद्या उपस्थित झाला. तक्रारदार यांचे वकील श्री.विजय दर्जी यांचा युक्तीवाद ऐकला. तक्रारदाराने दाखल केलेले संपुर्ण दस्तऐवजांचे अवलोकन केले. संपुर्ण दस्तऐवज व तक्रारीत नमुद केलेल्या बाबींचे अवलोकन केले असता, सदरील तक्रार या मंचासमोर दाखल करुन घेऊन चालण्यास पात्र आहे काय ? असा मुद्या उपस्थित होतो.
3. तक्रारदाराचे वकील श्री.विजय दर्जी यांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदाराने सामनेवाला फायनान्स कंपनीकडुन कर्ज घेऊन टाटा सुमो गाडी खरेदी केली होती. तक्रारदार हे सदर गाडी पुणे येथे घेऊन गेले असता दि.17/10/2014 रोजी पुण्याजवळ त्यांची गाडी अडवण्यात आली व बळजबरीने सदरील गाडी टाटा कंपनीचे गोडावुन ला घेऊन गेले व सदरील गाडीचा ताबा तक्रारदाराकडुन घेतला. तक्रारदाराला कोणतीही पुर्व सुचना न देता तक्रारदाराचे ताब्यातुन वाहन हिसकावुन घेतले. सदरील गाडी तक्रारदारास आज पर्यंत मिळाली नाही. तक्रारदार यांनी असेही म्हटले आहे की, तक्रारदारांना खात्रीशीर समजले आहे की, सदरील टाटा फायनान्स कंपनीने सदरील गाडी त्रयस्थ इसमास विकली आहे. तक्रारदाराचे वकीलांनी असा युक्तीवाद केला की, त्यांनी सर्व हप्ते वेळोवेळी भरलेले आहेत. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या दस्तांचे अवलोकन केले असता व खाते उता-याचे अवलोकन केले असता असे निर्दशनास येते की, तक्रारदार व सामनेवाला यांच्यामध्ये हायर-परचेस करार होऊन तक्रारदार यांनी कर्ज काढुन वाहन विकत घेतलेले आहे. तक्रारदार म्हणतात की, त्यांनी वेळोवेळी हप्ते भरलेले आहेत परंतु तक्रारदारांनी दाखल केलेले फायनान्स कंपनीचे रिपेमेंट केल्याचा खाते उतारा पाहीला असता, तक्रारदाराने दि.16/09/2013 पासुन ते दि.12/11/2014 पावेतो कोणताही हप्ता भरल्याचे दिसुन येत नाही व तशा पावत्याही तक्रारदाराने हजर केलेल्या नाहीत तसेच तदनंतरही तक्रारदाराने हप्ते भरल्याचे निर्दशनास येत नाही. सबब तक्रारदार व सामनेवाला यांच्यामध्ये झालेल्या कराराच्या अनुषंगाने तक्रारदार यांनी कर्जाचे हप्ते भरल्याचे निर्दशनास येत नाही. तक्रारदार व सामनेवाला यांचे हक्क व कर्तव्य सदरील कराराने बांधले गेले आहेत. तक्रारदाराने हप्ते न भरल्यास सामनेवाला यांना वाहन ताब्यात घेण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत त्या अधिकाराचा वापर करुन सामनेवाला यांनी तक्रारदाराचे वाहन ताब्यात घेतल्याचे निर्दशनास येते. सदरील बाबीचे अवलोकन केले असता सामनेवाला यांनी तक्रारदार यांना कोणती सेवा द्यावयास पाहीजे होती व कोणती सेवा देण्यात त्रृटी ठेवली आहे ही बाब तक्रारदाराने प्रथमदर्शनी शाबीत केली नाही. तक्रारदार हे ग्राहक आहेत असे जरी गृहीत धरले तरी तक्रारदार व सामनेवाला यांचे हक्क व कर्तव्य कराराने ठरवुन दिलेले आहेत व त्या दोघांना आपआपले कर्तव्य व हक्क कराराचे अधिन राहुन पुर्ण करावयाचे आहेत. तक्रारदाराने त्याचे कर्तव्य पुर्ण केल्याबाबत कोणताही पुरावा दाखल केला नाही. सबब या मंचाचे मत की, तक्रारदाराने सदरील तक्रार दाखल करण्यास प्रथमदर्शनी कोणतेही कारण घडलेले नाही त्यामुळे सदरील तक्रार दाखल करुन घेता येत नाही असे या मंचाचे मत आहे. सबब आदेश.
आ दे श
1) तक्रारदाराची तक्रार रद्य करण्यात येते.
2) खर्चाबाबत आदेश नाही.
ज ळ गा व
दिनांकः- 01/06/2015. ( श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.विनायक रा.लोंढे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगांव.