तक्रारदारातर्फे वकील ः- श्री. उदय पी. क्षिरसागर
विरूध्द पक्ष क्र 1 तर्फे वकील ः- एम.बी.रामटेके
विरूध्द पक्ष क्र 2 तर्फे वकील ः- श्री. एस.सी.तागडे
विरूध्द पक्ष क्र 3 तर्फे ः- एकतर्फा
(युक्तीवादाच्या वेळी)
निकालपत्रः- श्री. भास्कर बी. योगी अध्यक्ष, -ठिकाणः गोंदिया.
निकालपत्र
(दिनांक 31/08/2018 रोजी घोषीत )
1. तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल केलेले आहे.
2. तक्रारकर्तीच्ो तक्रारीचा आशय थोडक्यात असा आहे की, तिचे पती श्री. लक्ष्मीचंद आसाराम बिसेन यांची मालकीची मौजा. कु-हाडी ता. गोरेगांव जि. गोंदिया येथे भुमापन क्रमांक 424 ही शेतजमीन आहे. तक्रारीकर्तीचा पती हा शेतीचा व्यवसाय करीत होता. विरूध्द पक्ष क्र 1 हि विमा कंपनी असून शासनाच्या वतीने हे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत दावे स्विकारतात.
3. महाराष्ट्र शासनाने विरूध्द पक्ष क्रमांक 1 टाटा एआयजी जनरल इंन्शुरंन्स कं.लि. यांच्याकडे गोंदीया जिल्ह्यातील शेतक-यांचा विमा ‘शेतकरी जनता अपघात विमा योजना’ अंतर्गत विमा उतरविला होता आणि योजनेअंतर्गत अपघात विम्याचे प्रस्ताव विरूध्द पक्ष क्रमांक 2, 3 मार्फत विरूध्द पक्ष 1 ला सादर करावयाचे होते.
4. तक्रारकर्तीचे पती श्री. लक्ष्मीचंद आसाराम बिसेन दिनांक 04/06/2015 रोजी मोटर सायकलने मागे बसून जात असता मोटर सायकल घसरून पडल्याने जखमी होऊन उपचार दरम्यान दि. 06/06/2015 रोजी मरण पावले.
5. तक्रारकर्तीने अपघाताबाबतची कागदपत्रे व शेतीचा 7/12, फेरफार इत्यादी कागदपत्रांची जुळवाजुळव करून शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत पतीचे मृत्युपोटी विम्याची रक्कम रू. 1,00,000/- मिळावी म्हणून विमा प्रस्ताव विरूध्द पक्ष क्रमांक 2 कडे दिनांक 15/12/2015 रोजी सादर केला. मात्र विरूध्द पक्ष क्रमांक 1 ने सदर प्रस्तावावर कोणतीही कारवाई केली नाही. सदर तक्रार दाखल केली असून त्यात खालीलप्रमाणे मागणी केली आहे.
1. शेतकरी जनता अपघात विमा दाव्याची रक्कम रू.1,00,000/- विरूध्द पक्षाकडे प्रस्ताव सादर केल्याच्या दिनांकापासून म्हणजेच दिनांक 15/12/2015 पासून द. सा. द. शे. 18%
व्याजासह मिळावी.
2. शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल नुकसानभरपाई रू.30,000/- मिळावी.
3. तक्रारीचा खर्च रू. 15,000/- मिळावा.
6. तक्रारीचे पुष्ठ्यर्थ तक्रारकर्तीने विरूध्द पक्ष क्रमांक 2 द्वारे विमा दावा विरूध्द पक्ष क्रमांक 1 कडे पाठविल्याबाबतचे पत्र, विमा दाव्याची प्रत, फेरफार नमुना 8 7/12 चा उतारा, पतीच्या अपघाती निधनाबाबत पोलीस दस्तावेज, पोस्ट-मार्टेम रिपोर्ट, मृत्यु प्रमाणपत्र, वयाचा दाखला, तक्रारकर्तीने रितसर अर्ज दाखल केली. तसेच वेळोवेळी विरूध्द पक्षनी जे दस्ताऐवज मागीतले त्याची पुर्तता केली.
