निकाल
दिनांक- 26.09.2014
(द्वारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्यक्ष)
तक्रारदार रंजना दिलीप वैरागे यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाला यांनी आम आदमी विमा योजनेअंतर्गत सेवा देण्यात त्रुटी ठेवलेली आहे म्हणून नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली आहे.
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात येणेप्रमाणे, तक्रारदार यांचे पती नामे दिलीप वैरागे हे तक्रारदार यांचे सोबत मौजे नायगाव ता.केज येथे राहात होते दि.23.09.2010रोजी तक्रारदार यांचे पती बाबासाहेब भुजंग यांचे शेतात तणनाशक फवारणी करता कामावर गेले होते. तणनाशक औषधी फवारणी करत असताना वा-यामुळे मयत दिलीप यांचे नाकातोंडात गेले व त्यांना विषबाधा झाली. तक्रारदार यांचे पती यांना सरकारी दवाखान्यात शरीक करण्यात आले त्यांचेवर उपचार चालू असताना दि.23.09.2010 रोजी ते मयत झाले. पोलीसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली व तपास केला. पोलीसांनी घटनास्थळावर जाऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. मयत दिलीप यांचेवर मरणोत्तर पंचनामा तयार करण्यात आला. शवविच्छेदन करण्यात आले.
केंद्र सरकारने आम आदमी विमा योजना राज्यात राबवली आहे. केंद्र व राज्यसरकार यांनी विम्याच्या हप्त्याची रक्कम भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच सामनेवाला क्र.3 यांचेकडे भरलेली आहे. सदरील योजनेचे लाभार्थी ग्रामीण भागातील भूमीहीन कुटूंबातील वयोगट 18 ते 59 व कुटूंब प्रमुख किंवा कमावता व्यक्ती मयत झाल्यास सदरील योजनेचा लाभ देण्यात येतो. तक्रारदार यांनी त्यांचे पती मयत झाल्यानंतर आम आदमी विमा योजनेअंतर्गत लाभ मिळण्यासाठी सामनेवाला क्र.1 व 2 यांचे मार्फत प्रस्ताव सामनेवाला क्र.3 यांचेकडे पाठविला. सामनेवाला यांनी दि.23.04.2012 रोजी पत्र पाठवून त्रुटी पूर्ण करण्यास सांगितले. दि.30.06.2012 रोजी सामनेवाला क्र.3 यांनी रक्कम रु.30,000/-चा चेक नं.140464 तक्रारदार यांना पाठविला. तक्रारदार यांचे पतीचा मृत्यू अपघातामध्ये झाल्यामुळे रक्कम रु.75,000/- मिळणे क्रमप्राप्त ठरते. तक्रारदार यांनी दि.09.07.2013 रोजी सामनेवाला क्र.1 यांच्याकउे उर्वरीत रक्कम रु.45,000/- मिळण्यासाठी अर्ज केला व त्रुटी बाबत पुर्तता केली. मयताचा व्हीसेरा रिपोर्ट बाबत पत्र दाखल केले. सामनेवाला यांनी तक्रारदार यांचे क्लेमचा पुनर्विचार केला नाही व उत्तर ही दिले नाही. सामनेवाला क्र.3 यांनी तक्रारदार यांना विम्याची पूर्ण रक्कम न देऊन सेवेत त्रुटी ठेवलेली आहे. सबब तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.3 यांना उर्वरीत रक्कम रु.45,000/- देण्याचे आदेश व्हावे. तक्रारीचा खर्च मिळावा व शारिरिक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळावी म्हणून विनंती केलेली आहे.