7. विरूध्द पक्ष क्रमांक 1 टाटा एआयजी जनरल इंन्शुरंन्स कं.लि. यांनी दि. 26/07/2017 वकीलामार्फत लेखी जबाब देण्यासाठी मुदतीचा अर्ज केला होता तरी देखील त्यांनी लेखी जबाब सादर केलेला नाही. विरूध्द पक्ष क्रमांक 3 कबाल इन्शुरन्स ब्रोकिंग सर्व्हीसेस यांना मंचाची नोटीस मिळूनही ते मंचात हजर झाले नाही. दि. 22/06/2018 रोजी त्यांचेविरूध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला
विरूध्द पक्ष क्रमांक 2 च्या वतीने लेखी जबाब व त्याची पुरसीस सादर केली.
8. तक्रारकर्तीचे पतीची तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे शेती होती व ते शेतकरी असल्याने शासनाकडून त्यांचा शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत विमा काढण्यात आल्याचे कबुल किंवा नाकबूल आजपर्यंत केले नाही. विरूध्द पक्ष क्र 1 शासनाकडून विमा प्रव्याजी घेतली असल्याने विम्याची रक्कम देण्याची जबाबदारी केवळ विमा कंपनीचीच आहे.
9. विरूध्द पक्ष क्रमांक 2 तहसीलदार, गोरेगांव जि. गोंदिया यांनी लेखी जबाब दाखल केला असून त्यांत म्हटले आहे की, तक्रारकर्तीने सदरचा प्रस्ताव यांना सादर केलेला नसून. मंडळ कृषि अधिकारी, गोरेगाव यांचे पत्र क्रमांक/मकृअ/अपघात विमा/649/2015 दि. 18/12/2015 अन्वये प्रस्ताव या कार्यालयास सादर केलेला होता. या कार्यालयाने सदर प्रस्ताव मा. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी गोंदिया यांना पत्र दि. 02/01/2016 अन्वये सादर केलेला होता. त्यांनी असेही म्हटले आहे की, तक्रारकर्तीचा दावा स्विकारून वरीष्ठ कार्यालयात सादर केलेला होता आणि तिच्या मागणीप्रमाणे नुकसानभरपाई मिळणे आवश्यक असून तिच्या मागणीशी ते सहमत आहेत. विरूध्द पक्ष क्रमांक 1 कडून दावा मंजुरी/नामंजुरीची माहिती त्यांना कळविली नव्हती.
10. तक्रारीच्या निर्णयासाठी खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष व कारणमिमांसा खालीलप्रमाणेः-
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | विरूध्द पक्षांनी सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार केला आहे काय? | होय |
2. | तक्रारकर्ती मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पात्र आहे काय? | अंशतः |
3. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | अंतिम आदेशाप्रमाणे |
- कारणमिमांसा –
12. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबतः- तक्रारकर्तीच्ो पती श्री. लक्ष्मीचंद आसाराम बिसेन यांची मालकीची मौजा. कु-हाडी ता. गोरेगांव जि. गोंदिया येथे भुमापन क्रमांक 424 ही शेतजमीन आहे. त्यांनी 7/12 चा उतारा या मंचात सादर केलेला आहे. तक्रारीकर्तीचा पती हा शेतीचा व्यवसाय करीत होता. विरूध्द पक्ष क्र 1 हि विमा कंपनी असून शासनाच्या वतीने हे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत दावे स्विकारतात.
तक्रारकर्तीचे पती श्री. लक्ष्मीचंद आसाराम बिसेन हे दिनांक 04/06/2015 रोजी मोटर सायकलने जात असता सुमारे 12.00 वाजता (दुपारी) मोटर सायकलने घसरून पडल्याने उपचार दरम्यान दि. 06/06/2015 रोजी मृत्यु पावले. त्याबाबत मर्ग खबरी पोलीस स्टेशन गोरेगांव, जि. गोंदिया यांनी 16/15 कलम- 174 जा.फौ. सर तर्फे एएसआय श्री. राजेंद्र डुंबरे मेंडिकल पोलीस बुथ नागपुर यांनी नोंदविले आहे. तसेच, घटनास्थळ पंचनामा, शवविच्छेदन अहवाल दस्त क्रमांक 5 वर दाखल केला आहे, त्यात मृतकाचा मोटर सायकल स्लिप होऊन, डोक्याला जबर मार लागल्याने जखमी असल्याचे नमूद आहे. सदर दस्तावेजांवरून श्री. लक्ष्मीचंद आसाराम बिसेन यांचा मोटर सायकल स्लिप होऊन, अपघाती मृत्यू झाला असल्याचे सिध्द होते.
विरूध्द पक्ष क्रमांक 2 तालुका कृषि अधिकारी, गोरेगांव यांनी लेखी जबाबात नमूद केले आहे की, तक्रारकर्तीच्या पतीचा दिनांक 06/06/2015 रोजी मोटर सायकल स्लिप होऊन, अपघाती मृत्यू झाल्यावर तक्रारकर्तीने विरूध्द पक्ष क्रमांक 1 कडे विमा प्रस्ताव सादर केलेला आहे. विरूध्द पक्ष क्रमांक 1 ने लेखी जबाब या मंचात सादर केलेला नाही. म्हणजे त्यांना काही म्हणायचे नाही. म्हणून Specific Denial केला नसल्याने तसेच आजपर्यंत स्विकारले किंवा नाकारले नसल्याने IRDA (PROTECITION OF POLICY HOLDER INTERESTS ) REGULATION 2002 नियमन क्र. 8 प्रमाणे दावा मिळाल्यानंतर इंन्शुरंन्स कं. यांनी विमा धारकाने त्यांचा विमा क्लेम स्विकारला किंवा नाकारला हे त्यांना कळविणे बंधनकारक आहे. तसेच, शेतकरी जनता अपघात विमा योजना सन 2014-2015 च्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे समर्थनीय कारणास्तव 90 दिवसानंतर प्राप्त दावे स्विकारावेत असे नमूद आहे. विरूध्द पक्ष क्र 1 यांनी वरील अधिनियम 2002 चे नियमन क्र. 8 व शेतकरी जनता विमा अपघात योजना यांच्या अटी व शर्तीचे पालन केले नसल्याने विरूध्द पक्ष क्र 1 यांनी तक्रारकर्तीला सेवा देण्यात कसुर केला आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 1 व 2 वरील निष्कर्ष होकारार्थी नोंदविला आहे.
13. मुद्दा क्र. 3 ः- मुद्दा क्रमांक 1 व 2 वरील विवेचनाप्रमाणे सदर प्रकरणातील विमित शेतकरी लक्ष्मीचंद आसाराम बिसेन याचा पॉलीसी कालावधीत अपघाती मृत्यु झाला असल्याने त्याची वारस विधवा तक्रारकर्ती श्रीमती गिताबाई लक्ष्मीचंद बिसेन ही विमा दाव्याची रक्कम रू. 1,00,000/- (दिनांक 15/12/2015 त्रुटींची पूर्तता करून प्रस्ताव सादर केल्यानंतर मंजुरीसाठी लागणारा 3 महिन्यांचा वाजवी कालावधी सोडून) म्हणजे 15/03/2016 पासून प्रत्यक्ष अदायगीपर्यंत द. सा. द. शे. 9% व्याजासह मिळण्यास पात्र आहे. याशिवाय शारीरिक व मानसिक त्रासाबाबत नुकसानभरपाई रू. 10,000/- आणि तक्रारीचा खर्च रू. 5,000/- मिळण्यास देखील पात्र आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 3 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविले आहेत.
वरील निष्कर्षास अनुसरून मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरूध्द पक्ष 1 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला तिच्या मृतक पतीच्या शेतकरी जनता अपघात विम्याची रक्कम रू.1,00,000/- (दिनांक 15/12/2015 त्रुटींची पूर्तता करून प्रस्ताव सादर केल्यानंतर मंजुरीसाठी लागणारा 3 महिन्यांचा वाजवी कालावधी सोडून) म्हणजे 15/03/2016 पासून प्रत्यक्ष अदायगीपर्यंत द. सा. द. शे. 9% व्याजासह दयावे.
3. विरूध्द पक्ष 1 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून रू. 10,000/- आणि तक्रारीच्या खर्चापोटी रू. 5,000/- द्यावे.
4. विरूध्द पक्ष 1 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी उपरोक्त आदेशाचे पालन आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांचे आंत करावे.
5. विरूध्द पक्ष 2 व 3 यांचेविरूध्द कोणताही आदेश नाही.
6. आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामूल्य पुरविण्यात यावी.
7. प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ प्रत तक्रारकर्तीला परत करावी.