सामनेवाला क्र.1 हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी निशाणी 10 अन्वये आपले लेखी म्हणणे सादर केले. सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदार यांचे तक्रारीतील कथन मान्य व कबूल आहे. सामनेवाला क्र.1 यांचे कथन की, नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी सामनेवाला क्र.3 ची आहे. महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकार पुरस्कृत आम आदमी योजना राबवलेली आहे. ग्रामीण भागातील भूमीहीन कुटूंबातील 18 ते 59 वयोगटातील रोजगार करणारा कुटूंब प्रमुख किंवा त्या कुटूंबातील एक कमावता व्यक्ती प्रतीसदस्य रु.200/- विमा सामनेवाला क्र.3 यांच्याकउे उतरविलेला आहे. सदरील रक्कम मिळणेकामी लाभार्थीने तहसिलदार यांच्याकउे अर्ज करुन तो अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत विमा कंपनीकउे पाठविला जातो. नैसर्गिक मृत्यू झालेला असल्यास रक्कम रु.30,000/- व अपघाती मृत्यू झालेला असल्यास रक्कम रु.75,000/- दिल्या जाते. तक्रारदार यांनी उर्वरीत रक्कम मिळण्यासाठी दिलेला अर्ज विमा कंपनीकडे पाठविलेला आहे, तो अर्ज सामनेवाला क्र.3 कडे प्रलंबित आहे.
सामनेवाला क्र.2 हे महाराष्ट्र शासन असल्यामुळे सामनेवाला क्र.1 व 2 हे शासकीय कार्यालय आहे. त्यामुळे सामनेवाला क्र.2 ची लेखी कैफियत अभिप्रेत नाही.
सामनेवाला क्र.3 हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी निशाणी 19 अन्वये आपले लेखी म्हणणे सादर केले. सामनेवाला क्र.3 यांचे कथन की, तक्रारदार यांचा क्लेम प्राप्त झाल्यानंतर सामनेवाला क्र.3 यांनी कागदपत्राची फेर तपासणी केली. तक्रारदार यांचे पतीचा मृत्यू अपघाती झाल्याबाबत कागदपत्र हजर केले नाही. म्हणून सामनेवाला क्र.3 यांनी तक्रारदार यांना रक्कम रु.30,000/- नुकसान भरपाई पाठवली. तक्रारदार यांचे पतीच्या मृत्यूचे कारण हे अपघाती नसून नैसर्गिक आहे. तक्रारदार यांना सदरील तक्रार दाखल करण्याचा अधिकार नाही. तक्रारदार यांनी पुरेसे कागदपत्र पाठविले नसल्यामुळे तक्रारदार यांना त्यांचे पतीचा मृत्यू अपघाती झाल्याबाबत नुकसान भरपाई दिली नाही. सबब तक्रारदार यांची तक्रार रदद करण्यात यावी.
तक्रारदार यांनी निशाणी 4 सोबत कागदपत्र हजर केले आहे. तक्रारदार यांनी स्वतःचे शपथपत्र निशाणी 21 वर हजर केले आहे. सामनेवाला क्र.3 यांनी निशाणी 16 सोत शासकीय परिपत्रक हजर केले आहे व पुराव्याकामी सक्षम अधिका-यांचे शपथपत्र दिले आहे. तक्रारदार यांचे वकील श्री.राजपूत यांचा युक्तीवाद ऐकला. सामनेवाला क्र.3 यांचे वकील श्रीकुलकर्णी यांचा युक्तीवाद ऐकला. न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1) तक्रारदार यांचे पतीचा मृत्यू अपघातामुळे झाला,
ही बाब तक्रारदार यांनी शाबीत केली आहे काय? होय.
2) सामनेवाला क्र.3 यांनी विम्याची पूर्ण रक्कम न
देऊन सेवेत त्रुटी ठेवली आहे, ही बाब तक्रारदार
यांनी शाबीत केली आहे काय? होय.
3) तक्रारदार हे तक्रारीत केलेली मागणी मिळण्यास
पात्र आहे काय? होय.
4) आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुददा क्र.1 ते 3 ः- तक्रारदार व सामनेवाला यांनी दाखल केलेले शपथपत्र व कागदपत्र याचे अवलोकन केले असता खालील बाबी विषयी वाद नाही. तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.3 यांचेकडे सामनेवाला क्र.1 व 2 यांचेमार्फत आम आदमी विमा योजनेअंतर्गत लाभ मिळण्यासाठी प्रकरण दाखल केले होते. सामनेवाला क्र.3 यांनी तक्रारदार यांना रक्कम रु.30,000/- अदा केलेले आहे.
तक्रारदार यांचे वकील श्री.राजपूत यांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदार यांचे पती मजूरी करत होते. दि.23.09.2010 रोजी ते बाबासाहेब भुजंग यांचे शेतात तणनाशक औषधांची फवारण करण्यासाठी गेले होते. वा-यामुळे तणनाशक औषधी तक्रारदार यांचे पतीचे नाकात व तोंडात गेले व त्यांना विषबाधा झाली, ते उपचार घेत असताना मयत झाले. तक्रारदार यांचे पतीचा मृत्यू अपघाती झालेला आहे. सामनेवाला यांनी आम आदमी विमा योजनेअंतर्गत पूर्ण लाभ न देऊन सेवेत त्रुटी ठेवलेली आहे. तक्रारदार यांचे वकीलांनी या मंचाचे लक्ष तक्रारदार यांनी दाखल केलेले पोलीस पेपर, शवविच्छेदन अहवाल, यावर वेधले व तक्रारदार यांचे पतीचा मृत्यू हा अपघाती झालेला आहे. त्यामुळे आम आदमी विमा योजनेअंतर्गत संपूर्ण रक्कम मिळण्यास तक्रारदार पात्र आहे.
सामनेवाला क्र.3 यांचे वकील श्री.कुलकर्णी यांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदार यांचे पतीचा मृत्यू हा अपघाती झाला आहे ही बाब तक्रारदार शाबीत करु शकलेले नाही. तक्रारदार यांचे पतीने औषध प्राशन केले असावे व आत्महत्या केली असावी त्यामुळे तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाही. तसेच श्री.कुलकर्णी वकील यांनी पुढे असा युक्तीवाद केला की, सामनेवाला यांनी कागदपत्राची पाहणी केली असता औषध फवारणी करत असताना ते तक्रारदार यांचे पतीच्या पोटात जाणे शक्य नाही, त्यामुळे मृत्यू होणे शक्य नाही. तक्रारदार यांनी वैद्यकीय विश्लेषण शाळेचा रिपोर्ट हजर केला नाही. त्यामुळे मृत्यूचे खरे कारण कळू शकले नाही. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना रक्कम रु.30,000/- दिलेले आहे उर्वरीत रक्कम मिळण्यास तक्रारदार पात्र नाही. सबब तक्रारदार यांची तक्रार रदद करण्यात यावी.
तक्रारदार व सामनेवाला यांनी दाखल केलेले शपथपत्र व कागदपत्राचे अवलोकन केले. तक्रारदार यांचे पतीचा मृत्यू अपघाती झाला किंवा काय? ही बाब निश्चित करणे बाबत या मंचाने तक्रारदार यांनी दाखल केलेले पोलीस पेपरचे अवलोकन केले. मरणोत्तर पंचनान्यामध्ये विषारी औषध पिल्यामुळे मृत्यू झाला परंतू शवविच्छेदन होऊन अभिप्राय करण्याकरता शव पाठविल्याचे नमुद आहे. तक्रारदार यांनी शवविच्छेदन अहवाल दाखल केला आहे, शवविच्छेदन अहवालामधील परिच्छेद नं.20 याचे बारकाईने अवलोकन केले असता शवविच्छेदन करताना मयताच्या पोटामध्ये काय आढळून आले हे पाहणे गरजेचे आहे. मयताच्या पोटामध्ये 300मि.ली. ग्राम रंग असलेले द्राव आढळून आले, त्याचा वास रॉकेल सारखा येत होता व इतर अवयव आकुंचन झालेले होते. शवविच्छेदन करताना व्हीसेरा राखून ठेवला होता तसेच मयताच्या रक्ताचा नमुना तपासणीसाठी काढून घेतला होता. तक्रारदार यांनी सदरील नमुन्याचा अभिप्राय मिळण्यासाठी पोलीसाकडे अर्ज केलेला आहे परंतू तो त्यांना प्राप्त झालेला नाही. तक्रारदार यांनी दाखल केलेले शवविच्छेदन अहवाल पाहिले असता तक्रारदार यांचे पतीचा मृत्यू हा विषामुळे झालेला आहे. तक्रारदार यांचे पती हे बाबासाहेब भुजंग यांच्या शेतात तणनाशक फवारणी करण्याकरता गेले होते, ते फवारणी करत असताना त्यांचा नाकातोंडात वा-यामुळे औषध जाऊन त्यांना विषबाधा झाली सदरील बाब ही पोलीस पेपरवरुन निदर्शनास येते. सामनेवाला क्र.3 यांचे कथन की, तक्रारदार यांचे पतीचा मृत्यू अपघाती झाला ही बाब सिध्द होत नाही. सोबत दाखल केलेल्या कागदपत्राचे अवलोकन केले असता तक्रारदार यांचे पतीचा मृत्यू अपघाती झाला आहे हे प्रथमदर्शनी निदर्शनास येते. ज्या वेळेस दोन शक्यता निर्माण होतात, त्यावेळेस तक्रारदार यांचे हितासाठी जी शक्यता असते ती गृहीत धरणे उचित होईल. केंद्र शासनाने आम आदमी विमा योजना ही ग्रामीण भागातील भूमीहीन कुटूंबातील 18 ते 59 वयोगटातील रोजगार करणारा कुटूंब प्रमूख किंवा त्या कुटूंबातील एक कमावती व्यक्ती असल्यास लाभ देण्याविषयी निकष लावलेले आहे. सदरील योजना ही लाभार्थ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळावा या उददेशाने राबवली आहे. तक्रारदार यांचे पती कुटूंबात एकटे कमावते होते, त्यांचा विषारी औषधामुळे मृत्यू झाला, तो मृत्यू आत्महत्या केल्यामुळे झाला आहे, ही बाब जरी सामनेवाला यांनी म्हटली आहे तरी त्याबाबत पुष्टी देणारा पुरावा सामनेवाला यांनी दिला नाही. म्हणून तक्रारदार यांचे पतीचा मृत्यू हा अपघाती झाला आहे असे हया मंचाचे मत आहे. सबब तक्रारदार हे नुकसान भरपाई रक्कम रु.75,000/- मिळण्यास पात्र आहे. सामनेवाला क्र.3 यांनी तक्रारदार यांना रक्कम रु.30,000/- अदा केलेले आहे. उर्वरीत रक्कम रु.45,000/- मिळण्यास तक्रारदार पात्र आहे. सबब मुददा क्र.1 ते 3 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येत आहे.
2) सामनेवाला क्र.3 भारतीय आयुर्विमा महामंडळ यांना आदेश
देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदार यांना आम आदमी विमा
योजनेअंतर्गत विमा दाव्याची उर्वरीत रक्कम रु.45,000/-
(अक्षरी रुपये पंचेचाळीस हजार फक्त) निकाल कळाल्यापासून
30 दिवसाचे आत दयावेत, सदर रक्कम विहीत मुदतीत न
दिल्यास त्यावर तक्रार दाखल तारखेपासून संपूर्ण रक्कम वसूल
होईपर्यत द.सा.द.शे.9 टक्के व्याज द्यावे.
3) सामनेवाला क्र.3 यांनी तक्रारदार यांना झालेल्या मानसिक
व शारिरिक त्रासापोटी नुकसान भरपाई रु.1,000/- (अक्षरी
रुपये एक हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रु.500/-
(अक्षरी रुपये पाचशे) दयावेत.
4) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील
कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला
परत करावेत.
श्रीमती मंजूषा चितलांगे, श्री.विनायक लोंढे,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड